Category: मुंबई

Mumbai news

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची ऐरोली विधानसभा निवडणूक कार्यालयास भेट

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 150 ऐरोली व 151 बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला…

 रिझवान -मधुराला प्रथम मानांकन

 रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व रोटरी भवन, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबई उपनगरच्या रिझवान शेख तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या मधुरा देवळेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २६ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता करण्यात येईल. यानंतर पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल. तर महिला एकेरी गटाचे सामने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळविण्यात येतील. महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामान्यांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय विजेत्या खेळाडूंना रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) रिझवान शेख (मुंबई उपनगर ), २) योगेश परदेशी ( पुणे ), ३) विकास धारिया ( मुंबई ), ४) सागर वाघमारे (पुणे), ५) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ६) संजय मांडे (मुंबई), ७) पंकज पवार ( ठाणे), ८) महम्मद घुफ्रान ( मुंबई ) महिला एकेरी : १) मधुरा देवळे ( ठाणे ) २) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) ३) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग ), ४) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ६ ) उर्मिला शेंडगे ( मुंबई ), ७) अनिता कनोजिया ( रायगड ), ८) संगीता चांदोरकर (मुंबई ) ००००

शाश्वत कोकण परिषदेच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची दखल घेणार – उद्धव ठाकरे

अनिल ठाणेकर मुंबई : शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा करण्यामागची कारणे,  प्रक्रिया  व जाहिरनाम्यातील मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली. उध्दव ठाकरे यांनी, शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा लक्षपूर्वक पाहिला आणि या जाहीरनाम्याचे सादरीकरण व डिझाईनचे कौतुक केले. तसेच त्यात घेतलेल्या कोकणातील मुद्द्यांची दखल घेतली जाईल असे सांगून जाहिरनाम्याच्या आणखीन प्रती देण्याचे आवाहन केले .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने मंगळवारी भेट घेतली आणि त्यांना शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा सुपूर्द करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धोरणे ठरवताना शाश्वत कोकण परिषदेचा जाहिरनाम्यातील मुद्द्यांचा उद्धव ठाकरे हे नक्कीच विचार करतील असा आशावाद शाश्वत कोकण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर, सचिव व माजी खासदार विनायक राऊत, राजापूर लांजा विधानसभेचे आमदार राजन साळवी, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भुवड, बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, आदेश भोवड, सूर्यकांत सोडये, विनायक शिंदे, संतोष तिरलोटकर, स्वप्नील सोगम, गोपीनाथ घाडी, तुळशीदास नवाळे, महेंद्र गुरव, अमित नेवरेकर, शाश्वत कोकण परिषदेचे सत्यजीत चव्हाण, नाणारचे माजी सरपंच ओमकार देसाई, पाळेकर वाडी (नाणार) चे प्रमुख सत्यवान पाळेकर व धनाजी वालम आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट कोकणातील जनतेच्या, मुंबई, वसई, सावंतवाडी, चिपळूण, चिंचणी (पालघर) व पेण येथील झालेल्या परिषदांच्या विचारमंथनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग व संस्कृती यांच्या शाश्वत अस्तित्त्वासाठी कोणती धोरणे अंमलात आणावी, कोणते प्रकल्प हवेत – नकोत याची स्पष्ट दिशा दर्शविणारा कोकण परिषदेचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात प्रस्तावित न करणे , ग्रीनफिल्ड व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे, सिडको व एम एस आर डी सी यांना कोकण किनारपट्टी भागातून नियोजनाचा अधिकार देणारे अध्यादेश रद्द करणे, जंगलतोड बंदी, दोडामार्ग तालुक्याचे संरक्षण, जांभ्याच्या सड्यावरील जैव विविधतेचे संरक्षण, अवैध एल इ डी , परसिनेट मासेमारीवर कृती अशा मागण्यांना धोरणात्मक निर्णयात सामील करण्याचे म्हंटले आहे.प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय , विद्यापीठ , अंगणवाडी -आशा वर्कर्स  यांना वाढीव अनुदान, कातळशिल्प संरक्षण , बोली भाषेचे जतन, स्वयंरोजगारावर भर, कृषी प्रक्रिया केंद्रे, कोकण रेल्वेचे थांबे वाढवणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात कोकणी जनतेने अजून भर घालावी अशी अपेक्षा आहेच तरीही हा जाहीरनामा राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि कोकणातील  सर्वच जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे. शाश्वत कोकण  परिषदचे समन्वयक सत्यजीत चव्हाण व शशी सोनावणे यांचेद्वारा प्रस्तुतचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.

उमेदवार, पक्षीय कार्यालयांसमोरील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडीत

कल्याण : कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपली जनसंपर्क, निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय कार्यालये हीच निवडणूक कार्यालये करण्यात आली आहेत. या कार्यालयांच्या बाहेर दररोज सकाळ, संध्याकाळ पक्षीय नेते, पदाधिकारी सार्वजनिक रस्त्यावरील वाहनांचा विचार न करता कार्यालयासमोरील रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी करत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. निवडणूक कार्यालयात आलेल्या नेते, पदाधिकाऱ्याला वाहन बाजुला करून घ्या, असे सांगण्यास जाणाऱ्या वाहतूक पोलिसाला उलटसुलट उत्तरे मिळण्याची शक्यता असल्याने ते आव्हान न स्वीकारता वाहतूक पोलीस, सेवक आहे त्या परिस्थितीत पक्षीय कार्यालयांसमोरील कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी एका पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होती. यावेळी बहुतांशी पदाधिकाऱ्यांची वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या वाहनांमुळे बस, ट्रक अशी वाहने त्या भागातून पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे अर्धा ते एक तास वाहने मानपाडा रस्ता, इंदिरा चौक, फडके रस्ता, रामनगर, टिळक रस्ता, केळकर रस्ता भागात अडकून पडली होती. नोकरदारांची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि त्याच वेळेत ही कोंडी झाल्याने प्रवासी रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वरिष्ठ पक्षीय नेत्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने पक्षीय कार्यालयापासून दूर अंतरावर किंवा पालिकेच्या, खासगी वाहनतळावर वाहने उभी करून मगच पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अशीच परिस्थिती कल्याणमधील विविध भागात आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील कोंडी झाल्याने ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस, सेवकांची दमछाक झाली होती. पक्षीय नेत्यांना वाहने थोडी बाजुला उभी करा, असे सांगणार कोण, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. दिवाळी सणामुळे बाजारपेठा गजबजून जातील. खरेदीसाठी नागरिक अधिक संख्येने बाहेर पडतील. त्याचवेळी निवडणूक बैठकांसाठी नेते, पदाधिकारी आपल्या पक्षीय कार्यालयांमध्ये हजेरी लावणार आहेत. या नेत्यांनी आपली वाहने नागरिकांना त्रास होणार नाहीत अशा पध्दतीने उभी करण्याची नागरिकांची मागणी आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, गुरुदेव हाॅटेल चौक भागातील कोंडीने नागरिक हैराण आहेत. 00000  

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे गुरुवारी कल्याण, डोंबिवलीत

कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटातील एका प्रभावी गटाने महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांचे काम करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत महायुतीत बंडाचे वारे वाहत असतानाच, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये येत असल्याने शिवसेनेतील बंडाच्या तयारीत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना हा सूचक इशारा मानला जात आहे. कल्याण पूर्वेत आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांचेच काम करायचे आहे. कोणीही अपक्ष निवडणूक लढवू नये किंवा बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, अशी तंबी शिवसेनेच्या वरिष्ठांनी स्थानिकांना दिल्याचे समजते. या तंबीनंतर बंडाच्या पवित्र्यातील काही जण शांत तर काही जण अद्याप अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत आहेत. सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याची भूमिका शिवसेनेतील कल्याण पूर्वेतील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांना सुलभा गायकवाड याच महायुतीच्या उमेदवार असतील आणि मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतील, असा सूचक इशारा देण्याच्या व्यूहनितीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पूर्वेत येण्याचा निर्णय घेतला आहे. सुलभा गायकवाड गुरुवारी महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, इतर घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महायुतीचा जनसागर गुरूवारी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना लोटलेला असेल. तुल्यबळ असा उमेदवार समोर नसल्याने त्यांचा विजय नक्की होईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. पती आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात केलेली विकास कामे. आपण येत्या काळात करणारी विकास कामे हा अजेंडा लोकांसमोर ठेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी सांगितले. राज ठाकरे डोंबिवलीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान डोंबिवलीत येणार आहेत. मानपाडा चौक येथून उमेदवार राजू पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीला सुरूवात होईल. ही मिरवणुक वाजत गाजत डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे जाणार आहे. राज ठाकरे यांनी स्वताहून आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील राष्ट्रीय मराठा पार्टीत

रमेश औताडे मुंबई :मराठा आरक्षण या प्रश्नावर आझाद मैदान दणाणून सोडणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मराठा पार्टीत प्रवेश केला. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा गाठत, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी व आबा पाटील यांनी केलेला हा महत्वाचा मानला जात असल्याचे पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी यावेळी सांगितले. या निर्णयानंतर मराठा समाजाच्या असंतोषाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मराठा समाजातील विविध संघटना,  मराठा क्रांती ठोक मोर्चा व इतर संघटनांनी आरक्षणाची ही चळवळ लाखो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर लढली. मात्र आरक्षण प्रश्न म्हणावा तसा नाही. म्हणून आता समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी पाटील यांच्या प्रवेशाने एक नवी दिशा मिळणार आहे. पार्टी राज्यभारत शंभर ते सव्वाशे उमेदवार उभे करणार आहे.  शेतकरी , शिक्षणात समान संधी, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे  जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे असतील. मराठा समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

 ओवाळणीत एक रुपयाही नको, आमदारकी पाहिजे!

 शर्मिला ठाकरेंची मनसे उमेदवारांकडे मागणी   मुंबई: शिवतीतर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या अभिनंदनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या वेळी मनसेच्या इतर उमेदवारांचे देखील औक्षण करण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खास भूमिका बजावली. त्या औक्षणाच्या वेळी बोलताना म्हणाल्या, “ओवाळणीत एक रुपयाही नको, आता आमदारकी पाहिजे!” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माहीम विधानसभेत थेट मुकाबला- माहीम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये थेट मुकाबला होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या मतदारसंघात तणाव वाढला आहे. अमित ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबीयांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे, तर सदा सरवणकर यांच्याकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचा आधार आहे. मनसेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध विधानसभांमध्ये मनसेकडून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. माहीम, वरळी आणि अन्य मतदारसंघांमध्ये मनसेने थेट लढत देण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 000

मिहीर कोटेचा मुलुंड विधानसभेसाठी आज उमेदवारी दाखल करणार

मुंबई : मुलुंडचे आमदार आणि भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे उद्या, गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी मुलुंड विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जंगी…

कॉंग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हाती ‘घड्याळ’…

मुंबई : अमरावती शहरातील कॉँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.…

ऑलेक्ट्राचा सहामाही आर्थिक अहवाल सकारात्मक

मुंबई : प्रवाशांना प्रदुषण विरहीत गारेगार प्रवासाची संधी एसटी आणि बेस्टच्या इलेक्ट्रिक बस देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान या पुरवठ्यात वाढही झाल्याचे नुकतेच महामंडळाने सांगीतले. एसटी आणि बेस्टला इलेक्ट्रिक बस पुरवण्यता आघाडीवर असणारी  इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने  दुसऱ्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीचा  एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केला. संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत या उल्लेखनीय बाबींना अधिकृतपणे मान्यता दिली.  या  तिमाहीत, ऑलेक्ट्रा ने 315 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, 23-24 या आर्थिक वर्षातील 154 च्या तुलनेत यात  105 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीकडे एकूण 10,503  बस ऑर्डर्स आता पर्यत नोंदवण्यात आल्या आहेत. 0000