Category: होम

वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सभासद महायुतीच्या पाठीशी

डोंबिवली : वाल्मिकी बेडर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज डोंबिवली येथे भेट घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सदस्य असलेली शेकडो कुटुंबे कल्याण लोकसभेत वास्तव्याला आहेत. हे सर्वजण सक्रियपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहणार असून कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या अभूतपूर्व विकासाने प्रभावित होऊन आपण हा पाठिंबा देत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले असून येत्या २० मे रोजी सर्वांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.  

हॉटेल धारकांना पाणी मस्त ,नागरिक पाण्याविना त्रस्त !

वीज, पाणी नॉट रीचेबलमुळे पर्यटनावर परिणाम माथेरान : मागील तीन दिवसांपासून माथेरान मध्ये वीज आणि पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने ऐन सुट्टयांचा हंगाम असताना याचा पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यातच ई रिक्षांना चार्जिंग नसल्याने ही सेवा सुध्दा कोलमडून गेली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा दूरवर शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागली आहे.शारलोट लेक येथे जनरेटर असताना देखील त्याचा वापर न केल्यामुळे पाणी पुरवठा केला गेला नाही. तर संध्याकाळच्या दरम्यान तीन दिवस सतत वादळी वारा आणि पाऊस यामुळे नेटवर्किंग सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आणि सततच्या विजेच्या लपंडावामुळे उष्मां अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे येथील हॉटेल धारकांना मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हॉटेल धारक कधीच स्थानिकांनी उभारलेल्या आंदोलनात अथवा ग्रामस्थांशी हितसंबंध ठेवत नाहीत. मुळात त्यांची अनधिकृत वाढीव बांधकामे असल्याने हॉटेल धारक शासनाच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. त्यांना मुबलक पाणी पुरवठा केला जातो आणि गावातील नागरिकांना पाण्यावाचून दिवस काढावे लागतात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे पण पदाशिवाय इथली नेतेमंडळी पुढाकार घेत नाहीत हे दुभाग्यच म्हणावे लागेल असे स्थानिक बोलत आहेत.

आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अशातच शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांकडून विनाकारण नोटीसा पाठविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच या नोटीसा मागे न घेतल्यास आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. येत्या २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ठाणे पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने ऐन निवडणुकीच्या काळात १४४ – २ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १५ ते १९ मे पर्यंत फिरकू नये असे सांगितले जात आहे. परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींवर नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्याचा एवढाच गुन्हा आहे की तो निवडणुकीत प्रभावी ठरू शकणार आहे, त्यामुळेच त्याच्यावर नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीसा बजावल्या जात नाहीत. केवळ अशा पध्दतीने टारगेट करुन त्याला ऐन निवडणुकीच्या काळात घराबाहेर काढण्याचाच हा प्रयत्न असून पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचेही ते म्हणाले. परंतु ज्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, करा तुम्हाला काय कारवाई करायची आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात निवडणुक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी अन्यथा उलटी पावले उचलावी लागतील, वेळ प्रसंगी बंद पाळावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अखेर ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील ३०५ रहिवाशांना मिळाली घराची हमी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येथील ३०५ रहिवाशांना अखेर मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीद्वारे दिली. मुंबई मंडळाने ३०५ घरांसाठी सोडत काढली असून या ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार राज्य सरकारने पुनर्वसित इमारती उभ्या राहण्यापूर्वीच या इमारतीत पात्र रहिवाशांना कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर असणार याची हमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीद्वारे ही हमी देण्यात येत आहे. आतापर्यंत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील अनेक पात्र रहिवाशांना घराची हमी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ना. म. जोशी मार्ग येथील पहिल्या टप्प्यातील सर्वच्या सर्व १२५० रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना सोडतीद्वारे घराची हमी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील अंदाजे ९०० रहिवाशांसाठी सोडत काढून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्याशी करारही करण्यात आला आहे. या टप्प्यातील ३०५ रहिवाशांची सोडत शिल्लक होती. काही बाबींच्या अनुषंगाने या सोडतीला रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे ही सोडत रखडली होती. मागील आठवड्यात, शुक्रवारी, १० मे रोजी ना. म. जोशी मार्ग येथील ३०५ रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्यात येणार होती. सोडतीची सर्व तयारही झाली होती. मात्र या सोडतीला एकही रहिवासी उपस्थित न राहिल्याने सोडत रद्द करावी लागली होती. मात्र ही सोडत रद्द करतानाच मुंबई मंडळाने १४ मे रोजी रहिवाशी उपस्थित राहिले नाही तरी सोडत काढण्यात येईल अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार मंगळवारी ३०५ घरांसाठी सोडत काढण्यात आली असून पात्र ३०५ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता लवकरच या रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता ३०५ रहिवासी रहात असलेल्या चार इमारती रिकाम्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या ३०५ रहिवाशांना महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

बोगस कुष्ठरोगी दाखवून लाटले कोट्यवधी रूपये

‘ठाण्यात कुष्ठरूग्ण घोटाळा’ अनिल ठाणेकर ठाणे : स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेमध्ये “कुष्ठरूग्ण” घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे पूर्वेकडे असलेल्या  कोपरी विभागात  फक्त १०० ते १५० कुष्ठरूग्ण असताना सुमारे ७१० जणांना ठाणे महानगर पालिकेकडून प्रत्येकी २४ हजार रूपयांचा निधी वाटप केला आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोपही जेया यांनी केला आहे. अजय जेया यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळविली आहे.   ठाणे पूर्वेकडील  कोपरी येथील गांधीनगर ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरुग्णांना दरवर्षी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून, प्रत्येकी २४ हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे,  या भागात शंभर ते सव्वाशे कुष्ठरूग्ण असताना  ७१० कुष्ठरुग्णांची नावे लाभार्थी म्हणून यादीत समाविष्ट  केली आहेत. साधारणपणे ३५० जणांचे बोगस प्रमाणपत्रे बनवून, त्यांच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुष्ठरोग निधीच्या नावाखाली, गेल्या अनेक वर्षांपासून, ठाणे महानगरपालिकेची फसवणूक करण्यात येत असून, यामागील खरे सूत्रधार ठाणे शहराचे माजी महापौर आणि ठाणे लोकसभेचे विद्यमान उमेदवार नरेश म्हस्के हेच असल्याचा थेट आरोप अजय जेया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला आहे. दरम्यान,  या घोटाळ्यासंदर्भात अधिक माहिती देताना समाजसेवक अजय जेया पुढे म्हणाले की, नौपाडा कोपरी प्रभाग समितीत काम करणारे  अधिकारी अकबर शेख , नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार, कुष्ठरोग निधी मिळण्याबाबतचे अर्ज लाभार्थ्यांना वितरित करतो, त्यानंतर याच परिसरात वास्तव्यास असणारा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) कर्मचारी असणारी ॲलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती यादीतील सर्व लाभार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र बनवते.  त्याबाबतचा मोबदला तो रोख पैशाच्या स्वरुपात घेतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर, ७१० लाभार्थ्यांपैकी अवघ्या १०० ते १५० कुष्ठरुग्णांना  24हजार रुपये दिले जातात . या कामी शिंदे गटाचे  शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख व महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप अजय जेया यांनी  केला. याप्रकरणी शासनाचे कुष्ठरोग विभाग, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, कुष्ठरोग निधी घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार नरेश म्हस्के यांच्यावर कठोर, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी समाजसेवक अजय जेया यांनी केली आहे.

‘नालेसफाई केल्यावर काढून ठेवलेला गाळ तत्काळ उचलण्यात यावा’

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. परिसरात दुर्गंधी पसरू नये, अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिला. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली. नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी दैनंदिन स्वरुपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिला. या पाहणीच्या वेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात वारा, वादळ व पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान 

वीजपुरवठा पुर्ववत करण्याची कामे युध्दपातळीवर रायगड : दि.१३ मे २०२४ रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभगाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आले होते. या दिवशी, कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार, वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने,वीज पुरवठ्याची वाताहात होऊन, तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बऱ्याच  ठिकाणी उच्चदाब व लघुदाब  वाहिनीचे पोल पडले होते, विद्युत रोहित्र निकामी झाले होते. आशा प्रसंगी महावितरण कर्जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून खंडित वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे प्रयत्न करीत होते. सोमवारी झालेली पडझडीमुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येत होता व बहुतांशी भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे . परंतु दि. १६ मे २०२४ रोजी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने व भोगावणाऱ्या वाऱ्याने कर्जत तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे महावितरणचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नेरल इन्कमर उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल, कडाव उच्चदाब  वाहिनीवर १७ पोल व अंजप उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल पडल्याच्या घटना संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारस समोर आलेले आहेत. प्रसंगी लघुदाब  वाहिनीचे अंदाजे ५० पोल पडले आहेत. या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांचा वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा विना गैरसोय होत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतीग्रस्त वीजवाहिन्या, पोल, डीपी , इत्यादी   महावितरण तर्फे सदर काम लवकरात लवकर करण्याचा अथक प्रयत्न चालू असून, सदर वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे कामे युध्दपातलीवर  सुरु आहेत.  तरी, महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे अहवान केले  आहे.

निवडणूक तयारीचा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत- एस.चोक्कलिंगम ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज निवडणूक तयारीचा आढावा घेतला.…

२० मे रोजी होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासन सज्ज – संजय यादव

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ९० हजार २३८ मतदार, २ हजार ५२० मतदान केंद्रे अशोक गायकवाड मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या…

समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देणार-पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत.…