Category: ठाणे

Thane news

पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर पालिका अ‍ॅक्शन मोडवर!

चार अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम केले सुरू उल्हासनगर : एकीकडे महानगरपालिकेने 336 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या शक्यतेची दक्षता घेऊन उल्हासनगरातील 4 अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम करण्याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कॅम्प 1 ते 5 परिसरातील प्रभागनिहाय 336 घोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्द केली आहे.सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक आयुक्त यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ज्या अतिधोकादायक इमारती मागच्या वर्षी खाली करण्यात आल्या होत्या,ज्या राहण्यास अयोग्य आहेत अशा प्रभाग समिती 4 च्या हद्दीतील 4 इमारतींचे पाडकाम आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सुरवात केली आहे.मिनर्व्हा पॅलेस अपार्टमेंट,हिललाईन पोलीस् स्टेशन जवळ,रुपानी महल अपार्टमेंट,प्रभाराम मंदिरासमोर,गंगासागर अपार्टमेंट,सेवक बेकरीसमोर,पवनधाम अपार्टमेंट,कैलास कॉलनी, स्मशान भूमीसमोर ही पाडकाम करण्यात येत असलेल्या अतिधोकादायक इमारतींची नावे असल्याची माहिती सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.

दिव्यातील नालेसफाईच्या कामांना मुहुर्त नाहीच

आमदार राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर ठाणे : पावसाळा जवळ आला असतांना आजही ठाणे शहरातील विविध भागात नाले सफाईच्या कामांच्या गंगाटळ्या सुरुच असल्याचे चित्र आहे. तिकडे दिवा भागात आजही नाले सफाईच्या कामांना मुहुर्तच सापडला नसल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे राजू पाटील यांनी मंगळवारी येथील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी हे विदारक चित्र त्यांच्या निर्दशनास आहे. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धारेधर धरले. तर नालेसफाईच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांना यंदाही उशीराने सुरवात झाली. त्यात ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावा महापालिकेने केला आहे. सद्यस्थितीत ७० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. परंतु त्यानंतरही नालेसफाईच्या कामांना वेग आला नसल्याचेच चित्र दिसत आहे. दिव्यात नालेसफाईबरोबरच गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहेत. मनपा कडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केला जात असल्याने नागरिकांनी स्वखचार्ने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र पावसाळा जवळ आला असताना दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे. दिव्यात कोणत्याही प्रकारे नाले सफाईच काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाले सफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.  यावेळी त्यांनी दिवा शिळ रोड, साबे गाव, मुंब्रा कॉलनी, दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतली आहे. यावेळी ठाणे मनपाला अद्याप नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. तर यावेळी सहाय्यक आयुक्तांनी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.  यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आणि उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

‘कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे’

आनंद परांजपे यांचे आव्हान ठाणे :  पुणे अपघात प्रकरणी अजित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे व राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही जितेंद्र आव्हाड हे खोटे आरोप करीत आहेत. उलट अजित पवार यांनी आव्हाडांच्यासाठी दोन-दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात. जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे बंद करावे, असेही ते यावेळी म्हणाले. माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजित पवार साहेब यांनी आपल्यासाठी ज्यावेळी ३५४ गुन्हा दाखल झाला. त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता, की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता, चौकशी न करता आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा कसा दाखल केलात ? हे आपण विसरलात का ? हरहर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला, आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनने अचानकपणे नेले होते, त्यावेळी देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबध जोडण्याचे काम आव्हाडांकडून केले जात असल्याचेही ते म्हणाले. मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे चुकीचे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी मतुस्मृतीचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलणार आहेत की, अशाप्रकारे मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे हे चुकीचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा विरोधच करेल असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. पुण्यात झालेल्या घटनेनंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरु झाली आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाईचा दट्या दिला जात आहे. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये विकासकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही कार भरधाव चालवून दुचाकीवरून जाणाºया तरूण-तरूणीला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, ढाबे सुरू आहेत. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवणे अशांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मद्य विक्री करण्याचा परवाना असलेल्या परंतु नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हॉटेल, बार विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

पुराची सूचना देणाऱ्या सेन्सरमुळे आपत्ती व्यवस्थापन होणार प्रभावी

महापालिका क्षेत्रातील सहा सेन्सरची देखभाल ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेसर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा प्रभावी वापर करण्याची सूचना ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) या वातावरण बदल क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे. पावसाळापूर्व आढावा बैठकीत या सेन्सर्सच्या स्थितीची चर्चा झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार, मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे, पूर स्थिती, पाणी साठणे आदींचा सामना करणे यंत्रणेला शक्य होते. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

३१ मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात आनंद नगर येथील नाले सफाईचे काम आयुक्त राव यांनी पाहिले. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचे काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनतर, रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याची सफाईचे काम आयुक्त यांनी पाहिले. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणे आव्हानात्मक असले तरी ते काम व्यवस्थित केले जावे, अशी सूचना यावेळी त्यांनी दिली. त्यानंतर, वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कोरम मॉल लगतच्या नाल्याची मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो. तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या पाहणी दौऱ्यात, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारी उपस्थित होते.

पनवेलमधील माता-बाल संगोपन केंद्राला मुहूर्त मिळेना

सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब; आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली पनवेल ः पनवेल महापालिकेकडून नवीन पनवेल नोड-आसूडगाव हद्दीमध्ये साडेचारशे खाटांचे माता-बाल संगोपन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्‍णालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब झाल्‍याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्‍याचे बोलले जात आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर शासकीय रुग्णालय नाही. परिसरात सद्यःस्थितीत सुमारे आठ लाख लोकवस्ती असून दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती केंद्र अपुरे पडत असल्‍याने अनेक गर्भवतींना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. खांदा वसाहतीलगत आसूडगाव सेक्टर १८ मध्ये भूखंड क्रमांक ८अ आणि ८ ब येथे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड जिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने राखीव ठेवला आहे. येथे पनवेल महापालिकेने १०० खाटांचे माता  संगोपन व बाल आरोग्य केंद्र करण्याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीमध्ये या ठरावाला तीन वर्षांपूर्वी मंजुरीही देण्यात आली. हा प्रस्ताव आरोग्य संचालनालयाला पाठवण्यात आला होता, त्‍यानंतर त्‍या काही सुधारणा करण्यात आल्‍या. रुग्णालयांच्या खाटांमध्ये आणखी ३५० खाटांची वाढ करण्यात आली आहे. त्‍यानुसार बांधकाम आराखडाही बदलण्यात आला आहे. अतिशय भव्य  स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या केंद्रात विविध सोयी-सुविधा प्रस्तावित आहेत. हिरकणी या नावाने हा वैद्यकीय उपक्रम साकारला जाणार आहे. गतवर्षी अर्थसंकल्पात प्रशासनाने आरोग्यावर विशेष भर देत माता बाल संगोपन केंद्रासाठी निधीची तरतूदही केली होती. मात्र पनवेल महापालिकेला सिडकोने वेळेत भूखंड हस्तांतरित केला नाही. त्यामुळे हा आरोग्य आणि वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडे जागा वर्ग करण्यात आली आहे. मात्र सध्या आचारसंहित लागू असल्याने याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेचा रौप्य महोत्सव

कल्याण : महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने गणेश घाट आगार या ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात सत्यनारायणाची महापूजा तसेच आरोग्य शिबिर आणि छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी परिवहन कर्मचारी ज्ञानेश्वर रहाणे यांच्या संकल्पनेतून पंचवीस किलोचा केक केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते कापण्यात आला. याप्रसंगी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहनचे अधिकारी कार्यालय अधीक्षक प्रिया निगडे, किशोर घाडी, तृषार्त मुळीक, प्रमोद बागुल, दीपक चौधरी, भारत सांगळे, मच्छिंद्र कणसे, संदीप दलाल, प्रशांत जावळे, गंगाधर राठोड, गौरख पवार तसेच सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या दोन्हीकडून पावसाळ्यातील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३१) असे पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. परिणामी शहरात चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे आधीच पाण्याची मागणी वाढत असताना होत असलेल्या शटडाऊनमुळे शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर, तर एमआयडीसीकडून ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. या दोन्ही स्रोतांकडून सुमारे दोनशे लिटर पाणी मिळत असले तरी शहराची दैनंदिन पाण्याची गरज २२५ ते २३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच ३० ते ३५ तासांनी पाणी मिळते. यात एकाही स्रोताकडून पाणीपुरवठा खंडित झाला, तरी शहरात पाणीटंचाई निर्माण होते. आता तर स्टेम, एमआयडीसी या दोघांकडून पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी (ता. २९) सकाळी ९ ते गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, तर एमआयडीसीचा पाणीपुरवठा काही तासांच्या अंतराने म्हणजेच गुरुवारी (ता. ३०) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ३१) रात्री बारा वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होणार आहे. स्टेम प्राधिकरणाचा पाण्याचा उद्‍भव शहाड, टेमघर येथे आहे, तर एमआयडीसीचा पाण्याचा उद्‍भव बारवी धरण आहे. या दोन्ही स्रोतांपासून मिरा-भाईंदर शहर हे सुमारे ८० किमी लांब असून पाणीपुरवठ्यासाठी तेवढ्या लांबीची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाचा पाणीपुरवठा खंडित झाला, तरी जलवाहिनी पाण्याने पूर्ण भरून पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस नागरिकांना पाणी कमी दाबाने व उशिराने तर मिळतेच; शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून ३० ते ३५ तासांवरचा पाणीपुरवठा ६० ते ७० तासांवर जातो. आता दोघेही लागोपाठ शटडाऊन घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. खासगी टँकरचे उखळ पांढरे तीव्र पाणीटंचाईचा खासगी टँकरमालकांना मात्र चांगलाच लाभ होणार आहे. शहरात पाचशे ते सातशे लिटर पाणी देणारे छोटे, तसेच दहा हजार लिटर पाणी देणारे टँकर कार्यरत आहेत. शिवाय या पाण्याची गुणवत्ता काय असते, याबाबतही शंका व्यक्त होत असते; मात्र शहरातील पाणीटंचाईदरम्यान हेच पाणी घेण्यावाचून नागरिकांपुढे दुसरा पर्याय नसणार आहे. विविध कारणाने शटडाऊन रखडले वास्तविक एमआयडीसीकडून घेण्यात येणारा शटडाऊन गेल्या आठवड्यात शुक्रवारी घेण्यात येणार होता; मात्र आयत्या वेळेस तो रद्द करण्यात येऊन या आठवड्यात घेण्यात येणार आहे. एमआयडीसीचा शटडाऊन गेल्या आठवड्यात झाला असता, तर नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला असता. दुसरीकडे स्टेम प्राधिकरणाचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा शटडाऊन घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र काही ना काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हे दोन्ही शटडाऊन एकाच आठवड्यात काही तासांच्या अंतराने एका पाठोपाठ घेण्यात येत आहेत.