Category: ठाणे

Thane news

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा नवी मुंबई, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समागसेवक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ६० सभासदांचा वाढदिवस साजरा करून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.  याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ९१) व ज्ञानेश्वर भोगले (वय ७५) यांचा कुटुंबासमवेत शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तर संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सांगितले की, संघाच्या सभासदांसाठी लवकरच आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्या सभासदांसाठी  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिले जाणारे स्मार्ट  कार्ड देण्यासाठी लवकरच एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे महत्व सांगितले.  संघाच्या उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. संघाचे सहसचिव राजेंद्र कदम यांनी वाढदिवस असणाऱ्या मानकऱ्यांच्या नावांचे वाचन केले. संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी नवीन सभासदांचे स्वागत केले. तर संघाचे सहखजिनदार  नाना शिंदे यांनी देणगीदारांचे  आभार मानले.  संघाचे ज्येष्ठ सभासद पत्की आणि संघाच्या माजी उपाध्यक्षा डॉ.  विजया गोसावी व इतर  सभासदांनी सामुहिकरित्या सुरेल आवाजात वाढदिवसाचे गीत म्हटले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानून ९१ वर्षाचे ज्येष्ठ सभासद देणगीदार ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या स्नॅक वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर अनिल ठाणेकर ठाणे: ‘वी नीड यू’ सोसायटीतर्फे समाजात ‘व्रतस्थ वृत्तीने कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व ठाणे शहर आणि जिल्ह्यालगतच्या परिसरात सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ८ वर्षे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात. सन २०२५चे हे तिन्ही पुरस्कार संस्थेच्या१५ फेब्रुवारी झालेल्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार समाजव्रती पुरस्कार स्टालिन दयानंद यांना, शिक्षणव्रती पुरस्कार सुनिता भोसले यांना तसेच कार्यव्रती पुरस्कार बाळासाहेब आठरे यांना घोषित झाले आहेत. भांडूप, मुंबई येथे ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेत धडाडीने काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद स्टालिन यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार मिळाला आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एससी. आणि एम. बी. ए.चे शिक्षण घेणाऱ्या मुंबई शहर, कोकण किनारपट्टी आणि देशातील अनेक भागात झपाट्याने लुप्त होत असलेली जैवविविधता टिकवण्यासाठी गेली पंचवीस वर्षे व्रतस्थपणे काम केले आहे. २००९मधे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांजुरमार्गमधील १४० हेक्टर पाणथळ जमिनीवर कचरा डेपो करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली. स्टालिन यांनी या मागणीला विरोध केला आणि न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने एक केंद्रीय अभ्यासगटाद्वारे अभ्यास करून घेत कचरा डेपो करण्यास परवानगी नाकारली. ही एकच जमीन नव्हे तर मुंबईतील पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीचे अतिक्रमण रोखण्यासाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कामाने अस्वस्थ झालेल्या काही बिल्डरनी त्यांच्यावर गुंडांकरवी हल्लेही केले आहेत. २०१०मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या खाणींच्या प्रकल्पालाही प्रखरपणे विरोध केला आणि अखेर प्रकल्प रोखण्यात यश मिळवले. खारफुटी वन किंवा कांदळवन टिकवून त्यात वृद्धी करण्यासाठी ते कार्यरत आहेत. केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मानवी हक्क अभियान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात प्रवेश करणाऱ्या आणि पुढे समाज कार्याबरोबरच समाज शिक्षण, कायदा शिक्षण घेता घेता थेट पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तसेच शिक्षणाचा गंध नसलेल्या फासेपारधी आणि अन्य भटक्या तसेच आदिवासी समाजात शिक्षणाचे मोल पोहोचवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या, आणि तब्बल १५०हून अधिक विद्यार्थी दत्तक घेतलेल्या सुनिता भोसले यांना या वर्षीचा शिक्षणव्रती पुरस्कार मिळाला आहे. २०१२ साली त्यांनी क्रांती संस्था स्थापन करून या सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती तपासणे, त्यांचं वह्या, पुस्तके, कपडे आदी गरजा पाहणे, त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था पाहणे, अशी अनेक कामे केलेली आहेत. इतकेच नव्हे तर बालमजुरी रोखणे, बालविवाह रोखणे, त्यासाठी पालकांत जागृती करत राहणे, त्यासाठी बालक पालक संवाद घडवून आणणे, हे काम सुनिता सातत्याने करत आहेत. ‘विंचवाचे तेल’ या आत्मकथनातून त्यांनी फासेपारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा धांडोळा घेतानाच समाजांतर्गत, विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर अत्यंत प्रखर प्रकाशझोत टाकलेला आहे. आगामी काळात वंचित, पारधी, भटके आणि आदिवासी समूहातील मुलांसाठी आश्रमशाळा अगर वसतिगृह निर्माण करण्याची त्यांची योजना आहे. तालुका कृषी अधिकारी म्हणून करणाऱ्या बाळासाहेब आठरे यांनी शासकीय सेवेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या लोकाभिमुख कामाचा गौरव त्यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र विकास, महिला स्वयंसहायता गट बळकटीकरण, आदिवासी विकास संदर्भातील योजना, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बीज उपलब्ध व्हावे म्हणून शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार विकास योजना अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, सेंद्रिय शेती उत्पादन कार्यक्रम आदि अनेक कार्यक्रम राबवले आहेत. तसे करताना शेतकऱ्यांची अनोखी शेतीशाळा व घोंगडी बैठक राबवून शेतकरी हितासाठी काम केले आहे. पथनाट्य लेखन, गीतलेखन करून त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने व सामाजिक कार्यात सहभाग दिलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर या आदिवासी जिल्ह्यातही त्यांनी सामाजिक आणि ग्रामविकास संस्थांबरोबर काम केले आहे. हे पुरस्कार रविवार ८ मार्च सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे होणार असून ज्येष्ठ सामाजिक तसेच स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. शिरूर जिल्हा पुणे येथे जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रविंद्र धनक यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. वी नीड यू सोसायटी ही संस्था १९८६पासून ठाणे व नवी मुंबई परिसरात काम करत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात उमंग वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्रे व शिबिरे आदी प्रबोधन कार्यक्रम केले जातात. ठाणे शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वी नीड यू सोसायटीचे अध्यक्ष अतुल गोरे यांनी तसेच सर्व विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न

भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी ७५ वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व आंबेडकर चेअर (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विकासदृष्टी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद यशस्वी रितीने संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते झाला. स्वागतपर भाषण प्रा. मनीषा कर्णे यांनी  तर प्रास्ताविक डॉ. कैलास गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी  जे. एस. सहारिया यांनी भारतीय राज्यघटनेतील मूल्ये व त्यांचे सामाजिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांमध्ये १६ संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैदराबाद आदी राज्यांतील संशोधकांनी यामध्ये सहभाग घेतला. साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटी, लंडन येथील संशोधकानेही आपला संशोधन निबंध या परिषदेत सादर केला. समारोप सत्रात थायलंड येथील डॉ. श्रीरंजन आवटे यांनी संविधानिक मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. अधिवेशनाच्या विशेष सत्रात दीपक करंजीकर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दूरदर्शी अर्थतज्ज्ञ” या विषयावर व्याख्यान दिले. परिषदेत संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण धोरण, लोकशाही व विकास या विषयांवर सखोल चर्चा झाली. सत्रांचे मॉडरेशन मुंबई विद्यापीठाच्या डॉ. प्रिया वैद्य व डॉ. सोनाली वाखर्डे यांनी केले. कार्यक्रमाचा तपशीलवार आढावा सादर करण्यात आला तसेच सहभागी अभ्यासकांना प्रमाणपत्रे व समिती सदस्यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राशी बग्गा यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सौ. संध्या आंबाडे व  दशरथ गंभीरे यांनी केले. हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विकासदृष्टीचा पुनर्विचार करणारा ठरला.

खुशखबर! आता फक्त ४५ हजारांत बसवा सोलर

खुशखबर! आता फक्त ४५ हजारांत बसवा सोलर महावितरणच्या निर्णयामुळे ग्राहकांचे १५ हजार वाचणार! हरिभाऊ लाखे नाशिक – महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या निविदेत एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी पाच लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॉटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे. राज्य सरकार गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबवत असून त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या निविदेला मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रति किलोवॉट ५० हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रती किलोवॉट सुमारे ६० हजार रुपये आकारतात. पण महावितरणने मंजूर केलेल्या निविदेत प्रती किलोवॉट ४५,४५० रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल. केंद्र सरकारचे अनुदान कसे? केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॉटला ३० हजार रुपये, दोन किलोवॉटला ६० हजार रुपये व तीन किलोवॉटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. ऊर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एक किलोवॉटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज देयक शून्य येते व ग्राहकाला अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. राज्य सरकारने या योजनेत राज्यातर्फे आणखी अनुदान देऊन दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आणली आहे. प्रत्येकी एक किलोवॉटचे सौरऊर्जा प्रकल्प या योजनेत बसविण्यात येतील. गरजुंना लाभ घेणे सुकर… महावितरणने स्मार्ट योजनेसाठी मागवलेल्या निविदेत एक किलोवॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४५,४५० रुपये इतका कमी दर निश्चित झाल्यामुळे आता अन्य गरजू वीज ग्राहकांनाही लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सरकारी अनुदानाशिवाय ऊर्वरित रक्कम ग्राहकाला भरावी लागते. या रकमेत मोठी घट झाल्यामुळे छोट्या गरजू वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सूचिबद्ध पुरवठादारांची यादी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर आणि स्मार्ट योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध केली आहे.

 केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला

केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला आरोग्य कर्मचाऱ्यांचा केडीएमसी बाहेर ठिय्या कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून, जुलै महिन्यापासून वाढीव पगार थकबाकी तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा थकबाकी पगार मिळावा या मागणीसाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालया बाहेर ठिय्या मांडला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनएचयुएम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून सुरळीत पगार होत नाही. तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा पगार जमा झालेला नाही.  तसेच जुलै २०२५ पासूनचा वाढीव पगार मिळालेला नाही. इतर महानगरपालिका एनएचएम कर्मचार्यांना १५ हजार वाढीव पागार देते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणताही वाढीव पगार देत नाही. तसेच नागरी आरोग्य केंद्रातील एएनएम, जीएनएम यांचे रिक्षा बिल, सपोर्ट ग्रुप, आरोग्य वर्धिनी ही बिले थकीत आहेत. या सर्व समस्यांमुळे एनयुएचएम  स्टाफलं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

पोलीस असल्याचे सांगत 5 लाख रुपये लांबवले

पोलीस असल्याचे सांगत 5 लाख रुपये लांबवले आरोपींना कोळसेवाडी पोलीसांनी घेतले अवघ्या 5 तासांत ताब्यात कल्याण: पुणे येथे राहणारे दीपक शिंदे यांना ५ लाख रुपयांच्या बदल्यात सुटे १०,५०,१०० च्या नोटा असलेले ७ लाख रु. असे २ लाख जास्तीचे पैसे मिळवून देतो असे सांगून कल्याण पूर्व येथे बोलवून घेतले. तक्रारदार हे ५ लाख रुपये घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन कल्याण पूर्व येथे आले असता सुट्टे पैसे देण्याचा बनाव करून एका स्कॉर्पिओ गाडीतून तीन-चार इसमांनी येऊन पोलीस आहेत तुम्ही इथे काय करता असे बोलून पैसे बदली करणारे इसमास त्यांच्या गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील पाच लाख रुपये असलेली पैशाची बॅग ओढून गाडीत बसून ते सर्वजण स्कॉर्पिओ गाडी मधून पळून गेले. हि माहिती तक्रारदाराने पोलीस ठाण्याला कळवताच कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत लागलीच आरोपींचा शोध घेत या आरोपींना अवघ्या 5 तासांत अटक केली. गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी पैसे बदली करण्यासाठी आलेल्या आरोपींचे मोबाईलचे वेळोवेळी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची स्कॉर्पिओ गाडी जुन्या पुणे हायवेने जात असल्याचे समजून आल्याने तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांना कळवले असता, सोमाटणे फाटा या टोल नाक्यावर स्कॉर्पिओ गाडी MH-04-GD-7823 व त्यातील चार आरोपी संजय नागोजीराव भोसले,  राह. गौरीपाडा, कल्याण, गौसपाक गुलाम हुसेन शेख, राह. गौरीपाडा, कल्याण, सोमीनाथ तुळशीराम गायकवाड, राह. मोहने, अरविंद नागनाथ जॉजट, राह. इंदिरानगर, कल्याण यांना पाच तासामध्ये ताब्यात घेण्यात आले. तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता गुन्हयातील इतर आरोपी आळंदी मार्गे अहिल्यानगर कडुन शिर्डी मनमाड कडे स्कॉर्पिओ गाडी क्र. MH-05-AJ-0247 याने पळून जात असल्याचे समजल्याने लागलीच जवळचे पोलीस ठाणे राहुरी यांच्याशी संपर्क करून अहिल्या नगर शिर्डीरोड वर नाकाबंदी करून अहिल्या नगर-शिर्डी रोडवर पाहिजे असलेले आरोपी ५) उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू ६) शरद कुमार मोहन  ७) नरेश फट्टू शर्मा तसेच आरोपी नामे ८) लक्ष्मण उर्फ प्रदिप विश्वनाथ धनवे राह. उल्हासनगर यास पुढील ३६ तासात ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गुन्हयातील चोरीस गेलेल्या रोख रक्कमेपैकी २ लाख ३६ हजार रूपये, गुन्हयात आरोपींनी वापरलेल्या २ स्कॉर्पिओ गाडया, आरोपींचे वापरते एकुण ९ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हि कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरख, पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप भालेराव, पोउनि जगन सापटे, पोहवा. जाधव, सांगळे, वाघ, मुसळे, जरग, सौंदाणे, घुगे, आव्हाड, बोरसे, सांगळे, कापडी, पोना कोती, फटांगरे, पोशि गिते, इंगळे  यांनी केली आहे.

युध्दामुळे आखाती देशांमध्ये जाणारी शहापूरतील भेंडीची निर्यात ठप्प

युध्दामुळे आखाती देशांमध्ये जाणारी शहापूरतील भेंडीची निर्यात ठप्प अविनाश उबाळे ठाणे : अमेरीका,इस्रायल,इराण यांच्यातील युध्दजन्य अशा परिस्थितीमुळे पश्चिम आशियात युध्दाची व्याप्ती वाढली आहे.त्याचे परिणाम आयात निर्यातीवर झाले आहेत भारतातून विशेषता महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातून आखाती देशात एक्सपोर्ट होणाऱ्या भेंडीची निर्यात पुर्णपणे ठप्प पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही युध्दजन्य परिस्थिती कधी थांबेल याकडे शेतकरी व व्यापारी डोळे लावून बसले आहेत.निर्यात थांबल्याने मोठ्या प्रमाणावर रोज भेंडीचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती भेंडीची आवक वाढल्याने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या  भेंडीचा साठा पडून आहे.शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या हिरव्यागार भेंडीला तसेच कारली,काकडी,व भोपळा,डांगर व अन्य भाजीपाल्याला इराण,युरोप, ब्रिटन अफगाणिस्तान, दुबई तसेच आखाती देशांमध्ये मोठी मागणी आहे. गेली अनेक वर्षे शहापूरची भेंडीला परदेशात मागणी आहे.खास करुन भेंडीची निर्यात येथून थेट परदेशात होते पण अचानक युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचे परिणाम हवाई वाहतूक व सागरी वाहतूकीवर झाले आहेत.परिणामी महाराष्ट्रातील भाजीपाला निर्यात ठप्प झाली आहे. विशेषता शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आणलेली भेंडी सध्या पडून आहे.आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे परदेशात होणारी आयात निर्यात ही पुर्णपणे कोलमडून पडल्याने सध्या व्यापारी हे भाजीपाला खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत नसल्याने याचा मोठा फटका सामान्य गरीब शेतकऱ्यांना बसला असून उत्पन्नाचे एकमेव साधन असलेला भाजीपाला व्यवसाय हा आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. अगदी कवडीमोल भावाने भेंडी व अन्य भाजीपाल्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. भाजी मालाला उठावच नसल्याने तो खराब झालेला भाजीपाला एकतर फेकून द्यावा लागेल अशी एकंदरीत परिस्थिती येथे निर्माण होण्याची शक्यता आहे. -शहापूरच्या बाजारपेठेत रोज एक ते दोन हजार क्विंटल भेंडीची आवक होत असून किलोमागे शेतकऱ्यांना ३५ ते ४० रुपयांचा भाव मिळतो आहे.शहापूर तालुक्यात या वर्षी भेडीचे सर्वाधिक…

सतीची विहीर प्रशासनाकडून दुर्लक्षीत

सतीची विहीर प्रशासनाकडून दुर्लक्षीत पडघ्यातील १०० वर्षे जुनी ऐतिहासिक विहीर खुली करण्यास टाळाटाळ ठाणे: भिवंडी तालुक्यातील पडघे गावात ऐतिहासिक वारसा जपणारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी सर्वे नं. ७९/१० मधील ‘सतीची विहीर’ प्रशासनाकडून दुर्लक्षीत झाली आहे.ही विहीर बुजवण्यात आल्याचा धक्कादायक असा प्रकार उजेडात आला आहे. या घटनेनंतर दोन महिने उलटूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सतीची विहीर पुन्हा खुली करून तिचे ऐतिहासिक स्वरूप जतन करावे, या मागणीसाठी पडघा ,समतानगर येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांनी मुंबई येथील पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे लेखी निवेदने दिली. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल भिवंडी तहसील कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे. मात्र, दोन महिने लोटूनही तहसीलदार स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा केवळ कागदोपत्री राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पडघा ग्रामपंचायत हद्दीतील ही विहीर जवळपास १०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या मते, याच सतीच्या विहिरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी सत्याग्रह केला होता. त्या वेळी ते समतानगर येथील काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी उतरले होते. सत्याग्रहींसह विहिरीवरून पाणी काढून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला होता. या ऐतिहासिक घटनेमुळे ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याची जिवंत साक्ष मानली जाते. समतानगर येथील दिवंगत हिराबाई दुंदांजी सोनावणे (वय ९६) यांनी जिवंत असताना सांगितलेल्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबासाहेबांनी सतीच्या विहिरीवर सत्याग्रह केल्यानंतर शिसवीच्या झाडाखाली सभा घेतली होती आणि “मुलांना शिक्षण द्या” असा संदेश दिला होता. या आठवणींमुळे सतीची विहीर ही पडघ्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरते.ही ऐतिहासिक विहीर पुन्हा खुली होणार का? प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? की प्रक्रिया सुरू असून नागरिकांना माहिती दिली जात नाही? सतीची विहीर हा केवळ स्थानिक वादाचा विषय नसून सामाजिक न्यायाच्या इतिहासाशी निगडित वारसा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चौकट (“डॉ. बाबासाहेबांनी पदस्पर्श केलेली ही विहीर आमच्या पडघ्याचा अभिमान आहे. त्यांच्या पाऊलखुणा पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. शासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार का, की अर्जांना केराची टोपली दाखवली जाणार?” असे आम्ही होऊ देणार नाही. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव)

 ‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्चला ठाण्यात प्रकाशन सोहळा

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्चला ठाण्यात प्रकाशन सोहळा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गजांची राहणार उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ यांच्या, “लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ मार्चला ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’ या संघटनेच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, त्याचा प्रचार आणि प्रसार करुन बहुजनवर्गात; विशेषत: तरुणांमध्ये, संविधान-लोकशाही-समता-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता यांबाबत जनजागृती करण्याचा वसा, आनंदा होवाळ यांनी अखंडपणे सुरु ठेवलेला आहे. देशातील वाढता जातीयवाद, धर्मविद्वेष याबाबत, आपल्या व्याख्यानांतून भाजप-आरएसएस या धर्मांध संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा प्रहार केलेला आहे. त्या सर्वांचा उहापोह त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सद्यस्थितीतील भारतीय राजकारणावर, आनंदा होवाळ यांनी परखड भाष्य केले आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली असून, त्यांनीदेखील मोदी-शहा यांचे भाजपाई सरकार व धनदांडग्या भांडवलदारी व्यवस्थेविरोधात तसेच, केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांविरोधात, कष्टकरी कामगारवर्गाला गुलामगिरीत ढकलणाऱ्या कंत्राटी पद्धतीविरोधात ताशेरे ओढले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’च्या अध्यक्षा सविता सोनावणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य भूषवणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. राम पुनयानी, माजी न्यायमूर्ती डॉ. डी.के. सोनावणे, अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, ॲड. गाथा ढाले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला जास्तीतजास्त लोकशाहीवादी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आनंदा होवाळ यांनी केले आहे.

ई-चलान विरोधात वाहतुकदारांचा आज आझाद मैदानात एल्गार

ई-चलान विरोधात वाहतुकदारांचा आज आझाद मैदानात एल्गार शासनाने तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारच्या वाहतुक विभाग आणि पोलिसांकडून विनाकारण ‘ई चलान’ अनेक वेळा ऑनलाइन पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे याचा संताप म्हणून बस ओनर्स सेवा संघाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीतर्फे गुरुवारी ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्यभरातील वाहनांसह थेट आझाद मैदानात धडकण्याचा इशारा दिला आहे. बुधवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वाहतुकदारांच्या समितीचे प्रवक्ते राजेंद्र पाटील यांनी याविषयी माहिती दिली. तसेच, शासनाने तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, वाहतुकदारांचा या संपाचा फटका शालेय विद्यार्थी तसेच चाकरमान्यांना बसण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने महसुल वाढीसाठी ई चलानचा हत्यार म्हणुन वापर सुरू केला आहे. टार्गेट देऊन वाहतूक नियम मोडल्याबद्दल दंडाच्या केसेस केल्या जात असुन दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे, असा आरोप वाहतूकदार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. एमएमआर रिजनमधील ४० हजार बसेसचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बस मालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ई चलान दंड मुक्तीसाठी सरकारने समिती बनवुन तोडगा काढण्याची खात्री दिली होती. मात्र, आजवर काहीच तोडगा काढलेला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही वाहतुकदारांच्या समस्येची कबुली देत अडचणी विषयी सहमती दर्शवली. मात्र, ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली. ई चलानच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत, प्रत्येक कॉन्स्टेबलला ई चलान कारवाईचे टार्गेट दिलेले आहे. एकप्रकारे हा महसुल वाढीचा स्त्रोत बनवला आहे. हे सर्वानाच जाचक आहे तेव्हा शासनाने चर्चेसाठी यावे. अशी मागणी असुन गुरुवारी ५ मार्च रोजी आझाद मैदानात वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ई-चलान देताना वापरण्यात येणारी उपकरणे मान्यताप्राप्त नाहीत.  ई-चलान देण्यासाठी अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आलेले नाही. ई चलनसाठी दिला जाणारा नमुना आणि पावती नियमबाह्य आहे. ई चलाननुसार पुराव्यांशिवायच दंडवसुली केली जाते. पुरावे म्हणून सादर केलेले छायाचित्र धुसर असल्याचे अनेकदा आढळलेले आहे. ई-चलान यंत्रणा राबवून वाहनधारकांचर खोटे गुन्हे दाखल करून जबरदस्तीने दंड वसूलण्यात येत असल्याचा आरोप करून वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे म्हणजे सरकारची डिजिटल रॉबरी असल्याचा गंभीर आरोप केला आहे