Author: bittambatami.com

वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन.

वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कट्टीबद्ध – रमेश चेन्नीथला उत्तर मध्य मुंबईसह मुंबईचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार – वर्षा गायकवाड मुंबई : निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार यासाठीचे न्याय पत्र वर्षा गायकवाड यांनी सादर केले आहे. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम केले आहे. वर्षा गायकवाड वडिलांचा वारसा पुढे नेत असून त्या लढवय्या नेत्या आहेत. आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करुन संसदेत पाठवा, मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासठी त्या कट्टीबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात काय केले व पुढे काय करणार यावर ते बोलत नाहीत. प्रत्येक भाषणात मोदी हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान यावरच बोलत असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. ४ जूनला देशातील भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकरांना भेडसावत असलेल्या समस्यांवर जनतेशी चर्चा करून एक त्रिसुत्री बनवण्यात आली असून या न्यायपत्राच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न मांडलेले आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबईतील मोकळ्या जागांचे संवर्धन करणे, झाडांची कत्तल होऊ नये, विमानतळ फनेल झोन मधील पुनर्वसनासाठी विशेष धोरण आखले जावे यासाठी प्रयत्न केला जाईल. मुंबईची जीवनवाहिनी लोकलमधील गर्दी कमी व्हावी यासाठी लोकलची संख्या वाढवणे, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. हाऊसिंग सोसायट्यांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरात प्रदुषण ही सुद्धा एक महत्वाची समस्या असून त्यावर उपाय योजना करण्यावरही भर दिला जाईल, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने न्यायपत्र जाहीर केलेले आहे, ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेल्या आहेत. इंडिया आघाडीला जनतेचे १०० टक्के समर्थन मिळत असून पाचव्या टप्यातही जनतेचे समर्थन कायम राहिल. मुंबईतील महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, आमदार अमिन पटेल, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, संगठन प्रभारी प्रनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, महेंद्र मुणगेकर, आदी उपस्थित होते.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज-सुषमा सातपुते

ठाणे :  येत्या  20 मे 2024 रोजी संपन्न होणा-या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करुन मतदाराचा आपला हक्क बजवावा, असे आवाहन 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले. 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील एकूण 6 विधानसभा मतदार संघात 1960 मतदान केंद्रे असून 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तसेच जास्त घनता असलेल्या ठिकाणी म्हणजे एकूण 1012 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही व वेब कास्टींगची सुविधा पुरविण्यात आली आहे.  सद्यास्थितीतील तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मेडिकल कीट तसेच किमान आवश्यक सुविधांची (पिण्याचे पाणी, रॅम्प, शौचालय इ.) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूकीकामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून, “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगाना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे.  तसेच अंध दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळ मजल्यावर घेण्यात आले असल्याचे  निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी नमूद केले. सद्यास्थितीपर्यंत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी संदर्भात 5 FIR नोंदविण्यात आले आहेत. 149 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील 216 मतदान केंद्रात पर्दानशीन महिला मतदार असल्यामुळे या प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे. आता पर्यंत C Vigil ॲपवर 318 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, सदर तक्रारींचे निवारण या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघांनी विहीत वेळेत केलेले आहे. 24-कल्याण लेाकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 1 दिव्यांग मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र , महिला मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र आणि युवा मतदार कर्मचारी उपलब्ध झाल्यास प्रत्येक मतदार संघनिहाय 1 युवा मतदार कर्मचारी केंद्र मतदानासाठी उपलब्ध राहणार आहे. 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही सुरेंद्र बाजपेयी बंदीस्त सभागृह, वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्राँगरुमची व्यवस्था सावित्रीबाई फुले कला मंदिरातील तळघरात (Basement) करण्यात आली असून, तेथे राज्य पोलीस, राज्य राखीव दल व केंद्रीय पोलीस सुरक्षा दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते  यांनी दिली.

कोरम मॉलमध्ये ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम

फ्लॅशमॉबमधून युवकांनी केले मतदानाचे आवाहन ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार, २० मे मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी बुधवारी कोरम मॉल येथे पीडीसी इव्हेंट्स या ग्रुपने फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबद्दल आवाहन केले. याआधी असा फ्लॅशमॉब गेल्या आठवड्यात विवियाना मॉलमध्ये करण्यात आला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच मालिकेत, सुटीच्या काळात नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या कोरम मॉलमध्ये मतदार जागृती करण्याची जबाबदारी युवावर्गाने घेतली होती. आम्ही मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन या युवांनी नागरिकांना केले. तसेच, फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातूनही मतदानविषयी जागृती करण्यात आली.

‘मतदारांना बाहेर काढा, अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल’

विनोद तावडे यांचा इशारा ठाणे : मतदारांना जास्तीत जास्त संख्येने बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार करावा लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे. प्रत्येक नगरसेवकाने किती मतदारांना बाहेर काढले, त्यांच्या प्रभागातून उमेदरावाला किती मतदान झाले, याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार केला जाईल असा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी विनोद तावडे यांनी भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाअधिक मताधिक्य कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्वाच्या सुचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही दिसून आले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती, ठाण्यात आपली ताकद वाढली असतांना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचे असा सुरही काही जणांनी लावला. मात्र, आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचे असल्याचे सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रत्येक माजी नगरसेवकाने, पदाधिकाऱ्याने आप-आपल्या भागातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचे असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे, कमी मतदान झाले तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? या बाबत विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

शहरातील नाल्याची ६८ % सफाईचा पालिकेचा दावा

वसई-विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी ड्रेन मास्टर यंत्राचा वापर विरार : वसई विरार मधील नाले सफाईचा विषय पावसाळ्यात शहरात पाणी भरल्यावर दरवर्षी चर्चिला जात असतो . त्यामुळे यावेळी पालिकेने शहरातील नाल्यांच्या सफाईसाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री मागवूनत्या द्वारे नाले सफाईल सुरुवात केली आहे. वसई विरार महापालिकेने शहरातील नाल्यांची सफाई करण्यासाठी ड्रेन मास्टर ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली असून त्याद्वारे नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पोकलेन मशीन किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची यंत्रसामुग्री वापरणारी दिल्ली नंतरची वसई विरार ही दुसरी महानगरपालिका ठरली आहे.पालिकेने आता पर्यंत ६८ % नाले सफाई झाल्याचा दावा केला आहे. सध्या वसई विरार महापालिकेकडून शहरातील नाल्याची साफसफाई करण्यात येत आहे. त्यासाठी ९ प्रभागात नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजपर्यंत एकूण ६८% नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. ड्रेन मास्टर यंत्रांला उभयचर प्रकारचे यंत्र असे म्हणतात. हे यंत्र पाण्यावर तरंगून तसेच जमिनीवरून किंवा ड्राय नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम करते. या ड्रेन मास्टर नावाच्या एका यंत्राची किंमत १ लाख ७४ हजार असून पालिकेने १५ व्या वित्त आयोगातून ३ लाख ४८ हजारांची दोन ड्रेन मास्टर यंत्रे विकत घेतली आहे. याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, नाल्यांमधील गाळ यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी आम्ही ड्रेन मास्टर या यंत्राचा वापर करत आहोत. हे यंत्र कॉम्पॅक्ट स्वरूपाचे असून त्यामुळे नाल्यातील गाळ पूर्णपणे काढून टाकला जात आहे. दलदलीच्या भागात व जास्त पाण्याचा ठिकाणी हे यंत्र चेन स्प्रॉकेटने सहज काम करत आहे. या यंत्रामध्ये गाळ गोळा करण्यासाठी विशेष प्रकारची बीन्स यंत्रावरच उपलब्ध करून दिलेली आहेत, यामुळे ज्या नाल्यांच्या धक्क्यावर इमारती आणि घरे आहेत अशा ठिकाणी नाले साफ करणे खूप शक्य झाले आहे. या यंत्रामुळे हायड्रॉलिक लेग आणि काही गाळ वाहत्या पाण्यात अडकल्यामुळे, यंत्र पाण्यात स्थिर करून ते काढले जात आहे. शहरात सघ्या नालेसफाईचे काम जोरात सुरू असून या यंत्रांच्या माध्यमातून नालेसफाई अधिक परिणामकारक होत आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (घनकचरा) नानासाहेब कामठे यांनी दिली. दिल्ली महापालिकेत या ड्रेन मास्टर यंत्राचा वापर करून नालेसफाई केली जात आहे. दिल्ली नंतर अशा यंत्राचा वापर करणारी वसई विरार ही दुसरी महापालिका ठरली आहे.

शंभर क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक

उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीकडून उल्हासनगर : शहरातील क्षयरोग रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी किंबहूना त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता निक्षय मित्राची भूमिका निभावणाऱ्या उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीने तब्बल 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेतले आहेत. या सर्व रुग्णांना पोषक आहाराचा पुरवठा व्हावा या सकारात्मक उद्देशाने कंपनीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे उल्हासनगर मेडिकल असोसिएशन यांच्या नावाने 3 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. सेंच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी हा धनादेश आयुक्त अजीज शेख यांना सोपवला असून यावेळी उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,क्षयरोग अधिकारी सत्यम गुप्ता,हानगरपालिका आरोग्य विभागाच्या पब्लिक प्रायव्हेट समनव्यक संगीता मगर,क्षयरोग विभागाच्या ममता कामरानी आदी उपस्थित होते. महानगरपालिका कडून दरवर्षी क्षयरोग रुग्णांची शोधमोहिम राबिवली जाते.वर्षाला सरासरी दिड हजार क्षयरुग्ण आढळतात.त्यापैकी 86 टक्के रुग्ण औषधोपचार केल्यावर बरे होतात.तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते. राष्ट्रपतींनी ०९ सप्टेंबर २०२२  रोजी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानाची सुरुवात केलेली आहे.त्यात निक्षयमित्राच्या माध्यमातून क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती,प्रति महिना आवश्यक धान्य,कडधान्य,डाळी,तेल इत्यादी पोषक आहार देण्याचे प्रयोजन आहे.सहा महिन्याच्या पोषक आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. सेंच्युरी रेयॉन कंपनीने निक्षय मित्र बनून आणि 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेऊन स्तुत्य काम केले आहे.या सर्व रुग्णांना 6 महिन्याचे पोषक आहाराचे किट देण्यात येणार आहे. अशाचप्रकारे शहरातील क्षयरुग्णांना पोषक आहाराचा फायदा होण्याकरिता जास्तीत जास्त निक्षय मित्रांनी तयार व्हावे व अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घ्यावा असे आहावन आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांनी उल्हासनगरकरांना केले आहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षी अजीज शेख यांनी सुद्धा निक्षय मित्र बनून 10 क्षयरुग्ण दत्तक घेतले होते.

केसपेपरसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करा

आयुक्त भूषण गगराणी यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश मुंबई : केईएम रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बाह्यरुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नियुक्त करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी भूषण गगराणी यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. रुग्णालयातील विविध विभागांनाही त्यांनी भेटी दिली. याप्रसंगी बाह्यरुग्ण खिडकीजवळील रुग्णांशी संवाद साधताना त्यांनी केस पेपर संदर्भातील निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, तसेच विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते. केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा गगराणी यांनी आढावा घेतला. शतक महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी व्हावे, अशी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. केईएम रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हिस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. रुग्णालयाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारी अधिक उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना व स्थलांतरित लोकसंख्या यामुळे हे क्षेत्र हिवताप व डेंग्यू या आजारांसाठी संवेदनशील आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळी नाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण तसेच  राबविण्यात येणा-या जनजागृती मोहीमा यांच्या माध्यमातून प्राधान्याने हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अनुषंगाने 16 मे 2024 रोजीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे यावर्षीचे घोषवाक्य ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा ( Connect With Community, Control Dengue)‘ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डेंग्यूविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग घेऊन डेंग्यू आजारास प्रतिबंध करणे हे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच जनजागृतीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिनी अर्थात 16 मे रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामे वा झोपडपट्टी अशा एकूण 38 ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, 16 ते 21 मे 2024 या कालावधीत प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक व खाजगी प्रयोगशाळा प्रमुख यांची प्रत्यक्ष सभा घेऊन त्यांना हिवताप, डेंग्यू,  साथरोग, जलजन्यरोग याबाबत संबोधित करण्यात येणार आहे. याच 16 ते 21 मे कालावधीत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामगारांच्या सभा घेऊन फवारणी काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 21 मे  रोजी मुख्यालयातील आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.डेंग्यू हा विषाणुजन्य आजार असून, डेंग्यू विषाणू संक्रमित एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्यामुळे तो प्रसारित होतो. हा एडिस इजिप्ती डास गच्चीवरील व घराच्या परिसरातील पाण्याच्या साठ्यात तसेच भंगार साहित्य, टायर्स, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावर टाकलेले प्लास्टिक आच्छादन, कुंडयांखालील ताट, कुलर्समधील पाणी अशा पाणी साचलेल्या ठिकाणी अंडी घालतो आणि डास उत्पत्ती होते. ही डास उत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घेणे व झाल्यास ती तात्काळ नष्ट करणे गरजेचे ठरते. डेंग्यू आजाराची लक्षणे म्हणजे – एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी स्नायुदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे अशा प्रकारची असून अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे आत्यंतिक गरजेचे आहे. डेंग्यू आजार रोखण्यासाठी – आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासून – पुसून कोरडी करावीत, घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत, झाकण नसल्यास कापडाने झाकावे, घराच्या परिसरातील अडगळीचे सहित्य नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात व झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, गॅलेरीत / छतावर पाणी साठेल असे भंगार सामान ठेवू नये, गळके नळ आणि पाईपलाईन वेळीच दुरुस्त करावी, कोणाताही ताप अंगावर काढू नये – अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी. नवी मुंबईकर नागरिकांनी डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि हिवताप / डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नजिकच्या महानगरपालिका रुग्णालयात किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे-शिवानंद टाकसाळे

अशोक गायकवाड मुंबई : सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलन संपन्न झाले यावेळी शिवानंद टाकसाळे बोलत होते. रविवार दि.१२ मे रोजी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन महात्मा गांधी हाँल ,एस व्ही रोड ,तलावाजवळ ,वांद्रे (पश्चिम) मुंबई येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद टाकसाळे ( आयएएस सेवानिवृत्त), विनायक विसपुते (असि. कमिश्नर मुंबई महापालिका), डॉ. अभय विसपुते (डायरेक्टर एस आर व्ही हॉस्पिटलस् ग्रुप्स्,), प्रा.श्रीकांत मुरलीधर सोनवणे (MA ,MMCJ , Ph.d.IEC. (डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स, पत्रकारिता महाविद्यालय नाशिक), डॉ अजय भामरे,( प्र कुलगुरू मुंबई विद्यापीठ), अँड.सी.डी.सोनार (मार्गदर्शक धुळे सोनार समाज), अँड. राजन दीक्षित (सोलापूर उपाध्यक्ष, भारतीय ओबीसी संघटन दिल्ली )सुरेखा सोनार, (नगरसेविका, मिरा -भाईंदर महानगरपालिका) प्रभाकरजी मोरे(ट्रस्टी, मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळ तसेच संस्थापक जन्मबंध फाउंडेशन), प्रकाश खरोटे (अध्यक्ष,मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळ)आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार आणि दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर मोरे यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात सांगितले. की, कोरोना महामारीने दोन अडीच वर्षे सर्व संपूर्ण जग ठप्प झाले होते, अशा परिस्थितीत जगाबरोबर समाजानेही कोरोना परिस्थितीचा मुकाबला केला. अशा परिस्थितीतून सावरुन आजचा मुंबई ऐक्यवर्धक मंडळाचा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,असे यावेळी सांगितले. मंडळाचे सचिव घनःशाम सोनार यांनी मंडळाचा वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर वाचून दाखविला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे कामाचे कौतुक केले. तसेच सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केले आहे अश्या मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मुंबई तसेच मुंबई परिसरातील समाजाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यामध्ये नवी मुंबई सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय खरोटे सचिव हेमकांत सोनार तसेच कळवा समाजाचे अध्यक्ष चैतन्य वानखेडे तर धुळे येथून अँड. राकेश रनाळकर तसेच अनेक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव घनश्याम सोनार , घनश्याम विसपुते , सुनील सोनानिस , रत्नाकर वडनेरे , विशाल सोनार, वसंत सोनार , जयेश खरोटे, संजय विभांडीक, आशा खरोटे , अनुराधा वानखेडे, वर्षा सोनवणे ,पुनम सोनवणे आदींनी अधिक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी सोनार (साम टीव्ही)यांनी केले तर उपस्थितांचे आभार घनःशाम विसपुते यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी

१० जून पूर्वी अर्ज सादर करा – शशिकला अहिरराव अशोक गायकवाड रायगड :सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश घेवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज १० जून २०२४ पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण ता.पेण येथे सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण शशिकला अहिरराव यांनी केले आहे.* या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.१ लाख इतकी असावी, इयत्ता १ ली ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असावे, वय ३१ डिसेंबर २०२४ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म ०१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान झालेला असावा, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला तसेच, अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आधारकार्डची झेरॉक्स जोडण्यात यावी, विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या/पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.