Category: मुंबई

Mumbai news

धारावी सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी १५ टीम होणार तैनात

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डीआरपीपएलकडून गेल्या पंधरा दिवसांपासून घरोघर सर्वेक्षण सुरू आहे. मात्र सर्वेक्षणाचा वेग मंद असल्याने आतापर्यंत केवळ ६०० झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी पंधरा टीम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ सर्व्हेयर आणि ७ नायब तहसीलदार नव्याने घेतले जाणार आहेत. धारावीत एक लाखाहून अधिक झोपड्या असून त्यांचे नंबरिंग आणि सखोल माहिती पुढील सहा-आठ महिन्यात जमा करण्याचे उद्दिष्ट धारावी पुनर्विकास प्राधिकरण लिमिटेडने ठेवले आहे. त्यानुसार १८ मार्चपासून नंबरिंगचे काम माटुंगा येथील कमला रमण येथून सुरू झाली आहे. तसेच १ एप्रिल पासून घरोघर सर्व्हे सुरू झाले. सुरुवातीला पाच टीम होत्या, मात्र एका घराचा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी पाऊण तासाहून अधिक वेळ लागत आहे, तसेच सर्व्हे मशीनला रेंज नसल्याने ओटीपी मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सर्व्हेच्या टीम वाढवल्या आहेत. तरीही सर्व्हेला विलंब लागत असल्याने डीआरपीपीएलने आणखी पंधरा टीम वाढवल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून पंधरा सर्व्हेयर आणि सात नायब तहसिलदार देण्याबाबत मागणी केली असून लवकरच ते मिळतील अशी माहिती डीआरपीपीएलच्या अधिकाऱ्यांने दिली. एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी धरणार धारावीत घरोघर सर्व्हेचा वेग वाढवण्याच्या हलचली सुरू आहेत. त्यासाठी सर्व्हरच्या टीममध्ये भविष्यात वाढ करावी लागल्यास एका सर्व्हेयरकडे दोन टीमची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व्हेच्या कामाला वेग मिळू शकणार आहे. पावसाळ्यात सर्व्हे मंदावणार धारावीचा बहुतांश सखल भाग आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरते, झोपड्यांमध्ये पाणी जात असल्याने पावसाळ्यात सर्व्हेचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत जास्तीतजास्त झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

पोलिसांनी 50 नागरिकांना मोबाईल फोन केले परत 

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या नागरिकांच्या 50 मोबाईल फोनचा शोध घेऊन त्यापैकी 28 नागरिकांना परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते परत केले. यावेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची दखल घेऊन तांत्रिक तपास करुन भारतातील विविध राज्यातून एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यापैकी सोमवारी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते 28 नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. उर्वरीत मोबाईल फोनच्या तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

 रामनवमीला खबरदारी घ्या!

 उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांमुळे मुंबईत विशेषत: मालाड-मालवणी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले. रामनवमीनिमित्त मालवणी येथील मुस्लीमबहुल परिसरातून काढण्यात येणाऱ्या यात्रेदरम्यान हेतुत: मशिदीसमोर नमाज सुरू असताना मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवले जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. आम्ही कोणालाही सार्वजनिक यात्रा काढण्यापासून किंवा सभा घेण्यापासून रोखू शकत नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणीही नियमांचा भंग केल्यास पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, नियमांचा भंग होणार नाही, या आश्वासनाच्या आधारे आमदार टी. राजा. सिंह यांना मिरा-भाईंदर येथे सभा आयोजित करण्यास आपण परवानगी दिल्याचे न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले. रामनवमीला काढण्यात येणाऱ्या यात्रांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे का ते पाहा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर, रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांदरम्यान अनुचित घटना घडणार नाहीत याबाबत पोलीस अधिक सावध राहतील, असे आश्वासन महाधिवक्ता बिरेद्र सराफ यांनी खंडपीठाला दिले.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत गीता दुबे व एस.आर. दुबे,शॉप नं 8,9,10, भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई , हार्दिक सुनिल गोखरू व  प्रेमप्रकाश भवंरलाल शर्मा, शॉप नं 14,15,16, कासा ब्ल्यानका सो,भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केले होते. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1)अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने सदर बांधकामावर निस्कासनाची कारवाई करण्यात आली व त्यापोटी रु.10,000/- एवढी वसूली  करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त तसेच, 08 मजूर, 1 पिकअप व्हॅन, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, 01 गॅस कटर इत्यादी चा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईकरांची लालपरीला पसंती

मुंबई : उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. उन्हाळी सुटीच्या दिवसांत गावाकडे जाण्यासाठी बस स्टँडवरील प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने यंदाही जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार अतिरिक्त बसच्या संगणकीय आरक्षणाला सुरुवात झाली असून मुंबई विभागात दिवसाला सरासरी ४४ हजार प्रवाशांची नोंदणी होत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत हा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. त्यात १३ एप्रिल रोजी ४८ हजार, तर १४ एप्रिल रोजी ५० हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यात ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास, ६५ ते ७४ वय असणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाशांना ५० टक्के सवलत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलतीमुळे ही संख्या वाढल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची रॅलीव्दारे नवी मुंबईत मतदानाविषयी जनजागृती

नवी मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता 150 – ऐरोली विधानसभा मतदारसंघ कार्यालय व 151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालय यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालये यामध्येही मतदानविषयक जनजागृती करणारे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळा, महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात आहे. अनेक नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहचणारा रॅलीसारखा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात जात असून शाळांमार्फत आपापल्या शालेय परिसरात प्रभातफेरी काढली जात आहे. ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करुया हक्काचे मतदान’, ‘मी मतदान करणार – आपल्या देशाचे भविष्य घडवणार’ अशा स्वरुपाच्या घोषणा देत मतदान विषयक संदेश देणारे फलक उंचावत विद्यार्थी अत्यंत उत्साहाने रॅलीत सहभागी होत असून मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच मतदान करण्याविषयी आवाहन करीत आहेत. 150 व 151 या दोन्ही विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या 25 ठाणे लोकसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमात महापलिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शानानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांचा संपूर्ण सहभाग लाभला असून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत खाजगी शाळांनीही यामध्ये सहभागी होण्याकरिता कार्यवाही करण्यात आलेली आहे. खाजगी शाळा, महाविद्यालयांचाही यामध्ये उत्तम सहभाग लाभत आहे. 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत मतदानांची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वत्र व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली

एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेचे संचालन करणाऱ्या मुंबईमे ट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी दिवाळखोरीत निघण्यापासून बचावली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गिकेचे कर्ज फेडणार असल्याची हमी दिल्याने आता या मेट्रो मार्गिकेच्या थकित कर्जप्रकरणी बँकांनी सुरू केलेल्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने निकाली काढली आहे. त्यामुळे आता मेट्रो १ मार्गिका खरेदीचा एमएमआरडीएचा मार्ग माेकळा झाला आहे. मेट्रो १ मार्गिकेची खासगी-सार्वजनिक भागीदारी पद्धतीने बांधा-वापरा स्वामित्व घ्या आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारली होती. या मेट्रो मार्गिकेवरून जून २०१४ मध्ये प्रवाशांची वाहतूक सुरू झाली. मेट्रो १ प्रकल्पाच्या उभारणीसाठी २ हजार ३५६ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात रिलायन्स इन्फ्राची ७४ टक्के, तर एमएमआरडीएची २६ टक्के भागीदारी आहे. ही मेट्रो मार्गिका खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मंजुरी दिली; मात्र एमएमआरडीएने स्वतःच्या निधीतून ही मेट्रो मार्गिका खरेदी करावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून मेट्रो १ मार्गिका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बँकांनी या एकरकमी कर्ज फेडीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर एमएमओपीएलवरील दिवाळखोरीची प्रक्रिया टळली आहे. दरम्यान, याबाबत एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सहा बँकांचे १,७११ कोटी कर्ज १) एमएमओपीएलकडून संचालन केल्या जाणाऱ्या मेट्रो १ मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे १,७११ कोटी रुपयांचे कर्ज आहे. याबाबत एमएमओपीएल आणि बँका यांच्यामध्ये १५ मार्चला बैठक पार पडली होती. २) बैठकीत कर्जाची एकरकमी परतफेड करण्यावर तत्त्वतः सहमती झाली होती. त्यानंतर बँकांनी या एकरकमी कर्जफेडीला तत्त्वत: संमती असल्याचे १८ मार्चला पार पडलेल्या अन्य एका बैठकीत कळविले होते. ३) बैठकीतील निर्णयानुसार एमएमआरडीएने १० टक्के कर्जाची म्हणजेच सुमारे १७५ कोटी रुपयांची परतफेड बँकांना केली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांचा समावेश आहे.

मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका

मुंबई : मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. मुंबईतील क्षय रुग्णांच्या नमुन्यांच्या केलेल्या संपूर्ण जीनोम सिक्वेसिंगमधून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. यात ६०० पैकी ५१ टक्के नमुन्यांमध्ये एक्सडीआर टीबी असल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. हॅस्टॅक अॅनॅलिटिक्सने पालिकेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार टीबीसाठी देणाऱ्या चारपेक्षा जास्त औषधांचा टीबी रुग्णांवर परिणाम होत नसून हा एक्सडीआर टीबी तरुणांमध्ये सर्वाधिक पसरत आहे. कोविड काळात पालिकेने मुंबईसह इतर परिसरातील प्रामुख्याने ६०० एमडीआर टीबी रुग्णांचे नमुने गोळा केले होते. पालिकेने टीबीवरील उपचार देऊनही या रुग्णांवर औषधांचा परिणाम झाला नाही. दोनपेक्षा जास्त औषधे या रुग्णांवर वापरली; पण त्यांना फरक न पडल्याने हे रुग्ण एमडीआर म्हणजेच (मल्टी ड्रग रेसिस्टन्स) असल्याचे समजले. त्यामुळे प्राथमिक स्तरावर या रुग्णांचे नमुने पालिकेने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले. या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालानुसार, ६०० पैकी ५१ टक्के रुग्णांमध्ये प्री-एक्सडीआर (एक्सटेंसिव ड्रग रेजिस्टेंट) संसर्ग झाला होता. ज्या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांचा फारसा परिणाम होत नाही, असे रुग्ण एक्सडीआर टीबी या श्रेणीत मोडतात. सामान्यपणे, टीबी रुग्णांवर वेगवेगळ्या १८ औषधांपासून तयार केलेल्या औषधांचा वापर केला जातो. एमडीआर रुग्णांना दोन औषधांपासून तयार केलेले औषध दिले जाते; पण अनेकदा रुग्णांवर टीबीची काही औषधे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे डॉक्टर वेगवेगळे फॉर्म्युल्यातून रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधे देतात. त्यानुसार ज्या रुग्णांना एमडीआर टीबी होता, त्या रुग्णांच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेंसिग केले गेले. या जीनोम सिंक्वेसिंगमधून रुग्णावर कोणती औषधे प्रतिसाद देतात आणि कोणती नाही, हेदेखील समजते. सद्यस्थितीत पालिका सी-डीएसटी म्हणजेच कल्चर डीएसटी ही चाचणी टीबी रुग्णांसाठी वापरत आहे. या तपासणीच्या अहवालासाठी किमान नऊ आठवडे लागतात. या चाचणीतून १२ ते १३ औषधांचा प्रतिसाद कळतो. काय सांगतात तज्ज्ञ? मुंबईत तरुणांमध्ये प्री- एक्सडीआर टीबीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांपासून तयार केलेले औषधही प्रतिसाद देत नाही. यापेक्षा जास्त तीव्र संसर्ग असणाऱ्या रुग्णांवर आठ औषधांपासून तयार केलेले औषध काम करत नाही. या रुग्णांना बिडाक्युलिन, डेलामाईन ही औषधे द्यावी लागतात. जीनोम सिक्वेसिंग केलेल्या ६०० एमडीआर नमुन्यांपैकी अर्ध्याहून अधिक ५१ टक्के लोकांमध्ये एक्सडीआर टीबीचा संसर्ग आढळला. विशेष म्हणजे त्यांना आधीपासूनच एक्सडीआरचा संसर्ग असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात तरुण वयोगटात संसर्ग आढळला आहे. – अनिर्वन चॅटर्जी, प्रमुख अभ्यासक एमडीआर आणि जे रुग्ण औषधांना प्रतिसाद करत नव्हते, त्या टीबी रुग्णांचे नमुने दोन वर्षांपूर्वी अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते. सामान्य लोकांमधून नमुने घेण्यात आले नव्हते. याचा हा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती पालिकेने आता टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी पूर्ण क्षमतेने वापरायला हवी. जेणेकरून लवकर योग्य निदान होणे शक्य होईल. – डॉ. मंगला गोमारे, माजी कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये 2.5 टन प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच एकल वापर प्रतिबंधावरही विशेष लक्ष दिले जात असून नागरिकांच्या प्रबोधनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात एपीएमसी मार्केट येथे जयेश कुमार अँड कंपनी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत 2.5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी अजित देशमुख व शशिकांत पाटील यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, सुषमा देवधर, योगेश पाटील उपस्थित होते. या कारवाईत जयेश कुमार अँड कंपनी यांचेकडून साधारणत: 2.5 टनाहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच संबंधितांकडून रू. 5 हजार व सरस फुड्स मार्ट, एपीएमसी मार्केट यांच्याकडून रुपये 5 हजार अशी एकूण रू. 10 हजार दंडात्मक शुल्क वसूली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा मोठ्या प्रमाणात जप्त केलेला प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे.

वनमाळी हॉल येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरमची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनमाळी वातानुकूलित हॉल, छबिलदास मार्ग, दादर-पश्चिम येथे दिनांक ४ ते ६ मे दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम खेळासाठी क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबईचे योगदान फार मोठे असून एकेकाळी वनमाळी हॉलच्या स्पर्धेने हंगामाची सुरुवात होत असे. जवळपास महिनाभर चालणारी क्षत्रिय युनियन क्लबची स्पर्धा खेळाडू व क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा ७० व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे या विशेष स्पर्धेने हंगामाची सुरुवात करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला असून क्षत्रिय युनियन क्लबनेही स्पर्धेसाठी आपला वातानुकूलित हॉल उपलब्ध करून दिला आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या क्लब मार्फत आपली नावे दिनांक २४ एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत. तर जिल्हा संघटनेने प्राप्त नावे दिनांक २५ एप्रिल २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिशनकडे पाठवावीत.