Category: होम

मुंबईतील मोदींच्या सभेला यशस्वी करणे महायुती म्हणून आमची जबाबदारी…- – सुनिल तटकरे

मुंबई : राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुंबई प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या विजयाचीही खात्री सांगितली.विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल असेही सुनिल तटकरे म्हणाले. महायुतीची लाट आहे असे ते म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले असावे यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार यांना फार मोठी आघाडी म्हणजे २०१९ मध्ये भाजपला मिळाली होती त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. बारामतीमध्ये निकाल काय लागणार आहे याची रोहित पवार यांनी पराजयाची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ट्वीट करत कबुली दिली आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने

मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मानले आभार मुंबई :- १० राज्ये आणि ९६ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी…

फ्लॅश मॉबव्दारे मॉलमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा अधिकार असणा-या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये नुकताच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले पहिल्यांदाच मतदान करणारे 18 वर्षावरील युवक व युवती यांना मतदान करण्याकरीता प्रोत्साहित केले जात असून महाविद्यालयांमध्ये तसेच युवक संघटनांमध्येही मतदार जनजागृती विषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे. या अनुषंगाने शनिवार व रविवारी होणारी मॉलमध्ये येणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाशी येथील इनॉर्बीट मॉल तसेच सीवूड येथील ग्रॅंड सेंट्रल मॉल या दोन ठिकाणी लोकांना चटकन आकर्षित करुन घेणा-या फ्लॅश मॉब सारख्या संगीतमय कलाप्रकाराचा मतदार जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला. मॉलमधील वातावरण खरेदीसाठी उत्साही असताना व तशा प्रकारची लगबग मॉलमधील प्रत्येक दुकानातून सुरु असताना अचानक मोठया आवाजात गीत – संगीत वाजायला सुरुवात होते. गाणे कुठे वाजते आहे याचा कानोसा घेत लोक आवाजाच्या दिशेने सूरांचा शोध घेण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी त्यांना मॉलच्या तळमजल्यावर मधल्या मोकळया पॅसेजमध्ये संगीत वाजायला सुरुवात झाल्याचे लक्षात येते व त्या तालावर नृत्यासाठी सज्ज असलेले तरुण, तरुणी दिसतात. गाणे वाजायला सुरुवात होते आणि त्या तालावर ते तरुण – तरुणी समुहनृत्य सुरू करतात. बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवतालची गर्दी वाढत जाते. सुरूवातीच्या गाण्यानंतर चक्क मतदान विषयक जनजागृती करणारे गाणे सुरू होते. मग मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारी गाणी एकापाठोपाठ एक नृत्यासह सादर होत जातात. तळमजल्यावरच नव्हे तर मॉलमधल्या प्रत्येक मजल्याच्या कठडयाजवळ येऊन नागरिक तळमजल्यावर नृत्य करणा-या कलावंताकडे आकर्षित होऊन गर्दी करतात. नृत्याविष्काराच्या अखेरीस 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत केले जाते. नागरिकही या तरुणाईला प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याचे कौतुक करतात व लोकसभा निवडणूकीत आम्ही मतदान करणार आहोत अशी ग्वाही देखील देतात. वर्दळीच्या ठिकाणी अचानक सुरु होणारा गीतसंगीतमय फ्लॅश मॉब हा नागरिकांना आकर्षित करणारा व त्याच वेळी मतदानाविषयी जनजागृती करणारा असल्याने हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला.

रेवदंड्यात हवामन बदलाचा फटका

रेवदंडा : मागील काही दिवसांपासून परिसरात हवामान बदलाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होत आहे. यंदा तालुक्‍यात हवामानात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे शरीराची लाही लाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे हवेत मळभ दाटून आल्‍याने उष्म्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहानंतर ते सायंकाळी सहापर्यंत नागरिक घराबाहेर पडण्याऐवजी घरातच थांबणे पसंत करताना दिसून येत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. येथील अनेक समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र, वाढत्‍या उष्म्यामुळे पर्यटक लगेच परतत आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने जव्हार परिसरात अंधार

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी  दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता. तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.

मोखाड्यात तीन दिवसांपासून नुकसान

मोखाडा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी  झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे. मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.

उद्धव ठाकरे आज वसईत

विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (ता. १४) वसईत येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारानिमित्त वसई-माणिकपूर येथील वायएमसीए मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ते प्रमुख म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. वसई सनसिटी येथील मैदानावर सायंकाळी साडेचार वाजता हेलिकॉप्टरमधून त्यांचे आगमन होईल. त्यानंतर येथून जवळच असलेल्या बिशप हाऊसला ते भेट देतील. त्या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि धर्मगुरूंसोबत संवाद साधतील. त्यानंतर नियोजित वेळेत सभास्थळी पोहोचून सभेला मार्गदर्शन करतील. उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीने भारती कामडी यांच्या रूपाने महिला उमेदवार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी ६ एप्रिल आणि उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी अनुक्रमे वसई व बोईसर येथे सभा घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनीही ८ मे रोजीच्या ‘बाईक रॅली`तून विरार-नालासोपारा भागातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवार, ११ मे रोजी पालघरमध्ये पुन्हा भेट दिली होती. या भेटीत त्यांनी येथील विविध क्षेत्रांतील संघटनांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा वसईत जाहीर सभा घेत आहेत. पर्यावरण हानी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, औद्योगिकीकरण, वाहतूक व्यवस्था, अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत व पाणी योजना आदी विषयांवर या सभेतून ते जनतेशी संवाद साधतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

बाबासाहेबांच्या शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! या संदेशानुसार शैक्षणिक प्रगती करा – डॉ. जयपाल पाटील

अशोक गायकवाड अलिबाग : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! असा दिलेला संदेश आपल्या समाजातील मुला मुलींनी शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उंच करावे असे मार्गदर्शन पंचशील बौद्ध मंडळ खंडाळे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात समाज भूषण, आपत्तीव्यवस्थापन तज्ञ, रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष. मंगेश मोरे. उपाध्यक्ष. वैष्णवी कदम. प्रा. डॉ.जयपाल पाटील. उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन. त्रिशरण,पंचशील, घेण्यात आले. यानंतर पुरस्कार प्राप्त जयपाल पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकात प्रा.जयपाल पाटील यांच्या समाजसेवेबाबत उपस्थित त्यांना माहिती व आपल्या समाज बांधवांना कायम आरोग्याबाबत मदत करणारे असून त्यांना अलिबाग तालुक्यात प्रथमच हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आपल्या मंडळामार्फत बोलावले आहे. यावेळी प्रा.जयपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मोफत चालविले जाणारे अलिबाग, पनवेल, पाली व महाड येथील मुलींचे वसतिगृह व मुलांसाठी अलिबाग, तळा, महाड येथील व जावळी माणगाव येथील १०वी पर्यंतचे माध्यमिक विद्यामंदिर याचा आपल्या समाजातील गोरगरीब, गरजवंतांनी शिक्षणासाठी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी कधी केव्हाही अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. आपली मुलगी बाळंतपणासाठी बाहेर आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी १०२ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. पावसाळा आता जवळ आल्याने काही वेळा विजा कोसळतात त्यासाठी केंद्र सरकारने “दामिनी” ॲप काढला असून विजय बाबत सुरक्षेची माहिती मोबाईलवर कशी मिळते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा. या माहिती सोबतच महिलांनी आपल्या घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी सांगितले.त्याचबरोबर विहाराच्या ग्रंथालयास संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तक आपत्ती सुरक्षेची पुस्तके भेट दिली. यापुढे असा कार्यक्रम तालुक्यात जिल्ह्यात आपल्या समाजातील महिला पुरुषांसाठी बुद्ध विहारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी अँड. अनुष्का गायकवाड, प्रीती रघुनाथ मोरे, प्रतिभा मोरे, पांडुरंग मोरे व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव सिमरन ओहाळ यांनी मानले.

महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 26 मतदारसंघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आहे. या चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 7,384 एवढ्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचलन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार असून त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला अधिकारी व कर्मचारी संचलित एकूण 26, तरुण अधिकारी व कर्मचारी संचलित 26, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचारी (सक्षम केंद्र) संचलित एकूण 26 मतदान केंद्र असतील, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या  मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे  आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांच्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार, २३ जून, २०२४ रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी स. ११ ते दु. १ असा राहील. प्रवेश परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जून २०२४ पर्यंत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cdinstitute.net) उपलब्ध असलेल्या लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.  टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.        सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८८१४२१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना मासिक तीन हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते.तसेच, सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित करण्यात येतात.