Category: क्रीडा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी, याच दिवशी, अहिंसेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुजाऱ्याची, एका अधम वृत्तीच्या माथेफिरुकरवी कट रचून निर्घृण हत्या करविली गेली.बरोबर ७८ वर्षांपूर्वी ‘गांधी’ नावाच्या महात्म्याची हत्या झाली खरी; पण, ‘गांधीवाद आणि गांधीविचार’ कधिच मेले नाहीत, कधिच मरणार नव्हते…कारण, आजच्या जागतिक-तापमानवाढीसारख्या महासंकटामुळे भयग्रस्त झालेल्या व भांडवली-नववसाहतवादी दुष्प्रृत्तींमुळे, अशांत-अस्वस्थ झालेल्या जगाला.केवळ, ‘गांधीविचार’च तारु शकतो; हे एव्हाना, या समरप्रसंगी, अवघ्या जगाच्या चांगलंच ध्यानी आलंय, असे मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले. आपल्या याच, विश्ववंदनीय महात्म्याचे, हेच वैश्विक-विचार पुढे नेण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ या समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने, ३० जानेवारी-२०२६ रोजी, सायंकाळी ठीक ५ वा. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे, हे दोघे मान्यवर प्रभावी वक्ते ‘गांधी-विचारविश्वावर’ प्रकाशझोत टाकताना, आपल्यातील समाजघातकी, राष्ट्रद्रोही व अतिरेकी अशा उजव्याशक्तिंचा यथोचित समाचार घेतील.  सर्वसामान्यांना अज्ञात असलेल्या ‘गांधींची ओळख’, या व्याख्यानातून होईलच; पण, त्याचबरोबर गांधीहत्येचं नेमकं ‘सत्य’ही, या व्याख्यानातून पुढे येईल. आजपर्यंत ढोंगी व जात्यंध्य हिंदुत्ववाद्यांकडून, आपल्या महात्म्याबद्दल आणि त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक अफवा बेमालुमपणे प्रसारित केल्या गेल्या; त्या सप्रमाण, पुराव्यांसह खोडून काढण्याचं महान कार्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, ही अपेक्षा आहे. आपल्या राष्ट्रपित्याचं कळीकाळाला पुरुन उरणारं महान कार्य व त्याचा संदेश…जनसामान्यांपर्यंत साद्यंत पोहोचावा; तसेच, त्याच्या ‘हौतात्म्या’तून अंशतः का होईना, पण उतराई होता यावे, यासाठीच,”गांधीहत्या आणि आपण…” या व्याख्यानाचं प्रयोजन आहे आणि त्यासाठीच, आपली उपस्थिती आवर्जून प्रार्थनीय आहे, असे आवाहन राजन राजे यांनी केले.

 भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यानिमित्ताने मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की भारतीय संविधान देशातील सर्व प्रकारच्या जनतेस जगण्याचे – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हक्क व अधिकार प्रदान करते. त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी देखील प्राप्त होते. याचा लाभ घेत असतांना आपण सर्वांनी आपली कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे व मेहनतीने पूर्ण केली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या शिक्षणक्रमांची माहिती देखील दिली. त्यात प्रामुख्याने नवीन कौशल्याधारित व रोजगाराभिमुख, कृषी विज्ञान केंद्राचे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेले शिक्षणक्रम यांचा समावेश होता. मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली सुरु असलेला महाज्ञानदीप प्रकल्प, वाढवन बंदर साठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या हेतूने सुरु झालेले शिक्षण – प्रशिक्षणाचे काम, शेतकरी वर्गास एआय तंत्रज्ञान आधारित दिले जात असलेले शिक्षण, सामाजिक बांधिलकी म्हणून बंदिवान, तृतीयपंथी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवक युवती यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे सुरु असलेले विशेष उपक्रम यांची देखील त्यांनी माहिती दिली. सन २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करुया असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,  विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, दैनंदिन वेतन व सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी, शेतमजूर आदी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती शिवसेना उबाठाची मागणी मान्य मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले. नगरसेवक धरम काळे, ऍड संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अमोघ शर्मा टायब्रेकवर विजेता

प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा मुंबई : प्रतिष्ठेच्या प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत अमोघ शर्माने टायब्रेकवर विजेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत चार खेळाडूंचे समसमान गुण झाले होते. अखेर अमोघ…

 लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती

लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी स्मारक रुग्णालयासाठी ऐतिहासिक निर्णय मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील कामगारांच्या दिर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच लाड पागे अंतर्गत नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, लाड पागे वारसाहक्काने ६ कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय जाहीर झाला. लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सन २०१५ पासून सुरू होता. अथक पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील एकूण ७८ रिक्त पदांवर सफाई कामगारांच्या पात्र वारसांना नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय, श्रमिक उत्कर्ष सभा आणि महात्मा गांधी स्मारक कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला आहे. या विषयावर आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला होता. त्याच प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून, २०१५ पासून प्रलंबित असलेल्या ६ पात्र वारसांना प्रजासत्ताक दिनी अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट आश्वासन दिले की, येत्या एका महिन्यात उर्वरित ७८ पैकी सर्व रिक्त पदांवर लाड-पागे समिती अंतर्गत पात्र वारसांची नियुक्ती केली जाईल. या निर्णयामुळे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांच्या जागी आता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त होणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षित भविष्य मिळणार आहे. महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियन (मान्यताप्राप्त) च्या कामगार बांधवांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद असून, सेवा, संवेदना व सामाजिक न्यायाचा आदर्श या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आमदार लाड यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर रिवणकर, डॉ. शिवकुमार भाले, डॉ. संजय असुर्लेकर, डॉ. जितेंद्र पाटील तसेच संघटनेचे सचिव दिपक गोडे उपस्थित होते. या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांना न्याय मिळाला असून, सामाजिक बांधिलकीची जबाबदारी शासन व प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली २०१५ साली अंतिम झालेल्या लाड पागे वारसांची यादी प्रथम अंमलात आणावी. व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या वारसांवर अन्याय होऊ नये. वयाची अट शिथिल करून पात्र वारसांना नियुक्ती द्यावी. सामाजिक जबाबदारी (आईवर अवलंबित्व, कौटुंबिक परिस्थिती) लक्षात घेऊन मानवी दृष्टिकोन ठेवावा. अनुकंपा वारसांपैकी सफाई कामगार व जातीचे प्रमाणपत्र असलेल्यांना लाड पागे समिती अंतर्गत समाविष्ट करून तातडीने न्याय द्यावा. अनुकंपा वारसांची २०१५ ची ज्येष्ठता कायम ठेवून नियुक्तीचा विचार करावा.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न अशोक गायकवाड अलिबाग : २६ जानेवारी  रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सभारंभ असून भारताची राज्यघटना अंमलात आल्याने पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. हजारो देशभक्तांच्या बलिदानातून या दिवसाची प्राप्ती झालेली असल्याने हा आपल्या देशाचा सुवर्ण दिन आहे. या दिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने कारागृहातील दाखल बंद्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची तसेच प्रजासत्ताक दिनाची जाणीव व्हावी तसेच कारागृहातील बंदी सुध्दा या देशाचे नागरिक आहेत त्यांना देशाविषयी आपुलकी वाटावी व स्वत:चा आत्मविश्वास वाढावा याकरीता अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता देशभक्तीपर गाणे, रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धा , बुध्दीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा व देशभक्तीपर निबंधस्पर्धा सोमवारी विविध विशेष स्पर्धा संपन्न झाल्या. या विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बंद्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले तसेच शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) महारुद्र नाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बंद्यांचे भावी जीवनात शिक्षणाचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच बंद्यांना कारागृहात दाखल असताना तसेच कारागृहातून सुटून बाहेर पडल्यावर पुढील शिक्षण कसे प्राप्त करता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रथम कारागृहातील सर्व बंद्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बंदी कारागृहात दाखल असताना जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विभाग यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होवून प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांनी या प्रशिक्षणांत सहभाग घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होवून त्यांना रोजगार उपलब्ध होईल तसेच स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळून त्यांचा उदर निर्वाह करु शकतात असे सांगून बंदी पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त बंद्यांनी हे प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता अधीक्षक.अलिबाग जिल्हा कारागृह,वर्ग-२, विशाल बाळासाहेब बांदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, श्रीवर्धन मंगेश डफळे, व उपाध्यक्ष, प्रबोधन सामाजिक सेवा संस्था अलिबाग, डॉ.मिलींद पाटील, प्रतिनिधी, प्रयास सामाजिक संस्था,मुंबई ॲड.निलेश मोहिते, प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे प्रशिक्षक प्रांजली, अमोल माळी, सतिश मोडखरकर, प्रचिती भगत, हर्षदा दांडेकर तसेच अलिबाग जिल्हा कारागृहातील अधिकारी किशोर महादेव वारगे, तु.अ.श्रेणी-२, निशिगंधा माळी, वैद्यकीय अधिकारी, रामहरी कुटे, सुभेदार व देवलु केरबा रांजड, सुभेदार व तसेच अविनाश जाधव, गजानन खवळे,नितीन भोईर, का.शिपाई तसेच भारती शेवाळे, महिला शिपाई उपस्थित होते.

 निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले

योनेक्स सनराईज मल्टी डिस्ट्रिक्ट मास्टर्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले मुंबई उपनगरातील ५९ वर्षीय आनंद विठ्ठलकर यांनी ठाणे जिल्ह्यातील निरंजन शहाणे यांच्यासोबत जोडी करून, ज्यांच्यासोबत ते ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नियमितपणे सराव करतात, ४५+ पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित जोडी जस्टिन जोसेफ आणि प्रेम रोहेरा यांचा १५-६; १५-७ अशा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत जोसेफ अँथनी कुजूर आणि सुधीर कंधारी यांच्या जोडीला १५-५; १५-७ असे आणि उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित महेश छाब्रिया आणि सुमित कौल यांच्या जोडीला १६-१४; १५-८ असे पराभूत केले. ३५+ पुरुष दुहेरी गटात, मुंबई उपनगरातील अव्वल मानांकित आदित्य स्वामी आणि हितेश दुआ यांच्या जोडीने अजय मसंद आणि अंशु सिंग यांच्याविरुद्ध तीन अटीतटीच्या गेममध्ये १५-१०, १३-१५, १५-१३ असा रोमांचक विजय मिळवला. इतर निकाल :- महिला दुहेरी 3५+ नेहा काकडे आणि स्मिता साळगावकर यांनी नम्रता घोले आणि सोनाली सरकार यांचा १५-9, १६-१4 असा पराभव केला. मिश्र दुहेरी 3५+ आदित्य स्वामी आणि स्मिता साळगावकर यांनी अंशू सिंग आणि सरला कोटक यांचा १५-७, १५-१३ असा पराभव केला. महिला दुहेरी 4५+ रोशनी ठाकूर आणि सरला कोटक यांनी दृष्टी कुकरेजा आणि जान्हवी मेहरानी यांचा १५-१३, १५-९ असा पराभव केला. मिश्र दुहेरी 4५+ प्रेम रोहेरा आणि जानवी मेरानी यांनी जस्टिन जोसेफ आणि चेरिल गॅब्रिएल यांचा १५-७, १५-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरी ५५+ अजय विग आणि अविनाश गोडे यांनी प्रशांत मुखर्जी आणि योगेश अरोरा यांचा १५-११, १५-७ असा पराभव केला. महिला दुहेरी ५५+ नीना बाजपेयी आणि रितू अरोरा यांनी कविता जैन आणि माधवी कुरुंभती यांचा १५-१3, १५-१७, १५-१० असा पराभव केला. मिश्र दुहेरी ५५+अविनाश गोडे व कविता जैन यांनी आनंद विठ्ठलकर व प्रेरणा साधनकर यांचा १५-८, १५-२ असा पराभव केला. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि TCDBA यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे क्लब येथे ही स्पर्धा पार पडली.

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले एमसीसी लिटिल स्टार  (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले. पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला. एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले. संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८). एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८). विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).

चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन

आर्य गुरुकुलचा समष्टी अंजनेय होम चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन कल्याण : कल्याण येथील आर्य गुरुकुल, जागतिक चिन्मय मिशनच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक तेजस्वी भाग बनले. त्यांनी समष्टी अंजनेय होमचे आयोजन शनिवारी कल्याण मध्ये  केले होते.  हा एक असा यज्ञ होता ज्याने भक्ती, शिस्त आणि दैवी कृपेला एकत्र आणले. हा कार्यक्रम केवळ एक विधी नव्हता, तर एक आध्यात्मिक जागरण होते, जे वेदांताला दैनंदिन जीवनात आणि ज्ञानाला सेवेत रूपांतरित करण्याच्या गुरुदेवांच्या दृष्टिकोनाचा प्रतिध्वनी होता. दिवसाची सुरुवात राम नामावलीच्या जपाने आणि तानपुऱ्याच्या श्रुतीने झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शांतता पसरली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्याचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण भजनांनी, कृशांक मलिक (उपाध्यक्ष, चिन्मय मिशन, कल्याण) यांच्या स्वागतपर भाषणाने आणि अलका मुतालिक यांच्या सत्काराने झाली, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या शब्दांनी सर्वांना आठवण करून दिली की, “अमृत महोत्सवातील आर्य गुरुकुलचा सहभाग हा तरुण पिढीसाठी आध्यात्मिक जागृतीचा एक प्रकाशस्तंभ आहे.” याठिकाणी सर्वांच्या सहभागातून सामूहिक भक्तीचे दर्शन घडले. यामध्ये ४०० तरुण साधक, ७५ मार्गदर्शक, ५० समर्पित समर्थक, २१ कुटुंबे कृतज्ञता व्यक्त करणारी आणि २१ वैदिक विद्वान यांचा समावेश होता. दिवसाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘राम-की टोळी’ मिरवणूक होती, जिथे भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे आदरपूर्वक प्रतिनिधित्व करण्यात आले. एका प्रतीकात्मक कृतीत, हनुमानाने आपली गदा अम्माजींना अर्पण केली, ज्यामुळे प्रधान होमाचा प्रारंभ झाला. या पवित्र कृतीत नम्रता, भक्ती आणि सामर्थ्य यांचा संगम होता, ज्यामुळे यज्ञाच्या गहन आध्यात्मिक महत्त्वासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. स्वामिनी निष्कलानंद-जी अम्मा यांचे आशीर्वादवचन या सोहळ्याचा आत्मा होता. हा कार्यक्रम म्हणजे “अनिश्चिततेने भरलेल्या जगात, आपण जागतिक शांततेसाठी जप करूया, आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेचा स्वीकार करूया—ज्याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची प्रतिक्रिया आर्य ग्लोबल अध्यक्ष भरत मलिक यांनी दिली. तर “शिक्षण हीच पूजा आहे. आजचा यज्ञ बुद्धी, हृदय आणि हात यांना एकत्र आणतो—जे सर्वांगीण शिक्षणाचे सार असल्याचे डॉ. नीलम मलिक यांनी सांगितले.

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ कल्याण : करिअरच्या वाटेवर उभ्या असलेल्या किशोरवयीन मनांमध्ये संभ्रम असतो, प्रश्न असतात, भीती असते… पण योग्य शब्द, योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की तीच मनं स्वप्नांकडे झेप घेऊ लागतात. ठाणे जिल्ह्यात हेच घडलं. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर आणि नवी मुंबई या महानगरपालिकांच्या सहकार्याने अंतरंग फाऊंडेशनने राबवलेली तीन भागांची ऑनलाइन करिअर वेबिनार मालिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेडाची दीपमाळ ठरली. ५५ हून अधिक शाळांमधील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमाने केवळ माहिती दिली नाही, तर विचारांना दिशा दिली, मनाला बळ दिलं आणि स्वप्नांना पंख दिले. “करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तो स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे” ही भावना या वेबिनार मालिकेच्या प्रत्येक संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली. शिक्षण, IT, AI आणि सोशल सेक्टरसारख्या विविध क्षेत्रांतील अनुभवी वक्त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव उघडले—संघर्षांचे दिवस, अपयशांचे क्षण, यशाची पहिली पायरी आणि त्या प्रवासातून शहाणपणाची शिदोरी मिळाली. शब्दांतून फक्त कथा नव्हत्या, तर आयुष्याची शिकवण होती; सल्ल्यांत फक्त मार्ग नव्हता, तर आत्मविश्वासाची ज्योत होती. त्यामुळे करिअर ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातली माहिती न राहता, जिवंत अनुभव बनून उभी राहिली. प्रश्नोत्तर सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी भीती झटकली, संकोच बाजूला ठेवला आणि मनातले प्रश्न मोकळेपणाने विचारले. विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि स्वतःचं मत ठामपणे मांडण्याचं धाडस या उपक्रमातून नकळत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजत गेलं. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदाच “मी करू शकतो” हा विश्वास चमकताना दिसला. ऑनलाइन स्वरूपामुळे हा उपक्रम केवळ काही शाळांपुरता मर्यादित राहिला नाही. वर्गखोल्यांतील टीव्ही, प्रोजेक्टर, मोबाईलच्या स्क्रीनवरून एकाच वेळी हजारो विद्यार्थी या वेबिनारशी जोडले गेले. शहर, उपनगर, परिसर यांची सीमा मिटली आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रकाश ठाणे जिल्ह्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात पोहोचला. या यशामागे शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वयक आणि महानगरपालिकांचे भक्कम पाठबळ होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, चळवळ बनला. अंतरंग फाऊंडेशनने या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाची नवी संस्कृती रुजवली असून, भविष्यात अधिक व्यापक, अधिक समावेशक आणि अधिक प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा संस्थेचा निर्धार या यशस्वी वेबिनार मालिकेतून ठामपणे अधोरेखित झाला आहे.