Category: रायगड

raigad news and updates

कर्जत मतदार संघाच्या विकासपुरुषास मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माथेरान : कर्जत खालापूर मतदार संघातील असंख्य विकास कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आपल्या मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांची उकल करणारा आमचा आवडता मित्र, आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खरोखरच आनंद वाटत आहे असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात आज दि.६ रोजी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत या निष्ठावंत आमदारावर स्तुतीसुमने उधळली. एक धीरोदात्त असा हा लढवय्या आमदार आमचा सहकारी असल्याचा आम्हाला आनंद होत असून जवळपास एक हजार कोटी रुपयांची विकास कामे थोरवे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहेत असेही शिंदेंनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले,मंगेश चिवटे आणि इत्तर आमदार  उपस्थित होते.

निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे-जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचनाजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या निमित्त बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.

ज्येष्ठ निरुपणकार परमपूज्य तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.

मतदान यंत्रांची ७ विधानसभा संघनिहाय पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३२ रायगड आणि ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील ७ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार २ हजार ७१९ मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी ६ हजार ७८० बॅलेट युनिट, ३ हजार ७७४ कंट्रोल युनिट तर ३ हजार ९५२ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या १३८ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर १४५ टक्के व्हीव्हीपॅट वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूम मध्ये आहेत.

राकेश कोकळे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डे भरण्यास सुरुवात

माथेरान : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्समुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले होते तर याच रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या साधनांना देखील त्रासदायक बनले होते याकामी येथील जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत माती आणि खडी मध्ये हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माथेरान मध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही याबाबत नागरिकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

माथेरानमध्ये कार्यान्वित होणाऱ्या प्रकल्पात राजकीय म्होरक्यांची विरोधकांसह चंगळ

माथेरान : माथेरानसारख्या या दुर्गम भागात कधी नव्हे ती विकास कामे मागील सहा ते सात वर्षांपासून प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु विकास तेथे विरोध हे गणितच असल्याने…

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय शाळेचं सक्षमिकरण

व्हिझिबल अल्फा कंपनीने दिला मदतीचा हात कर्जत : अशोक गायकवाड व्हिझिबल अल्फा कंपनी च्या मदतीने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, गौरकामत शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापक प्रमोद किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढे केला जाईल अशी ग्वाही दिली. २८ मार्चला  स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेत अल्फा व्हिसिबल च्या मदतीने नूतनिकरणाचे काम झाले आहे…आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश शाळांना सक्षम करण्यासाठी तसेच शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हे गौरकामत शाळेतील व्हिसिबल अल्फा डोनर च्या सपोर्ट मुळे साध्य झाले आहे. व्हिसिबल अल्फा ने शाळेसाठी शालेय विज्ञान प्रयोग शालेसाठी स्वतंत्र वर्गखोली , सौर ऊर्जा सुविधा , पाणी फिल्टर, शौचालये आणि स्नानगृहांचे नूतनीकरण तसेच ७० लाकडी बेंच , ग्रंथालय आणि एक स्वतंत्र वर्ग उपलब्ध करून दिले आहे . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य व सामूहिक नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दासवानी यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसोबत भागीदारी करून शाळेला पाठिंबा दिल्याबद्दल व्हिजिबल अल्फा टीमचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कांचन थोरवे यांनी शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश सांगून शाळेची सक्षमीकरण प्रकल्पाची गरज स्पष्ट केली. शाळेचे अध्यक्ष पाटील आणि मुख्याध्यापक किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढेही केला जाईल अशी ग्वाही दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमच्या शाळेत सर्व सुविधा असल्याने इतर विद्यार्थीही या शाळेत प्रवेश घेतील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक समन्वयक प्रिया सोनावळे यांनी केले. ह्या कार्यक्रमासाठी विशेषाधिकारी पाहुणे म्हणून श्रीमती पद्म प्रिया सरस्वतुला हेड ऑफ व्हिसिबल अल्फा भारत , अरुल, आयटी विभाग व्हिसिबल अल्फा, श्रीमती सीमा, प्रशासकीय व्हिसिबल अल्फा लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे सीईओ दासवानी तसेच लाईफ ट्रस्ट मार्केटिंग टीम सदस्य हरपाल सिंग, कार्यक्रम व्यवस्थापक कांचन थोरवे, गौरकामत शाळेचे अध्यक्ष पाटील , चेअरमन राणे आणि गौरकामत गावचे सरपंच योगेश देशमुख उपस्थित होते.

डॉ.मीनल जाधव हिचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सत्कार

माथेरान : माथेरान मधील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील शिक्षक विनोद जाधव यांची मुलगी मीनल हिने होमिओपॅथी मेडिकल मध्ये डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मीनलचे पालक शिक्षक विनोद जाधव आणि आई सीमा जाधव उपस्थित होत्या.मीनल जाधव हिचे चौथी पर्यंतचे शिक्षण आसल( कर्जत) इथे झाले त्यानंतर अकरावी,बारावी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत आणि त्यानंतर केडीएमसी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शिरपूर (धुळे) याठिकाणी झाले. तिने डॉक्टर पदवी२९ मार्च रोजी प्राप्त केली आहे केल्या या तिच्या यशाबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नेरळ येथील छत्रपती शिवाजी मैदान जवळील हॉलवर भव्य सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मीनलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० महत्वाची भूमिका बजावेल – कुलगुरू डॉ.कारभारी काळे

अशोक गायकवाड रायगड : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ करिता बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांनी मंगळवार, (दि.२) रोजी येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत १२ वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षामाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर होण्याच्या उद्देशाने कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे आयोजित एक दिवसीय स्कूल कनेक्ट कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस परिसरातील एकूण २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात राज्यात राबविण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील शैक्षणिक बदलांबाबत जागृती, बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजना, विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठात उपलब्ध शैक्षणिक सोई-सुविधा, विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठातील विविध विभागांना भेट आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, डॉ.एच.एस. जोशी, डॉ.ए.पी. शेष, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.एस.एम.पोरे आणि पदविका विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, भारतीय ज्ञान परंपरा, अकँडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलायीन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्कृती विकसित होण्याकरिता विद्यार्थी व शिक्षकांकरिता विद्यापीठामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आदान-प्रदान होण्यासाठी विद्यापीठ प्रशासन निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली. तसेच भारताला विश्वगुरु बनविण्याकरिता विकसित भारत २०४७ व आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत डॉ.ए.पी.शेष इंग्लिश विभाग प्रमुख यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना समग्र शिक्षण, जीवनावश्यक कौशल्य व माणुसकी याचे आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्व विषद केले. करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. नीरज अग्रवाल यांनी विद्यापीठात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप, स्टार्टअप / उद्योजकता करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ.बाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्वाची भूमिका पार पेल असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.मधुकर दाभाडे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना आपल्या भागातील संभाव्य उद्योग संधी लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी उद्योग स्थापन करावे तसेच आपल्या परिसरात उत्तम दर्जाचे अभियंता निर्माण होतील या करिता विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांनी विद्यापीठामार्फत उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यशाळेची प्रस्तावना डॉ.एच.एस. जोशी यांनी केली तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.रतिका जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संप्रीत गौड यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.संजय नलबलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नवीन खंडारे व विद्यापीठाचे अधिकारी/कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.