Category: होम

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी लागू केलेले नवीन नियम म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर लादलेला कायदा योग्य नसून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी ब्राह्मण सेवा फाउंडेशनने केली आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रयोग थांबवावेत, असेही संघटनेने स्पष्ट केले. या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अ‍ॅड. राहुल उपाध्याय आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनजी यांनी संयुक्त निवेदन जारी करून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी नियमांना जे माध्यमांमध्ये यूजीसी समानता / भेदभाव विरोधी नियम म्हणून ओळखले जात आहेत) तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचा अर्थ असा की हे नवे नियम सध्या अंमलात आणता येणार नाहीत आणि पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार नाहीत. विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद न साधता घेतलेले निर्णय अस्वीकार्य असून त्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला. संविधानाने दिलेले समान संधीचे अधिकार अबाधित ठेवावेत आणि उच्च शिक्षण क्षेत्राला राजकारणापासून पूर्णतः मुक्त ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यूजीसी धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून त्यावर कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही ब्राह्मण सेवा फाउंडेशनने दिला आहे.

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी?

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टोकावडे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता, एम. एच १४ – सि. पी ७3४७ या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचे दिसून आले. ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आले, धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाली. धान्य व्यापाराकडे धान्य व गव्हाचे परवाना नसल्याचे समजले, तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नर कडे काळया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रथमदर्शनी समजले. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे. टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहे अशी माहिती मिळाली. पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशनिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का? असा सवाल करत आदिवासी क्रांति सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी मा . जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचे आमच्या दै, बित्तंबातमीचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन ८ फेब्रुवारी रोजी बोरीवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई: चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली यांचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ज्येष्ठालय सभागृह, बाभई, बोरीवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात  वित्तीय गुंतवणूकविषयक व्याख्यान तसेच ज्ञातीतील कलाकारांचा ‘गीतों का कारवाँ ‘ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.  विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्ञातीतील ज्येष्ठ बंधु-भगिनींचा सत्कार आणि कला – क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार अशी या सर्वसमावेशक कार्यक्रमाची रूपरेषा आहे.  वधू – वर सूचक मंडळांतर्गत नावनोंदणी तसेच संस्थेच्या नवीन सभासदांची नोंदणी याप्रसंगी करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेलनास सर्व ज्ञाती बंधु – भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली या संस्थेचे कार्यवाह उदय मथुरे, (९८२१०९९६०५) यांनी केले आहे.

टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी

टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र कल्याण : टिटवाळा मंदिर परिसरातील नागरी, व्यवसायिक सुरक्षा व वाहतूक कोंडीच्या निवारणाकरिता कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापित करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरमार्फत करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस उपधीक्षक व कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी याबाबत चर्चा केली असता निवेदनानुसार तजवीज करणार असल्याचे आश्वासन महासंघाला देण्यात आले आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिटवाळा हे गाव महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केलेले असून, टिटवाळा हे महागणपतीचे प्रसिध्द तिर्थस्थान आहे. तेथे नियमीतपणे व विशेषतः मंगळवार, चतुर्थी व अंगारीका हया दिवशी हजारोंच्या संख्येने भावीक येत असतात व अनेकवेळा वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे याठिकाणी कायमस्व्यरूपी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. टिटवाळा येथील महागणपती मंदिर परिसरातून मौजे गुरवली, रूंदा-फळेगाव व गोवेली या गावांकडे रस्ता जात असून या परीसरात अनेक गृहसंकुले असून, व्यावसायिक संकुले आहेत. हा परीसर नियमीतपणे वाहतुकीचा व वर्दळीचा असल्याने बाहेरूनही अनेकवेळा मालवाहतुक होत असते. तसेच अनेक गृहसंकुलनाकडे जाणा-या रस्त्यांवर आंधार पडल्यावर संशयीत फिरस्ते फिरत असतात. अनेक मद्यपी जागोजागी मद्यपान करतांना आढळून येतात त्यामुळे अंधार पडल्यावर या रहीवासी संकुलनातील महीला, वृध्द हयांना या रस्त्यावरून जाणे येणे भितीदायक होत असल्याच्या तकारी प्राप्त होत आहेत. तसेच वेळप्रसंगी चेनस्नॅचिंग, चोरी, घरपोडी व शरीराद्विरुध्दचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि परीस्थिती पहाता टिटवाळा येथील मंदीर परिसरात कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करून त्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणुक होऊन कायमस्वरूपी विशेषतः रात्रीच्या वेळची गस्त घालणे सोयीस्कर होणार असून होणा-या गुन्हयांना आळा बसणार आहे. तरी कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत टिटवाळा मंदीर परिसरात सोयीस्कर ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन होऊन त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात येऊन त्यांना रस्त्यांवर, गृहसंकुलनामध्ये रात्रीची गस्त घालण्याचे आदेश देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरतर्फे करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका कलावंत जपणारी-संदीप माळवी

ठाणे महापालिका कलावंत जपणारी-संदीप माळवी मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन ठाणे: ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुध्दा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी केले. ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्या निमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच श्रुखंलेतील कवी संमेलन २७  जानेवारीला  कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून “न्यूजलेस कविता” असा  लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गझलकार सुनील तांबे, वृत्त निवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा.वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा अविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केल्या. गझल, हायकू, मुक्त छंद, वृत्तबध्द आणि चार ओळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहास ही या निमित्ताने उलगडून दाखवला. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन हे कवी संमेलन संपन्न झाले. प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेली “बा विठ्ठला” उपहासात्मक  कविता, यामिनी दळवी यांनी सादर केलेली “सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू…” ही गझल… तर “हार नाही जीत नाही” “श्वास गझल..” या सुनील तांबे यांच्या तरनुम्म मधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेल्या. पंकज दळवी यांच्या नर्म विनोदी कवितांमुळे सभागृह हशा आणि टाळ्यात भरुन गेले.

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली कल्याण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या असह्य दुःखद प्रसंगी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची, जनतेसाठी केलेल्या कार्याची आणि संघर्षमय वाटचालीची आठवण यावेळी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे दादा आपल्या आज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्ते वल्ली राजन यांनी दिली.

माथेरान वन समितीच्या कार्यकारिणीमध्ये कुणाची वर्णी लागणार?

माथेरान वन समितीच्या कार्यकारिणीमध्ये कुणाची वर्णी लागणार? मुकुंद रांजाणे माथेरान : पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वनविभाग माथेरान यांच्या वन समितीची निवड नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाकडून दर पाच वर्षांनी करण्यात येते. परंतु नगरपरिषदेच्या निवडणुकीला पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी गेल्यामुळे ह्या समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. वनसमितीला वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असते. माथेरान मधील जवळपास अधिक क्षेत्र हे वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी खर्च करण्यासाठी ही समिती सहकार्य करीत असते. नुकताच नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.त्यामुळे वनसमितीची नव्याने निवड व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली असून अनेकजण ह्या समितीवर काम करण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. मागील काळात ह्या समितीने आपल्या परीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नव्याने ह्या समितीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या मंडळींना इथले पर्यावरण त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी प्लास्टिक मुक्त माथेरान असावे,त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अभिप्रेत असणारे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी मेहनत करणाऱ्या सदस्यांची आवश्यकता असून सत्ताधारी गटाने सुध्दा ह्या समितीच्या कार्यकारिणी वरील सर्वच सदस्यांची निवड करताना जे खरोखरच आत्मीयतेने कामे करू शकतात अशांना संधी उपलब्ध करुन दिल्यास माथेरान हे स्वच्छ, हरित आणि पर्यटन वाढीस मदत होईल असेही सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याणतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याणतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप कल्याण :   कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टतर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडीच्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात. सोमवारी झालेल्या या उपक्राला दाता म्हणून अरविंद कपोते, दिपक पोपट व जतिन ठक्कर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात विषेश अतिथी म्हणून नगरसेवक जतिन प्रजापति व मेधा खेमा उपस्थित राहिल्या होत्या. संस्थेचे संचालक  जसू चंदाराणा व छबिल कारीया यांनी संस्थे तर्फे त्यांच्या सत्कार केला. ज्या कोणाला या अन्नक्षेत्राच्या सेवाकार्या मध्ये सहयोग द्यायचा असेल त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलनानंतर नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरावर गुन्हा दाखल

दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलनानंतर नोवेल साळवे यांच्यावरील हल्लेखोरावर गुन्हा दाखल कल्याण : कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर उल्हासनगर येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात साळवे गंभीर जखमी होऊन त्यांना कार्डियक अटॅक आला होता. याप्रकरणी एक वर्षाहून जास्त कालवधी उलटून देखील गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणी साळवे यांनी दीड महिन्याच्यावर आझाद मैदानात उपोषण आंदोलन केल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. ९ जून २०२५ रोजी उल्हासनगर येथे एका वृद्ध सिंधी व्यक्तीला काही लोक मिळून मारत होते. सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले असताना त्यामधील एका अज्ञात व्यक्तीकडून साळवे यांच्या वर  प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात साळवे यांचा ब्लडप्रेशर स्ट्रोक झाला व त्यांना कार्डियक अटॅक आला होता. त्यानंतर साळवे यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात येऊन २४ दिवस दवाखान्यात उपचार घेत होते. या घटनेची माझ्या कुटुंबियांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या पोलिसांना माहिती देऊन सुद्धा त्यांनी त्यावेळेस कुठलीच ठोस कार्यवाही केली नाही. त्यावर आश्चर्याची गोष्ट अशी की पोलिसांनी साळवे यांचा जवाब न नोंदविता माझा केस दफ्तरी फाईल करून टाकले होते. झालेल्या ह्या अन्याय विरोधात राज्य सरकार कडून पाऊले उचलण्यासाठी साळवे यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री व  वरिष्ठ नेत्यांना निवेदन दिले होते, परंतु त्या निवेदनांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याकारणाने साळवे  ८ डिसेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनाला दीड महिन्याच्या वर वेळ झाल्यानंतर थोडा न्याय मिळाला आहे, उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस स्टेशन च्या पोलिस अधिकारयांनी मंगळवारी दोषींवर गुन्हा दाखल केला आहे.

कर्तव्यापलीकडचा त्याग

कर्तव्यापलीकडचा त्याग महाराष्ट्र पोलिस भावाने यकृतदान करून धाकट्या भावाला दिले नवे आयुष्य कल्याण : कर्तव्य, प्रेम आणि बंधुत्व यांचा विलक्षण संगम दाखवणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका…