Author: bittambatami.com

कळव्यात वाहतुकोंडीमुळे वाहनांच्या रांगा

कळवा : मुंब्रा बायपास रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. त्याचवेळी सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा रेल्वे सबवेखालून जाताना एक कंटेनर…

कोटेच्या यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक

देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबईः ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा दगड दोघांना लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी सोमवारी प्रचाराला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री त्यांचा प्रचार गोवंडी परिसरात सुरू असताना अचानक एक दगड प्रचारातील रथावर येऊन पडला. हा दगड तक्रारदार निहारिका खोदले (५४) यांना लागला. पुढे तोच दगड कलप्पा गुनाळे यांच्या उजव्या गालाला लागला. त्यानुसार खोदले यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३३७, ३३६ अंतर्गत व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात देवनार पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. गोवंडी येथील न्यू गौतम नगर परिसरात सोमवारी सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर खोदले यांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी मध्यरात्री याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीटीव्हीच्या मदतीने याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

कोंकण भवनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

नवी मुंबई : थोर  संत व समाजसुधारक संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे 50 पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती केली.

मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश राजीव चंदने मुरबाड : नगरपंचायतचे हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटणाऱ्या राहुल हिंदुराव या ठेकेदाराने लाखो रुपयांचा काळा पैसा मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत टाकला असल्याने नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली असुन या प्रकरणाची चौकशी  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे करीत असुन त्या चौकशी कडे तमाम मुरबाड करांचे लक्ष लागले आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने नगरोथ्तान योजनेतुन कोट्यवधी रुपये मुरबाड नगरपंचायतला दिले.मुरबाड नगरपंचायतने हि कामे  आपल्या मर्जीतील ठेदारांना देऊन शासनाचा निधी खर्च  केला मात्र  उघडी गटारे, रस्ते व शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वस्तीत येत असल्याने त्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली असता सदर ठिकाणी राहुल हिंदुराव या ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत परंतु ती कामे अस्तित्वात नसल्याचे उघड झाले.याबाबत शिवसेना कार्यकर्ते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे ,सागर भंडारी,दिपक दुधाळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली असता प्रसारमाध्यमांनी  हा प्रकार उजेडात आणला, त्यामुळे ठेकेदाराचे पायाखालची वाळू सरकली व त्याने मुरबाड नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरोथ्तान खात्यावर सुमारे आठ लाख चौतीस हजार रुपये जमा केले.याबाबत नगरपंचायतीने राहुल हिंदुराव ठेकेदाराला लेखी पत्र दिले असता त्याने समाधान कारक खुलासा केला नाही त्यामुळे नगरपंचायतने  जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत. कोट मुरबाड नगरपंचायतीच्या नगरोत्थान खात्यावर संबंधित ठेकेदाराने अनाधिकृत पणे जमा केलेल्या रकमेची जिल्हाधिकारी स्तरावरुन चौकशी सुरू आहे.त्याचे चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे आहेत –मनोज म्हसे.मुख्याधिकारी.मुरबाड नगरपंचायत.

आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला – विजय कुवळेकर

रमेश औताडे मुंबई : खिळे जुळविण्याच्या पत्रकारितेच्या पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात फोटो स्पष्ट दिसू नये म्हणून शाई जास्त टाका असे सांगणारे  व आजची पत्रकारिता पाहता , ज्या दोन व्यक्ती भेटल्याच नाहीत त्यांची दृश्ये एकत्रित करण्याची कला पाहता आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला. ‘तंत्रज्ञान’  कोणतेही असूद्या मात्र ‘मंत्र’ तोच आहे. असे जेष्ठ पत्रकार व्यासंगी व्यक्ते विजय कुवळेकर यांनी जेष्ठ छायाचित्रकार घन:श्याम भडेकर यांच्या ‘शूट आऊट’  या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या वेळी सांगितले. यावेळी माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे, पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण म्हणाले,  लेखणी हि तलवार असते. मात्र घन:श्याम भडेकर यांच्या कॅमेऱ्याची लेन्स ही बुलेट ठरली आहे. त्यांनी काढलेला एक फोटो लाखो शब्दापेक्षा मोलाचा आहे. जीवनात काही  प्रसंग असे येतात त्यावेळी आपल्याला राग येतो. मात्र घन:श्याम भडेकर यांना मी कधीही रागावलेले पाहिले नाही. आज त्यांच्या १९१ पानी शूट आऊट या पुस्तकाच्या   प्रकाशन समारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची गुंफण घन:श्याम यांनी केली आहे. त्यांची अशी अजून शंभर पुस्तके निघोत हिच सदिच्छा असे संदीप चव्हाण म्हणाले. यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे यांनी चारोळ्याच्या माध्यमातून घन:श्याम भडेकर यांच्या पुस्तकाचे व त्यांचे कौतुक केले. तर संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे यांनी घन:श्याम भडेकर यांच्या सोबत सुरू केलेली कारकीर्द कशी होती याबद्दल सांगितले. माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे म्हणाले, १६ वर्षा खालील व महिलांना जबानी घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी जावे असा कायदा आहे.मात्र त्याचे पालन कोणी करत नाही. घनश्याम यांनी त्यांच्या काळातील फोटोग्राफी बद्दल जे काही सांगितले तेव्हा सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या.असे अनेक किस्से सांगत त्यांनी घनश्याम यांचे कौतुक केले.

पी. वेलरासू यांनी कोंकण विभागीय महसूल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

अशोक गायकवाड नवी मुंबई :कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सूलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. पी. वेलरासू यांनी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवी मुंबई मधील एस आर ए विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची कोकण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. वेलरासू हे २००२ च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. पी. वेलरासू यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. पी. वेलरासू यांचे मास्टार्स इन पब्लिक अफेअर पब्लिक पॉलीसी ॲनालीसीचे शिक्षण कॅलीफोरनीया विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण केले आहे. यावेळी आयुक्त पी. वेलरासू यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. आणि कोकण भवन मधील महत्त्वाच्या विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केली.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

कल्याण : पावसाळ्यापूर्वीची जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (ता.२ मे) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अभियंता रमेश गोरे यांनी सांगितले. पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडून ते डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पुरवले जाते. १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी कल्याण शहराच्या काही भागांना वितरित केले जाते. या जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रांना महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठा केंद्राच्या कांबा येथील उपकेंद्रात दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेला होणारा वीज पुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. नऊ तास हे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांना, ग्रामीण भागातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, मोहने, शहाड परिसराला होणारा पाणी पुरवठ बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर-राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी डोंबिवली : कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला. यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. रखरखीत उन असूनही कार्यकर्ते हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन घामाघून होऊनही या फेरीत सहभागी झाले होते. उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी सकाळी डोंबिवलीचे ग्रामदैवत फडके रस्त्यावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्या इंदिरा चौकात उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत दाखल झाल्या. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत वैशाली दरेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांचा जयघोष केला जातो. राष्ट्रवादी, काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा जयघोष करत होते. त्यामुळे वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले होते. ढोलताशांच्या दणदणाटाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीला सुरूवात झाली. एका सजविलेल्या वाहनावर उमेदवार वैशाली दरेकर, युवा नेते आदित्य ठाकरे, डॉ. जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, वरूण सरदेसाई, सदानंद थरवळ विराजमान झाले होते. नागरिकांना अभिवादन करत वाजतगाजत फेरी घरडा सर्कल येथील निवडणूक कार्यालयाकडे निघाली होती. यावेळी रस्तोरस्ती वाहनकोंडीचे दृश्य होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा-मुंब्रा भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत जनता आपल्या पाठीशी आहे हे ठामपणे दिसले. विकासाच्या नावाने बोंबा ठोकल्या जात असल्या तरी विकास कोणाचा झालाय हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे या भागातील सर्व जनता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे हे आजच्या गर्दीतून, प्रचारातून दिसून आले आहे.– वैशाली दरेकर उमेदवार, महाविकास आघाडी

कल्याण लोकसभेत महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे २ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतून निघणार भव्य मिरवणूक डोंबिवलीः कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे २ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जातील. श्री गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील १० वर्षात त्यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या कामांचा स्मार्ट रूपातील कार्य अहवाल नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या १० वर्षातील कामांचे सादरीकरण करत उभारलेल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. सध्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर गुरूवार, २ मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, राष्ट्रीय समाज पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ विविध मान्यवर मंडळींशी भेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद यासह अनेक सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहात आहेत. तसेच विविध समाज संघटनांकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठींबा देखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २ मे रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच विविध समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. असा असेल मिरवणुकीचा मार्ग – डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी निघतील. गणेश मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक बाजीप्रभू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार रस्ता नाका, लोकमान्य टिळक चौकामार्गे जिमखाना रस्त्यावरून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत जाईल आणि डॉ. श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ईटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी रॅलीव्दारे केली मतदान जनजागृती

नवी मुंबई : सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुका होत असून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे याकरिता ठिकठिकाणी जनजागृती मोहीमा राबवल्या जात आहेत. याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विविध माध्यमांतून अनेक लोकप्रिय व्यक्तीही प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन करीत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रानेही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदार जनजागृती मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला असून विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष आरदवाड तसेच ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्र इमारतीपासून वाशी रेल्वे स्टेशन परिसरात मतदानाचे आवाहन करणारी रॅली काढण्यात आली. यामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक आणि प्रौढ विशेष विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी ईटीसी केंद्रातील सहशालेय शिक्षकांनी तयार केलेले मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरिता घोषणा देण्यात आल्या आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत त्यांना 20 मे रोजीच्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. ईटीसी केंद्राचे शैक्षणिक व्यवस्थापक व अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली या रॅलीचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी आपल्या पालकांसह रॅलीव्दारे केलेल्या मतदानाविषयक जनजागृती उपक्रमाची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.