Author: bittambatami.com

लोकलमधून पडून डोंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू

डोंबिवली: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली. ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती. डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलने मुंबईच्या दिशेेने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. मुंब्रा खाडीजवळ लोकलच्या दरवाजाला त्याने धरलेला हात सटकला तो खाडीत पडला असे पोलिसांंचे म्हणणे आहे. अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटु्ंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशावर आतील गर्दीचा भार येतो. किंवा त्या प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणे मुश्किल होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

‘जेल का जवाब वोट से’

महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातला संताप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमटत आहे. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामध्ये ‘आप’चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सामील झाले होते. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा व ‘जेल का जवाब वोट से’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात असल्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे, परंतु ‘आप’च्या कार्यकर्त्यांची गळ्यात पक्षाचा शेला, डोक्यावर टोपी व हाती झेंडे घेत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले ‘जेल का जवाब वोट से’ अशा आशयाच्या फलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जेल का जवाब वोट से, अरविंद केजरीवाल जिंदाबाद, भारत माता की जय, पहले लढे थे गोरो से – अब लडेंगे चोरोसे, गली गली में शोर है भाजपा सरकार चोर है आदी घोषणा करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसर दणाणून सोडला. ‘आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून ऐन निवडणुकीच्या काळात तुरुंगात टाकले आहे. या हुकूमशाही वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला जो धक्का दिला आहे, त्याचे उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत. त्यामुळे ‘जेल का जवाब वोट से’ ही आमची नवीन घोषणा आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही जागोजागी ही घोषणा व प्रचार करीत आहोत. सध्या मोदी सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, त्यामुळे बहुसंख्य मतदार हे महाविकास आघाडी – इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान करतील’, असे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष धनराज वंजारी यांनी बोलताना सांगितले.

कपिल पाटील व श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे नरेंद्र मोदी रणशिंग फुंकणार

राजीव चंदने मुरबाड : येत्या 10मे रोजी  कल्याण मध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन्ही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. त्याचप्रमाणे आता येत्या १० मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. तर नरेंद्र मोदी यांची सभा होण्याआधीचे भिवंडी आणि कल्याण लोकसभेचे चित्र अतिशय पोषक आहे. पण नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या झंजावाताचे महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा विश्वासही भिंवडी लोकसभेच्या कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मोदींचे विचार स्वयंस्फूर्तीने ऐकण्यासाठी जनता येत असते, अशाप्रकारे जनता हे विचार ऐकते आणि त्यांनाही मोदींच्या विचारांची प्रेरणा मिळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित रहा असे आव्हान भिवंडी लोक सभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले आहे

ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ

जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्याने ठाण्यात इंडिया-महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली. तसेच ठाण्यात मिंधेची उमेदवारी  गुजरातमधून आदेश आल्यानंतर ठरणार असल्याची खरमरीत टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गॅंगवर जोरदार निशाणा साधला. इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणेकरांचे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, शिवसेना उपनेते विजय कदम, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद, कॉंग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सलुजा सुतार, कॉंग्रेस महिला आघाडी पूनम पाटील, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, अनिश गाढवे, मुजफ्फर हुसैन, धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे, व इंडिया-महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिल्डरने लावला घर खरेदीदारांना चुना, घरखरेदीदार रस्त्यावर

केतन खेडेकर मुंबई : सुप्रिम सिव्हील कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर अब्बास कुरेशी यांनी त्यांच्या  कंपनीच्या माध्यमातून चेंबूर येथे इमारतीचे बांधकाम करण्याचे काम घेतले. त्यानंतर त्यांनी एका व्यावसायिक ओळखीतून  कुर्ला (पूर्व) येथील वत्सलाताईनगर, नेहरूनगर मधील, ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) कंपनीच्या ‘मास मेट्रोपोलिसीस या प्रकल्पाचे काम मिळाले. ह्या कामाची पाहणी करण्याकरिता व प्राथमिक बोलणी करण्याकरिता  तसेच आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री. निकेश इंदरलाल रावल गेलो असता. या मास मेट्रोपॉलिसीस साईट साठी ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ या कंपनीस बार्टर सिस्टम (पैशाच्या बदल्यात फ्लॅट अथवा बांधकाम एरिया देणे) नुसार काम द्यायचे ठरले. त्यानुसार ‘ग्रेस अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन’ चे मालक अत्ताउल्ला अन्सारी, दानिश अन्सारी, निशांत अन्सारी यांच्या विरोधात मी दिनांक २६/०७/२०२२ रोजी गुन्हेगारी, कट, फसवणूक, विश्वासभंग आणि धमकी देत असल्याच्या गुन्ह्याबद्दल मा. पोलिस सहआयुक्त (गुन्हे) यांचे कडे तक्रार केली होती. आमच्या सोबत खरेदीदारांची ही फसवणूक केली आहे. ११ फ्लॅट पैकी ०२ फ्लॅट चे रजिस्ट्रेशन करून दिले आणि उर्वरित ०९ फ्लॅट च्या ‘अलॉटमेंट लेटर’ आणि ‘डीड ऑफ कॅन्शलेशन’ यामध्ये फ्लॅट एरिया, फ्लॅट नंबर यांमध्ये तफावत आहे. तसेच अलॉटमेंट लेटर दिल्यानंतर फ्लॅट हे दुसऱ्याच व्यक्तीना रजिस्ट्रेशन करून विक्री केले. त्यानुसार सतत 2 वर्षांपासून आम्ही आमची तक्रार गुन्हे शाखेने नोंदवली नाही, आरोपीच्या चुकीच्या तक्रारीवर आमचा धक्का आणि आश्चर्य व्यक्त करत संयुक्त सीपी गुन्ह्याने प्रकरण 6 वरून युनिट 7 कडे वर्ग केले. तसेच घर खरेदीदार यांनी रिट याचिका क्र. 4218आणि अशोका बिल्डकॉन यांनी अनेक रिट याचिका क्र. 5779 ऑफ 2024 आणि आम्ही रिट याचिका क्र. 4691ऑफ 2024 केल्यानंतरच पोलिसांनी आमची प्रकरणे घेतली आणि एफआयआर नोंदविला गेला नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, या सर्व विकासानंतरही आणि माननीय उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार आरोपींना अटक केली जात नाही आणि कायद्याची भीती न बाळगता आरोपी मुक्तपणे फिरत आहे. एकूण रु. 12 करोडची आमची फसवणूक करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत किंवा कोणतीही कारवाई करत नाहीत. एक आरोपी केवळ श्रीमंत आणि उच्च संपर्कातील लोक असल्यामुळे आमचे संरक्षण कसे होते, या प्रकरणात निष्पक्षता का नाही, पोलिसांच्या या दृष्टिकोनाने आम्ही हैराण झालेल्या सर्व उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन देखील आम्हाला कोणतेही यश मिळालेले नाही किंबहुना आमची रक्कम किंवा घर देखील आम्हाला परत मिळालेले नाहीत. तरी आम्ही संपूर्णपणे हवालदिलं झाले असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रसारमाध्यमांना आवाहन करत आहोत की आम्हाला आमचे हक्काचे घर मिळवून द्यावे अशी माहिती बांधकाम व्यवसायिक निकेश रावल आणि अब्बास कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन  दिली.

‘दुष्काळातही रेशनचे धान्य मिळत नाही साहेब! ८० कोटी जनतेला धान्य मिळाल्याचा गप्पा सांगू नका’

थेट भर सभेत लाभार्थ्यानी जाब विचारला जरंडीतील महायुतीच्या प्रचार सभेतील प्रकार छायाचित्र ओळ-जरंडी येथील महायुतीच्या सभेत मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार दुसऱ्या छायाचित्रात उमेदवार रावसाहेब दानवे मार्गदर्शन करताना तिसऱ्या छायाचित्रात जनसमुदाय…. सोयगाव : अहो साहेब! दोन वर्षांपासून आमचा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही आमचे रेशनचे धान्य बंद केले आहे आम्हाला त्या अंशी कोटी लोकांच्या गप्पा नका सांगू आमचे धान्य का बंद आहे याबाबत तालुका प्रशासन दरबारी ओरड मांडा असा भर सभेत लाभार्थ्यांनी जाब विचारुन सभेत मार्गदर्शन करतांना खासदार रावसाहेब दानवे यांना दोन मिनिटे भर सभेत स्तब्ध केल्याचा प्रकार सोमवारी राज्य आणि केंद्राच्या दोन मंत्र्यांच्या सभेत जरंडी (ता सोयगाव) येथे घडला दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही ग्रामस्थांची समजूत काढून आधी ऐकून तर घ्या ऐकल्याशिवाय कसे समजेल असे प्रत्युत्तर देऊन वेळ मारून नेली आहे … जालना लोकसभाचे महायुतीचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सोमवारी मतदार संघाचे शेवटचे टोक समजले जाणाऱ्या जरंडीतून सुरुवात करण्यात आली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेला मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी जनतेला २०२२ पर्यंत मोफत रेशनचे गहू व तांदूळ दिल्या चा मुद्दा काढताच साहेब आम्हाला दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा आमच्याकडे तीन एकर शेती आहे काय खावे दुष्काळात धान्य मिळत नाही असा जाब थेट सभेत दोन्ही मंत्र्यांना विचारला त्यावेळी मंत्री सत्तार स्तब्ध झाले तर दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषण पुढे सुरू ठेवत आधी ऐकून घ्या त्याशिवाय समजणार नाही असे बोलून वेळ काढून घेतली होती यावेळी व्यासपीठावर   भाजपचे जेष्ठनेते सुरेश बनकर,अल्पसंख्याक चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी,बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई काळे, भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड,  भाजपचे  जयप्रकाश चव्हाण,आदींची उपस्थिती होती काय म्हणाले शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे— महायुतीच्या बाबतीत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितले की राज्यात युती असली तरीही सिल्लोड सोयगाव तालुक्यात भाजपा युती धर्म पाळत नाही त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपा सोबत काम करण्याची मानसिकता नाही मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करत आम्ही काम करत आहे भाजपने सुधारणा करावी मागील विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव ची भाजपा युतीच्या विरोधात होती हे सर्वश्रुत आहे असे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रभाकर काळे यांनी सांगितल्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर खुलासा करत रावसाहेब दानवे यांच्या सोबत या मुद्द्यावर सात बैठका झाल्या आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलली आहे असे सांगून चार महिन्यात भाजपा काय आहे हे कळेलच असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी यावर पोतारा फिरवीत अब्दुल सत्तार आणि मी चाळीस वर्षांपासून दोस्त आहे आम्ही भांडतो व एकही होतो राजकारनात कोणीही कोणाचा मित्र व शत्रू नसतो त्यामुळे आता आमचं जमलं तुमचं जमलं पाहिजे तुम्ही जमवून च्या घ्या असा सूचक टोला रावसाहेब दानवे यांनी भाजपा च्या कार्यकर्त्यांना मारला यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनीही पुन्हा रेल्वे मंजुरीचा विषय काढत जालना वरून पुढील निवडणूकीत रावसाहेब दानवे यांना थेट रेल्वेने फर्दापुरला निवडणुकीच्या प्रचाराला बोलावू असा खोचक शब्दात सूचक वक्तव्य केले त्यामुळे जरंडीतील प्रचार सभेतही या दोघांच्या मध्ये राजकिय कलगीतुरा रंगला होता… यावेळी अनुसूचित जातीचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजीवन सोनवने,राजेंद्र पाटील,सरपंच स्वाती पाटील,वंदनताई पाटील,धृपाताबाई सोनवणे, शमा तडवी, श्रीराम चौधरी, समाधान तायडे,आदींसह तालुक्यातील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपसरपंच संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले पुष्पा बाई काळे यांनी आभार मानले.

१ मेला वाजणार ठाणे प्रिमियर लीगचा बिगुल

ठाणे : महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२४ आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यतेने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदा…

नवी मुंबईत ‘मतदार अन् लोकशाही’ची लग्नपत्रिका

वाशी : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असून काही राज्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाकडून लग्नपत्रिकेच्या स्वरूपात मतदानाची पत्रिका छापली असून पालिकेच्या विभाग कार्यालयाबाहेर तसेच सरकारी कार्यालयांच्या बाहेर चिकटवण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरदेखील या पत्रिकेची चर्चा सुरू आहे. भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव चि. मतदार व भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. लोकशाही यांचे सोमवारी, २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या शुभमुहूर्तावर लग्न होणार आहे. लोकसभा २०२४च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. ‘आपले मतदान हाच आमचा आहेर’ ‘आपले मतदान हाच आमचा आहेर आणि विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट’ असा पत्रिकेतील टीपमध्ये संदेश देण्यात आला आहे. या पत्रिकेतून मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने पालिकेच्या मालमत्ता करांवर ‘मी जागरूक मतदार, मतदान करणारच’ असा उल्लेख करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. एनएनएमटीमध्येदेखील जनजागृती करण्यात येत आहे; तर शहरात पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. निळ्या शाईचे आवाहन पत्रिकेच्या समारोपामध्ये ‘वरील विनंतीला मान देऊन मतदानाला यायचं हं…’ ‘आमच्याशिवाय तर मज्जाच नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कु. निळी शाई आणि चि. ईव्हीएम यांनी मतदानाला येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. पथनाट्य, पालिकेच्या मालमत्ताकराच्या पावतीवरदेखील संदेश देण्यात आला आहे. तसेच शहरांमध्ये फलक लावण्यात आलेले आहे. पालिकेच्या मुख्यालयात स्क्रीन लावण्यात आलेली आहे. – शरद पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग

कोंकणातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी– विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर

नवी मुंबई : कोंकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने  उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी  नागरिकांनी  दुपारी 12 ते 3च्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे  स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. उष्माघात  होऊ नये म्हणून  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे,  हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. कोंकणातील जनतेने काळजी घ्यावी . उन्हाळ्यात त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.

‘मी मतदान करणारंच .. आपणही मतदान करा’

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती ठाणे : ‘मी मतदान करणारंच.. आपणही मतदान करा आणि लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भास्कर कॉलनी येथील हजेरी शेड या ठिकाणी मतदान जनजागृती केली. स्वीप कार्यक्रमातंर्गत शहरात विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. १४८ ठाणे मतदार संघ सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (२९ एप्रिल) सफाई कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या ठिकाणी मतदान जनजागृतीपर सामूहिक घोषणा देऊन सफाई कामगारांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन मतदानाची सामूहिक  शपथ घेण्यात आली. या मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक सफाई कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा या संदेशासह मतदानाची तारीख  दर्शवणारे माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले. सर्व स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांना मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांनी व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मेला अवश्य मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे “आम्ही राबऊ स्वच्छ्ता अभियान,पण तुम्ही करा हक्काने मतदान या घोषणे द्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.