Category: होम

मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी पुन्हा तीन दिवसांची मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव असलेल्या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात येणार होती. मात्र तत्पूर्वीच सोमवारी मंडळाने निविदा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली. मुंबई मंडळाने मार्चमध्ये १७ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने एक बोली निश्चित केली आहे. ४५ हजार ३०० रुपये प्रति चौरस मीटरपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत. ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम अदा करावी लागणार आहे. मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ एप्रिल होती. मात्र आचारसंहिता आणि अधिक प्रतिसाद मिळावा या उद्देशाने निविदा सादर करण्याची मुदत संपण्याआधीच या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियेस ७ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत मंगळवार, ७ मे रोजी संपणार होती. मात्र तत्पूर्वीच निविदा सादर करण्यास मंडळाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना १० मेपर्यंत निविदा सादर करता येतील, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाण्यात पाणी बचतीसाठी पालिकेने लागू केले निर्बंध;

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई ठाणे : तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असून त्याचबरोबर विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई करण्यात आली असून त्याचबरोबर तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई केली आहे. या आदशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यानुसार दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध असणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याऐवजी कूपनलिकेच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे. अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी.  सोसायटीतील गळकी टाकी, जलवाहिनी, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी. त्यासंदर्भात, तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा अशी गळती आढळल्यास संबंधीत इमारतीचे-सोसायटीची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये.  स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याचा अनावश्यक साठा करू नये तसेच, साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती, सोसायटी, संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये आणि वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत.  कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने होईल. कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणार निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लशसाठी, बाथरुम धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी तसेच बगीच्यासाठी वापरावे, अशी सूचनाही प्रशासनाने केली आहे.

कोकण रेल्वेची विलंबयात्रा… मतदानाला पोहोचण्याबाबत शंका!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मुंबईस्थित बहुसंख्य कोकणवासीय गावी निघाले आहेत. मात्र कोकण रेल्वेवर असलेला मेगा ब्लॉक आणि रेल्वे गाड्यांची सातत्याने विलंबयात्रा यामुळे मतदानासाठी वेळेवर पोहोचणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. नियमित आणि विशेष रेल्वे गाड्या किमान दोन-तीन तास उशिरा असून एलटीटी ते थिवीम विशेष गाडी तर ११ तास विलंबाने धावली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकणात मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मंगळवारी मतदान झाल्याने  मुंबईतील कोकणवासीय गावाकडे निघाले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाड्यांना गर्दी वाढली आहे. मात्र सततच्या विलंबाने प्रवासी हैराण झाले.  कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी गावी पोहोचण्यासाठी मतदारांना तारेवरची कसरत करावी लागली. एलटीटीवरून ४ मे रोजी रात्री १०.१५ वाजता सुटणारी गाडी ५ मे रोजी सकाळी ७.२४ वाजता सुटली. त्यानंतर पुढील प्रवास प्रचंड रखडत सुरू असल्याने थिवीम येथे रात्री ९ वाजता पोहोचली. ५ मे रोजीची सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या १ तास १० मिनिटे, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस ३२ मिनिटे, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ५३ मिनिटे, एलटीटी ते थिवीम १ तास २६ मिनिटे उशिराने धावल्या. केवळ एकच विशेष गाडी… मध्य रेल्वेने सोमवारी मुंबईतील टर्मिनसऐवजी पनवेलहून सावंतवाडीसाठी एकच विशेष रेल्वे गाडी सोडली. ही गाडी रत्नागिरीला रात्री १२ वाजता तर राजापुरात रात्री २ वाजता पोहोचेल. त्यामुळे पुढे गावापर्यंत प्रवास कसा करायचा, हा प्रश्न प्रवाशांना पडला. एसटीने एक लाख मतदार रवाना एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारांतून कोकणात जाण्यासाठी विशेष बसदेखील चालवण्यात आल्या. रायगड, रत्नागिरी या भागात सर्वाधिक बस धावल्या. ५ मे रोजी २४४ नियमित बस चालवण्यात आल्या, तर आठ जादा बस चालवण्यात आल्या. या बसद्वारे ४४,६०० प्रवाशांनी प्रवास केला. ६ मे रोजी २५० नियमित बस आणि आठ जादा बस सोडण्यात आल्या. त्यातून ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

जप्त मालमत्तांकडे खरेदीदारांची पाठ

मागील दहा वर्षात थकबाकीदारांच्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचे विहित प्रक्रिया पूर्ण करून लिलाव जाहीर केले होते. कोट्यवधी रूपये पालिकेला या लिलावातून मिळणार होते. परंतु, गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारे जाहीर करण्यात आलेल्या लिलाव बोलीतील एकाही थकबाकीदाराची मालमत्ता विकली गेली नसल्याची पालिकेच्या अभिलेखातील धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघडकीला आली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करायच्या असतील तर त्यासाठी पालिकेचा मालमत्ता कर विभाग संबंधिताला पहिले नोटिसा पाठवून थकीत रक्कम भरणा करण्याचे सूचित करतो. अशाप्रकारे तीन नोटिसा पाठविल्यानंतर संबंधित थकबाकीदाराने मालमत्ता कर थकबाकी भरणा केली नाही तर पालिका त्या मालमत्ता जप्त करते. अशा अनेक थकबाकीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतर पालिका प्रसिध्द वर्तमानपत्रात या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्याची आणि त्यांचा लिलाव जाहीर करते. या जाहिरातींसाठी पालिका लाखो रुपये खर्च करते. या मालमत्ता नागरिकांनी खरेदी कराव्यात म्हणून जनजागृती करते. मालमत्ता विक्रीला न गेल्याने पालिकेने खर्च केलेला सगळा पैसा फुकट जातो, असे माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी सांगितले. मागील १५ ते २० वर्षाच्या काळात थकबाकीदार कर मालमत्ताधारकांकडे पालिकेची सुमारे पंधराशे कोटीहून अधिकची रक्कम होती. या रकमा वेळोवेळी पालिकेने अभय योजना, विविध प्रकारच्या क्लृप्त्या करून थकबाकीदारांकडून वसूल केली आहे. ही रक्कम आता सुमारे चारशे ते पाचशे कोटीच्या आसपास आहे. थकबाकीदार कर भरणा करत नाहीत मात्र पालिका पुरवत असलेल्या पाणी, रस्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेतात. गेल्या महिन्यापूर्वी पालिकेने अनेक वर्ष कर भरणा न करणाऱ्या २७ कर थकबाकीदारांच्या ११४ कोटीच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव जाहीर गेला होता. या मालमत्ता विक्रीतून पालिकेला सुमारे सहाशे कोटीहून अधिकची रक्कम बाजारभावाप्रमाणे मिळणार होती. परंतु, पालिकेने हा लिलाव अचानक रद्द केला. त्यामुळे थकबाकीदारांनी समाधान व्यक्त करून पालिकेला या लिलाव प्रक्रियेसाठी केलेला खर्च वाया गेला, असे तक्रारदार कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात पालिकेने किती मालमत्तांचे लिलाव केले. किती मालमत्ता विक्रीला गेल्या, अशाप्रकारची माहिती मनोज कुलकर्णी यांनी कर विभागाकडून मागवली होती. त्यावेळी कर विभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी लिलाव प्रक्रियेव्दारे मिळकती विकल्या गेल्या नाहीत, असे उत्तर दिले आहे. या मालमत्तांंचे पुढे पालिकेने काय केले, थकित रकमा पालिकेने वसूल केल्या आहेत का, असे प्रश्न कुलकर्णी यांनी केले आहेत. राजकीय दबाव आणून बडे थकबाकीदार पालिका अधिकाऱ्यांना असे लिलाव रद्द करण्यास किंवा त्यांच्या जप्त मालमत्ता कोणी खरेदी करू नये म्हणून ‘व्यवस्था’ करतात, असे समजते.

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘ब’ संघ उपांत्य फेरीत

ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने बेनेटन क्रिकेट क्लबचा एक गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे…

किरण सामंतांना सुरक्षा द्यावी-वैभव नाईक

रत्नागिरी : किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार  माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. ही दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना…

किरण सामंत अन् १५ मिनिटे

सिंधुदुर्ग : सामंत बंधूमधिल नाराजी नाट्य आज मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा दिसून आले. राणेंच्या एवेजी या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उत्सुक होते. पण एनवेळी शिवसेनेची ही…

पालघर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी आज मुंबईत दादर येथील वसंतस्मृती येथे डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

‘दोन सुरतवाले’ छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायेत-ठाकरे

धुळे : दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, मोदी सरकार थापेबाज सरकार आहे. थापेबाज सरकारला पुन्हा…

मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले- फडणवीस

मुंबई : हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलतायत. वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल करीत मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले आहेत अशी…