Category: होम

भारताने टी२० मालिका जिंकली

गुवाहाटी : सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन इनिंगच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी२० क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडचा १० ओव्हर आणि ८ विकेट राखून धुव्वा उडविला आणि टी२० मालिकाही जिंकली.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५३ धावा केल्या होत्या.कॅप्टन सूर्यकुमार…

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील ७५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून त्यात ठाण्याच्या सुवर्णा शिंदें…

अंतराळवीर शुभांशू शुक्लांना अशोक चक्र

  नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट देणाऱ्या भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी भारत सरकारकडून अशोक चक्र जाहीर करण्यात आलं आहे. शांतता काळातील हा सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार…

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले एमसीसी लिटिल स्टार  (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले. पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला. एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले. संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८). एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८). विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).

चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन

आर्य गुरुकुलचा समष्टी अंजनेय होम चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन कल्याण : कल्याण येथील आर्य गुरुकुल, जागतिक चिन्मय मिशनच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक तेजस्वी भाग बनले. त्यांनी समष्टी अंजनेय होमचे आयोजन शनिवारी कल्याण मध्ये  केले होते.  हा एक असा यज्ञ होता ज्याने भक्ती, शिस्त आणि दैवी कृपेला एकत्र आणले. हा कार्यक्रम केवळ एक विधी नव्हता, तर एक आध्यात्मिक जागरण होते, जे वेदांताला दैनंदिन जीवनात आणि ज्ञानाला सेवेत रूपांतरित करण्याच्या गुरुदेवांच्या दृष्टिकोनाचा प्रतिध्वनी होता. दिवसाची सुरुवात राम नामावलीच्या जपाने आणि तानपुऱ्याच्या श्रुतीने झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शांतता पसरली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्याचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण भजनांनी, कृशांक मलिक (उपाध्यक्ष, चिन्मय मिशन, कल्याण) यांच्या स्वागतपर भाषणाने आणि अलका मुतालिक यांच्या सत्काराने झाली, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या शब्दांनी सर्वांना आठवण करून दिली की, “अमृत महोत्सवातील आर्य गुरुकुलचा सहभाग हा तरुण पिढीसाठी आध्यात्मिक जागृतीचा एक प्रकाशस्तंभ आहे.” याठिकाणी सर्वांच्या सहभागातून सामूहिक भक्तीचे दर्शन घडले. यामध्ये ४०० तरुण साधक, ७५ मार्गदर्शक, ५० समर्पित समर्थक, २१ कुटुंबे कृतज्ञता व्यक्त करणारी आणि २१ वैदिक विद्वान यांचा समावेश होता. दिवसाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘राम-की टोळी’ मिरवणूक होती, जिथे भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे आदरपूर्वक प्रतिनिधित्व करण्यात आले. एका प्रतीकात्मक कृतीत, हनुमानाने आपली गदा अम्माजींना अर्पण केली, ज्यामुळे प्रधान होमाचा प्रारंभ झाला. या पवित्र कृतीत नम्रता, भक्ती आणि सामर्थ्य यांचा संगम होता, ज्यामुळे यज्ञाच्या गहन आध्यात्मिक महत्त्वासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. स्वामिनी निष्कलानंद-जी अम्मा यांचे आशीर्वादवचन या सोहळ्याचा आत्मा होता. हा कार्यक्रम म्हणजे “अनिश्चिततेने भरलेल्या जगात, आपण जागतिक शांततेसाठी जप करूया, आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेचा स्वीकार करूया—ज्याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची प्रतिक्रिया आर्य ग्लोबल अध्यक्ष भरत मलिक यांनी दिली. तर “शिक्षण हीच पूजा आहे. आजचा यज्ञ बुद्धी, हृदय आणि हात यांना एकत्र आणतो—जे सर्वांगीण शिक्षणाचे सार असल्याचे डॉ. नीलम मलिक यांनी सांगितले.

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ कल्याण : करिअरच्या वाटेवर उभ्या असलेल्या किशोरवयीन मनांमध्ये संभ्रम असतो, प्रश्न असतात, भीती असते… पण योग्य शब्द, योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की तीच मनं स्वप्नांकडे झेप घेऊ लागतात. ठाणे जिल्ह्यात हेच घडलं. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर आणि नवी मुंबई या महानगरपालिकांच्या सहकार्याने अंतरंग फाऊंडेशनने राबवलेली तीन भागांची ऑनलाइन करिअर वेबिनार मालिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेडाची दीपमाळ ठरली. ५५ हून अधिक शाळांमधील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमाने केवळ माहिती दिली नाही, तर विचारांना दिशा दिली, मनाला बळ दिलं आणि स्वप्नांना पंख दिले. “करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तो स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे” ही भावना या वेबिनार मालिकेच्या प्रत्येक संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली. शिक्षण, IT, AI आणि सोशल सेक्टरसारख्या विविध क्षेत्रांतील अनुभवी वक्त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव उघडले—संघर्षांचे दिवस, अपयशांचे क्षण, यशाची पहिली पायरी आणि त्या प्रवासातून शहाणपणाची शिदोरी मिळाली. शब्दांतून फक्त कथा नव्हत्या, तर आयुष्याची शिकवण होती; सल्ल्यांत फक्त मार्ग नव्हता, तर आत्मविश्वासाची ज्योत होती. त्यामुळे करिअर ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातली माहिती न राहता, जिवंत अनुभव बनून उभी राहिली. प्रश्नोत्तर सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी भीती झटकली, संकोच बाजूला ठेवला आणि मनातले प्रश्न मोकळेपणाने विचारले. विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि स्वतःचं मत ठामपणे मांडण्याचं धाडस या उपक्रमातून नकळत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजत गेलं. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदाच “मी करू शकतो” हा विश्वास चमकताना दिसला. ऑनलाइन स्वरूपामुळे हा उपक्रम केवळ काही शाळांपुरता मर्यादित राहिला नाही. वर्गखोल्यांतील टीव्ही, प्रोजेक्टर, मोबाईलच्या स्क्रीनवरून एकाच वेळी हजारो विद्यार्थी या वेबिनारशी जोडले गेले. शहर, उपनगर, परिसर यांची सीमा मिटली आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रकाश ठाणे जिल्ह्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात पोहोचला. या यशामागे शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वयक आणि महानगरपालिकांचे भक्कम पाठबळ होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, चळवळ बनला. अंतरंग फाऊंडेशनने या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाची नवी संस्कृती रुजवली असून, भविष्यात अधिक व्यापक, अधिक समावेशक आणि अधिक प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा संस्थेचा निर्धार या यशस्वी वेबिनार मालिकेतून ठामपणे अधोरेखित झाला आहे.

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा

धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला सांडपाण्याचा विळखा दुर्गंधीने उद्यानातील बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक त्रस्त कल्याण : २७ जानेवारी या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती असते. या दिवशी शिवसैनिक, त्यांचे नेते मंडळी व त्यांचावर प्रेम करणारे असंख्य नागरिक हे उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात. पण त्यांच्या नावाने असलेली उद्याने व इतर ठिकाणे यावर पाहिजे तितके लक्ष दिले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मॉडेल स्कुल जवळ असलेले धर्मवीर आनंद दिघे उद्यान २००२ साली तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उभारले होते. कालांतराने याचे दोनवेळा सुशोभीकरण हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या निधीतून करण्यात आले होते. परंतु केडीएमसी कडून याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने हे उद्यान नेहमी दुर्लक्षित राहिले आहे. आता तर या उद्यानात असणारा महापालिकेचा कंत्राटी सुरक्षारक्षक हा पण नसतो. त्यामुळे सकाळ/संध्याकाळी उघडे असणारे हे उद्यान फक्त सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेतच उघडे ठेवले जात आहे. सुरक्षारक्षक नसल्याने झाडांना पाणी मारले जात नाही. तसेच प्रेमियुगल जोड्या या उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने प्रेमीचाळे करीत असतात. महापालिकेच्या निवडणूक पूर्वी येथील शिवसेनेचे  इच्छुक उमेदवार अभिषेक चौधरी यांनी या उद्यानाची साफसफाई व खेळणी दुरुस्त करून घेतली होती. परंतु त्याना नगरसेवक पदाचे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने आता त्याची देखभाल/दुरुस्ती पाहण्यासाठी दुसऱ्या कोणालाही सवड मिळत नसल्याचे दिसत आहे. गेले काही दिवस या उद्यानाला लागून असलेल्या पावसाळी गटारातून ड्रेनेज सांडपाणी जमा झाल्याचे दिसत असून त्यात डासांची अंडी,पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत असल्याने उद्यानात येणारे बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. येथील ही गटारे एमआयडीसी ठेकेदाराकडून बांधण्यात येत असून तीही अर्धवट स्थितीत आहेत. गटारे बांधतांना येथील सांडपाणी वाहिन्या या फुटल्याने त्यातील सांडपाणी हे पावसाळी गटारात जमा झाले आहे. याबद्दल एमआयडीसी व केडीएमसी यांना स्थानिक रहिवाशी शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख सागर पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, मंदार स्वर्गे यांनी कळवूनही यावर प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. २७ जानेवारी या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होते. कमीतकमी या जयंती पूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे लक्ष देतील का ? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

 पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण

निवडणूक प्रक्रियेत घोळ पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण अनिल ठाणेकर ठाणे: नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत सदोष यंत्रणा वापरून मतदान प्रक्रियेत घोळ घातला आहे, असा आरोप करीत नव्याने निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी अपक्ष उमेदवार रवींद्र चांगो शिंदे हे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधून रवींद्र शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, हा पराभव सदोष प्रक्रियेतून झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. रवींद्र शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात झालेले मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही निवडणूक नियमबाह्य झाली असल्याने ही निवडणूक रद्द करून फेरमतदान घ्यावे. तसेच, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर आयोगाने कार्यवाही न केल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या उपोषणादरम्यान, असंविधानिक पॅनल पद्धती रद्द करावी, व्हीव्हीपॅट सुविधा सुरू करावी अथवा मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, जिथे बिनविरोध प्रक्रिया राबविली आहे; त्या ठिकाणी माघार घेणाऱ्यांची चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, असे रवींद्र शिंदे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई विभागीय केंद्रांतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे!!! माननीय कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार ८ फेब्रुवारीला श्री बापूसाहेब विसपुते बी.एड. कॉलेज, पनवेल येथेयुवा शक्ती फाउंडेशन आणि श्री डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर आपली नोंदणी करून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उत्कृष्ट रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.सर्व केंद्रप्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, कृपया ही माहिती सर्वत्र पोहोचवावी. या रोजगार मेळाव्यास केवळ मुक्त विद्यापीठाचेच नव्हे, तर इतर विद्यापीठांतील विद्यार्थीही नोंदणी करू शकतात.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यास नोंदणी करावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक(YCMOU) तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९७०७९६५७४२,८८७९33८८33

अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘संवाद’ पत्रिकेच्या वतीने विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि सृजनशीलतेला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून येत्या दिनांक २३ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेसाठी ‘ज्ञानगंगा घरोघरी – यशवाणी कानोकानी’, ‘मुक्त विद्यापीठातील शिक्षण – विकासाचे लक्षण’, ‘प्लास्टिक हटवा – पर्यावरण वाचवा’ व ‘मुक्त विद्यापीठ – ‘संवाद’ पत्रिका’ असे चार विषय आहेत. त्यापैकी एका विषयावर आधारित ए फोर आकारातील जाहिरात ही आकर्षक मजकूर, लक्षवेधी चित्र आणि विषयाला सुसंगत घोषवाक्यासह असावी. तसेच स्पर्धकांनी ही जाहिरात बहुरंगी भित्तीपत्रक (पोस्टर) स्वरूपात तयार करून पीडीएफ, जेपीईजी किंवा पीएनजी स्वरूपात paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac या मेल आयडीवर पाठवावी. सोबत स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, शिक्षणक्रमाचे नाव, अभ्यासकेंद्राचे नाव, केंद्र संकेतांक आणि कायम नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण ठरणाऱ्या प्रथम पाच जाहिरातींना विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ पत्रिका ‘संवाद’चे कार्यकारी संपादक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले आहे.