Category: होम

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर अनिल ठाणेकर ठाणे: ‘वी नीड यू’ सोसायटीतर्फे समाजात ‘व्रतस्थ वृत्तीने कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व ठाणे शहर आणि जिल्ह्यालगतच्या परिसरात सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ८ वर्षे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात. सन २०२५चे हे तिन्ही पुरस्कार संस्थेच्या१५ फेब्रुवारी झालेल्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार समाजव्रती पुरस्कार स्टालिन दयानंद यांना, शिक्षणव्रती पुरस्कार सुनिता भोसले यांना तसेच कार्यव्रती पुरस्कार बाळासाहेब आठरे यांना घोषित झाले आहेत. भांडूप, मुंबई येथे ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेत धडाडीने काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद स्टालिन यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार मिळाला आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एससी. आणि एम. बी. ए.चे शिक्षण घेणाऱ्या मुंबई शहर, कोकण किनारपट्टी आणि देशातील अनेक भागात झपाट्याने लुप्त होत असलेली जैवविविधता टिकवण्यासाठी गेली पंचवीस वर्षे व्रतस्थपणे काम केले आहे. २००९मधे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांजुरमार्गमधील १४० हेक्टर पाणथळ जमिनीवर कचरा डेपो करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली. स्टालिन यांनी या मागणीला विरोध केला आणि न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने एक केंद्रीय अभ्यासगटाद्वारे अभ्यास करून घेत कचरा डेपो करण्यास परवानगी नाकारली. ही एकच जमीन नव्हे तर मुंबईतील पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीचे अतिक्रमण रोखण्यासाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कामाने अस्वस्थ झालेल्या काही बिल्डरनी त्यांच्यावर गुंडांकरवी हल्लेही केले आहेत. २०१०मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या खाणींच्या प्रकल्पालाही प्रखरपणे विरोध केला आणि अखेर प्रकल्प रोखण्यात यश मिळवले. खारफुटी वन किंवा कांदळवन टिकवून त्यात वृद्धी करण्यासाठी ते कार्यरत आहेत. केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मानवी हक्क अभियान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात प्रवेश करणाऱ्या आणि पुढे समाज कार्याबरोबरच समाज शिक्षण, कायदा शिक्षण घेता घेता थेट पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तसेच शिक्षणाचा गंध नसलेल्या फासेपारधी आणि अन्य भटक्या तसेच आदिवासी समाजात शिक्षणाचे मोल पोहोचवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या, आणि तब्बल १५०हून अधिक विद्यार्थी दत्तक घेतलेल्या सुनिता भोसले यांना या वर्षीचा शिक्षणव्रती पुरस्कार मिळाला आहे. २०१२ साली त्यांनी क्रांती संस्था स्थापन करून या सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती तपासणे, त्यांचं वह्या, पुस्तके, कपडे आदी गरजा पाहणे, त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था पाहणे, अशी अनेक कामे केलेली आहेत. इतकेच नव्हे तर बालमजुरी रोखणे, बालविवाह रोखणे, त्यासाठी पालकांत जागृती करत राहणे, त्यासाठी बालक पालक संवाद घडवून आणणे, हे काम सुनिता सातत्याने करत आहेत. ‘विंचवाचे तेल’ या आत्मकथनातून त्यांनी फासेपारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा धांडोळा घेतानाच समाजांतर्गत, विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर अत्यंत प्रखर प्रकाशझोत टाकलेला आहे. आगामी काळात वंचित, पारधी, भटके आणि आदिवासी समूहातील मुलांसाठी आश्रमशाळा अगर वसतिगृह निर्माण करण्याची त्यांची योजना आहे. तालुका कृषी अधिकारी म्हणून करणाऱ्या बाळासाहेब आठरे यांनी शासकीय सेवेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या लोकाभिमुख कामाचा गौरव त्यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र विकास, महिला स्वयंसहायता गट बळकटीकरण, आदिवासी विकास संदर्भातील योजना, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बीज उपलब्ध व्हावे म्हणून शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार विकास योजना अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, सेंद्रिय शेती उत्पादन कार्यक्रम आदि अनेक कार्यक्रम राबवले आहेत. तसे करताना शेतकऱ्यांची अनोखी शेतीशाळा व घोंगडी बैठक राबवून शेतकरी हितासाठी काम केले आहे. पथनाट्य लेखन, गीतलेखन करून त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने व सामाजिक कार्यात सहभाग दिलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर या आदिवासी जिल्ह्यातही त्यांनी सामाजिक आणि ग्रामविकास संस्थांबरोबर काम केले आहे. हे पुरस्कार रविवार ८ मार्च सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे होणार असून ज्येष्ठ सामाजिक तसेच स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. शिरूर जिल्हा पुणे येथे जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रविंद्र धनक यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. वी नीड यू सोसायटी ही संस्था १९८६पासून ठाणे व नवी मुंबई परिसरात काम करत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात उमंग वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्रे व शिबिरे आदी प्रबोधन कार्यक्रम केले जातात. ठाणे शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वी नीड यू सोसायटीचे अध्यक्ष अतुल गोरे यांनी तसेच सर्व विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप अनिल ठाणेकर ठाणे, मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या रहिवाशांना हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वाटप आज उपमुख्यमंत्रीच्या हस्ते करण्यात आले. गेली २५ वर्षे जुन्या चिखलवाडीचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या काळात ३६ विकासकांनी हा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ३७ वे विकासक म्हणून आलेल्या श्रीपती डेव्हलपर आणि आमदार पराग शहा यांनी मिळून हा प्रकल्प हातात घेऊन पूर्ण केला. अवघ्या २ वर्षात या इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे २६५ रहिवाशांना घर देणे शक्य झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही रहिवाशांना प्रतिकात्मकरित्या या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार पराग शहा, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, श्रीपती डेव्हलपर्सचे सतीश चतुर्वेदी, जुनी चिखलवाडी रहिवाशी संघाच्या अध्यक्ष सुरेखा परब, सरचिटणीस चिंतामण दळवी आणि सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते स्वप्न आज जुन्या चिखलवाडीतील रहिवाशांचे पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद वाटत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने क्लस्टर योजनेला मंजुरी दिली, त्या अंतर्गत देण्यात आलेल्या इन्सेटिव्हचा लाभ रहिवाशांना देण्याचे निर्देश दिले त्यामुळेच १२० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना आता ५८५ स्क्वेअर फुटांचे मोठे असे २ बीएचके घरे देणे शक्य झाले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी अतिशय उत्तम घरे विकासकाने दिलेली असून, विक्रीयोग्य घरांच्या एवढीच उत्तम घरे स्थानिक रहिवाशांनाही दिलेली असल्याचे सांगितले. याठिकाणी जिम, लायब्ररी, लग्नाचा हॉल अशा अनेक सुखसोयी देण्यात आल्या आहेत असे सांगितले. मुंबईतील ४० लाख लोकांना घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. क्लस्टर योजनेला मंजुरी देऊन तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. या सेस इमारतींप्रमाणे नॉन सेस इमारतींचे क्लस्टर उभारण्याचा देखील प्रयत्न म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येईल. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा रखडलेल्या पुनर्विकासाला आम्ही चालना दिली असून १७ हजार घरांचा प्रकल्प तिथे साकारला जात आहे. हा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवला जात आहे, तर ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प ठाणे मनपा आणि सिडकोच्या माध्यमातून राबवला जात आहे. याशिवाय मुंबईतील जे प्रकल्प विकासकांनी अर्धवट सोडून दिलेत ते पूर्ण करण्यासाठी म्हाडा, एस आर ए, बी एम सी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महाप्रीत अशा प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे. जनतेला वेळेत घरे देणाऱ्या विकासकाला फुले तर लोकांना नाडणाऱ्या विकासकाला नारळ देण्यात मी मागेपुढे पाहत नाही असे  शिंदे यांनी स्पष्ट केले. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच अशा क्लस्टर योजनांना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना काळात विकासकाना संजीवनी देण्यासाठी ५० टक्के प्रिमियम कमी करण्याचा आणि स्टॅम्प ड्युटी मध्येही ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईतील विकासकांना आणि घरे घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याची आठवण करून दिली.गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आपण अनेक पथदर्शी निर्णय घेतले असून नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या अंतर्गत नोकरदार, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुंबईचे डबेवाले यांनाही सवलतीच्या दरात घरे देण्याचे निश्चित करण्यात आले असून मुंबईत काम करण्यासाठी येणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेव येथे उभारण्याला मंजुरी दिली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.जुनी चिखलवाडीतील रहिवाशांना शिंदेच्या विनंतीवरून मिळणार रंगीत टीव्ही. जुनी चिखलवडीमधील रहिवाशांना नवीन घरे मिळाल्यामुळे त्यांचे गृह स्वप्न पूर्ण झालेच आहे. पण नवीन घरची चावी द्यायला मी आल्याने त्यांना घरासह एखादी भेटवस्तू मिळायला हवी अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी विकासाकडे व्यक्त केली. तसेच नवीन घरासह त्यांना एक टीव्ही देखील द्या अशी आग्रही मागणीच त्यांनी विकासक सतीश चतुर्वेदी यांना केली. अखेर शिंदे यांचा मान राखून चतुर्वेदी यांनी प्रत्येक रहिवाशाला घरासोबतच २४ इंची कलर टीव्ही भेट म्हणून देऊ असे यावेळी कबूल केले.

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्च रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्च रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गजांची राहणार उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ यांच्या, “लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ मार्चला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’ या संघटनेच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, त्याचा प्रचार आणि प्रसार करुन बहुजनवर्गात विशेषत: तरुणांमध्ये, संविधान-लोकशाही-समता-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता यांबाबत जनजागृती करण्याचा वसा, आनंदा होवाळ यांनी अखंडपणे सुरु ठेवलेला आहे. देशातील वाढता जातीयवाद, धर्मविद्वेष याबाबत, आपल्या व्याख्यानांतून भाजप-आरएसएस या धर्मांध संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा प्रहार केलेला आहे. त्या सर्वांचा उहापोह त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सद्यस्थितीतील भारतीय राजकारणावर, आनंदा होवाळ यांनी परखड भाष्य केले आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली असून, त्यांनीदेखील मोदी-शहा यांचे भाजपाई सरकार व धनदांडग्या भांडवलदारी व्यवस्थेविरोधात तसेच, केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्याविरोधात, कष्टकरी कामगारवर्गाला गुलामगिरीत ढकलणाऱ्या कंत्राटी पद्धती विरोधात ताशेरे ओढले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’च्या अध्यक्षा सविता सोनावणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य भूषवणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. राम पुनयानी, माजी न्यायमूर्ती डॉ. डी.के. सोनावणे, अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, ॲड. गाथा ढाले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला जास्तीतजास्त लोकशाहीवादी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आनंदा होवाळ यांनी केले आहे.

‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर व्याख्यान

‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर व्याख्यान कल्याण : कल्याण इतिहास संकलन समिती कोकण प्रांतच्यावतीने श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त  इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, (कल्याण जिल्हा) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपतींच्या ३९६ व्या जन्मोत्सव दिनानिमित्त  मराठा साम्राज्याचे सखोल अभ्यासक इतिहास संकलन समिती कोकण प्रांत उपाध्यक्ष रविराज पराडकर यांचे ‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर  अभ्यासपूर्ण ओजस्वी भाषण शनिवार, ७ मार्च सायंकाळी ६.३० वाजता डोंबिवली पूर्वेतील, वीर सावरकर रोड, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान याठिकाणी आयोजित केले आहे.

 ३० कलाकारांची अभूतपूर्व भव्य ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल – ‘अर्घ्य २०२६’

३० कलाकारांची अभूतपूर्व भव्य ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल – ‘अर्घ्य २०२६’ पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून विशेष उपस्थिती मुंबई: २२ मार्चला ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे ‘अर्घ्य २०२६’ या अभूतपूर्व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची पहिली भव्य ऐतिहासिक ‘सिम्फनी’ अर्थात स्वरमैफल असे याचे स्वरूप आहे. वांद्रे येथील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून हा सोहळा रंगणार असून, यात पाच वेगवेगळ्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे ३० कलाकार एकाच वेळी कलेचे सादरीकरण करतील. ही अस्सल स्वरमैफल पवित्र गुरु शिष्य परंपरेला अधिक बळकटी देणारी ठरणार असून गुरु आणि शिष्य एकाच व्यासपीठावर एकत्र सादरीकरण करणार आहेत. त्यातून ज्ञानसंक्रमणाची आणि कलात्मक वारशाची अखंडित परंपरा अधोरेखित होणार आहे. शास्त्रीय संगीताचा अस्सलपणा टिकवून ती भव्य आणि खिळवून ठेवणाऱ्या स्वरूपात नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा फाउंडेशनचा हा एक अनोखा प्रयत्न आहे. या ऐतिहासिक संध्याकाळी पाच दिग्गज कलाकार आणि त्यांचे शिष्य एकत्र कला सादर करनार आहेत. त्यांत, सतारचे जादूगार पंडित रवी चारी आणि त्यांचे शिष्य; प्रख्यात गायक पंडित राम देशपांडे आणि त्यांचे शिष्य; बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य; तबलामहर्षी पंडित योगेश साम्सी आणि त्यांचे शिष्य; तसेच पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके आणि त्यांचे शिष्य यांचा समावेश आहे. ३० कलाकारांचा हा समूह शिस्त, परंपरा आणि कलात्मक सातत्याचा एक भव्य आत्मीय अनुभव प्रेक्षकांना देईल. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळीच ऊंची आणि अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे आज मैफलिंमध्ये फ्युजनचा वरचष्मा दिसत असताना ‘अर्घ्य २०२६’ ही एक दुर्मिळ आणि प्रेरणादायी पर्यायाची संकल्पना समोर मांडते. राग आणि ताल यांच्या शाश्वत समीकरणात पूर्णपणे रुजलेली एक ‘शुद्ध स्वरमैफल’ आहे. मोठ्या प्रमाणावर आणि सखोल रचनेत उभारलेला हा संगीतानुभव अनेक वाद्ये आणि आवाज यांना एक अखंड, सुरेल संवादात एकत्र आणण्यास सज्ज आहे. हा संवाद भारतीय शास्त्रीय परंपरेच्या शिस्त आणि सौंदर्यदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली साकारला जाईल. ही केवळ एक मैफल नसून, ती एक अगदी भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास म्हणून कल्पिलेली मैफल आहे. तो गाभ्याची अनुभूती, भक्तिभाव आणि ध्यानमग्न सौंदर्य यांचा साक्षात्कार घडवणारा एक सर्वांगिण उत्सव आहे. ‘अर्घ्य २०२६’ ही केवळ एक मैफल नसून भारताच्या समृद्ध संगीत वारशाचा ऐतिहासिक पुनरुच्चार आहे. ‘अर्घ्य फाउंडेशन’ सर्व रसिक आणि संगीतप्रेमींना या अभूतपूर्व स्वरमैफलीचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करत आहे. ही मैफल शास्त्रीय संगीताच्या अखंड भव्य रूपाचे  दर्शन घडविण्यास सज्ज असून तिथे परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचे एकत्रित दर्शन एकात्म, निनादमय संगीत यांच्या माध्यमातून घडणार आहे. कार्यक्रम:…

८ मार्च रोजी महिलांसाठी मोफत बस प्रवास

८ मार्च रोजी महिलांसाठी मोफत बस प्रवास मिरा -भाईंदर मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरांतर्गत तसेच शहराबाहेरील ठाणे व बोरीवली या मार्गांवर प्रवासी बससेवा नियमितपणे चालविण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित, सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची गरज लक्षात घेऊन परिवहन सेवेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रमही राबविण्यात येत असतात. याच अनुषंगाने, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बसमधून महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी मा. आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे सूचना केली होती. त्यानुसार परिवहन विभागाने सादर केलेला प्रस्ताव मा. आयुक्त यांनी मंजूर केला. मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत मागील पाच वर्षांपासून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाला शहरातील महिलांकडून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने महिला या सुविधेचा लाभ घेत आहेत. महानगरपालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार ८ मार्च २०२१ रोजी ११,५५२, ८ मार्च २०२२ रोजी २१,४६१, ८ मार्च २०२३ रोजी २५,८३८, ८ मार्च २०२४ रोजी २२,१३१ तसेच  ८ मार्च २०२५ रोजी ३३,४३२ महिलांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बससेवेचा मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. दरवर्षी वाढत असलेल्या या प्रतिसादामुळे महिलांमध्ये या उपक्रमाबाबत सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजात महिला सन्मान व महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.  महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये महिला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक महिला दिनानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये महिला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मिरा-भाईंदर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने महिला पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे शिबिर ६ मार्च, सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत रुग्णालयाच्या १४ व्या मजल्यावरील ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उंची, वजन, रक्तदाब (BP), रँडम ब्लड शुगर (RBS), फुफ्फुस तपासणी (PFT), डॉक्टर सल्ला, हाडांची तपासणी (BMD) तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी अशा विविध तपासण्यांचा समावेश असणार आहे. हे शिबिर विशेषतः महिला पत्रकारांसाठी तसेच त्यांच्या आईसाठी आयोजित करण्यात आले असून, पुरुष पत्रकारांच्या पत्नी किंवा आईसुद्धा या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ही आरोग्य तपासणी फक्त महिलांसाठीच मर्यादित असल्याची नोंद आयोजकांनी स्पष्ट केली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. सदर शिबिरास महिला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वोक्हार्ट  हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १२ ठिकाणी होणार आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १२ ठिकाणी होणार आयोजन तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांची उपस्थिती अशोक गायकवाड कर्जत : महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्जत उपविभागत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा-क्र. १ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत उपविभागातील कर्जत-खालापूर या दोन्ही तालुक्यांतील १२ मंडळ स्तरांवर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूलविषयक दैनंदिन अडचणींना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करून तक्रारींचे ऑन-द-स्पॉट निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. शिबिरांमधील प्रमुख सेवा पुढील प्रमाणे — प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निकाली काढणे , अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क , लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा अकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शन, कलम ४२ मधील सुधारणा ,अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणे, कलम ४२अ, ४२व, ४२क, ४२ड अंतर्गत संपुष्टात आलेल्या सनद प्रणालीबाबत मार्गदर्शन , एकवेळ अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था , भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे. व्यवसाय सुलभता अंतर्गत एक खिडकी व्यवस्था, ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएम किसान, तक्रार निवारण व पाणंद रस्ते विषयक सुविधा तुकडेबंद कायद्याविरुद्ध जमीन खरेदी-विक्री व हस्तांतरण व्यवहारांबाबत मार्गदर्शन अभियानाच्या प्रभावी नियोजनासाठी कर्जत प्रशासकीय भवन उपविभागीय अधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद पार पडली. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी मंडळ स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून शिबिरांच्या आयोजनातील अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दिले. सकपाळ यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

रुस्तमजी अझियानोमध्ये रंगली शिस्तबद्ध आणि इको-फ्रेंडली रंगपंचमी

रुस्तमजी अझियानोमध्ये रंगली शिस्तबद्ध आणि इको-फ्रेंडली रंगपंचमी ठाण्यातील रुस्तमजी अझियानो संकुलात यंदाची २०२६ सालची धुळवड मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. अझियानो उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या…