Category: ठाणे

Thane news

शेतीसंबंधित शंका निरसन व मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचे टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअप क्रमांक कार्यान्वित

ठाणे : शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअॅप क्रमांक सुरू केला आहे. शेतकरी बांधवांनी या टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधून शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हा कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत सुरू आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 4000 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. शेतीविषयक शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी बांधव कृषी विभागाशी संपर्क करू शकतात. टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 हा क्रमांक संपूर्ण वर्षभर सुरू राहणा आहे. खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत, उपलब्धता, गुणवत्ताबाबत शंका निरसन करता येईल. कृषी विभागाशी निगडित मृदा संधारण, विस्तार, सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण  इत्यादी संबंधित शंकांचे निरसन या क्रमांकावरून करता येईल. संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक, कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक, आवश्यकता असल्यास दिले जातात. टोल फ्री क्रमांक 9822446655 हा केवळ संदेश पाठवण्यासाठी उपलब्ध आहे. खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी  व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 0000

 आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठीशी कोकणातील सर्व स्तरातील संघटना

पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन   ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठीशी कोकणातील विविध स्तरांतील संघटना उभ्या राहिल्या आहेत. प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोचिंग क्लासेस, विद्यार्थी संघटनेबरोबरच भंडारी, कुणबी, धनगर समाजासह ज्ञाती संस्था, दिव्यांग आणि इंजिनियर संघटनांनी आमदार डावखरेंना पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. माजी शिक्षक आमदार स्व. रामनाथ मोते यांची महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटना, आमदार किसन कथोरे यांचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघ, आमदार मनीषा कायंदे यांची महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट), आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, ज्येष्ठ नेते डॉ. आर. बी. सिंह यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अँड कॉलेज एम्प्लॉईज फेडरेशन यांनी आमदार डावखरे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ, सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) ज्ञातिहितवर्धक मंडळ, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, खान्देश सेना या ज्ञातीसंस्थांनीही प्रचारात सक्रिय भाग घेण्याची ग्वाही दिली. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आपला उमेदवार माघारी घेऊन महायुतीला साथ दिली. त्याचबरोबर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा), राज्यातील २६ संस्थांचे फेडरेशन असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाबरोबर संलग्न अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा), राज्यातील २६ संस्थांचे फेडरेशन असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाबरोबर संलग्न अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पालघर शाखा, अखिल ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, पालघर जिल्हा महिला प्राथमिक संघ, पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाबरोबर संलग्न तलासरी तालुका प्राथमिक शिक्षक संघ, पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था, कोकण पदवीधर फोरम, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांच्याबरोबर संलग्न पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, सिंधूरत्न दिव्यांग प्रेरक संस्था, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, शिवशंभु प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि. प./ न. पा. /मनपा) संघटना, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन, कल्याण येथील नूतन शिक्षण संस्था, अखिल कोकण विकास महासंघ, ठाणे येथील जीवन ज्योती इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला. तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले आहे. -00000 00000

दुचाकी चालवताय, सावधान!

ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी   ठाणे : गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या ठाणे, घोडबंदर आणि खारेगाव भागांतील महामार्गासह उड्डाणपुलांवर यंदा पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले. यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहराकडे शासनाच्या संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यात ठाणे महालिका प्रशासन टीकेची धनी ठरली आहे. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला ६०५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनामार्फत दिला. यातून शहराच्या अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहराअंतर्गत रस्ते सुस्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असले तरी दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गासह उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत. या मार्गावर गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खड्डे पडले होते. या खड्डे प्रवासाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर या मार्गाची डागडुजी करण्यात आल्याने यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरून खड्डेमुक्त प्रवास होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. महापालिका क्षेत्रातील कोपरी उड्डाणपुल, तीनहात नाका उड्डाणपुल हे एमएमआरडीए, नितीन कंपनी उड्डाणपुल एमएसआरडीसी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, वाघबीळ उड्डाणपुल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. या सर्वच विभागांनी गेल्यावर्षी रस्त्यांची डागडुजी केली होती. या रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. माजिवाडा, कॅडबरी आणि नितीन कंपनी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या पुलांवर खड्डे पडले आहेत. या मार्गांवर अवजड, हलक्या तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनांच्या वेगावर परिणाम होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ते चालकांना दिसत नाहीत. यामुळे वाहन आदळते. तसेच काही ठिकाणी मोठे खड्डे आहेत. तिथे स्कूटरचे चाक अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कोंडीची कारणे मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. हा रस्ता काँक्रीटचा केला जात आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. सेवा रस्ता किंवा मुख्य रस्त्या लगतच्या रुंदीकरणातील भागात काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे मुख्य रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता उंच-सखल झाला आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच वाहतुकही या भागात संथ होऊ लागली आहे. उरण जेएनपीटी बंदरातून येणारी हजारो अवजड वाहने मुंबई नाशिकच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्गाने वाहतुक करतात. खारेगाव टोल नाका येथे खड्डे पडल्यामुळे येथे वाहतुक काहीवेळ थांबवून टप्प्याटप्प्याने सोडली जात आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा मुंब्रा बाह्यवळण मार्गापर्यंत जात आहेत. वाहतूक संथगती सोमवारी मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहने बंद पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव, मुंब्रा बाह्यवळण महामार्ग, पिंपळास भागात वाहतूक कोंडी झाली होती. या भागात मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे देखील वाहतूक संथ सुरू होती. तसेच माजिवाडा आणि कापूरबावडी भागातही कोंडी झाली होती. 00000

 शौचालय नूतनीकरणाच्या कामात थुकपट्टी 

कंत्राटदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा मनविसेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांचे आयुक्तांना पत्र   ठाणे : शौचालय नूतनीकरणाच्या २ कोटींच्या कामात शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन केली आहे. माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत मागासवर्गीय निधी तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शौचालय नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या संदर्भात पत्र दि. 21 मार्च 2024 रोजी माजिवाडा – मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनाही दिले आहे. पत्र देऊन तीन महिने होत आले तरी अद्याप कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका परिमंडळ 3 च्या उपायुक्तांना तीन वेळा भेटूनही सदर विषय सांगितला असता त्यांनी आमच्यासमोर तीन वेळा फोन करुन कार्यकारी अभियंता संजय कदम यांना सदर विषयात लक्ष घालण्याचे सांगितले परंतू संजय कदम यांनी उपायुक्त यांना देखील जुमानले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार भेटून, फोन करुन निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत माहिती दिली होती परंतु त्यांनी देखिल दुर्लक्ष केले. अशा प्रकरणांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा सतत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांसोबत मैत्रीचे संबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे हेमंत मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. कंत्राटदारांने फक्त बाहेरुन रंगरंगोटी करून शौचालय नूतनीकरण झाल्याचे भासवले आहे. निविदेत दिलेली बरीचशी कामे कंत्राटदाराकडून करण्यात आलेली नाहीत. जुन्या दरवाजांना अर्धवट रंग देऊन नविन दरवाजे असल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढी थूकपट्टी करुन अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, त्यामागचे कारण काय? तरी आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी केली आहे. 00000

 ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची तपासणी होणार

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत. ‘ते ३३ जाहिरात फलक काढून घ्यावेत’ महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्या इमारतींवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले आहेत. पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. त्यास, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत सांगितले. अतिधोकादायक इमारतीबाबत दक्ष राहावे अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ०७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. इतर प्रभागातील ०८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. 00000

प्रोजेक्ट आत्मनिर्भर’ क्रांतीकारी ठरणार-संदीप माळवी

अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या छत्र्यांची विक्री सुरु   ठाणे : रस्त्यावर निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचे काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल. सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार, असा आत्मविश्वास ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी येथे व्यक्त केला. समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल. प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी केले. जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, ऍड. ईश्वर सूर्यवंशी,  ऍड. प्रदीप टिल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील विविध सिग्नलवर वस्तू विकून चरितार्थ चलविणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड इंटरप्राइजेसच्या अंध, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचसोबत विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेसकोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील करण्यात येत आहे. अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले आहे. ही उत्पादने सिग्नल शाळा व तीन हात नका सिग्नल येथे उपलब्ध असतील. 000000

मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक  निरीक्षक  नजीब मुल्ला यांनी दिली.तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष लक्ष्य साधण्याकरिता पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबाबतीतला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत आहे. मुंब्रा कळवा विधानसभा क्षेत्रातील माझे सहकारी माजी नगरसेवक यांच्या मागणीनुसार हा ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झाली आहे. इथल्या आमदारांकडून विकासाच्या नावाखाली मागील काहीवर्षात पीए व ठेकेदार यांच्या मागणीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा प्रसिद्धी माध्यमांनीच प्रसिद्ध केला आहे. पण आम्ही मात्र नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नागरी विकास कामांमार्फत देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, महायुतीच्या राज्य शासनाकडून उपलब्ध ५० कोटी निधीचा उपयोग होणार आहे. मुंब्रा कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कौसाच्या पुढील लोकवस्ती आठी, वाय जंक्शन च्या पुढेल लोकवस्तीसाठी वनखात्याच्या जागेवर केंद्र सरकारने मंजूर केलेले आणखीन एक कब्रस्थान बनविण्यात येईल, कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक  निरीक्षक  नजीब मुल्ला यांनी दिली. तर प्रभाग क्रमांक ३२ पॅनलसाठी ५ कोटी, प्रभाग क्रमांक ३३ पॅनलसाठी ७. ६० कोटी रुपये, मिराज खान व आशरीन राऊत यांच्या पॅनलसाठी ६ कोटी रुपये, अजिज शेख व जाफर नोमानी प्रभाग क्रमांक ३० पॅनलसाठी ८.४० कोटी रुपये, मोरेश्वर किणे आणि इतर यांच्या प्रभाग ३१ पॅनलसाठी ६ कोटी रुपये, अनिता किणे व विष्णू भगत २६ पॅनलसाठी ८.५ कोटी रुपये, प्रकाश बर्डे प्रभाग क्रमांक २५ पॅनलसाठी ७.२० कोटी रुपये, याप्रमाणेच उद्यान, सुशोभीकरणसाठी ७ कोटी रुपये, दिवा येथील २९ नंबर पॅनलसाठी २५ लाख रुपये अशापद्धतीने या ५० कोटीच्या निधीचे विकास कामांसाठी वितरण केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानत आहे. डंकेकी चोटपर सच्चेपणाने काम करत आहोत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मागणीनुसार, लोकांमध्ये जावून, लोकांना विचारुन, लोकशाही पद्धतीने विकास कामांसाठी प्रभागनिहाय हा ५० कोटीचा निधी खर्च होणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा, प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर नईम खान, माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, माजी नगरसेवक राजू अन्सारी, अजीज शेख, इब्राहीम राऊत, मोरेश्वर किणे, मिराज खान, विश्वनाथ भगत तसेच तकी चेऊलकर, प्रभाकर सावंत, मनिषा भगत, राजनाथ यादव, जसबीर शेख, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध खेळाकरिता मुख्यमंत्री ५० कोटींचा निधी देणार-  प्रताप सरनाईक

एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवरील अनिल ठाणेकर   ठाणे : बोरीवडे येथील मैदानावर पी.पी.पी. तत्वावर उभारण्यात येणार्या कन्व्हेंशन सेंटर व स्पोर्टस् क्लब मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर स्थलांतरीत करण्यात यावे. येथील विविध खेळ खेळण्याकरिता या मैदानाचा उपयोग क्रीडापट्टूना करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असून त्याची लवकरच पुर्तता होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून या परिसरामध्ये अनेक नविन क्रिडापट्टू राहावयास आलेले आहेत. तसेच कित्येक लहान मुले ही वेगवेगळ्या क्रीडाक्षेत्रात पारंगत होण्यासाठी कासारवडवली येथील बोरीवडे मैदानाचा सरावासाठी वापर करीत असतात. मला मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ऍथलेटिक स्पर्धकांनी ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन ’या मैदानावर ऍथलेटिक ट्रॅक , बास्केटबॉल, हॉलीबॉल तसेच शिवाजी पार्कच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धांसाठी वापर करावा“, अशी मागाणी केली असून क्रीडा विभागाने त्याबाबतचा प्रस्तावही तयार केल्याचे समजते. घोडबंदर परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी २० एकरामध्ये असलेल हे एकमेव मैदान असून या मैदानाचा वापर क्रीडापट्टूना होणे गरजेचे आहे. बोरीवडे मैदानातील २० एकर जागेच्या सभोवताली कुंपन भिंत, सुसज्य प्रवेशद्वार त्याचबरोबर क्रीडापट्टूना एम.सी.ए.च्या धर्तीवर इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, बॅटमिंटन, हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, स्कॉश कोर्ट, मॅटवर खेळला जाणारा कुस्तीचा आखाडा, मुष्टियोध्दांसाठी आखाडा, मल्लखांब, मॅटवरची कबड्डी, खो-खो, लाँग टेनिस कोर्ट, यासह मैदानाच्या सभोवताली ऍथलेटिक्स खेळाडूंसाठी तीन मीटरचा सिथेंटिक ट्रॅक अश्या प्रकारचे विविध खेळ खेळण्याकरिता या मैदानाचा उपयोग क्रीडापट्टूना करता यावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असून त्याची लवकरच पुर्तता होणार आहे. त्यामुळे सर्व खेळांना प्राधान्य देणारे घोडबंदर परिसरातील हे एक अद्ययावत क्रीडा संकुल होईल यात शंका नाही.त्याचबरोबर भविष्यातील विकासाच्या दृष्टीने व विविध मोठमोठ्या व्यावसायिकांकरिता तसेच क्रीडापट्टूकरिता गोरेगाव येथील नेस्को, वरळीतील डोम यासारख्या कन्व्हेंशन सेंटर तसेच बीकेसी येथील स्पोर्टस् क्लब प्रमाणे ठाणे शहरामध्ये सुध्दा या सुविधा देणे गरजेचे आहे. त्याकरिता मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर बीकेसी येथे असलेल्या एम.सी.ए.च्या धर्तीवर क्रिकेट क्लब व कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी व एम.एम.आर.डी.ए.च्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे आपण बोरीवडे येथील पी.पी.पी. तत्वावर उभारण्यात येणारा प्रकल्प मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर स्थलांतरीत करून ऍथलेटिक तसेच विविध क्रीडा प्रकारात पारंगत असलेल्या क्रीडापट्टूना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांन केली आहे. ०००००

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) परिसरात  गुरुवार  दि. 27/06/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दि. 28/06/2024 रात्री 12.00 वा. पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी . ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ०००००

सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत 22 किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे :  ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्ड व ठाणे महानगरपालिका प्रदुषण विभागाच्यावतीने सदरची कारवाई सुरू असून आज माजिवडा मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 9.5 किलोक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत एकूण 22 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर सोमवारी (24/6/2024) वर्तकनगर प्रभागसमितीअंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लॅस्ट‍िक जप्त करण्यात आले. तर ‍विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16500/- रुपये दंड वसूल करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकूण 22 किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करुन 39000 हजार रु. इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकच्या प्रदुषण विभागाने दिली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागसमितीअंतर्गत प्रतिबंधीत प्लॅस्टिकबंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले. 00000 बुध्दिबळ दिनानिमित्त २० जुलैपासून आयडियल बुध्दिबळ महोत्सव मुंबई: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदा आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा-महोत्सव  २० व २१ जुलै दरम्यान आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आला आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना  सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कार आणि एकूण १५० पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय क्रीडा चळवळीच्या व्यस्ततेमुळे  प्रदीर्घ कालावधीनंतर खास खुल्या  गटातील बुद्धिबळपटूच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्वांसाठी खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे २१ जुलै रोजी ३० चषक आणि एकूण  रोख रु.४१,०००/- पुरस्कारासह  आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार व चषक दिला जाणार आहे. तसेच एकूण १२० चषक पुरस्कारासह विविध ८ वयोगटाच्या बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी होणार आहेत. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत  स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २९ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.