Category: होम

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये महानगर निवडणूक मध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबित महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले. यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार अशोक गायकवाड नवी मुंबई : मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ नवी दिल्ली येथे १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत आज महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा देशपातळीवर दखल घेत झालेला गौरव आहे. करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार ! नवी मुंबई महानगरपालिकेला लाभलेला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ हा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या माध्यमातून सुशासन, पारदर्शकता, तंत्रज्ञानाधारित करप्रणाली आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या निकषांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल, कारण हा प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक बदल नसून नागरिकांचा विश्वास निर्माण करणारा आणि शहराच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया आहे. त्यामुळे करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे सर्वात मोठे योगदान असल्याबदद्ल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून आभार व्यक्त केले आहेत. मालमत्ता कर व्यवस्थेत आमुलाग्र व संरचनात्मक सुधारणा नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्वीच्या हस्तलिखित, त्रुटीपूर्ण व अर्धवार्षिक कर आकारणी प्रणालीऐवजी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः नव्याने सूत्रबध्द व सुनियोजित रचना केलेली मालमत्ता कर प्रणाली अंमलात आणली. या प्रणालीअंतर्गत एकच निश्चित वार्षिक करबिल, शासकीय दरांवर आधारित स्वयंचलित करआकारणी, पारदर्शक व न्याय्य मूल्यांकन, नागरिकांना समजेल अशी सोपी कररचना यांची अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांचा सहभाग केंद्रस्थानी ठेवून राबवलेली डिजिटल प्रणाली मालमत्ता कर प्रणालीतील सुधारणांमध्ये सर्वसमावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात आले. नागरिकांसाठी एकाच वेळी ऑफलाईन व ऑनलाईन विविध माध्यमांतून कर भरण्याची सुविधा, क्यूआर कोडद्वारे सुलभ कर भरणा सुविधा देण्यात आली. महानगरपालिकेची www.nmmc.gov.in वेबसाईट, My NMMC ॲप, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व युपीआय सुविधा आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट अशा विविध प्रकारच्या करभरणा सेवा, जनजागृती मोहिमा व माहिती – आधारित थकबाकी वसूली मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे कर भरण्याबाबत नागरिकांचा विश्वास वाढून स्वयंस्फूर्त सहभाग लक्षणीयरित्या वाढला. भौगोलिक नोंदणी व माहिती शुद्धीकरणामुळे अचूकता मालमत्तांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी मालमत्तांचे भौगोलिक स्थान नोंदविणे, पत्त्यांची पडताळणी व अद्ययावत नोंद, संपर्क क्रमांकांची खात्री, उच्च कर क्षमतेच्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित कारवाई करण्यात आली. यामुळे करआकारणी व संकलनात अचूकता आणि पारदर्शकता वाढली. कर संकलनात ऐतिहासिक वाढ मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये एकूण ४७८.३५ कोटींचे मालमत्ता कर संकलन नोंदविण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ५९ हजार ४२५ मालमत्तांकडून कर भरणा, चालू कर संकलन ४२७.२० कोटी, थकबाकी कर संकलन ५१.१५ कोटी, ऑनलाइन कर भरण्यात सुमारे चारपट वाढ, अशी उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. शहराच्या विकासासाठी स्थिर आर्थिक पाया या सुधारणा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेचा आर्थिक प्रवाह स्थिर झाला असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होऊन तक्रारी व वादांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत राबविलेल्या विविधांगी व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५ – सिल्व्हर’ प्रदान करून गौरविण्यात आले असून याव्दारे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…!

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…! आरोग्य मंत्री आबिटकर यांचे उप-संचालकांना आदेश..! सावंतवाडी/राजन चव्हाण सावंतवाडी  उप -जिल्हा रुंग्णालयातील ‘ट्रामा केअर युनिट’, ‘आय.सी.यु’, ‘रक्तपेढी’, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदी समस्या तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य उप-संचालक डॉ. दिलीप माने यांना दिले. सावंतवाडी उप – जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड,रविंद्र केरकर, अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग चे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते ऍड. नंदन वेंगुर्लेकर,संपत दळवी आदींच्या शिष्टमंडळाने आबिटकर यांची आज त्यांच्या गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेतली. अभिनव फाऊंडेशनने सावंतवाडी उप- जिल्हा रुग्णालय प्रश्नी दाखल केलेली जनहित याचिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे,इथल्या दुरावस्थेमुळे, गोवा-बांबुळी येथे पाठवले जाणारे पेशंट, रखडलेले मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल यासंदर्भात निमंत्रक ओगले यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.कृती समितीच्या वतीने आबिटकर  यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.  सावंतवाडीत उप -जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्ना संदर्भात येत्या २६ जानेवारीला उप -जिल्हा रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा  इशाराही समितीने दिला आहे.

ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन!

ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन! संदीप माळवी, रवींद्र प्रभुदेसाई, व चंद्रशेखर पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती ! यंदाच्या वर्षातील पहिल्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेला खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या सर्व भागातून १७ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील ४०० खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ठाणे महापालिकेचे क्रीडा प्रेमी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तसेच पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन रवींद्र प्रभुदेसाई आणि नामवंत गुंतवणूक सल्लागार चंद्रशेखर पुरोहित तसेच सर्व खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.  संदीप माळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच  रवींद्र प्रभुदेसाई यांनी नारळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.  पुरोहित यांनी बॅडमिंटन कोर्टाचे हार घालून पूजन केले. संदीप माळवी यांनी आपल्या भाषणात ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीची व त्याचे प्रमुख श्रीकांत वाड व सर्व प्रशिक्षक घेत असलेल्या अहोरात्र मेहेनतीबद्दल त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच  रवींद्र प्रभुदेसाई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. व गरजू आणि गुणवंत खेळाडूंन साठी ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन करीत असलेल्या विशेष मदतीचा खास उल्लेख केला. तसेच पितांबरी लिमिटेड तर्फे आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. पुरोहित यांनी देखील ठाण्याच्या बॅडमिंटन पटूंच्या खास कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले.  या प्रसंगी राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील १४ वर्षीय वयोगटातील सुवर्ण पदक विजेता मयंक राजपूत चा खास सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत, राजीव गणपुले, तारक मोदी, सतीश शबराय,  मितेश हजारनीस,  संदीप कांबळे तसेच प्राजक्ता रानडे कांबळे हे ही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष  श्रीकांत वाड यांनी केले.

नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

विश्वनाथ स्पोर्ट्स मीट नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत रविवारी व सोमवारी खेळविण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांत नेस वाडिया कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि निकमार संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली. उरुळी कांचन येथील निकम मैदान व एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर हे सामने रंगले. निकम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नेस वाडिया कॉलेजने आयटीएम इलेव्हनवर ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत नेस वाडियाने सलामीवीरांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर १६ षटकांत ३ बाद १७० धावांचा मजबूत डाव उभारला. वेदांत डेडगेने संयमी खेळ करत ४७ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या, तर प्रणव लोखंडेने अवघ्या २१ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी साकारली. प्रत्युत्तरात आयटीएम इलेव्हनचा डाव नेस वाडियाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर गडगडला. रोहन देसाईने भेदक मारा करत ३ बळी टिपले, तर कर्णधार अश्विन शिंदेने महत्त्वाचे बळी घेत विजय निश्चित केला. त्याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सीओईपी टेक संघाने एमआयटी– वर्ल्ड पीस विद्यापीठवर (डब्ल्यूपीयू) ९ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी–डब्ल्यूपीयूने १७ षटकांत ८ बाद १४६ धावा केल्या. मात्र, आदित्य इंदानीच्या अचूक गोलंदाजीमुळे (४/२२) डावाला मर्यादा आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीओईपी टेकचा सलामीवीर मल्हारने अप्रतिम खेळी साकारत ५३ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. त्याला अमेय दांडेकरची ४९ धावांची भक्कम साथ लाभली आणि संघाने सहज विजय मिळवला. दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात निकमार संघाने एमआयटी स्कुल ऑफ कंम्पुटींगवर (एसओसी) ९ गडी राखून वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी एसओसीला १८.२ षटकांत अवघ्या १०३ धावांपर्यंत मजल मारता आली. निकमारकडून गौरव ठाकूरने ३ बळी घेत गोलंदाजीचे नेतृत्व केले. प्रत्युत्तरात, कर्णधार ओम अशोक कोकणेने आक्रमक फलंदाजी करत केवळ २७ चेंडूत नाबाद ५६ धावा ठोकल्या. रुतुराज तावरेनेही ४२ धावांची उपयुक्त खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. संक्षिप्त धावफलक : नेस वाडिया कॉलेज – १६ षटकांत १७०/३ (वेदांत डेडगे* ६४ – ४७ चेंडू, प्रणव लोखंडे ४९ – २१ चेंडू, साकिब खान ३१ – २५ चेंडू; विकास सी २/२४) वि.वि. आयटीएम इलेव्हन – १६ षटकांत ११८/९ (सिद्धांत सातपुते ४७ – ३८ चेंडू, सक्षम सुखीजा २७ – १० चेंडू; रोहन देसाई ३/१६, अश्विन शिंदे २/१४)  सामनावीर: वेदांत डेडगे एमआयटी–डब्ल्यूपीयू – १७ षटकांत १४६/८ (रोहन मोहिते ३६ – २२ चेंडू, अफनान पंडित २९ – १६ चेंडू; आदित्य इंदानी ४/२२) पराभूत.वि.सीओईपी टेक – १६.३ षटकांत १४८/१ (मल्हार* ७० – ५३ चेंडू, अमेय दांडेकर ४९ – ३७ चेंडू) सामनावीर : आदित्य इंदानी एमआयटी एसओसी – १८.२ षटकांत १०३/१० (श्रेयश पारवे ३१ – २७ चेंडू; गौरव ठाकूर ३/२२, सुश्रुत भैस्वर २/१४, वेदांत गिदये २ बळी) पराभूत.वि. निकमार – ८.३ षटकांत १०५/१ (ओम अशोक कोकणे* ५६ – २७ चेंडू, रुतुराज तावरे ४२ – २२ चेंडू) सामनावीर: ओम कोकणे.

हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा        

हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा कल्याण : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीतील बाविस्कर कुटुंबात शनिवारी रात्री हळदी समारंभा निमित्ताने जेवण जेवल्यानंतर ३०ते ४० जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा बाका प्रसंग ओढावला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमधील बाविस्कर कुटुंबात मुलीचा हळदी समारंभ शनिवारी होता. या समारंभा निमित्ताने रात्री आलेल्या पाहुणे आणि कुटुंबायांनी जेवण केल्यानंतर काही तासांनी उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा प्रसंग ओढावला. या जेवणातील विषबाधेचा जास्त त्रास जेष्ठांना, बालकांना झाल्याचे समजते. यामध्ये ज्या मुलीची हळद होती ती, तिची आई, बहीण यांना देखील त्रास झाला. या धक्कादायक प्रकारामुळे रविवारी होणारा लग्न समारंभ कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे कुटुंबियांच्या वतीने प्रसिध्दी माध्यामांना सांगितले. तसेच या घटना प्रकरणी  जेवणाच्या कंत्राटदारावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल करून कारवाई ची मागणी केली असल्याचे समजते.

‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न कल्याण: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणजे कल्याण शहर. कल्याण शहराला विशिष्ट असे व्यक्तिमत्व आहे  याच कल्याण शहराविषयी आपल्याला बहुविध माहिती असणं ही एक फार मोठी प्रेरणा ठरते, याच अनुषंगाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त  सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने “माझे कल्याण शहर प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. कल्याण शहरातील तब्बल ४३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. कल्याण सांस्कृतिक इतिहास,सुभे कल्याण, १०० वर्षाचा नगरपालिका अहवाल अशा विविध संदर्भग्रंथातील प्रश्न छत्रपतीशिवाजी महाराज कल्याणमध्ये कधी आले? कल्याणमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय केव्हा आली? प्रभाकर ओक टॉवर बांधणीचा खर्च किती आला? भारताचार्य चिंतामण वैद्य यांना भारताचार्य पदवी कोणी दिली? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्यमय चरित्र लिहिण्याचा मान कोणाला मिळाला? कल्याणचे पहिले दैनिक कोणते? पोखरण तलाव कोठे आहे? असे विविध प्रश्न स्पर्धकांना विचारण्यात आले होते. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून ही माहितीपर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली “कल्याण” या संदर्भग्रंथाचे लेखक श्रीकांत पेटकर, विवेकानंद विचारमंचचे ज्येष्ठ साहित्यिक प्रविण देशमुख, वाचक दिप्ती जोशी, धनंजय गोरे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानुन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, वाचक वर्ग, श्रोता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा

कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा बिर्ला महाविद्यालयात वस्त्रे, विणकाम आणि हस्तकलांचे प्रदर्शन कल्याण : बांधणीचे, यंत्रमागावरील कापड, रेशीम, ताग, सुती अशा विविध प्रकारचे कापड, त्यावर केली जाणारी छपाई, त्याची कला, त्यापासून बनवली जाणारी वेगवेगळी कापडांचे प्रकार आणि त्यामागचा इतिहास तसेच परंपरा पाहण्याची संधी नुकतीच कल्याणकरांना मिळाली. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे विणलेल्या परंपरा (वूवन लेगसीज) या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी कापडाचा प्रवास उलगडून सांगितला. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयातील इतिहास विभागाने शनिवारी विणलेल्या परंपरा: भारतातील उत्कृष्ट वस्त्रे, विणकाम आणि हस्तकला हे प्रदर्शन आयोजित केले होते. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनात देशाची वस्त्र परंपरा उलगडून सांगितली. प्रदर्शनाची संकल्पना तृतीय वर्षाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या ‘भारतीय कलेचा इतिहास’, ‘जागतिक कलेचा इतिहास’ आणि ‘वारसा पर्यटनाची ओळख ‘ या विषयांवर आधारित होती. या प्रदर्शनाचा उद्देश सिंधू संस्कृतीपासून ते आजपर्यंतच्या भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणे हा होता. या प्रदर्शनासाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे फॅशन डिझाइन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन हडप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. हडप यांनी ‘वस्त्रांपासून फॅशनपर्यंत: भारतावरील एक ऐतिहासिक दृष्टिकोन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा जाधव, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रणिता हरड यांनी यात मोलाची भूमिका बजावली. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अन्य महाविद्यालये आणि शाळांनाही आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थितांनी भारतीय वस्त्रपरंपरेच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेतला. या प्रदर्शनात देशातील साड्यांचे प्रकार, पैठणी, इरकल, कापडांचे प्रकार, बांधणीचे कापड, मॅँचेस्टरवरून आलेला आणि यंत्रमागावर बनलेला मांजरपाट कापड, मेंढराऱ्या केसांपासून तयार होणारी घोंगडी, तागाचे गोणपाट, रेशीम कापड मांडण्यात आले होते. तसेच या विविध प्रकारच्या कापडापासून बनलेल्या इतर वस्तुही होत्या. सुती, बांधणी, साधे कापड, त्यांची माहिती, त्यावर विविध रंगांची हाताने केली जाणारी छपाई, इम्ब्रोडरी, तसेच कापडासोबत केली जाणारी कलाकारी उपस्थितांना पाहता आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रेक्षकांची संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ?

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ? नगरसेविका तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे भाजपाने लावले बॅनर कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शिवसेनेचे ५३, भाजपा ५०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११, मनसेचे ५, कॉंग्रेसचे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्र. ४ मध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले असून या विजयामागे भाजपाचा हात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्याला कारण हि तसे असून ठाकरे गटातून निवडून आलेल्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच मोहने परिसरात तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले असून या बॅनरवर माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचा फोटो असल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये लागलेल्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागात शिवसेनेचे दिग्गज मानले जाणारे माजी नगरसेवक मयूर पाटील त्यांच्या पत्नी नमिता पाटील, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहन कोट आणि शिवसेना विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या पत्नी पूजा जोगदंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी नमिता पाटील या अवघ्या ८ मतांनी तर रोहन कोट हे १७०३ मतांनी निवडून आले. मात्र शिवसेनेच्या मयूर पाटील आणि पूजा जोगदंड यांचा ठाकरे गटाच्या राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी पराभव केला आहे. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असतानाच, मोहने परिसरात लावलेल्या  तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचे फोटो आहेत. तर तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली होती. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाला एकही जागा न दिल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात! मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलनाचा निर्धार अनिल ठाणेकर ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे ५०,००० लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.