Category: ठाणे

Thane news

कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा बंद

प्रवासी उकाडा, घामाने हैराण कल्याण : कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवासी लोकलच्या डब्यात बटाट्यासारखे उकडून निघत आहेत. उकाड्यामुळे बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलला आता पसंती देत आहेत. डब्यात घुसल्यानंंतर काही क्षणात प्रवाशांना डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांचा संताप होत आहे. अगोदरचा उकाड्याने नागरिकांचा घामटा निघाला आहे. सकाळची वेळ असली तरी उकाडा प्रवाशांची पाठ सोडत नाही. सकाळची वेळ असूनही घाम पुसून पुसून प्रवाशांंचे रुमाल ओलेचिंब होत आहेत. अशा परिस्थितीत वातानुकूलित लोकलमधून मस्त समाधानाने प्रवास करून या विचाराने या लोकलमध्ये चढून मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे प्रवासी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद राहत असल्याने संताप व्यक्त करत आहेत. वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा सुरू आहे की नाही हे लोकल सुरू करण्यापूर्वी कारशेडमध्ये तपासले जाते की नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. कल्याणमधून सकाळी सुटणारी वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सकाळी नऊ वाजता येते. ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेपूर्वी पोहोचत असल्याने बहुतांशी प्रवाशांची या लोकलला पसंती असते. गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी या लोकलमध्ये चढत आहेत. लोकलमध्ये चढल्यानंतर काही डब्यांमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास येत आहे. शीत यंत्रणा बंद असेल तर प्रवाशांना डब्यामध्ये सूचना करणारे एक लाल बटन आहे. ते दाबल्यानंतर मोटरमन, गार्डकडून त्याची दखल घेतली जाते. हे सूचना बटन दाबूनही त्याची मोटारमन, गार्डकडून दखल घेतली जात नाही, असे डोंबिवलीतील एक प्रवासी तुषार साठे यांनी सांगितले. एकदा वातानुकूलित लोकलमध्ये चढल्यानंंतर पुन्हा ती लोकल सोडून दुसऱ्या लोकलमध्ये चढणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे कोंडमारा करत, गुदमरत प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांंना अती उकाड्यामुळे डब्यात अस्वस्थ वाटू लागले की ते पुढील रेल्वे स्थानकात उतरत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. प्रवासी वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतात. पण दरवाजेही उघडत नसल्याने जीव गुदमरत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी सोशिक आहेत, असे समजून वातानुकूलित लोकलमधील बिघाड नाही काढला तरी चालेल असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा, रेल्वे प्रवाशांच्या उद्रेकाला एक दिवस रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

‘डोंबिवलीतील उद्योजक म्हणजे शासनाला कल्हईवाले वाटले का?’

डोंबिवलीतील उद्योजकांचा संतप्त सवाल डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान रासायनिक कंपनीत स्फोट झाला आहे. कामगारांचा नाहक जीव गेले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. आजुबाजुच्या कंपन्या बेचिराख झाल्या आहेत. याचे दुःख सर्वच उद्योजकांना आहे. आता स्फोटानंतरची सर्व परिस्थिती सुव्यवस्थित होण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील आहेत. या चिंताग्रस्त वातावरणात डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी डोंबिवली एमआयडीसीतील सर्वच उद्योजकांना कंपनी स्थलांतर संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या करून ती पत्र तात्काळ एमआयडीसी कार्यालयात जमा करण्याचे फर्मावले आहे. हा प्रकार पाहून डोंबिवलीतील उद्योजकांनी आम्ही म्हणजे कल्हईवाले आहोत का? असा संतप्त सवाल केला आहे. अमुदान कंपनी आणि परिसरातील रासायनिक कंपन्यांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तेथे अग्निशमन, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांंना उद्योजक सूचना करतील त्याप्रमाणे काम बचावाचे काम करावे लागते. चौकशी अधिकारी उद्योजकांना बोलावून काही अत्यावश्यक माहिती घेत आहेत. ही सर्व धावपळ सुरू असताना डोंबिवली एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी उद्योजक म्हणजे चोर समजून, ते उद्या कंपन्या सोडून पळून जातील या भावनेतून आम्ही आमची कंपनी स्थलांतरास तयार आहोत की नाही, अशा आशयाचे एमआयडीसीचे शीर्षक नसलेले, तळाला कोणत्याही जबाबदारी अधिकाऱ्याचे स्वाक्षरी नसलेले संमतीपत्र उद्योजकांना देऊन त्यावर तातडीने स्वाक्षऱ्या करून ते पत्र एमआयडीसी डोंबिवली कार्यालयात जमा करण्याचे फर्मान काढले आहे. अटींमुळे उद्योजक हैराण कंपनीच्या नावावर जलमापक करायचे असेल तर ते मुद्रांक शुल्कावर हवे. कंपनी प्रायव्हेट असेल तर संचालक मंडळाचा ठराव हवा. फॅक्टरी प्लान असुनही बीसीसी द्यायला दिव्य करावे लागते. संमतीपत्राची घाई करताना ते कोणाकडून पाठविले गेले आहे. पाठविणाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का त्या पत्राखाली नको का, असे प्रश्न उद्योजकांनी केले आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांवरील बेकायदा इमले तोडायची हिम्मत एमआयडीसी अधिकाऱ्यांमध्ये नाही. उद्योजक काही बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर दबाव आणि भूमाफिया बळाचा वापर करतात त्यांच्या समोर शरणागती. हे दुटप्पी धोरण अधिकाऱ्यांनी सोडावे, असा इशारा उद्योजकांनी दिला आहे. उद्योजकांकडून तातडीने स्थलांतराची संमतीपत्रे घेताना जशी जबरदस्ती केली जाते. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी औद्योगिक भूखंडांवरील बेकायदा निवासी इमले तोडण्यासाठी तेवढीच ताकद लावावी म्हणजे एमआयडीसीतील एक मोठा प्रश्न मार्गी लागेल, अशी भूमिका उद्योजकांनी मांडली.

“बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा”

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर तातडीने कारवाई सुरू करा. या कारवाईत कोणीही पोलीस अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला. पुणे येथील एका धनाढ्याच्या मुलाने दोन संगणक अभियंत्यांना मद्यसेवन करून वाहन चालविताना उडविले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत परिमंडळ हद्दीत बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्सबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करावी. कोणीही अधिकारी या कारवाईत कुचराई करत असेल, याची माहिती मिळाल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डुंबरे यांनी दिला. रात्री उशिरपर्यंत नृत्यगाणी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी परिसर, कल्याण शिळफाटा, नेवाळी, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अधिक संख्येने डान्सबार आहेत. काही ठिकाणी पब्ज, बेकायदा हॉटेल्स, ढाबे आहेत. ढाब्यांवर चोरून मद्य विकले जाते. या ढाब्यांना शासनाची परवानगी नाही. डान्सबार बंद असताना ते रात्री उशिरापर्यंत चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याविषयी ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत असे समजते. पोलीस मुख्यालय, परिमंडळातील काही पोलीस अधिकारी वरिष्ठांचे ‘कलेक्टर’ म्हणून परिसरात काम करतात. ते अधिकारी या बेकायदा उद्योगांची पाठराखण करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. असे जुने ‘कलेक्टर’ शोधून आयुक्त डुंबरे यांनी या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालय किंवा नियंत्रण कक्षात पदस्थापना देण्याची मागणी काही पोलीस अधिकारीच करत आहेत. अशा ‘कलेक्टर’ अधिकाऱ्यांची एक यादीच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी वर्षानुवर्ष पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असून त्यांची काही वरिष्ठांशी संबंध असल्याने या विषयावर उघडपणे बोलण्यास कोणीही अधिकारी तयार नाही. आता या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बार अशा बेकायदा व्यवहारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर या अधिकाऱ्यांची यादी आयुक्त डुंबरे यांना देण्याच्या विचारात काही पोलीस अधिकारी आहेत. कल्याण परिमंडळातील एका वरिष्ठाचा एक कलेक्टर अन्य भागात बदलीने गेला. पण वरिष्ठाने अथक प्रयत्न करून त्या ‘कलेक्टर’ची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून घेऊन आपले कार्य अबाधित चालू राहिल याची काळजी घेतल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपा आग्रही

 माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ठाणे : घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत. त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकामध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत जाहिरातीला आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली. काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी अनधिकृत व धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे. घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आला आहे, याकडे आयुक्त राव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी. तसेच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी. तसेच भविष्यात होर्डिगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावीत, अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संजय भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

डोंबिवलीतील कंपनीच्या स्फोटात ९४१ मालमत्तांचे नुकसान

डोंबिवली : डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटामुळे किती नुकसान झाले याचे पंचनामे करण्यात आले असून एकुण ९४१ मालमत्तांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात झालेल्या एक ते दोन किलोमीटर…

ठाण्यातील जिजाऊ अभ्यासिकेतील आदिवासी मुलांचे उज्वल यश

ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात चालणार्‍या १० अभ्यासिकांतील येऊरच्या आदिवासी पट्टयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये येऊरच्या अभ्यासिकेतील…

कल्याणहून होणार ‘कांगा  लिग’ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

ठाणे  : मुंबईत होत असलेल्या  प्रसिद्ध कांगा लिग क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच कल्याणमध्ये खेळाडूंची निवड होणार आहे. कांगा लिग क्रिकेट स्पर्धेत खेळणा-या खेळाडूंना पुढे जाण्याची संधी असते. या नामांकित स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक होतकरू क्रिकेटपटू कायम उत्सुक असतात. यंदा प्रथमच कल्याण परिसरातील क्रिकेट खेळाडूंची निवड कल्याण मध्येच होणार आहे. शुक्रवार दिनांक ३१मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. युनियन क्रिकेट ॲकडमी , पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे ही निवड प्रक्रिया होणार आहे. कांगा लिग ‘फ’  क्रिकेट टीम निवडीसाठी वयाची कोणतीही अट नाही. तरी इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन युनियन क्रिकेट ॲकदमीचे तुषार सोमाणी यांनी केले आहे.

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन – जितेंद्र आव्हाड

ठाणे : अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महिना १५ लाखांची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचे ऑफिस कसे चालणार असा सवालही केला जात आहे. याशिवाय निवडणुकीसाठी अनाधिकृत बांधकामाचे पैसे काहींना हवे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले नंतरही आजही कळवा, मुंब्य्रात ही बांधकामे उभी राहत असल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या दोन दिवसात कळवा, मुंब्य्रात सध्या सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकामांची यादीच सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. कळवा गावात, व्यायामशाळेशेजारी कोणाची बांधकामे सुरु आहेत, त्याचीही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बांधकामे राजरोसपणे केली जात असल्याचेही ते म्हणाले. चंदा दो और धंदा लो अशी परिस्थिती आहे. त्यात ठाणे महापालिकेचे सर्वच अधिकारी सहभागी आहेत. यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  तत्काळ निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र ती कारवाई होणार नसल्याचेही ते म्हणाले. एकूणच अनाधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्याचे काम सुरु असून कळवा, मुंब्रा बकाल करण्याचा मनसुबा आखला जात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या अनाधिकृत बांधकामा संदर्भात एसआयटी लावून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. अनधिकृत बांधकामांना ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग जवाबदार असल्याचा आरोप ही आव्हाड यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही ही बांधकामे उभीच राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील पुन्हा बांधकामे उभी राहत असून त्याकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.

पदवीधर-शिक्षक निवडणूक, मतदार नोंदणीसाठी आज अंतीम मुदत – अमोल यादव

ठाणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही मंगळवार, २८ मे २०२४ असून हे अर्ज पदनिदर्शत ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन स्विकारले जातील अशी उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नामनिर्देंशपत्रे  शुक्रवार दिनांक ३१ मे, २०२४ स्विकारली जातील. ही नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 7 जून, 2024 ही अंतिम मुदत राहील. बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रमासाठी २४ मे २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि. २८ मे, २०२४ पर्यंत https://gterollregistration.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज  स्विकारले जातील. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.