Category: ठाणे

Thane news

जुनी पेन्शन योजनेला अधिवेशनात मंजूरी- निरंजन डावखरे

शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी अनिल ठाणेकर     ठाणे : १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती लावून महाराष्ट्रातील व कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारा, त्यासाठी आवाज उठविणारा व फाॅलोअप घेऊन प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून निरंजन डावखरे ओळखले जातात, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. तर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून ना. रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आ.निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, भरत चव्हाण, एकनाथ भोईर, राधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे, शिवाई विद्यालयाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण, आर जे ठाकूर काॅलेजचे विश्वस्त मंगेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला ठाणे परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. निरंजन डावखरे यांनी गेल्या १२ वर्षातील आमदारकीच्या कारकीर्दीत प्रत्येक अधिवेशनात हजेरी लावून वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती नोंदविलेली आहे. तसेच प्रत्येक अधिवेशनात महाराष्ट्रातील,  कोकणातील व ठाण्यातील जनतेचे प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आवाज उठविलेला आहे. हे प्रश्न नुसते मांडून ते थांबले नाहीत तर सतत संबंधित विभागातील अधिकारी व मंत्री यांच्याकडे सतत फाॅलोअप घेत प्रश्न सोडविण्यासाठी निरंजन डावखरे हे सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहिलेले आहेत.अशा कार्यशील उमेदवाराला निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बळावर नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकी २५ मतदारांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी, मतदान होईपर्यंत मतदारांशो सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे मतदानाच्या वेळेस त्यांना बुथपर्यंत नेण्याची व्यवस्था करणे, मतदान कसे करावे याची सततची माहिती देणे, मतदान बाद होणार नाही याची काळजी घेणे या पाच गोष्टीवर लक्ष दिल्यास निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्याने निश्चित निवडून येतील अशी आशा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर निरंजन डावखरे हे संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यार्थी यांचे प्रश्न सातत्यपूर्ण मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोकणाने महायुतीला विजयाचा मार्ग दाखविलेला आहे. यामुळेच कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार ठाणे लोकसभेतील खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. सागरी, नागरी व डोंगरी अशा कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदारसंघ पसरलेला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यारथी यांचे विविध प्रश्न गत दोन टर्म मध्ये मार्गी लावण्यात आले आहेत. व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी आवश्यक जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरें यांनी व्यक्त केला. ०००

डोंबिवली उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर 

कल्याण : महावितरणच्या डोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत करण्यात आले आहे. उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश आहे. गणेश मंदिरच्या मागे, पंडित दिनदयाल रोड, कैलास भुवन बिल्डींग जवळ, डोंबिवली (पश्चिम) ४२१२०२ या नवीन पत्त्यावर शुक्रवारपासून (२१ जून) ही चारही कार्यालये कार्यान्वित होत आहेत. सध्या ही कार्यालये नाखे एव्हरेस्ट हाऊस, हॉटेल द्वारकाच्या वर, तीसरा मजला, रेल्वेस्टेशन जवळ, डोंबिवली पश्चिम येथे भाडयाच्या जागेत कार्यरत आहेत. संबधित ग्राहकांनी या नवीन बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा

आंबेडकरवादी अध्ययन सवर्धन समितीचा इशारा   ठाणे : अनुसूचीत जाती जमतीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येयांर्‍य परदेशी शिक्षण शिष्यवृतीत राज्य शासनाने बादल करून जाचक अटींचा समावेश केला. यामुळे अनुसूचीत जातींच्या सवलती…

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ :अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेली गटबाजी वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून पुन्हा एकदा समोर आली आहे. या गटबाजीकरून काही दिवसांपूर्वी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून दोन्ही गटांचे कान टोचले होते. मात्र त्यानंतरही काहीही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे. अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचे उघडपणे प्रदर्शन झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकासकामे करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून गटबाजी समोर आली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ३ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी वरिष्ठांनी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. – लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये येणार असल्याची कल्पना असताना देखील बैठकीच्या ठिकाणी शहराध्यक्षांचा फोटो एका गटाने डावळला होता. त्यावरून समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. – आढावा बैठकीत फोटो वरून वाद निर्माण झालेला असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली होती तसेच पदाधिकाऱ्यांना देखील सज्जड दम देण्यात आला होता. – वाळेकर गट आणि आमदार किनीकर गट यांच्यात आता मोठ्या प्रमाणात वाद वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 0000

कल्याण पूर्वेतील दावडी गावातील बेकायदा इमारतीवर हातोडा

भर पावसात भुईसपाट करण्याची कारवाई   कल्याण : कल्याण पूर्वेतील दावडी गावात महापालिकेच्या विकास आराखड्यामधील रस्त्यामध्ये उभारण्यात आलेली एक चार माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मंगळवारपासून सुरू केली आहे. या इमारतीवर आत्ताच कारवाई केली नाहीतर माफिया ही इमारत सात माळ्याची करून तिचा निवासी वापर सुरू करू शकतात. त्यामुळे ही इमारत पाऊस सुरू असला तरी भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली. दावडीतून पालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता गेला आहे हे माहिती असूनही भूमाफिया शेजूळ यांनी दावडी येथे चार माळ्याची बेकायदा इमारत उभी केली. शेजूळ यांनी विकास आराखड्यात बेकायदा इमारत उभारली असल्याच्या तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्य्क आयुक्त मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. मुंबरकर यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माफिया शेजूळ यांना इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटिस बजावली. विहित मुदतीत ते कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी शेजूळ यांची इमारत अनधिकृत असल्याचे घोषित केले. या बेकायदा इमारतीमधून घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी भर पावसात ही इमारत भुईसपाट करण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले आहे. या इमारतीचे स्लॅब क्रॅकरने तोडल्यानंतर या इमारतीचे सिमेंटचे खांब पोकलेनच्या साहाय्याने तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. या कारवाईने दावडी भागातील भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आय प्रभागात गेल्या वर्षभरात भुईसपाट करण्यात येणारी ही सहावी बेकायदा इमारत आहे. दावडी गावात विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारत उभारल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशाने ही इमारत जमीनदोस्त केली जात आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण. 0000

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे –  पी. वेलरासू

ठाणे : अशोक गायकवाड विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या मतदारसंघात २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात आज मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, पालघर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कोकण विभागाचे उपआयुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, रेवती गायकर, सत्यम गांधी आदी यावेळी उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीचे हे पहिले प्रशिक्षण होते. यावेळी गायकवाड यांनी मतमोजणीसाठी करावयाची तयारी, मतपत्रिका कशा मोजाव्यात, त्यांची वैध-अवैधता कशी तपासावी, वैध मतांचा कोटा कशा प्रकारे तपासावे, किती फेऱ्या होणार आदी माहिती दिली. तसेच रानडे यांनीही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी, डेटा कसा भरावा आदींची माहिती दिली. वेलरासू यांनीही मार्गदर्शन करून म्हणाले की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली आहे. तसेच यंदा मतदानाची वेळ वाढविण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया वेगळी असणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने मोजणी प्रक्रियेची व्यवस्थित तयारी करावी व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व बिनचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार आसावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले. 0000

रिक्षा, टॅक्सी चालकांनाही आता ग्रॅच्युईटी मिळणार !  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट  मुंबई :  रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  ग्रॅच्युईटीसाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना फक्त वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा  मुख्यमंत्री शिंदेंनी केली…

‘जेईई आणि नीटच्या प्रशिक्षणासाठी 30 जूनपर्यंत अर्ज द्या’

 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई -100 व नीट-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता 11 (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला 30 टक्के, दिव्यांग  5 टक्के, अनाथ 1 टक्के, वंचित 5 टक्के जागा आरक्षित असतील. प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 24 महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात 75 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000/- एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.5000/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/06/2024 आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

केवळ एक रुपयात शेतकऱ्यांनी भात, नाचणी पिकांचा विमा उतरावा- अंकुश माने

ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा काढण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै, 2024 आहे, अशी माहिती कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे. खरीप हंगाम २०२४ करीता पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही श्री. माने यांनी कळविले आहे. ठराविक पिकांकरिता अधिसूचित असणाऱ्या महसूल मंडळामधील शेतकरी त्या पिकाचा विमा उतरवू शकतील. ठाणे, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस.जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 51760/-, रत्नागिरी जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 50000/-., ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा नाचणी पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 20000/-., पालघर जिल्हा उडीद पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 25000/- ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामी अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तींचा अधिन राहून निश्चित केली जाईल. खरीप हंगाम 2024 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै, 2024 अशी आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, सहकारी पतसंस्था, पीक विमा अँप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीक विमा अर्ज दाखल करता येईल. शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. माने यांचे मार्फत करण्यात येत आहे. 0000

कोकण पदवीधर मतदार कर्मचाऱ्यांसाठी 26 जून रोजी नैमित्तिक रजा – अशोक शिनगारे

ठाणे :  विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 26 जून 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मर्यादीत स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. 000000