Category: ठाणे

Thane news

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप अनिल ठाणेकर ठाणे, मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या रहिवाशांना हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वाटप आज उपमुख्यमंत्रीच्या हस्ते करण्यात आले. गेली २५ वर्षे जुन्या चिखलवाडीचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या काळात ३६ विकासकांनी हा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ३७ वे विकासक म्हणून आलेल्या श्रीपती डेव्हलपर आणि आमदार पराग शहा यांनी मिळून हा प्रकल्प हातात घेऊन पूर्ण केला. अवघ्या २ वर्षात या इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे २६५ रहिवाशांना घर देणे शक्य झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही रहिवाशांना प्रतिकात्मकरित्या या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार पराग शहा, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, श्रीपती डेव्हलपर्सचे सतीश चतुर्वेदी, जुनी चिखलवाडी रहिवाशी संघाच्या अध्यक्ष सुरेखा परब, सरचिटणीस चिंतामण दळवी आणि सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते स्वप्न आज जुन्या चिखलवाडीतील रहिवाशांचे पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद वाटत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने क्लस्टर योजनेला मंजुरी दिली, त्या अंतर्गत देण्यात आलेल्या इन्सेटिव्हचा लाभ रहिवाशांना देण्याचे निर्देश दिले त्यामुळेच १२० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना आता ५८५ स्क्वेअर फुटांचे मोठे असे २ बीएचके घरे देणे शक्य झाले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी अतिशय उत्तम घरे विकासकाने दिलेली असून, विक्रीयोग्य घरांच्या एवढीच उत्तम घरे स्थानिक रहिवाशांनाही दिलेली असल्याचे सांगितले. याठिकाणी जिम, लायब्ररी, लग्नाचा हॉल अशा अनेक सुखसोयी देण्यात आल्या आहेत असे सांगितले. मुंबईतील ४० लाख लोकांना घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. क्लस्टर योजनेला मंजुरी देऊन तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. या सेस इमारतींप्रमाणे नॉन सेस इमारतींचे क्लस्टर उभारण्याचा देखील प्रयत्न म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येईल. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा रखडलेल्या पुनर्विकासाला आम्ही चालना दिली असून १७ हजार घरांचा प्रकल्प तिथे साकारला जात आहे. हा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवला जात आहे, तर ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प ठाणे मनपा आणि सिडकोच्या माध्यमातून राबवला जात आहे. याशिवाय मुंबईतील जे प्रकल्प विकासकांनी अर्धवट सोडून दिलेत ते पूर्ण करण्यासाठी म्हाडा, एस आर ए, बी एम सी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महाप्रीत अशा प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे. जनतेला वेळेत घरे देणाऱ्या विकासकाला फुले तर लोकांना नाडणाऱ्या विकासकाला नारळ देण्यात मी मागेपुढे पाहत नाही असे  शिंदे यांनी स्पष्ट केले. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच अशा क्लस्टर योजनांना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना काळात विकासकाना संजीवनी देण्यासाठी ५० टक्के प्रिमियम कमी करण्याचा आणि स्टॅम्प ड्युटी मध्येही ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईतील विकासकांना आणि घरे घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याची आठवण करून दिली.गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आपण अनेक पथदर्शी निर्णय घेतले असून नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या अंतर्गत नोकरदार, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुंबईचे डबेवाले यांनाही सवलतीच्या दरात घरे देण्याचे निश्चित करण्यात आले असून मुंबईत काम करण्यासाठी येणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेव येथे उभारण्याला मंजुरी दिली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.जुनी चिखलवाडीतील रहिवाशांना शिंदेच्या विनंतीवरून मिळणार रंगीत टीव्ही. जुनी चिखलवडीमधील रहिवाशांना नवीन घरे मिळाल्यामुळे त्यांचे गृह स्वप्न पूर्ण झालेच आहे. पण नवीन घरची चावी द्यायला मी आल्याने त्यांना घरासह एखादी भेटवस्तू मिळायला हवी अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी विकासाकडे व्यक्त केली. तसेच नवीन घरासह त्यांना एक टीव्ही देखील द्या अशी आग्रही मागणीच त्यांनी विकासक सतीश चतुर्वेदी यांना केली. अखेर शिंदे यांचा मान राखून चतुर्वेदी यांनी प्रत्येक रहिवाशाला घरासोबतच २४ इंची कलर टीव्ही भेट म्हणून देऊ असे यावेळी कबूल केले.

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्च रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्च रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गजांची राहणार उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ यांच्या, “लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ मार्चला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’ या संघटनेच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, त्याचा प्रचार आणि प्रसार करुन बहुजनवर्गात विशेषत: तरुणांमध्ये, संविधान-लोकशाही-समता-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता यांबाबत जनजागृती करण्याचा वसा, आनंदा होवाळ यांनी अखंडपणे सुरु ठेवलेला आहे. देशातील वाढता जातीयवाद, धर्मविद्वेष याबाबत, आपल्या व्याख्यानांतून भाजप-आरएसएस या धर्मांध संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा प्रहार केलेला आहे. त्या सर्वांचा उहापोह त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सद्यस्थितीतील भारतीय राजकारणावर, आनंदा होवाळ यांनी परखड भाष्य केले आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली असून, त्यांनीदेखील मोदी-शहा यांचे भाजपाई सरकार व धनदांडग्या भांडवलदारी व्यवस्थेविरोधात तसेच, केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्याविरोधात, कष्टकरी कामगारवर्गाला गुलामगिरीत ढकलणाऱ्या कंत्राटी पद्धती विरोधात ताशेरे ओढले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’च्या अध्यक्षा सविता सोनावणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य भूषवणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. राम पुनयानी, माजी न्यायमूर्ती डॉ. डी.के. सोनावणे, अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, ॲड. गाथा ढाले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला जास्तीतजास्त लोकशाहीवादी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आनंदा होवाळ यांनी केले आहे.

‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर व्याख्यान

‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर व्याख्यान कल्याण : कल्याण इतिहास संकलन समिती कोकण प्रांतच्यावतीने श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त  इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, (कल्याण जिल्हा) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपतींच्या ३९६ व्या जन्मोत्सव दिनानिमित्त  मराठा साम्राज्याचे सखोल अभ्यासक इतिहास संकलन समिती कोकण प्रांत उपाध्यक्ष रविराज पराडकर यांचे ‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीति’ यावर  अभ्यासपूर्ण ओजस्वी भाषण शनिवार, ७ मार्च सायंकाळी ६.३० वाजता डोंबिवली पूर्वेतील, वीर सावरकर रोड, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान याठिकाणी आयोजित केले आहे.

८ मार्च रोजी महिलांसाठी मोफत बस प्रवास

८ मार्च रोजी महिलांसाठी मोफत बस प्रवास मिरा -भाईंदर मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरांतर्गत तसेच शहराबाहेरील ठाणे व बोरीवली या मार्गांवर प्रवासी बससेवा नियमितपणे चालविण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित, सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची गरज लक्षात घेऊन परिवहन सेवेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रमही राबविण्यात येत असतात. याच अनुषंगाने, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बसमधून महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी मा. आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे सूचना केली होती. त्यानुसार परिवहन विभागाने सादर केलेला प्रस्ताव मा. आयुक्त यांनी मंजूर केला. मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत मागील पाच वर्षांपासून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाला शहरातील महिलांकडून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने महिला या सुविधेचा लाभ घेत आहेत. महानगरपालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार ८ मार्च २०२१ रोजी ११,५५२, ८ मार्च २०२२ रोजी २१,४६१, ८ मार्च २०२३ रोजी २५,८३८, ८ मार्च २०२४ रोजी २२,१३१ तसेच  ८ मार्च २०२५ रोजी ३३,४३२ महिलांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बससेवेचा मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. दरवर्षी वाढत असलेल्या या प्रतिसादामुळे महिलांमध्ये या उपक्रमाबाबत सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजात महिला सन्मान व महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.  महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये महिला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक महिला दिनानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये महिला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मिरा-भाईंदर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने महिला पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे शिबिर ६ मार्च, सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत रुग्णालयाच्या १४ व्या मजल्यावरील ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उंची, वजन, रक्तदाब (BP), रँडम ब्लड शुगर (RBS), फुफ्फुस तपासणी (PFT), डॉक्टर सल्ला, हाडांची तपासणी (BMD) तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी अशा विविध तपासण्यांचा समावेश असणार आहे. हे शिबिर विशेषतः महिला पत्रकारांसाठी तसेच त्यांच्या आईसाठी आयोजित करण्यात आले असून, पुरुष पत्रकारांच्या पत्नी किंवा आईसुद्धा या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ही आरोग्य तपासणी फक्त महिलांसाठीच मर्यादित असल्याची नोंद आयोजकांनी स्पष्ट केली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. सदर शिबिरास महिला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वोक्हार्ट  हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रुस्तमजी अझियानोमध्ये रंगली शिस्तबद्ध आणि इको-फ्रेंडली रंगपंचमी

रुस्तमजी अझियानोमध्ये रंगली शिस्तबद्ध आणि इको-फ्रेंडली रंगपंचमी ठाण्यातील रुस्तमजी अझियानो संकुलात यंदाची २०२६ सालची धुळवड मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. अझियानो उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या…

दैनंदिन वापरातील शालेय गणित’ पुस्तक प्रकाशित

दैनंदिन वापरातील शालेय गणित’ पुस्तक प्रकाशित कल्याण : रा.फ.नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोपरखरणे येथे ‘स्कूल मॅथेमॅटिक इन डेली लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन श्रमिक शिक्षण मंडळ, संस्था अध्यक्ष माजी आमदार…

कल्याणमध्ये “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन

कल्याणमध्ये “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन कल्याण : रविवार दि.8 मार्च रोजी महिला दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम यांच्या संयुक्त विद्यमाने “रण रागिणी मॅरेथॉन…

महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा

महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळात राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला. परिमंडळ कार्यालयात उपस्थित लाईनमन (जनमित्र) यांना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा…

रंगकर्मी रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान

रंगकर्मी रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान कल्याण: बलराज साहनी साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना ३ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमात साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वेगळा समाजप्रबोधनपर मार्ग निवडणारे अभिनेते व दिग्दर्शक म्हणून रविंद्र देवधर हे नाट्य वर्तुळात सुपरिचित आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अकथित पण महत्त्वपूर्ण पानं उलगडणाऱ्या, देवधर यांची संकल्पना व मुख्य भूमिका असलेल्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे २४९ प्रयोग त्यांनी केले आहेत. माजी एअर मार्शल भूषण गोखले, ऑस्करपर्यंत मजल मारलेले ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे यांसारख्या अनेक नामांकितांनी प्रत्येक भारतीयाने अनुभवायला हवा” असा नाट्यानुभव या शब्दांत ‘मी भारतीय’ला गौरवलेलं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद – मध्यवर्ती शाखेचा ‘नाट्यकला मंदिर पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषद – पुणे शाखेचा ‘भालबा केळकर पुरस्कार’, देवधर मंडळाचा ‘चतुरस्त्र व्यक्तिमत्व’ पुरस्कार यांशिवाय विविध प्रवाहबाह्य नाट्यकृतींसाठी पटकावलेली राज्य नाट्य स्पर्धेची अनेक पारितोषिकं देवधर यांच्या नावावर यापूर्वी जमा आहेत.