Author: bittambatami.com

 करंजाडेतील पाणी प्रश्न लागणार मार्गी

सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश राज भंडारी पनवेल : सन २०१९ पासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्नाने ग्रासले होते. त्यातच करंजाडे ग्रामपंचायतीत दीड वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. सरपंच मंगेश शेलार हे मुळातच पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊनच निवडणुकीला सामोरे गेले होते. अखेर करंजाडेचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या आठवडाभरात करंजाडेकरांना उच्चदाबाने मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. गेली अनेक वर्षे सतावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्याविरोधात मोर्चा काढावा लागेल, असा इशारा दिला असल्याची माहिती करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी गुरुवारी (दि.१३ जून) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह जेष्ठ नेते कर्णा शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. करंजाडेचा पाणी प्रश्न निकालात न निघाल्यास पावसाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार महेश बालदी यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना दिल्यानंतर सिडकोचे एमडी श्री.सिंगल व पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांनी येत्या चार दिवसांत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नवीन जलवाहिनीतून करंजाडेचा पाणीपुरवठा सुरू करतो, जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी एमजेपीच्या अधिकार्‍यांनीसुद्धा नवीन लाईनवरून पाणीपुरवठा सुरु करण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच करंजाडे व पुनर्वसन नोडमधील रहिवाशांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून मंगेश शेलार यांनी माहिती दिली. तसेच यावेळी नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करीत नागरिकांचे आभार मानले. 00000

म्हाडाच्या भूखंडावरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात

विलेपार्ले येथील फलक आज हटवणार मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात झाली. आतापर्यंत ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले असून विर्लेपार्ले येथील अनधिकृत जाहिरात फलकावर पहिला हातोडा पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने मुंबई मंडळाने फलक हटविण्याच्या कामाला काही वेळापूर्वी सुरुवात केली आहे. घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेनंतर म्हाडाने सर्व विभागीय मंडळांना आपल्या अखत्यारितील भूखंडावरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले होते. मुंबई मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले आहेत. हे सर्व फलक वांद्रे विभागात आहेत. म्हाडाच्या भूखंडावर जाहिरात फलक लावण्यासाठी संबंधित म्हाडा विभागीय मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र असेल तरच पालिकेला जाहिरात फलक लावण्यास परवानगी देता येते. असे असताना मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न घेता महापालिकेच्या परवानगीने म्हाडाच्या भूखंडावर ६० फलक लावण्यात आल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यानंतर मुंबई मंडळाने पालिकेला पत्र पाठवून तात्काळ हे जाहिरात फलक हटविण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार अखेर आता अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास सुरवात झाली. पालिकेच्या मदतीने अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत. पहिली कारवाई मौजे विलेपार्ले (ता. अंधेरी) येथील भूखंड क्रमांक ३६, विलेपार्ले शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्था येथील अनधिकृत जाहिरात फलकाविरोधात होणार आहे. काही वेळातच फलक हटविण्याच्या कारवाईस सुरुवात होणार आहे. उर्वरित फलक हटविण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. 00000

कल्याण-डोंबिवलीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्ती उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने घेतला आहे. मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उत्पादनावर भर द्यावा आणि भाविकांनी अशा मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पालिका हद्दीत गणेश मूर्तींचे उत्पादन, विक्री करण्यासाठी मूर्तिकार, कारागिर, विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जे मूर्तिकार, विक्रेते, कारागिर पालिकेकडे नोंदणी करणार नाहीत, त्यांना पालिका हद्दीत मूर्ती विकण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० च्या सुधारित नवीन मार्गदर्शक कायद्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याचे काटेकोर पालन कल्याण डोंबिवली पालिकेकडून केले जाणार आहे. मूर्तिकार, उत्पादक, कारागिर, विक्रेते यांना मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू करणे, मूर्ती विक्रीसाठी मंच लावणे यासाठी परवानगी देण्यासाठी पालिका प्रभाग कार्यालयांमध्ये नियोजन केले जाणार आहे. जे अशाप्रकारची परवानगी घेणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कारवाई करतील, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले आहे. पालिका परवानगीची प्रत प्रत्येक मूर्तिकार, कलाकार, विक्रेत्यांनी कारखाना, दुकानाच्या दर्शनी भागात लावावी. पर्यावरणपूरक, शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून सहज पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांना भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. जे या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिला आहे. मूर्तिकार बैठक कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उत्पादनावर भर देण्यात यावा. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची असलेली बंदी, तसेच पीओपीच्या वापराचे दुष्परिणाम याविषयावर मूर्तिकार, कारखानदार, विक्रेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शुक्रवार, १४ जून रोजी,दुपारी चार वाजता अत्रे रंगमंदिरातील सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले आहे. 000000

 मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात

एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय  मतदारांची आतापर्यंतची एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी झाली  अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. मुंबई पदवीधर मतदार संघात  मुंबई शहर स्त्री 12 हजार 873 व पुरुष 17 हजार 969 तर तृतियपंथी 1, मुंबई उपनगर स्त्री 36 हजार 838 व पुरुष 52 हजार 987 तर तृतियपंथी 5 असे एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार आहेत.  मुंबई शिक्षक मुंबई शहर स्त्री 02 हजार 14 व पुरुष 511 तर तृतियपंथी 0, मुंबई उपनगर स्त्री 09 हजार 872 व पुरुष 03 हजार 442 तर तृतियपंथी 0 असे एकूण 15 हजार 839 मतदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री 12 हजार 987 व पुरुष 15 हजार 930 तर तृतियपंथी 8, ठाणे जिल्हा स्त्री 42 हजार 478 व पुरुष 56 हजार 371 तर तृतियपंथी 11, रायगड जिल्हा स्त्री 23 हजार 356 व पुरुष 30 हजार 843 तर तृतियपंथी 9, रत्नागिरी जिल्हा स्त्री 09 हजार 228 व पुरुष 13 हजार 453 तर तृतियपंथी 0, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री 07 हजार 498 व पुरुष 11 हजार 053 तर तृतियपंथी 0, असे एकूण 2 लाख 23 हजार 225 नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या आहेत. 00000

रस्त्यावरील सुमारे 450 मुले यावर्षी जाणार शाळेत

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील 450-500 बालकांना यंदाच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम येत्या गुरुवारी, दि.20 जून 2024 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. रस्त्यावरील बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. साधारणतः 170 रस्त्यावरील बालकांना सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले 6 ते 7 महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. सदर बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या सर्वांना परिपाक म्हणून साधारणतः यावर्षी सन 2024 – 2025 च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी 450 ते 500 बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत. या बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र  महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास आयुक्त उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच सन 2023-24 या वर्षात 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील 50 मुलांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे. 000000

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा बुरूज ढासळला

कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या प्रवेशव्दारावरील दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूज गुरूवारी रात्री ढासळला. रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला. कोणीतीही हानी यात झाली नाही. गुरुवारी पडलेल्या पावसाच्या माऱ्याने बुरूजाचा काही भाग खचून हा बुरूज ढासळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील डाव्या बाजुला हा बुरूज आहे. शुक्रवारी पहाटे नागरिक दुर्गाडी किल्ल्यावर येऊ लागले. त्यावेळी त्यांना बुरूजाचा दर्शनी भाग कोसळला असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ कल्याण, डोंबिवली शहरात वाऱ्यासारखी पसरली. दुर्गाडी किल्ला हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत येत असला तरी त्यावर नियंत्रण पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. पाच वर्षापूर्वी दुर्गाडी किल्ल्याचे दोन बुरूज ढासळले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बुरूजांची डागडुजी करून ते सुस्थितीत केले होते. बुरूजावरील नवीन कामाला भेगा पडल्या आहेत. आता या नादुरुस्त भागाची देखभाल केली नाहीतर पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती इतिहासप्रेमींंनी व्यक्त केली. दुर्गाडी किल्ला हा निव्वळ दगडावर उभा नसून या किल्ल्याचा काही भाग मातीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती खचू लागली की असे प्रकार होऊ शकतात, असे एका जाणकाराने सांगितले. दुर्गाडी किल्ल्याच्या दोन्ही बाजुने २४ तास जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचे दणके अप्रत्यक्षपणे किल्ल्याला बसत असतात. त्याचाही हा परिणाम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निधी पडून दुर्गाडी किल्ला सुस्थितीत आणि देखणा असावा म्हणून शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ला नुतनीकरण कामासाठी २५ कोटीचा निधी गेल्या वर्षी मंजूर केला आहे. या निधीतील साडे सात कोटीचा निधी शासनाने प्रत्यक्ष कामासाठी मंजूर केला आहे. परंतु, या निधीतून वर्ष उलटले तरी दुर्गाडी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले नाही, असे दुर्गप्रेमींनी सांंगितले. शिवाजी महाराजांनी पहिल्या आरामाराची स्थापना कल्याणमध्ये केल्याचे इतिहासकार सांगतात. या आरामाराच्या किनारी दुर्गाडी किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हे ऐतिहासिक वैभव टिकून ठेवण्यासाठी शासनाने दुर्गाडी किल्ल्याच्या नुतनीकरण, संंवर्धनाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचीन बासरे यांनी केली. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवी मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ, सभोवताली बुरूज आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पातून दुर्गाडी किल्ल्याच्या बाजुला खाडी किनारी नौदल आरमार उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रेक्षणिय आणि प्रदर्शनीय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष ना. का. आहेर यांच्या कार्यकाळात दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती. बुरूज सुस्थिती करण्यात आले होते. आता बराच काळ लोटला असल्याने दुर्गाडी किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची आहे ते अस्तित्व कायम ठेऊन नव्याने बांधणी होणे आवश्यक आहे. अन्यथा असे पडझडीचे प्रकार सुरूच राहतील. – श्रीनिवास साठे, कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक. 0000000

प्रशासकांकडून ई रिक्षाच्या चार्जिंग स्पॉटची पाहणी

माथेरान : नुकताच हातरीक्षा चालकांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक मोठया प्रमाणावर या स्वस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी देण्यात आली असून उर्वरीत ७४ नवीन ई रिक्षा लवकरच सध्याचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर हातरीक्षा मालकांना मिळणार आहेत. ई रिक्षांना चार्जिंग करण्यासाठी एकूण तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यातील दस्तुरी नाक्यावर २,कम्युनिटी हॉल परिसरात ५ आणि नगरपरिषदेच्या आवारात ५ ई रिक्षांना चार्जिंग करण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत वीस ई रिक्षांना चार्जिंग साठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य ठिकाण असणाऱ्या कम्युनिटी हॉल परिसरात आणखीन चार्जिंग व्यवस्था करण्यात यावी यासाठी ई रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. यावेळी अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, चालक रुपेश गायकवाड, किशोर सोनावले, अक्षय वैद्य,सिताराम शिंदे, दीपक डोईफोडे, मारुती कदम, दिलीप कदम, शैलेश भोसले,विजय कदम आदी उपस्थित होते. रिक्षा संघटनेची आवश्यक सूचना लक्षात घेऊन आम्ही नगरपरिषदेच्या अभियंत्यांना याबाबतीत माहिती देऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. राहुल इंगळे — प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद ०००००

 राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म फॅक्टर प्रभावी ठरल्याचे भविष्यासाठी घातक

 कपिल पाटील यांचे मत मुरबाड : लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर प्रभावी ठरला, हे देशाच्या भविष्यासाठी घातक आहे, असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी काल येथे व्यक्त केले. भिवंडी व शहापूरपाठोपाठ कपिल पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिकांबरोबर गुरुवारी संवाद साधला. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, भास्कर जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभेच्या निवडणुकीत काही जणांनी जातीच्या नावावर, तर आपण राष्ट्राच्या नावाने मते मागितली. आपण मोदीजींचे कार्य पाहून मतदानाचे आवाहन केले, तर त्यांनी धर्माच्या नावाने मतांची मागणी केली. आपले राष्ट्र व कार्यही चालले नाही. देश व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर चालला, तो देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. देशभरात तीन प्रमुख फॅक्टर चालविले गेले. त्यात भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळाल्यावर, मुस्लिमांना भारत सोडून जावे लागेल, अशी भीती दाखविली गेली. केरळमधून सुरू झालेले अभियान देशभरात पोचविले गेले. केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममधून भिवंडीत आलेल्या काही विशिष्ट लोकांनी ९० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. देशाच्या विविध भागात हा फॅक्टर चालविला गेला. दलित बांधवांना संविधान बदल आणि आदिवासी बांधवांना आरक्षण रद्द होणार असल्याचे भासविले गेले. या तीन फॅक्टरप्रमाणे भिवंडी मतदारसंघात जातीचा फॅक्टर सुरू होता. त्याचबरोबर भाजपाच्या जवळच्या लोकांनी विरोधी कार्य केले. सर्व फॅक्टर चालूनही आपल्या कार्यकर्त्यांनी नीट काम केले असते, तर नक्कीच पराभव झाला नसता, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. मुरबाड विधानसभा क्षेत्रात महायुतीला कमी मतांसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांना पाणी पाजून मुरबाड विधानसभा मतदारसंघात ३२ हजारांची आघाडी मिळविण्याचे कार्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले. या श्रेष्ठ ताकदीच्या कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, असे आवाहनही श्री. कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. ०००००

 १६ हजार रहिवाशांची पात्रतानिश्चिती जुलैपर्यंत

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास मुंबई :  रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू असून तब्बल १६ हजार ५७५ रहिवाशांची पात्रता निश्चिती १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या रहिवाशांची १,६९४ घरे रिकामी करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. ही घरे रिकामी झाल्यानंतर सप्टेंबरपासून पूर्वमूक्त मार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपर छेडानगर आनंदनगर, ठाणे असा विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या प्रकल्पासाठी रमाबाई आंबेडकर नगर येथील १,६९४ घरे बाधित होत होती. त्यामुळे एमएमआरडीएने बाधित घरांसह संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प राबवित आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने १६ हजार ५७५ रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण करून आता परिशिष्ट २ तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. त्यांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता उर्वरित रहिवाशांची पात्रता निश्चिती १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जुलैमध्ये निविदा खुल्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएने आचारसंहितेआधी मार्चमध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. जुलैमध्ये या निविदा खुल्या करून वास्तूशास्त्रज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करून आराखडा तयार केला जाणार आहे. एकूणच रमाबाई आंबेडकर नगराच्या पुनर्विकासाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड

राहुल शेवाळे बदनामी प्रकरण मुंबई : माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने गुरुवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच, ही रक्कम शेवाळे यांना दहा दिवसांत देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे आणि संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. हा अर्ज करण्यासाठी झासेसा विलंब माफ करण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ठाकरे आणि राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र, त्याचवेळी, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले. महानगरदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ठाकरे आणि राऊत यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी विशेष न्यायालयासमोर न्यायालयात धाव घेतली आहे व महादंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. 00000