Category: ठाणे

Thane news

 बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा

बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची केडीएमसी महापौरांकडे मागणी कल्याण : बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे १२२ नगरसेवक दिनांक १६ जानेवारी रोजी निवडून आले असून, ३ फेब्रुवारी रोजी महापौरपदी नियुक्ती हर्षाली चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. तथापि, बीपीएमसी कायद्या  मधील तरतुदीनुसार  महानगरपालिकेचे कर व दर हे दिनांक २० फेब्रुवारीपूर्वी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात कोणतीही महासभा घेण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालू होता. नागरिकांनी व लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून दिलेल्या १२२ नगरसेवकांच्या अस्तित्वातही जर अशा महत्त्वाच्या विषयांवर महासभा होत नसेल, तर पुन्हा प्रशासनाचा कारभार प्रशासकांच्या हातीच राहणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नगरसेवकांच्या मनात निर्माण होत आहे. महासभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असून, तिच्यामार्फतच कर व दर निधित होणे अपेक्षित आहे. यामध्ये विलंब होणे हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे तातडीने महासभा बोलवून कर व दर निश्चित करण्याचा विषय मांडण्यात यावा. महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे.

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कल्याण : ८ मार्च २०२६ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा करिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्य क्षेत्रातील सर्व महिलांनी आपण केलेल्या कामगिरी बाबतची संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्जा सहित महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगपालिका येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी केले आहे.

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव अत्यंत चिंताजनक बनला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची मागणी कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण (पूर्व) येथे राहणारे आयेश अमीन या युवकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर रेबिजची भीती मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाच्या नियोजनातील त्रुटी व निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो. कुत्रा चावल्यानंतर तात्काळ व पूर्ण लसीकरण होणे आवश्यक असताना लसीची अनुपलब्धता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे. तरी परिसरात तातडीने कुत्रे पकड मोहीम राबवावी. सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहिम युद्धपातळीवर राबवावी. महानगरपालिका रुग्णालयांत रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. नागरिकांसाठी जनजागृती मोहीम व आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी राहुल काटकर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

 शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर

शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर शेकडो मुले  शिक्षणापासून वंचित अविनाश उबाळे ठाणे -ठाणे जिल्हयातील शहापूर,मुरबाड, भिवंडी,या तालुक्यातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतर…

 धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न

धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न अल्फी मेक्कदतचा दुहेरी मुकुट, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची चमकदार कामगिरी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथे पार पडलेली धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा  अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात यशस्वीरीत्या संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या आश्रयाखाली ठाणे सिटी अँड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील १० गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील बॅडमिंटन वातावरण अधिक बळकट केले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला अल्फी मेक्कदत याचा दुहेरी किताब. अल्फीने अंडर १३ मुलांच्या एकेरी गटात तसेच अंडर १५ मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने अत्यंत प्रतिभावान पियूष सुतारवर मात करत दोन उदयोन्मुख चॅम्पियनमधील थरारक आणि उच्च दर्जाच्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. अंडर ९ मुलांच्या एकेरी गटात शिवांश चव्हाण विजेता ठरला तर विहान अनिखिंडी उपविजेता झाला. अंडर ९ मुलींच्या एकेरीत यश्वी कोरगावकर हिने विजेतेपद पटकावले आणि यम्मी मानोन हिला उपविजेतेपद मिळाले. अंडर ११ मुलांच्या एकेरीत योहान नायर विजेता ठरला तर वेद चव्हाण उपविजेता ठरला. अंडर ११ मुलींच्या एकेरीत नैरा पहारिया हिने बाजी मारली आणि सान्वी वागळे उपविजेती ठरली. अंडर १३ मुलींच्या एकेरीत शनाया तावटे हिने विजेतेपद पटकावले तर अद्विका मोरे उपविजेती ठरली. अंडर १५ मुलींच्या एकेरी गटात आर्या शिंदे विजेती ठरली आणि शुभ्रा कुलकर्णी उपविजेती ठरली. खुल्या गटातील मुलांच्या एकेरीत मंथन पाडेल विजेता झाला तर अर्णव सावंत उपविजेता ठरला. खुल्या गटातील मुलींच्या एकेरीत आर्या घाडगे हिने विजेतेपद मिळवले आणि गुंजन कोठारी उपविजेती ठरली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वरिष्ठ बॅडमिंटनपटू व क्रीडाप्रेमी  उदय गायकवाड,  रामदास शिंदे आणि  सुनील सोपारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  उदय गायकवाड आणि  रामदास शिंदे यांनी विजेत्या खेळाडूंना नैतिक मार्गदर्शन देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून  नरेश गुंडले यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले. या भव्य आयोजनामागे संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांचे विशेष परिश्रम मोलाचे ठरले. तसेच धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि ठाणे महानगर पालिकेच्या क्रीडा उप-आयुक्त मीनल पालांडे यांचा देखील  या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा होता. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड तसेच प्रशिक्षक मितेश हाजीरनीस, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर उपस्थित होते.  श्रीकांत वाड यांनी खेळाडूंसोबतच पालकांनाही योग्य मार्गदर्शन करत स्पर्धेच्या दर्जात भर घातली. धर्मवीर क्रीडा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटनला नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरला आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंगरोड येथे वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. गांधारी वडवली रिंगरोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. या रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक आपल्या वाहनांची रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी याठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वाहनांच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी स्पीडगन, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून रिंगरोडवर बंदोबस्त लावून वाहनचालकांची तपासणी करत कारवाई केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी

कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी नागरिकांशी साधला थेट संवाद कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः पायी फिरून पहाणी केली आणि तेथील रहिवाशी असलेल्या मुस्लिम बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली.  गोविंद वाडी परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबत असल्याबाबत पालिका सदस्या समीना शेख यांनी केलेल्या तक्रारीवरून तेथील मलनिस्सारण व्यवस्थेची देखील त्यांनी  पाहणी केली आणि सदर तक्रारीचे  निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित महापौरांचा सत्कार करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता आधी तुमची कामे होऊ द्यात, नंतर सत्कार करा असे सांगत महापौरांनी आपल्या सहृदयतेने नागरिकांची मने जिंकली.

मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई

मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई कल्याण: मालमत्ता कर वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ९ आय प्रभागातील दोन लिपिकांवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची कडक कारवाई केली. मालमत्ता कर वसुलीच्या उददीष्टपुर्तीसाठी कर संकलन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. आज आयुक्त अभिनव गोयल यांनी कर वसुलीसंदर्भात समक्ष महानगरपालिकेच्या ९ आय व १० इ प्रभागात भेट दिली आणि दोन्ही प्रभागांचे सहायक आयुक्त, कर अधिक्षक व कर विभागातील भाग लिपिक यांच्या समवेत कर वसुलीबाबत सविस्तर बैठक घेवून, वसुलीच्या सद्यस्थितीबाबत  एकंदर आढावा घेतला. या बैठकीत भाग लिपिकांशी चर्चेअंती अत्यंत कमी प्रमाणात कर वसुलीस जबाबदार असणा-या ९ आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण व राजेंद्र पाटील यांच्यावर कामातील हलगर्जीपणाबाबत तातडीने निलंबनाची कारवाई करत, कर वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी  अधिक गांभीर्याने काम करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी वर्गास सक्त निर्देश दिले. यावेळी, कर वसुलीसाठी  प्रभागात पहाणी करीत असताना कर लावण्यास अटकाव करणा-या  सुमारे ४ अनधिकृत अनिवासी मालमत्तावर निष्कासनाची  धडक कारवाई देखिल करण्यात आली. मार्च महिना हा कर संकलनाचा या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असून, कर चुकवेगिरी करणा-यांवर तसेच कर वसुलीच्या कामात जाणीवपुर्वक निष्काळजीपणा दाखविणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखिल कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

महानगरपालिका मुख्यालयात भिक्षा मागून करवाढ विरोधात शिवसेनेचा निषेध

महानगरपालिका मुख्यालयात भिक्षा मागून करवाढ विरोधात शिवसेनेचा निषेध मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाने सुचवलेल्या ६०% करवाढीविरोधात शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. शेकडो शिवसैनिकांनी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले आणि सत्ताधारी पक्षाविरुद्ध भीक मागून आणि घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवला. निदर्शनादरम्यान, शिवसैनिकांनी एका पेटीत भिक्षा मागत सत्ताधारी पक्षासाठी “देणगी” असे म्हटलं आणि त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे मुख्य गेट जबरदस्तीने उघडले आणि आवारात प्रवेश केला. पोलिसांच्या वारंवार प्रयत्नांनंतरही, ते महापौरांना भेटून निवेदन सादर करण्याच्या त्यांच्या मागणीवर कायम राहिले. महापौर त्यांच्या दालनात उपस्थित नसताना, शिवसैनिकांनी महापौरांच्या दालनासमोर घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली, निवेदन सादर केले आणि वाढीव करदर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. या प्रसंगी, शिवसेना नेते सचिन मांजरेकर यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आणि म्हटले की, करवाढ ही कोणत्याही जनहित धोरण नाही तर “पैशाची भूक” आहे. त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की, “जर सत्तेत असलेल्यांना पैशांची इतकी कमतरता असेल, तर आम्ही शिवसैनिक भीक मागू आणि पैसे वसूल करू, परंतु आम्ही जनतेवर अतिरिक्त कर लादू देणार नाही.” दरम्यान, शिवसेना नेते विक्रम प्रताप सिंह यांनी सांगितले की, आर्थिक बळाच्या जोरावर निवडणुका जिंकल्यानंतर, सत्ताधारी पक्ष आता जनतेकडून पैसे उकळू इच्छित आहे. त्यांनी आरोप केला की नवीन आणि जुन्या घरांवरील कराबाबत गोंधळ पसरवला जात आहे, तर प्रत्यक्षात या निर्णयाचा थेट परिणाम शहरातील कायमस्वरूपी रहिवाशांवर होईल. याला “तुघलकी फर्मान” म्हणत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवसेना या कराचा तीव्र विरोध करत राहील. जर करवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सेव्हन इलेव्हन कंपनीचे ७८ कामगार महासभा चालवत आहेत-निशा नार्वेकर निदर्शनादरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा निशा नार्वेकर यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आणि म्हणाल्या की महासभा जनहिताकडे दुर्लक्ष करत आहे आणि केवळ सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी ठराव मंजूर करत आहे. त्यांनी आरोप केला की कर मनमानी पद्धतीने वाढवला जात आहे आणि महासभेत काम करणारे लोक भाजप बहुमताने निवडून आलेल्या नगरसेवकांसारखे नाही तर सेव्हन इलेव्हन कंपनीच्या ७८ कामगारांसारखे वागत आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर निर्णय घेत आहेत.

 ठाणे महापालिकेच्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची मागणी

ठाणे महापालिकेच्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांचे महापौरांना पत्र ठाणे,   : ठाणे महापालिकेच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका…