Author: bittambatami.com

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी सहा विद्यार्थी स्पर्धेत

मुंबई : राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी यंदा सहा विद्यार्थी स्पर्धेत आहेत. राज्यातील १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले असून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून अवघ्या २२ हजार ८३३ जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्यात उपलब्ध असलेल्या जागांच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांना वेगळा पर्याय निवडावा लागणार आहे. यंदा नीटमध्ये महाराष्ट्रातून १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी, २०२३ च्या नीटमध्ये महाराष्ट्रातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले होते. २०२४ च्या नीटमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील २५१ संस्थांमध्ये अवघ्या २२ हजार ८३३ इतक्या जागा आहेत. त्यातही तुलनेने परवडणाऱ्या अशा सरकारी ३६ संस्थांमध्ये ४२१० जागा, सरकारी अनुदानित २५ संस्थांमध्ये १९६८, तसेच १९० विनाअनुदानित संस्थांमध्ये १६ हजार ६५५ जागा आहेत. नीटमध्ये पात्र ठरणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे अधिक असतो. राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७ हजार ३२४ जागा असून, त्यात सरकारी महाविद्यालयांमध्ये ३३९० जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ७६४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३१७० जागा आहेत. बीडीएससाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये २११ जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ६४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २४०० अशा २६७५ जागा आहेत. बीएएमएस अभ्यासक्रमाच्या ७ हजार ८५७ जागा असून, यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ५५५ जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ९८७ आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६३१५ जागा आहेत. त्याचप्रमाणे बीएचएमस अभ्यासक्रमासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये ५४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४५४० अशा ४५९४ जागा आहेत. बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वात कमी जागा उपलब्ध आहेत. बीयूएमएससाठी सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये १५३ आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २३० अशा ३८३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारी व चांगले वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागणार आहे. दरम्यान गत वर्षामध्ये राज्यामध्ये काही नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असून, काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तुकडी वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांची नोंद झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विशेषत: एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत गटनेतेपदी मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. पक्षाला मिळणाऱ्या मंत्रिपदात पुत्राचा विचार केला जाणार नाही, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सन्मान केला. शिंदे गटाच्या खासदारांनी इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात राहू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने महायुतीत १५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर विजय मिळाला. श्रीकांत शिंदे ( कल्याण) नरेश म्हस्के ( ठाणे) बुलढाणा ( प्रतापराव जाधव) औरंगाबाद ( संदीपान भुमरे) हातकणंगले (धैर्यशील माने) श्रीरंग बारणे (मावळ) आणि रवींद्र वायकर ( वायव्य मुंबई) बैठकीला उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळावे, ही अपेक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. तरुण आणि पारदर्शी कारभाराचे उमेदवार विधानसभेला देण्यात येतील, अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राज्यातील जनतेत राज्य सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. तो लोकसभा निवडणुकीत प्रकट झाला. विधानसभा निवडणुकीतही या रोषाचा मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसेल, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते- पाटील, भास्कर भगरे हे खासदार हजर होते. सुप्रिया सुळे आणि नीलेश लंके नियोजित कार्यक्रम असल्याने येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे अजित पवार गटात अस्वस्थता आहे. त्यातून अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याचा दावा पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याविषयी जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले. आमचे आमदार तिकडे गेले तरी लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल आमच्या बाजूने आहे. आमदार गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे पक्षाला फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले. पिपाणी चिन्हाला सरासरी ४५ ते ५० हजार मतदान झाले आहे. एकट्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला १ लाख ३ हजार मते मिळाली. पिपाणीचा प्रचार तुतारी असा केला गेल्याने आम्हाला फटका बसला. पिपाणी चिन्हाविषयी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. रविवारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक ९ जून रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. १० जून हा पक्षाचा स्थापना दिन अहमदनगर शहरात होणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने अहमदनगर शहरात पक्षाची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

कामगार नेते स्व. श्याम म्हात्रे यांचा ९ जून रोजी स्मृतिदिन कार्यक्रम

पनवेल : दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे यांचे सहावे पुण्यस्मरण ९ जून रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु. श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्व. शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकीतून त्यांची कन्या श्रुती म्हात्रे यांनी प्रति वर्षी विविध उपक्रम राबविले आहेत. रविवारी 9 जून रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी खांदा कॉलोनी सेक्टर 8 मधील गार्डन व्हू सोसायटीमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 10 वाजता आयोजित कारण्यात आला असल्याची माहिती कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी दिली. विविध पक्षातील नेते कार्यकर्ते समस्त कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील विविध ठिकाणातील रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार हे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पाण्यासाठी माजी विरोधीपक्ष नेते शानू पठाण बसले आयुक्तांच्या दारात

अनिल ठाणेकर ठाणे : मुंब्रा – कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही.  पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त  झालेले मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू)…

महावितरणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचाही सहभाग कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी सायंकाळी उत्साहात साजरा झाला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महावितरणच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन तसेच कल्याण स्थापत्य मंडलांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या संयुक्त जंयती महोत्सवाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवताना लेखक जगदिश ओहोळ यांचे प्रभावी व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले. तर त्यानंतर ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या व्यावसायिक नाटकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे निखळ मनोरंजन करताना त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, संदिप पाटील, विजय मोरे, दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, हविषा जगताप, उपसंचालक सुमीत कुमार, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लिपिक गणराज वाळींबे यांनी केले.

‘शिवरायांचा राजभिषेक अखंड प्रेरणस्त्रोत ठरावा’

इतिहास संकलक आप्पा परब ठाणे : १६४२ ते १६७० दरम्यानच्या २८ वर्षांत शिवरायांची राजधानी घाटमाथ्यावर होती़  नंतर ती कोकणात (रायगड) नेली़ १४ जानेवारी शिवरायांचा पहिला राजाभिषेक झाला़ नंतर दुसरा आणि तिसरा १६७४ मध्ये झाला़ राजाभिषेकासाठी शिवराय विरासनात बसले़ ज्या आसनावर राजाभिषेक विधीवत संपन्न झाला़ त्या आसनावर आसनस्थ होण्यापूर्वी शिवरायांनी बैलाचे, वाघाचे , सिंहाचे आणि बोक्याचे कातडे आंथरले होते़  आज सघ्य शिखरीच्या राजाचा ३५० वा श्री. शिवराजाभिषेक स्मृती सोहळा ठाण्याच्या संकृति परिवार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शतायुषी-सेवाभावी श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात साजरा होत आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे मनोगत ७५ वर्षीय जेष्ठ  इतिहास संकलक आप्पा परब यांनी व्यक्त केले. गु्रूवारी सकाळच्या सत्रात हा सोहळा  संपन्न झाला. संकृति परिवार सामाजिक संस्थेने आप्पा परब यांचा ‘‘जिवन गौरव ’’ पुरस्काराने डॉ. सच्चिदानंद शेनडे यांच्या हस्ते सत्कार केला. या प्रसंगी सौ. अनुराधा  परब, सुकन्या शिल्पा परब, कार्यवाहक सविता कावले, संयोजक विनोद ढगे, सुधाताई ढगे आदी मान्यवर उपास्थित होते . उत्त्तरार्धात पुष्पा ताई लेले संचालित शिवस्तुतीवर आधारित स्वरसंवादिनी भजनी मंडळाने वीर गीतांचा संगीत कार्यक्रम व श्री आनंद भारती मार्गावरुन संवाद शिवप्रतिमा पालखी मिरवणुक काढण्यात आली. शिवप्रेमीचा उत्स्फुर्त प्रतिसाद साडेतीनशेव्या श्री शिवराजाभिषेक स्मृती सोहळ्यास लाभल्याबदल श्री आनंद भारती समाज  संस्थेचे कार्यवाहक विवेक मोरेकर व संस्कृति परिवारातर्फे विनेाद ढगे यांनी आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक

अमीत सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षदेखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक अमीत सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी, विजयाचा विश्वास व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे.  शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अमीत सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमीत सरैय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारासंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमीत सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे. मनसेच्या माघारीबाबत विचारले असता, मनसे हा संपलेला पक्ष आहे. सेटींग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमीत सरैया म्हणून काम करीत आहे, असेही सरैया म्हणाले. दरम्यान,  जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमीत सरय्या यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर,  महेंद्र पवार, प्रियांका सोनार, सचिन पंधेरे आदी उपस्थित होते.

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (#deepcleandrive) शुक्रवारी सकाळी दिवा प्रभागात स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शीळफाटा-महापे चौक येथील साफसफाई अभियानात सहभागी होऊन परिसराची स्वच्छता केली. तसेच, प्रभागातील स्वच्छता मोहिमेची पाहणीही केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असलेल्या या मोहिमेची सुरूवात शीळफाटा चौक स्वच्छ करण्याने झाली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत, दिवा आणि परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, रस्ते दुभाजक यांची स्वच्छता करण्यात आली. दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी यावेळी दिले. या मोहिमेनंतर, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील नाले सफाईचीही पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली.

पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना स्ट्रेचर, लाईफ जॅकेटचे वाटप – अशोक शिनगारे

जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ठाणे : ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोचावी, तसेच आपद्गग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण व दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझाटर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते. अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहचविणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाते. या वर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये फोल्डिंग मल्टिपर्पज स्ट्रेचर (1705 संच), फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्य (710 संच), आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य/रेस्क्यू किट (550 संच), बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (1260 संच) आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट (1190 संच) या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी 60 बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), 25 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 40 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 25 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 60 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि 10  बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत.  तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालये व मीरा भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी 100 बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), 40 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 50 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 50 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 100 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 100 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि 10  बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावे/प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या साहित्यामुळे आपत्ती काळात तातडीने मदत पोहचण्यास व संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. नुकत्याच डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला आहे. तसेच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्तीकाळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे. एखादी व्यक्ती उंच इमारतीवर अथवा आगीत अडकली तर त्या व्यक्तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे स्ट्रेचर उपयुक्त ठरणार आहे. तसेच हे स्ट्रेचर पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे पूर परिस्थितीत त्याचा उपयोग होणार आहे. रेस्क्यू रोपद्वारे इमारतीमधून अथवा अडचणीच्या जागेतून/दऱ्या खोऱ्यातून सुखरुपणे काढण्यासाठी उपयोग होणार आहे. फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर (संसर्ग रोधक) सोबतच या सोबतच्या किटमध्ये अंबू बॅग, कार्बन मास्क, हँड ग्लोज, सॅनिटायझर, शिट्टी, प्रेशर बॅंडेज/सेनेटरी पॅडस कॉडियेट पाईप, नेक बेल्ट, रेस्क्यू रोप, लिक प्रूफ लगेज बॅग, ऑईनमेंट, कापूस आदी साहित्याचा समावेश आहे. रेस्क्यू किटमध्ये अनेक छोट्या मोठ्या जीवनरक्षक सुरक्षित नावीन्यपूर्ण साधनांचा समावेश आहे. त्यामुळे हा संच शोध व बचाव पथक पोहचण्यापूर्वी उपयोगात येऊन जीवित व वित्त हानी टाळण्यास उपयुक्त ठरणार आहे. या संचामध्ये कार्बन मास्क, हँड ग्लोज, कॉम्पॅक्ट स्ट्रेचर, रिचार्जेबल रेस्क्यू टॉर्च, नेक बेल्ट, शिट्टी, रोलर बँडेज, लाल रंगाचे त्रिकोणी तसेच मेडिकेटेड बँडेज, सक्शन पंप, जखम साफ करण्यासाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध, रेस्क्यू रोप, टूल किट, टूल किट, सीपीआर मास्क सर्च लॅम्प आदी सुमारे 34 उपयुक्त साहित्यांचा समावेश आहे. आपत्त्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना दिलेल्या साहित्य कसे वापरावे, त्याची देखभाल कशी करावी याचे प्रशिक्षणही संबंधित गावातील कर्मचारी, आपदामित्र व हे साहित्य वापरणारे कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ठाणे महापालिका आपत्ती निवारण दल, नागरी संरक्षण दल व सामाजिक संस्थेच्या तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्त्कालीन परिस्थितीत संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांची सुटका करण्यासाठी हे साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी सांगितले..