Category: मुंबई

Mumbai news

माहीममधील मराठी नागरिकांच्या सुरक्षित व सन्माननीय घरासाठी प्रसाद लाड यांची सभागृहात ठाम मागणी

माहीममधील मराठी नागरिकांच्या सुरक्षित व सन्माननीय घरासाठी प्रसाद लाड यांची सभागृहात ठाम मागणी मुंबई,  फेब्रुवारी : मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या माहीम येथील मच्छीमार कॉलनी, पोलीस वसाहत, म्हाडा ट्रान्झिट कॅम्प, एसबीआय, ओएनजीसी व इतर स्वायत्त वसाहती मिळून सुमारे ३४ एकर परिसरातील एकूण ४५ इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासाचा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे ठामपणे उपस्थित केला. मच्छीमार समाज, पोलीस कर्मचारी, रिपेअर बोर्डाच्या इमारतींमध्ये राहणारे सर्वसामान्य मराठी कुटुंब, अशा सुमारे ३४०० कुटुंबांचे जीवन आज जीर्ण, धोकादायक आणि मूलभूत सोयीसुविधांअभावी अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू आहे. गळकी छते, पडझडीचा धोका, लिफ्ट नसलेल्या चार-पाच मजली इमारती, पावसाळ्यात होणारी गळती अशा अवस्थेत मुंबईचा कष्टकरी मराठी नागरिक राहत असल्याची गंभीर बाब आमदार लाड यांनी सभागृहासमोर मांडली. सन २००३ मध्ये या प्रकल्पाला लेटर ऑफ इंटेंट देण्यात आले; मात्र २०२५ साल उजाडूनही पुनर्विकास पूर्ण झालेला नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. स्थानिक सहकारी गृहनिर्माण संस्थांनी देखील विकासकावरील परवानग्या रद्द करून शासनामार्फत क्लस्टर धोरणांतर्गत पुनर्विकास करावा, अशी लेखी मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या माहीम नाक्यालगत, एका बाजूला बीकेसी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असलेल्या या परिसराचा नियोजनबद्ध क्लस्टर विकास झाला तर मच्छीमार, पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य मराठी कुटुंबांना सुमारे ५५० चौरस फुटांचे सुसज्ज, सुरक्षित आणि मालकी हक्काचे घर मिळू शकते, असा ठाम विश्वास आमदार लाड यांनी व्यक्त केला. या लक्षवेधीला उत्तर देताना प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, संबंधित विकासकास विलंबाबाबत नोटीस देण्यात आली असून, म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी बैठक घेऊन सहा महिन्यांत ठोस प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लस्टर धोरणांतर्गत या योजनेचा सकारात्मक विचार करून एमएमआरडीए/एमएसआरडीसी व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने (Joint Venture) प्रकल्प गतीने मार्गी लावण्याची कार्यवाही केली जाईल. अधिवेशनानंतर प्राथमिक बैठक घेऊन अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे. मुंबईच्या मातीशी नाळ जोडलेल्या माहीममधील मराठी नागरिकांना सुरक्षित, प्रशस्त आणि सन्माननीय जीवनमान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांची ही लढाई पुढेही सुरूच राहील. मुंबईच्या विकासात मुंबईकर मराठी माणूस केंद्रस्थानी असलाच पाहिजे, हीच या लक्षवेधीमागील भूमिका आहे.

 भाजपा बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार :-सुरेशचंद्र राजहंस

भाजपा बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार :-सुरेशचंद्र राजहंस मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मागील १२ वर्षांत काहीही विधायक कार्य केले नसून काँग्रेस सरकारने ७० वर्षात उभी केलेली देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकणाऱ्या भाजपाची वक्रदृष्टी आता मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवींवर पडली असून ३६ हजार ६२३ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. हा पैसा मुंबईकरांचा असून त्यावर भाजपा दरोडा टाकत आहे असा आरोप मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे. भाजपा सरकारने देशातील विमानतळ, बँका, विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग एक-एक करून विकण्याचा सपाटाच लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे, आता त्यांची नजर मुंबई महानगरपालिकेत असलेल्या ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील काही वर्षापूर्वी मुंबई दौऱ्यावरील भाषणात त्यांनी ‘पैसा बँकेत पडून’ असल्यावर भाष्य केले होते तेंव्हाच ह्या मुदत ठेवी भाजपा सरकार मोडीत काढणार अशा शंका उपस्थित झाली होती व तसेच झाले असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

  पावसाळ्यापूर्वी नालेसफाई वेळेत करा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई वेळेत करा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरसेवक सरसावले मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी भांडुप मधील नालेसफाई युध्दपातळीवर करावी. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी तुंबणे, रस्ते जलमय होणे, त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी यंदा वेळेत आणि शास्त्रीय पध्दतीने नालेसाफाई करण्यात यावी, अशा सुचना भांडुप प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी पालिका अधिका-यांना दिल्या आहेत. सकाळी त्यांनी एस विभागाच्या अधिका-यांना सोबत घेऊन भांडुप मधील नाल्याची पाहणी केली. नगरसेविका राजोल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यांमधील गाळ, बांधकामातील कचरा आणि सांडपाण्यामुळे येणारा इतर कचरा काढण्यासाठी यांत्रिक साधनांचा वापर करावा. मुख्य नाल्यांसोबतच गल्लीबोळात असलेल्या अंतर्गत लहान नाल्यांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम पुर्ण झाल्यानंतर काढलेला गाळ योग्य ठिकाणी टाकण्यात यावा, रस्त्यांवर कचरा साठू नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घरगुती कचरा नाल्यात न टाकता तो कचराकुंडीत टाकावा, तसेच पावसाळ्यापूर्वी या परिसरातील नाल्याची योग्य प्रकारे नागरिकांच्या देखरेखीखाली साफसफाई करण्यात यावी. अशा सुचना राजोल पाटील यांनी पालिका अधिका-यांना दिल्या आहेत. यासाठी भांडुप मधील नाल्यांची पाहणी करण्यासाठी राजोल पाटील यांनी पालिका अधिका-यांना बरोबर घेऊन पाहणी दौरा केला. स्थानिक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मते नाल्यांची सफाई कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात झाली पाहिजे. त्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या कमी होईल. गेले अनेक वर्षे नगरसेवक नसल्याने पालिकेचे अधिकारी मनमानी कारभार करीत होते. तक्रारी करुनही त्यावर कार्यवाही होत नव्हती. मात्र आता पालिकेत नगरसेवक निवडून दिल्याने त्यांनी आता लक्ष दिल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरवर्षी नाले सफाईचे कामे पूर्ण होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नाले भरतात व त्याचे पाणी जवळपासच्या घरात तसेच रस्त्यांवर जाते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. त्यांना राहते घर सोडून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो. नाल्यातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने हे पाणी रस्त्यांवर जमा होते. परिणामी वाहतुक कोंडी झाल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना, पादचा-यांना होतो. भरलेल्या पाण्यामुळे भांडुप येथे एका पादचा-याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना देखील घडलेली आहे. असा प्रकार होऊ नये म्हणून भांडुप पश्चिम प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी पालिकेच्या एस विभागातील अधिका-यांना सोबत घेऊन सर्व नाल्यांची पाहणी केली. अरुंद नाले, कचरा, मातीचा गाळ असल्याने अनेक नाले तुंबलेले आहेत. या सर्व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात यावी, त्यातील गाळ, कचरा काढून टाकण्यात यावा, जेणे करुन स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. याबाबत योग्य त्या सुचना पालिका अधिका-यांना नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केल्या.

भाजपा प्रदेश पदाधिकारी जाहीर

भाजपा प्रदेश पदाधिकारी जाहीर नवनाथ बन मुख्य प्रवक्ते मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. तरुण तडफदार आणि नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात…

लढा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी…

लढा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी… हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला भाव, दुष्काळग्रस्तभागात निधी वाटप आदी मागण्या करत महाविकास आघाडीने आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुपारी, संत्र्यांची प्रतिकात्मक माळ गळ्यात घालून…

लबाड सरकार ढोंग करतय- भास्कर जाधव

लबाड सरकार ढोंग करतय- भास्कर जाधव मुंबई : सराकर लबाड असून ते नुसतेच ढोंग करतेय. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारकडे तरुणांसाठी, आत्महत्या…

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला ( राजेंद्र साळसकर ) मुंबई -अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी रेल्वे बोर्डात…

  फलाटांची उंची कधी वाढणार?

फलाटांची उंची कधी वाढणार? मुंबई ते कसारा मार्गावर वाढत्या अपघातानंतरही रेल्वे प्रशासन ढीम्म अविनाश उबाळे मुंबई : लोहमार्गावरील मध्य रेल्वेच्या मुंबई ते कसारा मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकावरील फलाटाची उंची कमी असल्याने…

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मुंबई : चौथ्या आरंभ स्पोर्ट्स तर्फे  आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पार्थ धारोड, सनया पवार या समता क्रीडा भवनच्या दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे पुरुष, महिला गटात सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद विद्यामंदिर, दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले, तर महिला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद समता क्रीडा भवन यांनी पटकावले. ही स्पर्धा मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराच्या उत्कृष्टतेचा व शिस्तीचा गौरव करणारी ठरली.

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धा मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्र वर तर सेंट्रल बँकेने यजमान ओरिएंटल इन्श्युरन्स संघावर विजय मिळवला. डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्राचा ९ विकेट्स शिल्लक राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना बँक ऑफ महाराष्ट्राला ९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहिदास कोयंडे आणि कल्पेश सावंत यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. कल्पेश सावंतने १४ धावांत ४ तर रोहिदास कोयंडेने १३ धावांत ३ बळी मिळवले. त्यानंतर डाटामॅटिक्स संघाने ९.३ षटकांतच ९२ धावांचे आव्हान पार केले. भुवन पाटील याने ३० चेंडूंत केलेली ५० धावांची तर उपेंद्र यादवने २५ चेंडूंत केलेली ३६ धावांची खेळी डाटामॅटिक्सच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. एलिट गटाच्या दुसऱ्या सामन्यात सेंट्रल बँकेने ओरिएंटल इन्श्युरन्सवर २५ धावांनी विजय मिळवला. सेंट्रल बँकेने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा उभारल्या. प्रथम परमार याने तडाखेबंद ५८ धावांची खेळी साकारली. त्याला उत्तम साथ देताना गौतम साठेने २३ चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. हे उद्दिष्ट गाठताना ओरिएंटल इन्श्युरन्सच्या फलंदाजांनी ६० धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही, परिणामी धावांची गती कमी झाल्याने त्यांना विजयासाठी २५ धावा कमी पडल्या. ओरिएंटलचा डावखुरा फलंदाज समीप मिसाळ याने ३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा तर शंतनु तांडाले याने ४० धावा करत चांगला प्रतिकार केला. मात्र विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजेश बोरकर याने दोन बळी मिळवत सेंट्रल बँकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने ६ मार्च रोजी खेळवण्यात येतील.