Category: होम

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

विश्वनाथ स्पोर्ट मीट – २०२६ ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर पुणे: आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले. एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले. बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.…

नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे

मुंबईत कुस्तीचा महासंग्राम नरसिंह यादव दंगल लीगचे अजिंक्य महाराष्ट्राकडे मुंबई: अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन  नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव दंगल लीग’ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजयी झेंडा फडकावला. विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे झालेल्या या एकदिवसीय कुस्ती लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातून ५ पुरुष व २ महिला अशा एकूण ७ खेळाडूंनी सहभाग घेतला असून, स्पर्धेत एकूण २८ कुस्तीपटूंनी आपली ताकद आजमावली. स्पर्धेची सुरुवात हरियाणा व पंजाब यांच्यातील चुरशीच्या सामन्याने झाली. या लढतीत हरियाणाच्या ५ कुस्तीपटूंनी विजय मिळवला, तर पंजाबच्या २ कुस्तीपटूंनी बाजी मारली. परिणामी पहिला सामना हरियाणा संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात रंगतदार सामना झाला. महाराष्ट्राच्या ४ कुस्तीपटूंनी विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली, तर उत्तर प्रदेशच्या ३ कुस्तीपटूंनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्र संघ विजयी ठरला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा आमनेसामने आले. महाराष्ट्रच्या पृथ्वीराज पाटील, रविराज चव्हाण, आदर्श पाटील, अमृता पूजारी आणि सोनाली मंडलिक या पाच कुस्तीपटूंनी शानदार विजय मिळवला, तर हरियाणाच्या अंकुश सागर दहिया आणि कुसुम दहिया यांनी आपापले सामने जिंकले. अंतिम फेरीत महाराष्ट्रने ५–२ असा विजय मिळवत नरसिंह यादव दंगल लीगचे चॅम्पियन पद पटकावले. या स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आमदार अतुल भातळखर, आमदार संजय उपाध्याय, दुबईतील उद्योगपती काझी अब्दुल मतीन, संपत साळुंखे, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी प्रेक्षकांशी साधलेल्या संवादामुळे मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना आयोजक नरसिंह यादव म्हणाले, “देशातील कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा लीग स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या माध्यमातून अनेक नवोदित कुस्तीपटू घडतील. मुंबई व परिसरातील प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे.” स्पर्धेतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. विजेत्या महाराष्ट्र संघाला आयोजक नरसिंह यादव आणि डॉ. शिल्पी शेरॉन-यादव यांच्या हस्ते चांदीची गदा आणि ‘नरसिंह यादव दंगल लीग’ ची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक ठरली. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि संघबळाच्या जोरावर महाराष्ट्राने चॅम्पियनपदावर आपले नाव कोरले.

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाच फुटी लांब कोब्रा नागाची आणि मुंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहचले त्यांची चाहूल लागल्याने मंगूस पळून गेले. त्या नागाचा रूद्र अवतार पाहता मंजुराची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान पाहत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साडेपाच फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाची तिरिपसाठी दगडी पायरी परिसरात उबीसाठी आला असावा. संदर्भीत पकडलेल्या विषारी नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गाक्रमण गरजेचे आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी २0२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात आकस्मिक झालेल्या दु:खद निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही अशी सर्वांना नि:शब्द करुन टाकणारी ही दुर्दैवी घटना प्रत्येकाला सुन्न करुन टाकणारी होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सर्व विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत नागरिक यांच्या उपस्थितीत स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान असणा-या अजितदादा पवार यांच्यासारख्या महनीय नेतृत्वाच्या अचानक निधनामुळे महाराष्ट्राची व प्रशासनाची फार मोठी हानी झाली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण केली. आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या पायाभरणीपासून उभारणीपर्यंत तसेच महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांना गती देण्यात व अनेक प्रसंगी त्यांचे योगदान लाभले जे कधीही विसरता येणार नाही असे आयुक्त म्हणाले. मंत्रालय सेवेत असतांना त्यांच्या कामाची पध्दत जवळून पाहता आली. साता-यामध्ये काम करताना त्यांचे मार्गदर्शन लाभले. कोव्हीड काळात पालघरचा जिल्हाधिकारी असतांना मोठया प्रमाणावर कामगार आपल्या गावी स्थलांतर करीत होते अशा वेळी आवश्यक प्रसंगी रात्री २ वाजताही त्यांच्याशी बोलणे झाले व त्यांनी लगेच मदतही केली. सिडकोत असतांनाही त्यांचे विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन मिळाले अशा विविध ठिकाणच्या आठवणी आयुक्तांनी कथन केल्या. दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निधन झालेले त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट कॅ. सुमित कपूर, कॅ. शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्याही आत्म्यास चिरशांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करत सर्वांनी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे

गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी — अहिंसेचे पुजारी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची याच दिवशी एका अधम प्रवृत्तीच्या माथेफिरूने कट रचून निर्घृण हत्या केली.…

 पं.दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज सादर करा

पं.दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज सादर करा तेजस्विनी गालांडे यांचे आवाहन अशोक गायकवाड अलिबाग: रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२६ करीता नुतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा पात्र विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नुतनीकरणाचे अर्ज ३१ जानेवारीपर्यंत http://swayam.mahaonline.gov.in/, या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांनी केले आहे. ३१ जानेवारी पर्यंत नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीव्दारे निवड झालेली आहे व त्यांना वसतिगृहाकडून आवेदन पत्रे निर्गमित झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयंम योजनेत हस्तांतर करण्यात येणार नाहीत.

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक ‘सलामी ‘ मुंबई -प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत…

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष रमेश औताडे मुंबई : रेड डॉट फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांचा सन्मान आणि न्याय यांचे प्रभावी प्रतीक म्हणून साकारलेल्या अनंत साडी चे अनावरण करण्यात आले. भारतीय दंड संहितेतून वैवाहिक बलात्काराला दिलेली कायदेशीर सूट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नामवंत फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी या अनंत साडीची रचना केली असून, ही साडी म्हणजे न्यायाची मागणी करणाऱ्या शेकडो स्वाक्षऱ्या असलेली, भरतकाम आणि खास प्रिंट असलेली ही प्रतीकात्मक याचिका आहे. साडी वरील प्रत्येक स्वाक्षरी ही धैर्याचा एक धागा आहे आणि या साडीच्या पदराची प्रत्येक नीरी म्हणजे महिलेला निवड करण्याचा आणि मौन बाळगण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. असे रेड डॉट फाउंडेशनच्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग म्हणाल्या. डिझायनर निवेदिता साबू म्हणाल्या, “संस्कृतीच्या माध्यमातूनच संस्कृतीला आव्हान देत परिवर्तन घडवण्याचे काम हि साडी करते. सध्याच्या कायद्यानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्हणून ओळखले जात नाहीत. परिणामी कोट्यवधी विवाहित महिलांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. काळा घोडा कला महोत्सवात या अनंत साडीचे प्रदर्शन एल्फिन्स्टन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे.

 कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा!

कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा! नाशिकमध्ये ४ फेब्रुवारीला जनआक्रोश मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक – प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी शिव-फुले-शाहू आणि आंबेडकरी विचारांच्या नागरिकांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता. यावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संविधान निर्माण करणाऱ्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात, असा प्रश्न जाधव यांनी करीत महाजन यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनवधानाने नाव राहिल्याबद्दल मंत्री महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, शिव-फुले-शाहू आणि आंबेडकर विचारांच्या…

 राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.