Category: महाराष्ट्र

Maharashtra News

राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पुणे सर्वसाधरण विजेता;

पुणे क्रीडा प्रबोधिन उपविजेते अहिल्यानगर २७ नोव्हेंबर – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड…

साकिब रिझवीतर्फे रविवारी मॅरेथॉन

  मालाड : वांद्रे पूर्व बीकेसी येथे सहावी साकिब रिझवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन १ डिसेंबर रोजी जी-८ ग्राउंड येथे सकाळी साडेपाच वाजता आयोजन केले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर प्रसिद्ध ऑलिंपिक ॲथलीट अक्षय खोत यांच्यासह अनेक देशांचे राजकीय मान्यवर व अभिनेता अरबाज खानही उपस्थित राहणार आहेत. आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता आणि महिला सुरक्षितता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केल्याचे रुबिना अख्तर हसन रिझवी यांनी पत्रकारांना सांगितले. 000

बदलापुरात गरजूंना मदतीचा हात

00000   बदलापूर : गरजू आणि दिव्यांगबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट मागील अनेक महिन्यांपासून सेवा बजावत आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले यांच्या हस्ते या नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांच्या माध्यमातून वर्षभर चालणाऱ्या सामाजिक उपक्रमातून प्रेरणा घेत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांनी बदलापूर पूर्व शिरगाव आपटेवाडी परिसरातील गरजू आणि दिव्यांग नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य वाटपाचे काम त्यांनी हाती घेतले. या उपक्रमाला आशीष दामले यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते या नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या मदतीचा लाभ घेणाऱ्या या नागरिकांनी अनिल मराडे व दामले यांचे यावेळी विशेष आभार मानले.

 अभय योजनेत 27717 थकबाकीदारांना लाभ;

24.40 कोटी घरपट्टी वसूल हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी राबविलेल्या अभय योजनेत दोन महिन्यात २७, ७१७ मिळकतधारकांनी लाभ घेतला. यातून २४.४० कोटी रुपयांची घरपट्टी अदा केली, तर महापालिकेने १२.५१ कोटी रुपयांचा दंड माफ केला. महापालिकेला शासनाच्या माध्यमातून जीएसटी प्राप्त होतो. जवळपास ९८५ कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त होतो. जीएसटीनंतर महापालिकेला घरपट्टीतून अधिक उत्पन्न मिळते. वार्षिक अडीचशे कोटी रुपये महसूल घरपट्टीच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एक एप्रिल २०१८ नंतर शहरातील नवीन मिळकतींना दुप्पट घरपट्टी लागू करण्यात आल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ३०० कोटीपर्यंत थकबाकीची रक्कम पोचली आहे. महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने देयकांचे वाटप होत नाही. त्यामुळे आता घरपट्टी बिलांचेदेखील आउटसोर्सिंग करण्यात आले आहे. महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी आगाऊ घरपट्टी अदा केल्यास सवलत योजना राबविली जाते. त्यानंतर मात्र मुदत संपल्यानंतर घरपट्टी अदा न करणाऱ्यांना जुलै महिन्यापासून घरपट्टीच्या थकबाकी वर मासिक दोन टक्के शास्ती केली जाते. एक एप्रिल २०१८ नंतर महापालिकेच्या रेकॉर्डवरील मिळकतींना दुप्पट दराने घरपट्टी लागू करण्यात आल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. घरपट्टीची मूळ थकबाकीची रक्कम १७३ कोटी रुपये आहे. त्यावरील दंडाची रक्कम ही २७२ कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी १ ऑक्टोंबर २०२४ पासून अभय योजना लागू केली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थकबाकीची रक्कम अदा केल्यास दंडाच्या रकमेत ९५ टक्के माफी, डिसेंबर महिन्यात ८५ टक्के, तर जानेवारी २०२५ मध्ये ७५ टक्के शास्ती माफी असे योजनेचे स्वरूप आहे. १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या दोन महिन्यांत २७,७१७ थकबाकीदारांनी लाभ घेतला. असा मिळाला लाभार्थ्यांना लाभ सातपूर विभागात ३,४४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांच्याकडून २. ५२ कोटी रुपये थकबाकी जमा झाली असून, ९० लाखांची दंडमाफी देण्यात आली. पश्चिम विभागात १, ७८७ थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेत ३.२२ कोटी रुपये थकबाकी अदा करून १. १४ कोटी शास्तीचा लाभ घेतला. पूर्व विभागात ४, ९५०, पंचवटी विभागात ६,२१०, सिडको विभागात ७,०९१, नाशिक रोड विभागात ४,२३९ याप्रमाणे लाभ घेण्यात आला. कोट ”थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली असून, थकबाकीदारांनी एकरकमी थकबाकी अदा करून दंड माफीचा लाभ घ्यावा.” – श्रीकांत पवार, कर उपायुक्त, महापालिका. ००००

 नाशिक गारठले

 तापमान १०.८ अंशावर – हंगामातील सर्वात कमी पातळी   हरिभाऊ लाखे नाशिक : आठवडाभरापासून कमी होणाऱ्या तापमानाने मंगळवारी हंगामातील १०.८ अंश ही नीचांकी पातळी गाठली. तर निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ८.८ अंश तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमान या पातळीवर आल्याने सर्वत्र सुखद गारव्याची अनुभूती मिळत आहे. टळटळीत उन्हाळा, मुसळधार पावसानंतर नाशिकची वाटचाल आता वेगाने कडाक्याच्या थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. एरवी दिवाळीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. तशी सुरुवात यंदाही झाली होती. नोव्हेंबरच्या मध्यावर तापमान १६.६ अंशावर होते. ११ दिवसांत तापमान ५.८ अंशाने खाली आले आहे. मागील आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस तापमान १२.४ अंशावर होते. सोमवारची सकाळ नाशिकला थंड करणारी ठरली. या दिवशी शहरात १२ अंश तर, निफाडमध्ये १० अंश तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी ते आणखी खाली आले. नाशिक शहरात १०. ८ तर निफाडमध्ये ८.८ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. शहर आणि ग्रामीण भागात कमालीचा गारवा जाणवत आहे. गारठ्यामुळे उबदार कपडे बाहेर पडू लागले आहेत. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवते. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थंडी काही नवीन नाही. उलट दरवर्षी तिची प्रतिक्षा असते. ही प्रतिक्षा संपुष्टात आली असून या हंगामात अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची चिन्हे आहेत. उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. तिकडे वातावरणात जसे बदल होतात, तसे नाशिकचे तापमान बदलू लागते. मागील काही हंगामातील नोंदी पाहिल्यावर डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी असते. याच काळात तापमान नीचांकी पातळी गाठते. त्या दिशेने नोव्हेंबरच्या अखेरीस वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे. द्राक्ष बागायतदार सतर्क थंडीमुळे द्राक्ष बागायतदार सतर्क झाले असून थंडीचा कडाका वाढल्यास बागांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना उपाययोजना करणे भाग पडणार आहे. हिवाळ्यात जिल्ह्यामध्ये कायमच थंडी जाणवत असते. नाशिक, निफाड आणि मालेगाव या ठिकाणी तापमान घसरत असते. यंदा हिवाळ्याला सुरुवात होत असतानाच तापमान घसरल्याने यापुढे थंडीत अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटणार नाहीत !

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी  एक ऐतिहासिक निर्णय दिला. १९७६ मध्ये पारित झालेल्या ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकात “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्ष” या शब्दांचा समावेश करण्यात आला होता. हे दोन शब्द काढण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.…

नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे झाले शक्य

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात मोठ्या फरकाने महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याने अनेक ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यासह पराभूत इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली. १५ मतदारसंघात १९६ पैकी १६५ म्हणजे ८४ टक्के उमेदवारांनी ही रक्कम गमावली. केवळ १६ उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. विधानसभेच्या जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागांवर एकहाती विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. राष्ट्रवादीने (अजित पवार) सर्वाधिक सात, भाजपने पाच तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन आणि एमआयएमने एक जागा मिळवली. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांसह काँग्रेसचा दारूण पराभव झाला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतात. अनामत रक्कम परत मिळण्यासाठी उमेदवाराला एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते (१६.३३ टक्के) मिळणे आवश्यक असते. निवडणुकीत मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यास प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनामत वाचविणे शक्य होत नाही. ज्यांना तेवढी मते मिळतात, केवळ त्याच उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळते. उर्वरितांना ती गमवावी लागते. जिल्ह्यात १६५ उमेदवार तेवढी मते मिळवू शकले नाहीत. संबंधितांना अनामत रक्कम गमवावी लागली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात प्रत्येकी १६ उमेदवार होते. मतदानासाठी या ठिकाणी दोन मतदार यंत्रांचा वापर करावा लागला. नाशिक पश्चिममध्ये १५ तर नाशिक मध्य चांदवड आणि नांदगावमध्ये प्रत्येकी १४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे १ लाख २९ हजार या सर्वाधिक फरकाने विजयी झाले. या मतदारसंघात दोन लाख तीन हजार मतदान झाले होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारास ३३ हजार मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांना ३० हजार ३८४ मते मिळाली. तशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघातही झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांनी ८६ हजार ५८१ च्या मताधिक्याने विजय मिळवला. या मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख १४ हजार इतके झाले होते. प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लकी जाधव यांना अनामत रकमेसाठी ३५ हजार मते मिळणे आवश्यक होते. तथापि, त्यांना ३० हजार ९९४ मते मिळाली. बागलाणमध्ये दीपिका चव्हाण आणि इगतपुरीत लकी जाधव या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही अनामत रक्कम गमवावी लागली. उर्वरित १३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावरील नाशिक पश्चिम मतदारसंघ वगळता १२ मतदारसंघात उमेदवारांनाही ही रक्कम गमवावी लागली. त्यास केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघ अपवाद ठरला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार १५ मतदारसंघात केवळ १६ उमेदवार एकूण मतदानाच्या एक षष्ठांशहून अधिक मते मिळवत अनामत रक्कम वाचवू शकले. यामध्ये येवल्यात माणिकराव शिंदे, नांदगावमध्ये समीर भुजबळ, चांदवडमधील गणेश निंबाळकर व केदा आहेर, देवळालीत राजश्री अहिरराव व योगेश घोलप, नाशिक मध्य मध्ये वसंत गिते, नाशिक पश्चिम मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरील सुधाकर बडगुजर व तिसऱ्या क्रमांकावरील दिनकर पाटील, नाशिक पूर्वमध्ये गणेश गिते, निफाडमध्ये अनिल कदम, कळवणमध्ये जे. पी. गावित, सिन्नरमध्ये उदय सांगळे, मालेगाव बाह्यमधील बंडुकाका बच्छाव, मालेगाव मध्यमधील असिफ शेख रशिद व दिंडोरीतील सुनिता चारोस्कर यांचा समावेश आहे. ०००००

विकास, सुशासनाचा विजय- पंतप्राधान मोदी

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतील विजय हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे, विशेषतः तरुण वर्गाचे आणि महिलांचे, या ऐतिहासिक विजयासाठी आभार मानले आहेत. एवढेच नाही, तर मी ग्वाही देतो की,  महाराष्ट्राच्या…

नाशिक जिल्ह्यातील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता अवघ्या जिल्हावासीयांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून पंधराही मतदारसंघांत मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यंदा जिल्ह्यातील ६९.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त झाले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. बुधवारी (दि. २०) मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या-त्या मतदारसंघात उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षितरीत्या जतन करण्यात आले आहे. शनिवारी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता या स्ट्राँगरूम उघडल्या जाणार आहेत. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जिल्ह्याला नव्याने कोणते १५ आमदार लाभणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र नांदगाव : अतिरिक्त प्रशासकीय इमारत, नवीन तहसील कार्यायल इमारत, नांदगाव मालेगाव मध्य : शिवाजी जिमखाना, संगमेश्वर, मालेगाव मालेगाव बाह्य : शासकीय वखार महामंडळ गोदाम, मालेगाव बागलाण : मराठा हायस्कूल, स्काउट-गाइड हॉल, बागलाण कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण चांदवड : नवीन प्रशासकीय इमारत, आयटीआय रोड, चांदवड येवला : पैठणी क्लस्टर गोदाम औद्योगिक वसाहत, एमआयडीसी, अंगणगाव, येवला सिन्नर : तहसील कार्यालय, सिन्नर निफाड : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, निफाड दिंडोरी : मविप्र कॉलेज, दिंडोरी नाशिक पूर्व : मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक नाशिक मध्य : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक नाशिक पश्चिम : राजे छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, सिडको, नाशिक देवळाली : जिल्हा निवडणूक गोदाम, सय्यदपिंप्री, ता. नाशिक इगतपुरी : शासकीय कन्या विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सीबीएस, नाशिक

मुंबई नाक्यावर वाहतुकीची कोंडी

 रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ट्रॅफिक जाम   हरिभाऊ लाखे नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान उड्डाणपुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरण्याचे काम सुरू आहे. यामुळे मुंबई नाका सर्कल याठिकाणी दररोज दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते आहे. गुरुवारी दिवसभर याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांना नाहक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक वळविण्यासाठी व कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली असली तर कोंडीचा सर्वांना सामना करावा लागला. द्वारका ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान उड्डाण पुलाखालील सर्व्हिसरोडचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या काँक्रिटीकरणाचा सर्वाधिक ताण मुंबई नाका सर्कलवरील वाहतुकीवर पडला आहे. इंदिरानगर बोगद्याकडून मुंबई नाका सर्कलकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे येणारी वाहतूक प्रकाश पेट्रोल पंपासमोर सर्व्हिसरोडकडे वळविण्यात आलेली आहे. यामुळे मुंबई नाका सर्कलवर सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची जाम कोंडी होते आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्यासह वाहतूक पोलिसांचे पथक सतत प्रयत्नशील आहे. मात्र, सायंकाळच्या वेळीच वाहने मोठ्या संख्येने असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. मुंबई नाका ते संदीप हॉटेलमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. तर भाभानगर रस्त्यावर आणि इंदिरानगर रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरही वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत सापडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.