Category: ठाणे

Thane news

नाल्यावरील गाळ्याची भिंत पडली

सुदैवाने जीवितहानी नाही   ठाणे : लोकमान्य पाडा नं. ३ या भागातील लाकडीपुलाजवळील नाल्यावर असलेल्या गाळ्याची भिंत पडल्याची घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने गाळे बंद असल्याने कोणत्याही स्वरुपाची जिवीतहानी झाली नाही. मात्र या गाळ्याच्या बाजूला असलेले तीन गाळे देखील धोकादायक झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील चारही गाळे तोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री १.०२ वाजताच्या सुमारास लोकमान्य पाडा नं. ३ येथील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या अमित म्हात्रे यांच्या दुकानाच्या गाळ्याची भिंत नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने रात्रीच्या सुमारास गाळे बंद असल्याने जिवीतहानी टळली आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर यंत्रणांनी धाव घेत, परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु ज्या गाळ्याची भिंत पडली होती. त्या गाळ्याच्या बाजूला असलेल्या इतर गाळयांची स्थिती देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील चारही गाळे तोडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर नाल्यात पडलेले डेब्रीज आणि नाल्याच्या आजूबाजूला पडलेले डेब्रीज देखील काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यापूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून नाल्यावरील व नाल्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही नाल्यावरील रहिवासी स्थलांतरीत झालेले दिसून आलेले नाही. त्यामुळे आता प्रभाग समिती निहाय सर्वच ठिकाणांच्या नाल्याशेजारील व नाल्यावरील बांधकामांचा सर्व्हे केला जाणार असून जे अतिधोकादायक स्थितीत असतील त्यांना स्थलांतरीत करण्याच्या सुचना देण्यात येतील अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. तरी देखील रहिवासी स्थलांतरीत झाले नाही तर महापालिका त्यांनी तेथून स्थलांतरीत करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील तब्बल ३० ठिकाणी दरड कोसळण्याची भीती

 महापालिका बजावतेय केवळ नोटीस   ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २०२० मध्ये दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची यादी ही २६ च्या आसपास होती. त्यानंतर २०२१ पासून ही संख्या १४ वर आली होती. मात्र यंदा पावसाळा सुरु होत असतांना ही संख्या थेट ३० वर गेली आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांना संबधींत प्रभाग समिती मार्फत केवळ नोटीस बजावण्याची कारवाई केली जात आहे. मात्र याठिकाणी राहणाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असेही पालिकेने सांगितले आहे. दुसरीकडे येथील घरे देखील रिकामी करण्यास रहिवासी तयार होत नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना दरवर्षी पावसाळ्यात दोन ते तीन घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा देखील पालिकेने सुरवातीला यादी जाहीर केली होती. त्यात पूर्वीचीच म्हणजेच १४ ठिकाणेच होती. मात्र आता पालिकेने पुन्हा सर्व्हे करुन सुधारीत यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ही ठिकाणे आता तब्बल ३० एवढी झाली आहेत. याचाच अर्थ आधीच्या यादीत १६ ठिकाणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून कळवा प्रभाग समिती हद्दीत दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. तसेच मुंब्रा भागातही अशा प्रकारच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसीद्वारे सुरक्षितेची हमी मात्र पालिकेने दिलेली नाही. पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास महापालिका त्याला जबाबदार असणार नसल्याचे पालिकेने सांगत आपले हात यातून झटकल्याचे दिसत आहे.दरम्यान, येथील रहिवासी देखील ऐन पावसाळ्यात कुटुंब घेऊन कुठे जाणार असे सांगत घरे रिकामी करण्यास तयार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने जाहीर केलेली सुधारीत यादी महापालिकेने जाहीर केलेल्या सुधारीत यादीत वागळे प्रभाग समिती – ०४, वर्तकनगर – ०१, माजिवडा मानपाडा – ०३, कळवा – ०७, मुंब्रा – १५ आदी भागांचा यात समावेश आहे. याचाच अर्थ कळवा आणि मुंब्य्रातच दरड कोसळणाऱ्या ठिकाणांचा अधिक समावेश असल्याचे या यादीवरुन स्पष्ट होत आहे. ००००

काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’!

 मुख्यमंत्र्यांचा दावा   ठाणे : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरविले. त्यामुळे नक्षलवाद केवळ गडचिरोलीत नसून शहरी नक्षलवादी काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरले आहेत, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. ठाण्यात टीप टॉप प्लाझा येथे कोकण पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराकरिता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात अनेक संस्था चांगले काम करत आहेत. पण, काही संस्था सरकारविरोधात आहेत. अशा संस्था आणि महाविकास आघाडी खोटे कथानक लोकांपर्यत पोहचवण्यात यशस्वी ठरली. यामुळे डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आता आली आहे. लोकसभा निवडणुकीत चारशेचा आकडा पार होणार म्हणून कार्यकर्ते आरामात राहिले आणि तेच निवडणुकीत आम्हाला भोवले, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांच कोकणवासीयांनी तडीपार केले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याना लगावला. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळाले. येथील सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या. भिवंडीची जागा मिळू शकली नसून इथे काय घडले हे सर्वांनाच माहीत आहे. मुंब्रा येथे जे झाले, तेच भिवंडीत झाले, असे फडणवीस म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अभिजीत पानसे यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे आभारही मानले. शहरी नक्षली असलेल्या संस्थांनी पंतप्रधानांना हटविण्याचा नारा दिला. मात्र विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. त्यामुळे या संस्थांची चिंता आता वाढली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 00000

डोंबिवलीतील पुष्कर ब्याडगीला एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के

डोंबिवली : डोंबिवलीतील रहिवासी असलेला पुष्कर विनय ब्याडगी या विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या राज्यस्तरिय एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळविला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातून पुष्करने आपले शिक्षण घेतले आहे. डोंबिवली पश्चिमेतील माॅडेल इंग्लिश स्कूलमधून पुष्करने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राॅयल ज्युनिअर महाविद्यालयातून त्याने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकीतून पुढील शिक्षण घ्यायचे नक्की असल्याने त्या दिशेने अभ्यास केला. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंंडळाच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांचे वाचन केले. तसेच एमएच-सीईटीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. याशिवाय खासगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याने आपणास हे यश मिळाले आहे, असे पुष्करने सांगितले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या जेईई (मुख्य) परीक्षा आपण दिली होती. या परीक्षेत आपणास ९९.०७ टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळाले आहेत. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर गुणवत्तेच्या यादीत आपण २०८ वे आहोत, असे पुष्करने सांगितले. या गुणांच्या आधारे आपण मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहोत. आपण नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन केले. खेळामध्ये आपणास बॅडमिंटन आवडते. त्यामुळे त्याचा सराव नियमित करतो. पुष्करचे वडील डोंबिवलीत नेत्ररुग्ण चिकित्सक आहेत. आई गृहिणी आहे.

सिग्‍नल शाळा झाली हरित शाळा

ठाणे : शिक्षण हे सामाजिक बदलाचे साधन आहे हा विचार बाळगून आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍यानिमित्‍ताने सिग्‍नल शाळेने अभिनव उपक्रम राबविला असून शाळा परिसरात जवळपास तीन हजार रोपे लावून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे रूप दिले आहे. वृक्षरोपनासोबतच शाळेतील ओला कच-याचे खत व सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठीच्‍या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्‍यात आला. लायन्‍स क्‍लब ऑफ मांडवी इस्‍ट, ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या सहकार्याने हरित शाळा उपक्रम राबविण्‍यात आला आहे. तीन हात नाका परिसर हा ठाण्‍यातील सर्वांधिक वाहनांची वर्दळ असलेला परिसर आहे. वाहनांच्‍या धुराने व धुळीने होणारे प्रदुषण कमी व्‍हावे तसेच पुलाखाली असलेल्‍या शाळेतील मुलांना हवा प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्‍हणून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे स्‍वरूप देण्‍यात आले आहे. शाळा परिसरात मुंबई व ठाणे दिेशेला असलेल्‍या दोन्‍ही रस्‍त्‍यावर ‘व्‍हर्टीकल गार्डन’ची निर्मिती करण्‍यात आली आहे. या व्‍हर्टीकल गार्डनमध्‍ये जवळपास तीन हजार रोपांची लागवड करण्‍यात आली असून यामुळे वाहनांच्‍या आवाजाचा त्रास कमी होऊन हवा प्रदुषण देखील रोखले जाणार आहे. व्‍हर्टीकल गार्डन सोबतच शाळाच्‍या आवारात, वर्गखोल्‍याच्‍या बाहेर मोठया प्रमाणावर कुंडयाची आरास केली आहे. यामुळे प्राण वायुचा पुरवठा देखील वाढणार आहे. हरित शाळेतील रोपांची देखभाल करण्‍यासाठी विदयार्थ्‍यांचे प्रशिक्षण घेण्‍यात आले असून या माध्‍यमातून जीवशास्‍त्राचे प्रत्‍यक्ष ज्ञान मुलांना अनुभवता येणार आहे. रोप लागवड, बोन्‍साय निर्मिती, एका रोपापासून अनेक रोपे तयार करणे, कुंडीतील निगा व देखभाल याचे देखील प्रशिक्षण या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विदयार्थ्‍यांना दिले जाणार आहे. ‘माझी वसुंधरा व स्वच्छ भारत’ अभियानाचा भाग म्हणून ठाणे महानगरालिकेच्यावतीने संपूर्ण शहारात  हरित शहर व कचरा मुक्त शहरासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील शाळा हरित व कचरा मुक्त व्हाव्यात यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याला प्रतिसाद म्हणून ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेने हरित व कचरा मुक्त शाळेचा हा उपक्रम राबविला आहे. रोप लागवडी सोबतच रोपांना कायम उत्‍तम दर्जाचं खत पुरवठा व्‍हाव म्‍हणून शाळेत तयार होण्‍या-या ओल्‍या कच-यापासून खत निर्मिती करण्‍याचा उपक्रम सुरू करण्‍यात आली असून खत निर्मितीचे काम देखील विदयार्थ्‍यांच्‍या सहकार्याने केले जाणार आहे. ओल्‍या कच-यासोबत कच-याचे वर्गीकरण करणे, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्‍तू बनवणे, सुका कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या प्रकल्‍प पुनर्निमाण या सुका कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या प्रकल्‍पास पाठवून शाळा ‘शून्‍य कचरा’ करण्‍यात आली आहे. सिग्‍नल शाळेने रस्‍त्‍यावरील निर्वासित मुलांच्‍या शिक्षणाला हिरवा सिग्‍नल दिला. लायन्‍स क्‍लबने हा वसा पुढे नेत शाळा हरित करण्‍याचा उपक्रम राबविला याबद्दल क्‍लबच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा व निधीदात्‍या चंदा कारटेला यांचे लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा यांनी कौतुक केले. यावेळी समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले, लायन शांती सावला सह लायन्‍स क्‍लबचे सदस्‍य उपस्थित होते.  पाटील इंटरप्रायजेसचे संकेत पाटील व प्रवीण जाधव यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा, लायन्‍स क्‍लब मांडवी इस्‍टच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा, या उपक्रमासाठी ज्‍यांनी अर्थसहाय्य केले त्‍या लायन चंद्रा कारटेला, समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.

६७२ नागरिकांनी घेतला दाखल्यांचा लाभ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबीरात ६७२ नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे ६७२ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे,  मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसीन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बने, सुनिल पाटील, पल्लवी गिध, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज चेऊलकर, संदीप शिंदे, नासीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे 1000 हजार विद्यार्थ्यांना वह्यांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम   ठाणे : आई-बा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 मधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट मिळाली आहे. ज्युनियर…

भाजपा आमदाराचा पुन्हा हिंदू राष्ट्राचा नारा

भिवंडी : भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा नारा दिला. भाजपाला लोकसभेत चारशेपारचा विजय मिळाला असता तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते असेही टी. राज सिंह…

खासदारकीच्या कारकि‍र्दीत भिवंडीत १० वर्षांत एकही दंगल नाही

कपिल पाटील यांचे चोख प्रत्युत्तर, विधानसभा निवडणुकीत एकत्र मतदानासाठी आरोप   भिवंडी : भिवंडीतील एकही मुस्लिम नागरिक माझ्यावर दंगल घडविण्याचा आरोप करणार नाही. खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत भिवंडी शहरात एकही दंगल झालेली नसून, हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहे. दंगलीबाबत विधाने करीत मुस्लिमांची दिशाभूल करून लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकत्र मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता व्यक्त करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. तसेच हिंदू धर्म सभा व संत संमेलनाचा कार्यक्रम हा सकल हिंदू समाजाचा असून, नवीननवीन लोकप्रतिनिधी झालेल्या लोकप्रतिनिधींना विजय पचनी पडत नाही. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला लगावला. भिवंडी तालुक्यातील पडघा येथे शनिवारी सायंकाळी संत संमेलन व हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. त्याला तेलंगणचे आमदार टी. राजा सिंह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे कपिल पाटील फौंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले असून, भिवंडीत दंगली घडविण्याचा डाव आहे, असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला होता. या आरोपांना कपिल पाटील यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. या संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाने केले आहे. परंतु, कपिल पाटील फौंडेशनला ही संधी मिळाली असती, तर भाग्यवान समजलो असतो, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. यापूर्वी २०१५ मध्ये कामतघर येथील वऱ्हाळदेवी तलावालगत टी. राजा सिंह यांची सभा झाली होती. त्यानंतर भिवंडीत दंगल घडलेली नव्हती. गेल्या दहा वर्षांत हिंदू मुस्लिमांबरोबरच सर्व समाज व जातीबांधव गुण्यागोविंदांने राहत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मुस्लिमांचे एकत्रित मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शक्यता श्री. कपिल पाटील यांनी व्यक्त केली. हिंदू धर्माच्या जागृतीबाबत आयोजित केलेल्या संमेलनाला विरोध केला जात आहे. टी. राजा सिंह यांची सभा घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला. अशा प्रकारे संत-महंतांचा अपमान शिवसेना उद्धव ठाकरे गट सहन करणार आहे का. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिमानाने हिंदूत्व सोडले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेच्या भिवंडीतील अनुयायांना हा प्रकार मान्य आहे का, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणार का, असे आव्हान माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. अनधिकृत बांधकामांबाबत वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात आला. सुरेश म्हात्रे यांनी स्वत: आपल्या बांधकामांसाठी स्थगिती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या बांधकामांना माझे संरक्षण होते का? भिवंडी अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करावयाची असल्यास, स्वतचा जेसीबी घेऊन स्वत:ची अनधिकृत बांधकामे पाडावीत, असे आव्हान कपिल पाटील यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवे धोरण आणल्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण खासदार झाल्यावर पहिल्याच दिवशी या शेतकऱ्यांच्या मुलांचे उत्पन्न बंद करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका श्री. कपिल पाटील यांनी केली. सुरेश म्हात्रे यांच्याकडून केल्या जाणारे निराधार आरोप सहन केले जाणार नाहीत. याप्रकरणी कायदेशीर दावा दाखल केला जाईल, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला. भिवंडीत पोलिसाला मारहाणीकडे केले दुर्लक्ष लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी शहरात दिवसांपूर्वी पोलिसाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी सुरेश म्हात्रे कोठे होते. त्यावेळी ते पुढे का आले नाहीत, असा सवाल कपिल पाटील यांनी केला.

जिल्ह्यात प्रवेशोत्सवनिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत जिल्ह्यातील सर्व शाळा आज (दि. १५ जून २०२४ ) सुरू झाले असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांनी शाळा भेट दिली आहे. भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शाळा वैजोळा, केंद्र शिवनगर येथे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, गोड पदार्थ, पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिल्या दिवशी जसे सर्वांनी हजेरी लावली तसेच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत उपस्थित रहावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले. आज प्रवेशोत्सव निमित्ताने शासकीय शाळेत गावातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहात ही खरी आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे यासाठी पालकांनी विशेष सहकार्य करावे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे. आहार आणि आरोग्य उत्तम राहिल्यास शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना लागेल. जंक फूड न खाता विद्यार्थ्यांनी उत्तम आहार घ्यावा. शाळा छोटी असून देखील शाळेतील शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६० विद्यार्थीं या शाळेत शिक्षण घेत आहेत. आज शाळा सुरू होत असून शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यीं, पालक, शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी यांनी केले. प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळा भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल अर्चना पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी संजय असवले, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अनिल कुऱ्हाडे, शाळेचे शिक्षक यमुना मिटकरी, अर्चना पाटील, पालक, ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.