Author: bittambatami.com

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!

शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे.यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थितांना केले. मतदान जनजगृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला. शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आई-बाबास पत्र हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गाने विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर केला. मतदान करा… मतदान करा… लोकशाहीचा विजय करा या संकल्पनेमधून मी मतदान करणारच आपण ही करा’ असा प्रेरक संदेश फलकावर लिहून शिक्षक व कर्मचारीवर्गांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

दुय्यम निबंधक कार्यालयात मतदान जनजागृती

ठाणे, : ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात लग्नाच्या नोंदणीसाठी आलेल्या नववधू-वरांसह वऱ्हाडींमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीपच्या टीमने केले. सध्या लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा लाभ मतदानविषयक जनजागृतीसाठी उठवला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. या वेळी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दुय्यम निबंधक हे विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करण्यासाठी नववधू-वर व वऱ्हाडी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यात आज रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याचेच औचित्य साधून स्वीप टीमने दुय्यम निबंधक कार्यालय येथे सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दुय्यम निबंधक श्रीमती. राऊत यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम घेतला होता. विवाह नोंदणी करण्यासाठी ठाणे शहरातील नववधू-वर व वऱ्हाडी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्या सर्वाना मतदान टक्केवारी कशी वाढेल या विषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे यांची जाणीव त्यांना करून देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी व सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या सर्व वऱ्हाडींकडून ‘मी मतदान करणारच’ असे अभिवचन घेण्यात आले. यावेळी नवीन घरात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरीक आणि ठाणे शहरातील सजग मतदार म्हणून मतदान करेल. नागरिकांनीही मतदानात सहभाग घ्यावा, असे नववधू समिक्षा मंचेकरने सांगितलं आहे. संसाराच्या कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहे आणि मतदान करणार आहे, असे नवीनच लग्न झालेले हर्षद सावंत म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता पूर्ण-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १९२ अलिबाग विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी प्राप्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता (कमिशनिंग) पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. जे एस एम महाविद्यालय अलिबाग येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कमिशनिंग प्रसंगी निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) संजीव कुमार झा, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती जोयस लालरेम्मवी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदान यंत्रांची कार्यक्षमता तपासून सुसज्य करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट ची कमिशनिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदान यंत्र घटक योग्य कार्य करत आहेत याची खात्री करण्यासाठी चाचणी केली जाते. कमिशनिंग प्रक्रियेमध्ये नियोजन, निवडणूक उमेदवार- चिन्ह, मतदान केंद्रनिहाय प्रमाणीकरण सुसज्जता समाविष्ट आहे. यंत्र घटक जसे पाहिजे तसे काम करत आहेत याची खात्री करणे हा देखील कमिशनिंगचा उद्देश आहे. यावेळी प्रक्रिया पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली. स्ट्राँग रूमची सुरक्षा सुव्यवस्थेच्यादृष्टीने २४ X ७ पॉवर बॅकअप, सशस्त्र बंदोबस्त आराखडा, पोलीस आदी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात करण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

आता चौकशी करणार फ्लेमिंगोच्या मृत्यूची मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतील १० फ्लेमिंगोच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील खाडीत एका आठवड्यात १० फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता.  याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे सचिव आहेत. कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या 18 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत 20 वेळा बदली करण्यात आली आहे, अशा प्रामाणिक अधिकाऱ्याकडे चौकशी दिली याचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले. नवी मुंबईतील डीपीएस तलावाभोवती 10 फ्लेमिंगो मरण पावले  व  पाच फ्लेमिंगो जखमी झाले आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी नवी मुंबईतील हा एक महत्त्वाचा सरोवर पाणथळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेने स्वतः पाणथळ जागा फ्लेमिंगोचे निवासस्थान आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून संरक्षित करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशन सहकार्य करणार होते. मात्र सिडकोने आतापर्यंत हे काम महापालिकेकडे देण्यास नकार दिला आहे. सिडकोने सुमारे 25 तलाव नागरी संस्थेकडे हस्तांतरित केले आहेत परंतु डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा राखून ठेवल्या आहेत.या जागा राखीव ठेवल्या आहेत. असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.

पाकिस्तानला जगासमोर उघडे पडणाऱ्या अँड. उज्वल निकम यांची उमेदवारी म्हणजे मुंबईकरांचा सन्मान

रमेश औताडे मुंबई : मुंबईत रेल्वेत बाँम्ब ब्लास्ट करुन मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या याकूब मेमनला फाशी व्हावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद करणारे, मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी व्हावी म्हणून आवश्यक पुरावे व या कटातील पाकिस्तानचा सहभाग उघड करुन जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडणारे अँड उज्वल निकम यांना लोकसभेची  उमेदवारी म्हणजे मुंबईकरांसाठी लढणाऱ्या सच्चा मुंबईकरांचा हा सन्मान असून उज्वल निकम हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधितज्ञ अँड उज्वल निकम यांचा पक्ष प्रवेश करुन त्यांचे जोरदार स्वागत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केले. अँड उज्वल निकम म्हणजे एक सच्चा मुंबईकर आणि योध्दा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी प्रतिक्रिया अँड आशिष शेलार यांनी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अँड उज्वल निकम यांचे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विलेपार्ले येथील कार्यालयात ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अँड पराग अळवणी, शिवसेना नेते डॉ दीपक सावंत, विवेक पवार, माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यासह युतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. उज्वल निकम यांनी आपल्या भाषणात ,  संधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय, प्रदेश अध्यक्ष आणि भाजपा मुंबई अध्यक्षांचे आभार मानले. ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा बहुमान त्यांनी वाढवला ते पाहून आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान समजतो, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली.

रोहयो मजुरांना दुष्काळात आधार; सोयगाव तालुक्यात रोहयो मजुरांच्या खात्यावर ८६ ,लाख रु निधी जमा

सोयगाव : अती गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावरील एक हजार आठशे ६४ मजुरांच्या खात्यात गुरुवारी ८६ लक्ष रु जमा झाले आहे त्यामुळे चार महिन्यातून पहिल्यादाच रोहयो मजुरांच्या मोबाईल वर रक्कम जमा झाल्याचे संदेश  गुरुवारी दुपारी एक वाजेपासून प्राप्त झाले होते. सोयगाव तालुक्यात पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेची आठशे दहा कामे मंजूर आहेत या कामांवरील मजुरांच्या हातांना मजुरी तर मिळाली होती परंतु  डिसेंबर ते मार्च या चार महिन्यापासून मजुरीच्या पोटी एक रुपयाही मिळाला नव्हता परंतु सोयगाव तालुक्यातील रोहयो च्या कामावरील एक हजार ८६४ मजुरांच्या खात्यावर थकीत मजुरी गुरुवारी दुपारपासून सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६ लाख रक्कम रोहयो मजुरांच्या खात्यात वर्ग झाली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील रोहयो मजुरांना दुष्काळात आधार मिळाला आहे वाढीव दरा नुसार रक्कम शासनाने रोहयो मजुरांना एक एप्रिल २०२४ पासून प्रति दिवस २७३ ऐवजी २९७ रु याप्रमाणे मजुरी देण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करत गुरुवारी जमा झालेल्या रक्कम मध्ये एक एप्रिल पासून रोहयो च्या कामावर असलेल्या मजूरांना प्रति दिवस २४ रु वाढीव दरा ने मजुरी अदा केली आहे त्यामुळे एक एप्रिल पासून रोहयो कामावर असलेल्या मजूरांना २९७ रु प्रति दिवस मजुरी मिळाली आहे सोयगाव चे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, रोहयो अभियंता सचिन चव्हाण, राहुल राठोड, रोहयो कार्यक्रम अधिकारी दत्ता कटके गणेश गवळी,गजानन फरकांडे,प्रकाश मोकसरे,संगणक परिचालक सुरेंद्र निकम,आदींनी पुढाकार घेतला आहे.

दामोदर पांडुरंग काळे यांचे निधन

सोयगाव : सोयगाव येथील जेष्ठ नागरिक दामोदर पांडुरंग काळे उर्फ  अण्णा (वय ७६) यांचे शनिवारी (दि.२७) दुपारी २.३० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चयात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजाता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पत्रकार सुनील अण्णा काळे यांचे वडील होते.

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल  तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागात मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेन की, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.असे त्यांनी सांगितले. ॲड. आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, 2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही. अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते यावर ॲड. आंबेडकर यांनी समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे. असे सांगितले.

माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार – उद्धव ठाकरे

रमेश औताडे मुंबई : देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम सुरू असून त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई आहे. महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. माजी मंत्री वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे व त्यानंतर तुतारी वाजवणार असे म्हणत वर्षाताई गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मातोश्री व ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागांवर विजय मिळवू असा विश्वास असून २००४ च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

सोयगाव तालुक्यात उष्णतेची लाट

सोयगाव ते बनोटी मार्गावर शुकशुकाट तापमान ४३ अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण, रस्ते झाले सुनसान सोयगाव :दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.सोयगावचा पारा शनिवारी  ४३ अंशावर   पोहोचला आहे.त्यामुळे सोयगावात तापमानाने उच्चांक गाठल्याने दुपारी अकरा  ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंगाला उन्हाचे चटके बसत असत आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट दिसत आहे. उन्हाचा तीव्र झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्यांसह पशुपक्षांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोयगाव परिसरात दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, प्रवासी वाहतूकदार, माल वाहतूकदांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला आहे. दहा वाजेपासूनच उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत.सोयगाव परिसरात तीव्र उष्णता जाणवत असल्याने सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट होता.त्यामुळे घरात आणि कार्यालयात दिवसभर पंखे लावून उन्हाच्या झळांपासून बचाव केला जात आहे, तर घराबाहेर जाताना टोपी, स्कार्प, गॉगल,सनकोट घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात आहे. पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्तेही निर्मनुष्य होवून तुरळक वाहने ये-जा करतांना दिसत आहेत. लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैरान झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक मागील वर्षी पेक्षा यंदा उन्हाची तीव्रता अधिक असून ऐन लग्न सराईत रस्ते निर्मनुष्य झाले आहेत सोयगावचे तापमान गुरुवार ते शुक्रवार ४१ अंशावर असताना शनिवारी अचानक तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे.