Category: मुंबई

Mumbai news

तरीही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतात

मुंबई : मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाला कोणत्याही सरकारी संस्थेचा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए चाही पाठिंबा मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. स्वयंसेवी संस्था व देणगीदारांकडून मिळालेल्या निधीवर आम्ही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतो. दिव्यांग खेळाडू बाबत सरकारला ही लाजिरवाणी बाब आहे. अशी खंत व्हीलचेअर मुंबई क्रिकेट टीम चे कर्णधार राहुल रामूगडे यांनी व्यक्त केली. व्हीलचेअर क्रिकेट इंडिया आणि डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ मुंबई मलबार हिल यांच्या सहकार्याने घाटकोपर मध्ये २६ ऑक्टोबर रोजी टी १० व्हीलचेअर क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले. यात हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खेळाडूंना नवीन व्हीलचेअर भेट दिली. मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा हा सामना होता. या  सामन्यात मुंबईच्या टीम ने उत्कृष्ट खेळ खेळत बाजी मारली. क्रिकेट हा खेळ जगभरात प्रसिद्ध असून व्हील चेअर क्रिकेट टीम ला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. आमच्या मुंबई संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाकडूनही खेळले आहेत. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई, झोनल गव्हर्नर ए. व्ही. सुरेश आर्या, अखिलेश विश्वकर्मा, अभय प्रताप सिंह, कला श्रीधर, आदर्श गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.

कसली ही लोकशाही – कवी लेखकांचा सवाल

रमेश औताडे मुंबई : आदिवासी समाजातील सरपंच असलेल्या महिलेला जाहीर कार्यक्रमात स्टेजवर संधी दिली नाही. मात्र मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला खुलेआम व्यासपीठावर प्रवेश देण्यात येतो. कसली ही लोकशाही ? असा सवाल समाजसेवक कवी लेखक अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यात कनेरसर गावी भेट दिली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या जवाहर विठ्ठल दौंडकर खुलेआम व्यासपीठावर कसे काय फिरत होते ? असा सवाल अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ज्याच्या नावावर खटले दाखल आहेत, त्यांना वगळून इतरांना कार्यक्रमाचे पास देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, गुन्हे दाखल असलेल्या दौंडकर यांना प्रशासनाकडून पास देण्यात आले. सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी कनेरसर येथे येण्याअगोदर न्यायदेवतेची पट्टी काढून हातात संविधान ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्याच कार्यक्रमात गुन्हेगार खुलेआम फिरत होते.  त्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष, खेडचे दिवाणी न्यायाधीश न्या. पवार, सदस्य, खेडचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अशोक टाव्हरे यांनी केली आहे. 0000

कोपरी विभाग_🚩🚩शिवसेना 🚩🚩साईनाथ नगर शाखा_महिला शाखाप्रमुख पदी नेहा मानकामे यांची  नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र  शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे  ठाणे पुर्व मा नगरसेविका नम्रता पमनानी मालती पाटील व शर्मिला पिपलोकर  गायकवाड ‌तसेच कोपरी महिला विभाग प्रमुख सौ मनिषा ताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. ०००

वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ

  विरार : विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली असतानाही महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नव्हता. यामध्ये वसई आणि नालासोपारा मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर विजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने वसईमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नालासोपारा मतदारसंघातून महाविकास आघाडी कुणाला तिकीट देणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाने पालघर आणि बोईसर मतदारसंघामधून उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत मिळत होते. त्यानुसार काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विजय पाटील यांना स्थान देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच वसईत हितेंद्र ठाकूर विरुद्ध विजय पाटील, असा सामना रंगणार आहे. मागील वेळी हितेंद्र ठाकूर हे २६ हजार मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी शिवसेना महायुतीकडून उमेदवार राहिले होते. या वेळी पक्षबदल करत काँग्रेसमध्ये गेले आहेत. महायुतीमधून अद्याप उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे नालासोपाऱ्यामधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने ठाकरे गट की काँग्रेस ही जागा लढवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  

उल्हासनगरात मनसेकडून भालेराव रिंगणात

  उल्हासनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भगवान भालेराव यांची उल्हासनगर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. गेल्या वेळी भालेराव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढून तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतली होती. उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले भगवान भालेराव यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. मात्र शेवटच्या क्षणी ओमी कलानी यांची शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर, भालेराव यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यासह राज ठाकरे यांची रविवारी भेट घेऊन समर्थकासह मनसेत प्रवेश केला. ठाकरे यांनी भालेराव यांची उल्हासनगरसाठी उमेदवारी घोषित केली. भालेराव महापालिकेचे उपमहापौर राहिले असून आंबेडकरी जनतेत त्यांचे वजन आहे. २०१९ साली त्यांनी अपक्ष म्हणून उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाचे ८ हजार पेक्षा जास्त मते मिळविली होती. भालेराव यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी पराभूत झाल्याचे बोलले जाते. मनसेने भालेराव यांची उमेदवारी घोषित केल्याने, उल्हासनगर मतदारसंघात कलानी, आयलानी व भालेराव अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर विकास कागदावर असल्याने, नागरिकांना आयलानी-कलानी ऐवजी तिसरा पर्याय हवा आहे. त्यामुळे नागरिक माझा विचार निश्चित करतील. असा विश्वास भालेराव यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी,

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची तिसरी यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या ९ जणांच्या यादीमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून त्यांना अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्यात आलं आहे. अभिनेत्रीचे पती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वरा भास्करचे पती फहाद अहमद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र आता त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना अणुशक्तीनगरसाठी तिकीट देण्यात आलं आहे. कोण आहे फहाद अहमद? अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते तेथे युवा आघाडीचे अध्यक्ष होते. त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेकदा आंदोलनं केली होती. दरम्यान, मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा ही नवाब मलिक यांचा बालेकिल्ला मानला जातो. या जागेवर आता नवाब मलिक आमदार आहेत. नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगसारखे आरोप आहेत. याप्रकरणात त्यांना अटक झाली होती. ते जेलमध्ये होते. त्यामुळेच त्यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली नसल्याचं बोललं जातं. मात्र २०२४ च्या विधानसभेसाठी आता यांच्या मुलीला सना मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात सना मलिक यांची चांगली पकड आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडून फहाद अहमद आणि अजित पवारांच्या गटाकडून सना मलिक यांना अणुशक्तीनगरची जागा दिल्यानंतर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये दिवाळी पहाट

 अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रे खास आकर्षण कल्याण : कपिल पाटील फाउंडेशनतर्फे यंदाही कल्याणमधील साई चौकात २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी-हिंदी गीतांबरोबर हास्य कलाकार आणि भारतातील प्रसिद्ध बंजारा ग्रुपचे बेली नृत्य पाहण्याची पर्वणी कल्याणमधील हजारो रसिकांना मिळणार आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी कल्याण पश्चिममधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही, कल्याणमधील रसिकांसाठी कपिल पाटील फाउंडेशनने शनिवारी दिवाळी पहाट कार्यक्रम भरविला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो कल्याणकरांना अविस्मरणीय मैफल अनुभवता येईल. या कार्यक्रमात इंडियन आयडॉल विजेता व बिग बॉस फेम गायक अभिजीत सावंत, गायिका प्राजक्ता शुक्रे, भूमी त्रिवेदी, जुईली जोगळेकर यांच्याकडून बहारदार गीते सादर होतील. तर प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचा गडगडाट होईल. त्याचबरोबर प्रसिद्ध `बंजारा स्कूल ऑफ डान्स’च्या कलाकारांनी बॅलेसह सादर केलेल्या दिलखेचक अदा आणि मनमोहक नृत्य पाहता येईल.सर्व कल्याणकरांनी २ नोव्हेंबर रोजी साई चौकात दिवाळी पहाटमध्ये सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

एक हजार पोस्टकार्डांवर भारती विद्यापीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान वाढीसाठी विधानसभा निवडणूक कार्यालय व महानगरपालिका यांच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असाच एक अभिनव उपक्रम भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबविला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना एक हजाराहून अधिक पत्रांतून मतदान करण्याविषयी आवाहन केले. हा अनोख्या पध्दतीने व्यापक स्वरूपात राबवण्यात आलेला मतदान जनजागृतीचा उपक्रम शाळेतील कलाशिक्षक श्री. नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.  या विद्यार्थ्यांनी पत्रांतून आपल्या आई-वडिलांना व नातेवाईकांना – बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून माझ्या व भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपण जरूर मतदान करावे आणि भारताची लोकशाही बळकट करावी ही विनंती, माझेही वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मीही मतदान करेन असे लिहिले आहे. तसेच मतदानादिवशी लागणारी ओळखपत्रे म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, भारतीय पासपोर्ट, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत जरूर असावे असाही संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व नातेवाईकांना पत्राद्वारे दिलेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मतदार आणि लोकशाही यावर  विधानसभा मतदानासंदर्भात लग्नपत्रिका तयार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती केली आहे. याप्रसंगी उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. श्रीकांत तोडकर, सहायक आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छ्ता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे तसेच  प्राचार्य श्री. बेल्लम आर टी व इतर शिक्षक उपस्थित होते.

कल्याणमध्ये निवडणूक भरारी पथकाकडून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त

  कल्याण : येथील पूर्व भागातील चक्कीनाका भागात विधानसभा निवडणूक भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी एक लाख १० हजार रूपयांची विदेशी दारू एका वाहनातून जप्त केली. या दारू खरेदी, विक्रीच्या पावत्या आणि याविषयी सविस्तर माहिती वाहनातील इसम देऊ शकला नाही. त्यामुळे भरारी पथकाने हे वाहन अधिकच्या चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. निवडणूक विभागाचे भरारी पथक कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शनिवारी संध्याकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. यावेळी या चौकातून एक मोटार वेगाने जात होती. पथकाने ही मोटार अडवली. या मोटारीत बडवायझर कंपनीच्या ३८ इंचाच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. वाहनातील इसमाकडे पथकाने या विदेशी दारू खरेदी आणि विक्रीच्या पावत्या मागितल्या. त्याची माहिती वाहन चालकासह त्याचा साथीदार देऊ शकला नाही. निवडणूक कामात या विदेशी दारूचा गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने पथकाने ही माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. डी. आव्हाड यांना दिली. हवालदार वाय. के. गायकवाड, पंच सुनील कशिवले, रोहिदास डोक यांच्या उपस्थितीत या विदेशी दारूसह वाहनाचा पंचनामा करण्यात आला. ही वाहने उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात निवडणूक भरारी पथकाने अधिकच्या चौकशीसाठी दिली.ही विदेशी दारू मोटारीतून वहनाचे काम डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील संतोष किट्टना शेट्टी (४०) हे करत होते.

शेअर बाजार कोसळला १० लाख कोटीचा फटका

मुंबई : एन निवडणूकीच्या धामधुमीत शेअअर मार्केट पत्याच्या बंगल्यासारका कोसळला. शुक्रवारी सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली.  सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार कमी तोट्यात होता, पण हळूहळू तीव्र घसरण होत गेली. काही वेळातच गुंतवणूकदारांचे…