Author: bittambatami.com

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

अवघ्या ५ महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या ऑनलाईन तिकीटाची विक्री – अभिजीत भोसले अनिल ठाणेकर ठाणे : एसटीच्या  नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत म्हणजे अवघ्या पाच महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनो दिली आहे. १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत  करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच  मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत. प्रवाशांना  घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिक़ृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखिल प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत  सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे  प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे ‍ देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपच्या वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे. तथापी, ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ या दुरध्वनी क्रमांकावर  संपर्क करावा, असे आवाहन अभिजीत भोसले यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा-तहसीलदार आयुब तांबोळी

अशोक गायकवाड खालापूर : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती खालापूर आयुब तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय खालापूर येथे तालुक्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक संपन्न झाली आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा आहे, असे मत-तहसीलदार आयुब तांबोळी यांनी व्यक्त केले. सदर बैठकीस निवासी नायब तहसिलदार खालापूर सुधाकर राठोड, सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर सी.एस. राजपूत, उपमुख्याधिकारी नगरपरिषद खोपोली गौतम भगळे, अहगिनशमन अधिकारी, म.ओ.वि.म.पाताळगंगा आशिष मोरे, आरोग्य निरीक्षक, ता.आ. कार्यालय खालापूर प्रशांत अंबुर्ले, पोलीस उपनिरीक्षक खोपोली पोलीस ठाणे कर्मराज गावडे, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे एम.पी. खोपडे,पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस ठाणे संजय बांगर,अशोक मोरे, कनिष्ठ अभियंता, मोरबे धरण न.मु.म.पा.,सुदर्शन आगलावे, शा.अभियंता, रा.जि.प.कर्जत, रविंद्र म्हात्रे, वनपाल, वनपरिक्षेत्र खालापूर, दिक्षांत वाघ, म.रा.वि.मर्या., खालापूर, वी.जी. आंब्रस्कर, दुय्यम निबंधक खालापूर, ङिएम. मोरखंडीकर, नगरपंचायत खालापूर, ङिके.भोईर, खालापूर पोलीस ठाणे, आर.एम.भदले, रसायनी पोलीस ठाणे, डी.बी.नाईक, ग्रामीण पाणी पुरवठा रा.जि.प. उपविभाग खालापूर, ए.जी.तेलखडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग खालापूर, श्रीम. शिल्पा दास पवार, शिक्षक विभाग पंचायत समिती खालापूर, संजय पवार, अग्निशमन पाताळगंगा, अजित महारनूर, सां.बां. विभाग खालापूर, एस.बी.मेंगाळ, पाटबंधारे विभाग, कर्जत, गुरुनाथ साठेलकर, अध्यक्ष, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, निलेश कुडले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, अमोल कदम, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था,महेश भोसले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आदी उपस्थित होते. सन २०२४ च्या मान्सूनपुर्व तयारी अंतर्गत तालुक्यातील दरडप्रवण पूरप्रवण, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये सर्व विभागांनाप्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, अधिकारी/कर्मचारी यांची मोबाईल नंबरसह अद्यावत माहिती सादर करण्याच्या सूचना देणेत आल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व विभागाला त्यांचे कार्यालयातील नोडल अधिकारी यांची नेमणूक करुन, त्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षात सादर करणेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विभागप्रमुखांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, भ्रमणध्वनी कायम सुरु ठेवण्याच्या व तालुक्यात उद्भवण्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. नैसर्गिक आपत्ती सन २०२४-२५ च्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय खालापूर येथे २४x७ तास तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. खालापूर तालुका नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक: १) ०२१९२-२७५०४८ २) ८२६२८९७८८८

उल्हासनगर महानगरपालिका अधिकाऱ्याच्या कन्येची 95 टक्क्यांना गवसणी

उल्हासनगर : मनिष हिवरे हे उल्हासनगर महानगरपालिकेत तीन महत्वाच्या पदावर अधिकारी असून त्यांची एकुलती एक कन्या सौम्या हिवरे हिने 12 वीच्या परीक्षेत 95 टक्के गुणांना गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे 10 वीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवणाऱ्या सौम्याने 12 वितही 95 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. सहायक आयुक्त प्रभाग समिती 2,सहायक आयुक्त सामान्य प्रशासन आणि सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी या तीन पदाचा पदभार मनिष हिवरे हाताळत आहेत.त्यांची कन्या सौम्या हिने 10 वि मध्ये 97 टक्के गुण मिळवून माटुंग्यातील पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला आहे मनिष हिवरे यांची पत्नी व सौम्याची आई प्रज्ञा हिवरे ह्या डबल ग्रॅज्युएट असून सौम्याच्या अभ्यासाची जबाबदारी त्या लिलया पार पाडतात.कॉलेज,क्लास आणि आई कडून घेण्यात येणाऱ्या सरावाचे चीज सौम्याने 95 टक्के गुण मिळवून करून दाखवले आहे. सौम्या ही सी.ए करणार असून पुढे ती एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे.आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपआयुक्त किशोर गवस,डॉ.सुभाष जाधव,नोडल अधिकारी गणेश शिंपी,सर्व विभाग प्रमुखांनी सौम्या हिवरे हिचे अभिनंदन केले आहे.

मे अखेरीस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मुंबई : तापमानाचा पारा वाढणार असून पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी उष्ण, दमट आणि अस्वस्थ करणारे आहेत. मेअखेरीस पावसाचे पुनरागमन होत असून त्याचाच हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. यामुळे मुंबईमध्ये प्री-मान्सून सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांताक्रूझ येथे ३४.९; तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली; तर आर्द्रता सुमारे ६५ ते ७० टक्क्यांच्या आसपास नोंदवली गेली. यामुळे मुंबईत सध्या दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुढील आठवड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार व संध्याकाळपर्यंत आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

खालापूरमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र

आदिवासी वस्त्यांची पाण्यासाठी पायपीट खोपोलीः आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने खालापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाकडून पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी ते तोकडे पडत आहेत. सध्या खालापूरमध्ये काही वाड्या व सहा-सात दुर्गम गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर आणखी आठ गावांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्‍ताव आहे. २० हून अधिक वाड्या व गावांमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहिरींसह अन्य उपाययोजनांवर भर दिला जात असला तरी नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. तापमानाचा पारा वाढल्‍याने विहिरी कोरड्या पडल्या असून धरणांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या आहेत. अनेक वाड्यात सद्यःस्थितीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्‍ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. तालुक्यातील परखंदे वाडी, शिरवली, डोणवत ठाकूरवाडी, वावोशी बौद्धवाडा, दांडवाडी, गोहे, बीड खुर्द, नडोदे, खरीवली, नारंगी, देवकुंड, शिरवली-ढेबेवाडी, चिंचवली-गोहे, बोरगाव-तारवाडी, वरोसे आंबेवाडी या ठिकाणी दरवर्षी पाणीटंचाई भेडसावते. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, त्‍यांची वणवण थांबावी यासाठी तालुका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ही गावे व वाड्यांमध्ये अनेक इंधन विहिरी व पाणी साठवणूक टाक्या पूर्णत्वास आल्या आहेत, तर काही प्रकल्प प्रस्तावित असून दीर्घकालीन उपाययोजनांमुळे या ठिकाणीचा पाणी प्रश्‍न निकाली निघेल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे. योजनांच्या रखडपट्टीवर मौन खालापूर तालुक्यात तीन मोठी धरणे, अनेक पाझर तलाव व बारा महिने वाहणारी पाताळगंगा नदी आहे. असे असले तरी खालापुरकरांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचे गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र योजना का रखडलेल्या या बाबत बोलण्यास कोणीही तयार नाही. खालापूर तालुक्यातून पाताळगंगा नदी वाहते. मोर्बा, कलोते, डोणवत या धरणांबरोबरच आत्करगाव, नढाळ यांच्यासह अनेक पाझर तलाव आहेत. असे असताना अनेक गावे व वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन् मैलाची पायपीट करावी लागते. प्रशासनाने सर्वच ठिकाणी पाणी योजना राबवल्‍या असल्‍या तरी निम्म्‍याहून अधिक योजनांची कामे रखडली आहेत. बारा महिने वाहणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या योजना पूर्ण होऊ शकतात. मात्र नदीतील वाढते प्रदूषण, प्रशासनाची उदासीनतेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्‍याचे नागरिकांची तक्रार आहे.

सर्व आमदारांच्या आग्रहाखातर वरीष्ठांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे लागले – उमेश पाटील

अजितदादांनी कुणाला न विचारता शपथविधी करण्याचा निर्णय घेतला असता, तर पुन्हा त्यांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? मुंबई : अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती अजितदादांनी कुणाला न विचारता असा निर्णय घेतला असता तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का? असा सवाल करतानाच यामध्ये अजितदादांची काहीही चूक नाही हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर अजितदादांना उपमुख्यमंत्री करा असे ठरले त्यामुळेच वरीष्ठांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे लागले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत अजितदादांवर जे मुद्दे मांडले त्यावर मंगळवारी संध्याकाळी उमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व मुद्दे खोडून काढले शिवाय अनेक गौप्यस्फोट करत तुतारी गटाची हवाच काढली. अजितदादांना पक्षात माफी मागायला लावून परत घेतले हे जे सांगितले जाते ती वस्तुस्थिती नव्हती तर सर्व आमदारांचे समर्थन अजितदादांना होते त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे असेही उमेश पाटील म्हणाले. २००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने वरीष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कधी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कधी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. या पुत्र आणि पुत्री प्रेमातून दोन्ही पक्षात फूट पडलेली दिसत आहे हीच कारणे त्यामागे दडलेली आहेत असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टराना केली.

कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल

मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासन सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ मध्ये प्रतिदिन सरासरी ५०४ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी मोहीम राबवून एकूण १५ हजार १२९ प्रवासी तिकीटाविनाच प्रवास करीत असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण दोन कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपये दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे, असे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

बाष्पीभवनामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत घट

पाऊस उंबरठ्यावर असल्याने पाणी कपातीची शक्यता नाही कल्याण : मागील काही दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन, धरणाच्या पातळींमध्ये घट होत आहे. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्यात आता कपात केली जाते की काय या विचाराने नागरिक चिंतातूर असताना जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कोणतीही कपात करण्याचा निर्णय नाही, असे स्पष्ट केले आहे. एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होतो. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत जात होते. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो. मागील पाच ते सहा वर्षापूर्वी जून, जुलै सरला तरी पावसाने ओढ दिल्याने धरण साठा तळाला गेला होता. नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने दरवर्षी दिवाळीनंतर पाऊस पडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. यामुळे जून अखेरपर्यंत पुरेसा पाणी साठा पिण्यासाठी उपलब्ध होत होता. गेल्या दोन ते तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट, सप्टेंंबरमध्ये १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणी साठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो. गेल्या दोन महिन्यापासून तापमान ४० अंशाच्या पुढे जात आहे. उष्णतामानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. मुंबई, ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात केली जाते की काय अशी चिंता नागरिकांमध्ये आहे. जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणी साठा ४० टक्क्यांवर मुंबईला दैनंदिन सुमारे साडेतीन हजार तर बारवी धरणातून दैनंदिन सुमारे अकराशेहून अधिक दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर निवासी क्षेत्र, औद्योगिक विभागाला केला जातो. आता हा धरणांचा पाणी साठा सुमारे ३५ ते ४० टक्क्यांवर आला आहे. मागील दोन ते तीन वर्ष समाधानकारक पाऊस पडून ठाणे जिल्ह्यातील धरणे ऑगस्ट, सप्टेंंबरपर्यंत शहरांना आठ महिने दैनंदिन पुरेसा पाणी पुरवठा करतील अशा प्रमाणात भरतात. यापूर्वीसारखी पाणी कपातीची वेळ शासनावर येत नाही. भातसा धरणाची पाणी साठवण क्षमंता ३२४ दशलक्ष घनमीटर, तानसा ४८ दशलक्ष घनमीटर, मोडकसागर २६ दशलक्ष घनमीटर, बारवी १२१ दशलक्ष घनमीटर, मध्य वैतरणा २२ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणांमध्ये सद्य परिस्थितीत सुमारे ३५ ते ४० टक्के पाणी साठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंकडून करण्यात आला आहे.

दिवा येथील ठाणे पालिकेच्या कचराभूमीवर बेकायदा चाळी

डोंबिवली –दिवा शहराजवळील ठाणे महानगरपालिकेच्या कचराभूमीवर कचऱ्याचे सपाटीकरण करून भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा जोरदार धंदा उघडला आहे. या कचराभूमीवर जागा हडप करण्यासाठी भूमाफिया हिरव्या जाळ्या लावून, पत्रे लावून कचराभूमीवरील भौगोलिक…