Category: मुंबई

Mumbai news

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

मुंबई : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये  महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये  १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. स्वीप अभियान महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्‍वीप” (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे. एकूण मतदार २०१९ मध्ये  सेवा मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

शिंदेंचे ७ खासदार ठाकरेंच्या संपर्कात ?

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा दावा मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना खासदारांचा पत्ता कट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली असून शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहेत…

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई – राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : अशोक गायकवाड मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९९१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी ५० हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील ५ प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने पंडिता आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गायन कार्यक्रम रविवार ७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात आयोजित कऱण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आयोजित केला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर यती भागवत तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०. आपल्या सुरेल, मोकळ्या, घुमारेदार, ढंगदार आवाजाची जादू मैफलीत पसरविणाऱ्या पंडिता आरती अंकलीकर स्वरांचे सूक्ष्म दर्जेही ताकदीने ऐकवितात. बंदिशीची मांडणी त्या रेखीव आणि डौलदार करतात. या गायकीतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहे. स्वरात रमण्यापेक्षा तालक्रीडा, लयकारी, लयीच्या अंगाने रचना यांवर त्या भर देतात. अत्यंत प्रभावी, जोरकस, गणिती, अचूक, तयारीची लयकारी या गायकीत आहे. अत्यंत चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती या गाण्यात आहे. चपळ आणि सुरेल तान आहे. बंदिशींचे वैविध्य हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वाग्गेयकारांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवर्जून सादर करतात व त्यामुळे त्यांची गायकी समृद्ध झाली आहे. या गायनातून प्रखर आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, आक्रमकता प्रतीत होते. ख्यालाइतकीच ठुमरीही रंगविणाऱ्या काही गायिकांपैकी आरती अंकलीकर एक आहेत. त्यांनी सर्व गानप्रकार गाऊन विपुल यश प्राप्त केले आहे. त्यांनी पं. वसंतराव कुलकर्णी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. उल्हास कशाळकर व पं. दिनकर कायकिणी यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन घेऊन आग्रा व जयपूर परंपरेची खासियत आत्मसात केली.

‘मातोश्री’ची सुपारी फडणवीसांनीच दिली !

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा मुंबई- मातोश्री आणि तत्कालीन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे भ्रष्ट्राचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्लीतून आले होते. स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच मला हे आदेश अमंलात आणण्याबाबत सांगतिले होते, अशा…

राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

रायगडच्या बबन, गणेशची निवड मुंबई : येत्या ८ ते १२ एप्रिल दरम्यान पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रायगडच्या बबन बाबू झोरे (वाघेश्वर- कर्जत, जे व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे (फिटनेस ऑन जिम, तक्का – पनवेल) यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत १५० पेक्षा जास्त पुरुष आणि १०० पेक्षा जास्त महिला खेळाडूंचा सहभाग अपेक्षीत आहे.   त्यांच्या निवडीबाबत बबन झोरे यांना जे व्ही आर फिटनेसचे संचालक विनोद येवले (कर्जत) आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार (फिटनेस ऑन जिम, संचालक, पनवेल) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बबन, गणेश यांना प्रशिक्षक विशाल मुळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्यावतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील असा विश्वास माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.

दिलीप करंगुटकर स्मृती शालेय कॅरम स्पर्धा

३८ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे क्रीडा सल्लागार स्व. दिलीप करंगुटकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ६ एप्रिलला भायखळा येथे होणाऱ्या विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत मुंबईसह विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख ३८ खेळाडूंमध्ये विजेतेपद पटकाविण्यासाठी चुरस होणार आहे. १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकेरी कॅरम स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना आकर्षक चषक-पदक व स्ट्रायकर देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाप्रेमी राजेश सुर्वे यांच्या तर बक्षीस समारंभ डॉ. विशाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे परिसर व अविनाश स्पोर्ट्स यांचे स्पर्धेला सहकार्य लाभले आहे. क्रीडा व सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक पटकाविण्यासाठी आर्यन स्कूल-पुणेचा आयुष गरुड, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, इझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा रुद्र भालेराव, एमपीएस-वरळीचा सिध्दांत मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-वरळीचा समीर खान, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्ना गोळे आदी उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. परिणामी कॅरम रसिकांना अटीतटीच्या लढती पाहण्यास मिळतील. पंचाचे कामकाज नामवंत राष्ट्रीय दर्जाचे पंच प्रणेश पवार तसेच क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत.

रविवारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा पुण्याला

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणुक ७ एप्रिल रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ७, एप्रिल रोजी ठीक १२:00 वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, सभागृह, बालेवाडी पुणे आयोजित केली आहे. या विशेष सर्वसाधारण सभेत चौवार्षिक (२०२४ ते २०२८) निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. या सभेला सर्वांनी वेळेवर उपस्तीत राहण्याचे आव्हान चंद्रजीत जाधव – सहसचिव, भारतीय खो खो महासंघ व गोविंद शर्मा – सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी केले आहे. या सभेला सुधांशु मित्तल (अध्यक्ष – भारतीय खो खो महासंघ) व एम. एस. त्यागी (महासचिव – भारतीय खो खो महासंघ) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उपकार सिंग (सहसचिव, भारतीय खो खो महासंघ) व अनिल झोडगे (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन) हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘कोणतेही काम करा, आधी आयोगाची परवानगी घ्या’

मनपाकडून २२८ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आयोगाकडे मुंबई : निवडणुकीच्या काळात लोकानुनय करणारी किंबहुना लोकांना खुश करून त्यांच्यावर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत यासाठीच कोणतीही कामे करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला नियोजित कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे सदर करावे लागले आहेत. खड्डे बुजवणे, नालेसफाई आदी कामांसाठीही आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. विविध कामांचे २२८ कोटी रुपयांचे प्रस्ताव पालिकेने मंजुरीसाठी आयोगाकडे धाडले आहेत. आपत्कालीन परिस्थिती किंवा पावसाळ्यापूर्वीची कामे निवडणूक काळात पूर्ण होणे अपेक्षित असतात. खड्डे बुजवण्याच्या कामासाठीही आयोगाची परवानगी का घ्यावी लागते, अशी विचारणा पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असता, कोणती कामे निवडणूक काळात करावीत, याचे स्पष्ट निर्देश आयोगाच्या आचारसंहितेत आहेत. आपत्कालीन काळातील कामाशिवाय अन्य कामे या काळात अपेक्षित नाहीत. त्यातही अत्यावश्यक कामे कोणती, ही कामे खरोखरच अत्यावश्यक आहेत का, याची छाननी आयोगाकडून केली जाते. त्यानंतरच परवानगी दिली जाते. त्यामुळे खड्डे भरणीच्या कामासाठीही परवानगी घ्यावी लागते. खड्डे भरण्याचे काम का करावे लागणार आहे, ते किती महत्त्वाचे आहे, हे पटवून द्यावे लागते. निवडणूक काळात लोकानुनय करणारी कामे काढून लोकांवर एका अर्थाने लोकांवर प्रभाव टाकणारी कामे काढली जाऊ नयेत, हे आचारसंहितेत अभिप्रेत आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. हिरवा कंदील मिळाल्यानंतरच निविदा १)  पालिकेने याआधी ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, ती कामे आयोगाच्या कचाट्यातून सुटली आहेत. मात्र, यापुढे जी कामे आवश्यक असतील त्या कामांसाठी आयोगाकडे जावेच लागणार आहे. २)आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्या कामांच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर कामांना सुरुवात होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत नालेसफाई, नाल्यांतील गाळ काढणे, त्याची विल्हेवाट लावणे, गाळ वाहून नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे या कामांना वेग येईल. ३)  पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची डागडुजीही पालिका हाती घेणार आहे. त्यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

 अंधेरीतील गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी जूनअखेर

 अंतिम अहवाल रविवारपर्यंत सादर होणार मुंबई :अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पूल येत्या जूनअखेर जोडला जाणार आहे. पुलासाठी व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट मागविण्यात आला असून, येत्या रविवारपर्यंत अंतिम तो सादर होणार आहे. व्हीजेटीआयच्या अहवालाप्रमाणेच  पूल जोडणीचे काम होणार असून,  सुरक्षिततेसाठी, मजबुतीकरणासाठी आणि कमी वेळात जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी आयआयटीकडून काही पर्याय सुचविण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच काम हाती घेऊन पुढील दोन-तीन महिन्यांत गोखले पुलाचा निर्णय मार्गी लागेल, असा विश्वास मुंबई पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत, बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहू पर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र, काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयचा सल्ला मागितला होता.  व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून, तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल. पुलाचे चार स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे.  दरम्यान, पालिकेला स्वतःचा आराखडा तयार करता आला तरी तज्ज्ञांचा आणखी एक सल्ला म्हणून आयआयटीच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन यात समाविष्ट केले जाणार आहे. पुलाच्या संपूर्ण जोडणीत आयआयटी व व्हीजेटीआयचे तज्ज्ञ पाहणीसाठी उपस्थित राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. नव्याने निविदा प्रक्रिया- १) गोखले व बर्फीवाला पुलाच्या जोडणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी पालिका नव्याने निविदा करणार असून, ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जरी या कामाला सुरुवात झाली तरी जून अखेर हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मुदत दिली जाईल. ज्यामुळे नागरिकांसाठी पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. दुसऱ्या गर्डरचे कामही सुरू राहणार- २) या सगळ्यामध्ये गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरसाठीचे साहित्य पोहोचत असल्याने तेही काम सुरू राहणार आहे. दुसऱ्या बाजूच्या गर्डरसाठी लागणाऱ्या ३२ स्पॅन पैकी जवळपास ५ स्पॅन मुंबईत पोहोचले आहेत. आता त्यांचे एकत्रीकरण करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.