Author: bittambatami.com

ठाणे पालिकेची २६७ कोटींची विक्रमी कर वसुली

ठाणे :  पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाई सेवा उपलब्ध करून दिली होती, तसेच सवलती अन् वेळेत ग्राहकांच्या प्राप्त झालेल्या देयकांमुळे १ एप्रिल ते १५ जून या तीन महिन्यांच्या कालावधीत २६७ कोटींची विक्रमी वसुली झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली, तर मागील वर्षी याच कालावधीत २५३ कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १३ लाख १४ हजार रुपये अधिक वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेने करदात्यांना मालमत्ता कर भरण्याची योजना १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविली होती. त्यानुसार करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीतील मालमत्ता कराची रक्कम दुसऱ्या सहामाहीच्या करासह एकत्रितपणे जमा केली, तर दुसऱ्या सहामाहीतील करदात्यांना सामान्य करात १० टक्के सवलत दिली होती. या कालावधीतील रक्कम १६ ते ३० जून या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी करदात्यांना सामान्य कर रकमेवर ४ टक्के सवलत जाहीर केली होती. आयुक्त सौरभ राव म्हणाले की, या सवलतीला करदात्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सामान्य करातील १० टक्के सूट आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. कर वसुलीच्या उपाययोजना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक/करदात्यांना मालमत्ता संबंधित ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये करदात्यांना त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातून मालमत्ता कराशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या मालमत्तेवर किती कर थकीत आहे. किती दंड असेल, तर किती मालमत्ता कर भरावा लागेल, याची उत्तरे महापालिकेच्या वेबसाइटवरून नागरिकांना घरबसल्या मिळतील, अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात येऊन कोणालाही भेटण्याची गरज भासू नये, यासाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. विभाग समिती कार्यालयातील संकलन केंद्र महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे म्हणाले की, मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व विभाग समिती कार्यालयांत संकलन केंद्रे सुरू केली आहेत. मालमत्ताधारक सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केंद्रावर येऊन मालमत्ता कर भरू शकतात. याशिवाय ऑनलाईन कर भरण्याची सुविधाही सुरू आहे. करदात्यांना त्यांच्या देयकाची संगणकीकृत प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे किंवा प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रातून मिळू शकते, तसेच या लिंकद्वारे, करदाते इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲपद्वारे त्यांचा मालमत्ता कर ऑनलाइन जमा करू शकतात.

मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश मुंबई : पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कामांसाठी ज्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे, त्यांना कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिला जाणार आहे. पावसाळ्यामुळे काँक्रिटीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत. सध्या कार्यादेश देऊनही मागील वर्षी शहर भागातील कामे रखडली होती. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा यापूर्वीच मागवल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कंत्राट दिले नव्हते. आता मात्र लोकसभा निवडणूक संपल्यामुळे कंत्राट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कंत्राटदारांशी चर्चा करून अंतिम कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सगळी कामे पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहेत. पुन्हा आचारसंहिता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता रस्त्यांच्या कामात अडथळा ठरेल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. १) शहर विभाग ९७ किमी २) पूर्व उपनगर ७० किमी ३) पश्चिम उपनगर २५३ किमी रस्त्यांची कामे १) २०२२-२३ सालासाठीचा खर्च शहर – १३६२ कोटी ३४ लाख ६ हजार २) पूर्व उपनगर-  ८६४ कोटी १७ लाख ६१ हजार ३) पश्चिम उपनगर – ३ हजार कोटी २०२५ सालापर्यंत सर्व रस्ते काँक्रीटचे मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार ६०७८ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 000000

कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट

पहिल्या ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास   मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८० हजारांहून अधिक वाहने धावली. वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान एका मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यानची मार्गिका खुली झाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आठ ते दहा मिनिटे लागत असल्याने मुंबईकर कोस्टल रोडला पसंती देत आहेत. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास १२ मिनिटांत करता येईल. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची (कोस्टल रोड) वरळी ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिण मार्गिका मार्चमध्ये खुली झाली, तर उत्तर मार्गिका ११ जूनपासून सुरू झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. दक्षिण वाहिनीवरून पहिल्याच दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १५ हजार ८३६ वाहनांनी प्रवास केला होता, तर उत्तर वाहिनीवरून पहिल्या दिवशी २० हजार वाहने मार्गस्थ झाली. कोस्टल रोड (मरिन ड्राइव्ह ते वरळी-दक्षिण वाहिनी)- वाहनांची संख्या- १) मार्च २०२४- २,६३,६१० २) एप्रिल २०२४ – ४,३६,१५० ३) मे २०२४- ५,२८,५१९ ४)  ११ जून -२०,४५० मरिन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास जुलैनंतर कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ८९.६७ टक्के काम पूर्ण झाले असून, जुलैपर्यंत वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जुलैअखेर वांदे वरळी सी-लिकचा प्रवास करणे शक्य होणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांदे हा प्रवास फक्त १२ मिनिटांत करता येईल. 00000

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची चौवार्षिक निवडणूक २१ जुलैला होणार

अध्यक्ष अजितदादा पवार यांची वार्षिक सभेत घोषणा   मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची चौवार्षिक निवडणूक २१ जुलै २०२४ रोजी होणार. असे राज्य संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी वार्षिक सभेत जाहीर केले. राज्य कबड्डी संघटनेची वार्षिक सभा  १८जून २०२४ रोजी सकाळी दादर येथील कबड्डी महर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी सभागृहात होऊन विषय पत्रिकेवरी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी अजितदादा पवार होते. होणारी निवडणूक ही प्रचलित घटने प्रमाणे पण क्रीडा संहितेला आधारभूत ठेवून घेतली जाईल असे पवार म्हणाले.  निवृत्त न्यायधीश दिलीप जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीला या सभेने मंजुरी दिली. या निवडणुकी करीता संलग्न २५ जिल्हा संघटनेकडून प्रत्येकी चार(४) प्रतिनिधींची नावे (त्यात एक महिला प्रतिनिधींचे नाव असणे आवश्यक राहील) राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका परीपत्रकाद्वारे मागविली आहेत. शासनाच्या क्रीडा आचार संहितेचा सर्वांनी मान राखून त्याची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्राची क्रीडा परंपरा फार जुनी असून ती देखील जोपासली गेली पाहिजे असे ते पुढे म्हणाले. या सभेला पदाधिकारी, प्रतिनिधी, आजीव सदस्य, खेळाडू असे सर्व मिळून २०० सदस्य हजर होते. त्यात मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार अमरसिंह पंडित, शकुंतला खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती एका पत्रकाद्वारे संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली. 000000

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे – सुनिल तटकरे

अहमदनगर : आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगर जिल्हयातून केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तिथपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी या अहमदनगर जिल्ह्यातून झाली म्हणून या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना यापूर्वी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तसाच पुन्हा एकदा अजितदादाला पाठिंबा देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. याच आधारावर लोकसभा निवडणूक राज्यात लढली गेली शिवाय ही निवडणूक अक्षरशः ग्रामपातळीवर नेऊन ठेवली गेली. मात्र असे असताना नगर शहराचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना ३२ हजाराचे लीड देत या सगळ्यावर मात करून दाखवले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. पक्षाचा कार्यकर्ता हा धोरण समोर ठेऊन आणि नेता जे काम करतो ती भूमिका घेऊन काम करत असतो त्यावेळी नेत्याच्या त्या संवेदना घेऊन लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचायचे असते असेही सुनिल तटकरे म्हणाले. यापुढे सर्वांनी जबाबदारीचे भान लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच विरोधकांनी ज्यापद्धतीने गैरसमज पसरवले आहे ते कसे चुकीचे आहे हे लोकांना सांगायची गरज आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना सुनिल तटकरे यांनी केले. अजितदादांचे नेतृत्व व्यापकतेने पुढे न्यायचे असेल तर अजितदादांना ताकद देणे गरजेचे आहे. जनाधार वाढवण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे असा विश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले. भाजपकडे जाऊन सत्तेत सहभागी होणार होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. यापुढे सर्व घटकांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही हे आपण सांगत आहोतच परंतु लोकसभा निवडणुकीत जे जे घटक बाजूला गेले आहेत त्या घटकांना सोबत आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. योग्य भूमिका घेऊन लोकांसमोर गेलो तर पक्षाचे व्यापक हित जोपासणारे आणि जो आपल्यासाठी दिवसरात्र काम करतोय त्याला जनमानसात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. निवडणूक विकासावर लढली गेली नाही मात्र यावेळी लोकसभेत आलेले अपयश विसरुन किंवा झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यशाची पायरी नक्की मिळवू असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. या आढावा बैठकीत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप यांनी आपले विचार मांडले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, फ्रंटल सेल व प्रमुख तसेच जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी अहमदनगर दक्षिण ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहूरी  यामधील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतला. विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार संग्राम जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 000000

कोकणच्या विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करा – आनंद परांजपे

ठाणे : कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते,  ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पदवीधर मतदारांना केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव  डावखरे हे कोकण पदवीधर निवडणुकीत उभे आहेत. गेली १२ वर्ष विधानपरिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना उत्कृष्ट अशी कामगिरी ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी केली आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे शिक्षणाचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे कोकणातील विविध प्रश्न विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ते सोडविण्याचा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी प्रयत्न केला. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. २६ जून २०२४ रोजी मतदान आहे. माझी कोकणातील सर्व पदवीधरांना विनंती आहे की येत्या २६ जूनला न विसरता मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि ॲड निरंजन वसंतराव डावखरे यांच्या नावासमोरील एक सरळ उभी रेष काढून आपले अमूल्य मत त्यांना देऊयात आणि कोकणच्या विकासासाठी  पुन्हा एकदा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करुन कोकण विकासाची हमी घेऊयात, असे आवाहन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सर्व पदवीधर मतदाराना केले आहे. ०००००

पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’- निरंजन डावखरे

ठाणे : केलेली कामे पूर्णत्वास नेली असल्याचा अहवाल ‘कर्तवपथा’तुन मांडण्यात आला आहे तर पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ प्रकाशित करण्यात आल्याची माहिती, ठाणे शहरातील विविध शाळा कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरें यांनी दिली. येणाऱ्या सहा वर्षाच्या काळासाठी महत्वाकांक्षी व्सिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. या व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. यासाठी शासकीय योजना आणि MEDHA च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत. हे व्हिजन डाॅक्युमेंट लागू करण्यासाठी येत्या २६ जुनला कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत निवडून देण्याची विनंती महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध शाळा काॅलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना केली. यावेळी नौपाडा येथील सरस्वती स्कूल, शिवसमर्थ विद्यामंदिर, चरई येथील मावळी मंडळ,, श्रीरंग विद्यालय, माजीवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्था हायस्कूल, वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल, घोडबंदर रोड येथील लोढा वर्ल्ड हायस्कूल या शाळांतील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांच्या सभांना मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, साहित्यिक नरेंद्र पाठक, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ०००००

मेधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने

ठाणे : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले आहे. आंदोलनाच्या नेत्या मा. मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह दि, १५ जून २०२४ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम असून त्यांना देशभरातून लाखो लोकांचे समर्थन मिळत आहे.मधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. पुनर्वसना शिवाय डुब नाही. सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे. सरदार सरोवर बाधित आदिवासी, शेतकरी, मजूर आणि नर्मदा खोऱ्यातील सर्व भूमिहीन समुदायांनी अहिंसक सत्याग्रही म्हणून संघर्ष केला आणि पुनर्वसनाचा हक्क, जीवन आणि उपजीविकेचा हक्क मिळवला. भूमिहीन, स्त्रिया, भूमीधारक, मत्स्य कामगार, आदिवासी, कुंभार इत्यादींचाही कायदेशीर आणि सामूहिक कृतीं मुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात उदारीकरण केलेल्या राज्य धोरणांमुळे समावेश झाला. कालांतराने सुमारे ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. तथापि, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही काही शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबे आहेत, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे.असे असूनही नर्मदा न्यायाधिकरणाच्या पुरस्काराचे, कायद्याचे आणि धोरणाचे उल्लंघन करून, निमाड, मध्य प्रदेशच्या मैदानी भागातील वरची गावे आणि एका टाऊनशीपसाठी बॅकवॉटरची पातळी बदलण्यात आली. पात्र कुटुंबांच्या यादीतून १५९४६ कुटुंबांना वगळण्यात आले. परंतु त्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली. त्यांचे सर्व सामान उध्वस्त झाले. गुरेढोरे आणि माणसं मरणासन्न झाली !! अधिकाऱ्यांशी संघर्ष आणि संवादानंतर त्यांना काही मदतीची रक्कम मिळाली, पण अद्याप पूर्ण भरपाई मिळालेली नाही २०२४ चा पावसाळा दारात आलेला असताना पुढचे पाऊल म्हणून नर्मदा बचाव आंदोलन सत्याग्रहाची सुरुवात करत आहे. आंदोलनाच्या रास्त मागण्या खालीलप्रमाणे आहेत., केंद्रीय जल आयोगाने १९८४ मध्ये अंदाजित केलेली आणि २०२३ मध्ये ती बरोबर असल्याचे सिध्द झालेली बॅकवॉटरची पातळी ( जुनी ) स्वीकारा., बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या., कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा., रिक्त पदांवर पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण, मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा., वरील कामे पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा.वरील मागण्या घेऊन जिल्हाधिकारी  ह्यांना भेटून हे निवेदन मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांना निवेदन द्यावं. मागण्या मान्य करण्यासाठी खालील संस्था संघटने तर्फे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्देशने करण्यात आली.ह्या निर्दशनास जगदीश खैरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस, श्रमिक जनता संघ, डॉ. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक, भारत जोडो अभियान, नरेश भागवाने, महासचिव, बहुजन विकास संघ, लिलेश्र्वर बनसोडे, निमंत्रक, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति, निर्मला पवार,  भारतीय महिला फेडरेशन, सुब्रतो भट्टाचार्य स्वराज अभियान, ठाणे हर्षलता कदम, अध्यक्ष, समता विचार प्रसारक संस्था, नितीन देशपांडे उपाध्यक्ष, धर्मराज्य पक्ष ह्या संस्था संघटना सहभागी झाले होते. हे निर्देशन यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, सुनिल दिवेकर, गणेश चव्हाण ह्यांनी मेहनत घेतली. 000000

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर   ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

कोकण पदवीधर-शिक्षक मतदारांना २६ जूनला विशेष नैमित्तीक रजा मंजूर-अमोल यादव

अशोक गायकवाड   नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी पदवीधर-शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/ पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/ शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. या रजे बाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर- शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. 00000