Author: bittambatami.com

भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार…

पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्याचे निर्देश

उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि ठेकेदारात बैठक उल्हासनगर – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन यापुढे रस्ते न खोदण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात कंत्राटदार व ठेकेदार असोसिएशनची बैठक बोलाविली होती. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी शहरातील विकास कामे पूर्ण करा. असा सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला केले. तसेच त्यांच्या समस्या एकून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिका बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तर पाणीपुरवठा विभागामार्फत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. दोन्ही विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून कामे केल्यास समस्या निर्माण होणार नाही. असा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना आयुक्त शेख यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत करण्यात यावीत, तसेच नवीन खोदकाम करण्यात येवू नये, रस्त्यावर धूळ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, नागरिकांना वाहतूक कोंडीची त्रास होणार नाही. यासह दक्षता व सुरक्षा विषयक साधनांचा वापर करावा. अशा सूचना यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी ठेकेदारांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किशोर गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण शेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लडाख, सोनु खटवाणी, शशी जगत्यांनी, प्रभु चंद्राणी यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असेही आयुक म्हणाले.

सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून

लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करा.. ठाणे : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा, असे निर्देश ठाण्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी आज बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस 23 भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, 24 कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना व श्री.राहील गुप्ता उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) डॉ. धोंडोपंत स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी 23-भिवंडी संजय जाधव, 24-कल्याण सुषमा सातपुते, 25-ठाणे मनिषा जायभाये, नोडल अधिकारी कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर, नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता विजयसिंह देशमुख तसेच आयकर विभाग,  पोलीस विभाग- ठाणे नवी मुंबई, मिरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालय, केंद्रीय वस्तू व सेवाकर, महसूल, गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क, अंमली पदार्थ नियंत्रक ब्युरो, अंमलबजावणी संचालनालय, राज्य उत्पादन शुल्क, वस्तू व सेवाकर, राज्य परिवहन विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक ठाणे, खर्च संनियंत्रण समिती 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे आदी सर्व विभागांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व  विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक 2024 या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. तसेच मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा असून ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.  मतदानाचे शेवटचे चार दिवस हे  अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. 137 भिवंडी, 146 ओवळा, 150 ऐरोली हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. आपण सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. प्रास्ताविक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे यांनी केले. सूत्रसंचलन मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

‘निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा’

अशोक गायकवाड कर्जत : मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही बळकटीसाठी समाजातील सर्व स्तरातील जनतेचा सहभाग आवश्यक आहे .संपूर्ण भारत देशात सध्या लोकशाहीचा उत्सव निवडणुकीच्या माध्यमातून साजरा होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्राम) कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी ३३ मावळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे व कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघ १८९ कर्जत मधील नेरळ तलाठी कार्यालयापासून नेरळ बाजार पेठ मध्ये भव्य प्रभात फेरी (रॅलीचे) आयोजन करण्यात आले होते.तसेचं नेरळ येथील धारप सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप अंमलबजावणी अंतर्गत ३३ मावळ लोकसभा मतदारसंघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील कर्जत,नेरळ, चिंचवली,कडाव, कशेळे, कळंब पाथरज या महसुली मंडळात शहरी व ग्रामीण भागात आदिवासी वाडी वस्तीवर मतदार जनजागृती साठी प्रत्यक्ष दिव्यांग मतदार व ८५ अधिक वयोमान असणाऱ्या मतदारांच्या गृहभेटी घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच सायकल रॅली व विविध रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून मतदान विषयी मतदारास प्रोत्साहन देण्याकरता विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत नेरळ येथे काढण्यात आलेली प्रभात फेरी( रॅली) मध्ये कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, नेरळ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे , मंडळ अधिकारी नेरळ संतोष जांभळे , कळंब मंडळ अधिकारी अरुण विशे, चिंचवली मंडळ अधिकारी वैशाली पाटील, विकास गायकवाड अनिल कांबळे, उमेश कुमार भोरे, वैशाली मांटे माधुरी चौधरी तलाठी , नेरळ ग्रामसेवक कार्ले , अंगणवाडी सेविका ,अशोक भगत, दिपक पेरणे ,शासकीय कर्मचारी, महिला बचत गटातील महिला व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृतीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

भाईंदर : परदेशात नोकरी देण्याचा बहाण्याने विविध राज्यांतील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील एक इमारतीत ईगल प्लेसमेंट सर्व्हिसेस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाकडून परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. त्याला भुलून विविध राज्यातील गरजूंनी कंपनीशी संपर्क साधला. या प्रत्येकाकडून ७० ते ८० हजार रुपये उकळण्यात आले. या सर्वांना विमानाची तिकिटे आणि व्हिसाही देण्यात आला. त्यांचा पासपोर्ट मात्र काढून घेण्यात आला. पासपोर्ट विमानतळावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र विमानतळावर गेल्यावर तिकीट रद्द झाले असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व फोन बंद व कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले. आपण फसविले गेल्याचे समजल्यावर शंभरहून अधिक लोकांनी तक्रार केल्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका वास्तूंच्या सुरक्षा आणि सौंदर्यासाठी कायापालट मोहीम

ठाणे : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला. त्यावेळी, नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उप समिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात. त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची, निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.तसेच, महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक आहे. म्हणूनच, नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी. इमारतीची दुरुस्ती, अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी, प्रवेश आणि निकास मार्गिका, पार्किंग, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्या बद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागाने तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना महापालिकेच्या वास्तूंमध्ये यावेसे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील सी वन या अतिधोकादायक वर्गवारीतील २६ इमारती अजूनही व्याप्त आहेत. त्यात, १७८ कुटुंबे आणि ६७ दुकाने आहेत. यांचे निष्कासन करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात यावा. त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. तत्पूर्वी, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहायक आयुक्त सोपान भाईक यांनी कोपरी – नौपाडा प्रभाग समिती क्षेत्राबद्दल सादरीकरण केले. तसेच, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, विनोद पवार, शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला. या बैठकीला, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आदी प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त  सत्कार

मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक  कार्यकर्ते मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील इलेक्ट्रिक सेक्शनचे चार्जमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर व धडाडीचे कार्यकर्ते  सतीश शंकर तुपे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२४  पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त वर्कशॉपमधील कामगारांनी  माझगाव येथील वर्कशॉपमध्ये सतीश तुपे  व  पत्नी श्रद्धा तुपे यांचा  २६ एप्रिल २०२४ रोजी शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ  व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, विविध खात्यातील कामगार, नातेवाईक, माझगाव डॉक, फ्लोटीला वर्कशॉप यांच्यावतीने सतीश तुपे यांचा सत्कार करण्यात आला. सतीश तुपे हे प्रामाणिक, आदर्श व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत.  युनियनच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रभागी होते. त्यांनी कामगारांचे दैनंदिन प्रश्न, हॉस्पिटलला मदत, पेन्शन असे अनेक  प्रश्न पाठपुरावा करून यशस्वीपणे सोडविले. त्यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो,  तसेच त्यांच्याकडून यापुढेही कामगारांची चांगली सेवा घडो. अशी शुभेच्छापर भाषणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे  पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, मारुती विश्वासराव,  विजय पंदीरकर,  आप्पा सूर्यवंशी, पोर्ट ट्रस्टचे  विद्युत अभियंता राजेश वाधवाणी,  सहाय्यक विद्युत अभियंता इकबाल बामणे, दत्तात्रेय सुगवेकर, संध्या सुगवेकर, स्मिता चंदने आदी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे कमिटी मेंबर  श्रीकृष्ण पडेलकर यांनी केले. कार्यक्रमास मुलगी मधुरा तुपे व मुलगा साईराज तुपे उपस्थित होते. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी विष्णू पोळ, योगेश चौले, विजय बामगुडे,  सुनील गायकर,  नितीन रायकर,  नारायण पालव,  मेलविन डिसोझा,  संजय आरगडे,  रिझवान शेख,  श्रीकृष्ण पास्ते,  राजेश वाडेकर,  जावेद सोलकर,  टी. एलांगोवन, वाघमारे आदी कामगार कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

९ वर्षांपासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात, यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हातात – संजय केळकर

 शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात ! अनिल ठाणेकर ठाणे : अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे झालेली फळगळ  व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे तसेच हवामान बदलामुळे यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, अशी कोकणातील आंबा शेतकऱ्यांची परवड आमदार संजय केळकर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित  शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात होणार असल्याची माहिती आ. संजय केळकर यांनी दिली आहे. कोकणातील एकूण १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची पागवड केली जाते. २०२१ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न ३  लाख २० हजार मेट्रिक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन २०२२ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०२३ रोजी १ लाख २८ हजार मेट्रिक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. या वर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे चाळीस टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, या साऱ्या परिस्थितीचा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवास दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे. दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसुन एक चळवळ आहे. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात. याठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध आहे. तरी, कोकणातील अस्सल हापुस आब्यांसाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठामपा माजी उपमहापौर सुभाष काळे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट यंदा असह्य उकाड्यात हैराण ठाणेकरांना आंबा महोत्सवाचा गोडवा अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात १ मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे. १ ते १२ मे पर्यंत आंबा महोत्सव, सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असणार आहे. यावेळी महोत्सवाचे १७ वे वर्ष आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस आंबा, पायरी, रत्ना केसर आंब्या बरोबरच आंबा- फणस पोळी, सरबते, सुके-ओले काजू, मालवणी मसाले, पापड, लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे कोकणातील शेतकऱ्यांचे ४५ स्टॉल व ठाण्यातील महिला बचत गटाचे ५ स्टाॅल असे ५० स्टॉल या महोत्सवात असणार आहेत. चौकट महोत्सवात मिळणार अस्सल हापुस ! सध्या बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकचा आंबा विकला जातो. कोकणातील अस्सल हापुस कापल्यावर केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो. ठाण्यातील आंबा महोत्सवात ५०० ते ९०० प्रती डझन या दराने आंबा उपलब्ध असुन तरी चोखंदळ ग्राहकांनी महोत्सवातच अस्सल हापुस खरेदी करावी. असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले आहे.

ठाण्यात एसबीआयच्या नौपाडा शाखेकडून ग्राहकांसाठी मतदार जागृती मोहीम

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदान 20 मे 2024 रोजी होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या १४८ ठाणे विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयाच्या वतीने नौपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांसाठी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे, या विषयी स्टेट बँक ऑफ इंडियामधील कर्मचारी व ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.  १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांकडून मी मतदान करणार आणि इतरांनाही सांगणार, अशी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. बँकेतील सर्व कर्मचारी मतदान जनजागृतीमध्ये सहभागी होणार असून मतदान करा, मतदानासाठी घराबाहेर पडा असे संदेश मोबाईलद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे आश्वासन बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी दिले.

महिला बचतगट मतदार करत आहेत मतदान जनजागृती

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील महिलांचा टक्का वाढविण्यासाठी वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप टीमने भांजेवाडी येथील उतेकर चाळीत महिला बचत गटांच्या महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. मतदान प्रक्रियेची माहिती देणाऱ्या रिक्षातून भांजेवाडी, भास्कर कॉलनी परिसरात जनजागृती करण्यात आली. महिला वर्गात मतदानाबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच मतदार जागरुकता व मतदान टक्का वाढवण्यासाठी उतेकर चाळ, भांजेवाडी, ठाणे येथील महिला बचतगट यांच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य आणि इतर महिलाही उपस्थित होत्या. महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा या विषयी स्वीप पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. मतदानामध्ये सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये. शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्य, आजूबाजूला राहणाऱ्या महिला,कुटुंबातील सदस्य, नव मतदार आणि नागरिक यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रमाचा समारोप सामूहिक मतदानाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला. मतदान म्हणजे मतदान असतं भांजेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी ७४ वर्षे वयाच्या श्रीमती बर्वे म्हणाल्या की, मतदान म्हणजे मतदान असतं तुमच्या-आमच्यासाठी ते संविधानाचं वरदान असतं!, मी २० मे रोजी मतदान करणार आणि इतरांना ही मतदान करायला सांगणार.