Category: ठाणे

Thane news

‘मतदारांना बाहेर काढा, अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल’

विनोद तावडे यांचा इशारा ठाणे : मतदारांना जास्तीत जास्त संख्येने बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार करावा लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे. प्रत्येक नगरसेवकाने किती मतदारांना बाहेर काढले, त्यांच्या प्रभागातून उमेदरावाला किती मतदान झाले, याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार केला जाईल असा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी विनोद तावडे यांनी भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाअधिक मताधिक्य कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्वाच्या सुचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही दिसून आले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती, ठाण्यात आपली ताकद वाढली असतांना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचे असा सुरही काही जणांनी लावला. मात्र, आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचे असल्याचे सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रत्येक माजी नगरसेवकाने, पदाधिकाऱ्याने आप-आपल्या भागातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचे असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे, कमी मतदान झाले तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? या बाबत विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

शहरातील नाल्याची ६८ % सफाईचा पालिकेचा दावा

वसई-विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी ड्रेन मास्टर यंत्राचा वापर विरार : वसई विरार मधील नाले सफाईचा विषय पावसाळ्यात शहरात पाणी भरल्यावर दरवर्षी चर्चिला जात असतो . त्यामुळे यावेळी पालिकेने शहरातील नाल्यांच्या सफाईसाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री मागवूनत्या द्वारे नाले सफाईल सुरुवात केली आहे. वसई विरार महापालिकेने शहरातील नाल्यांची सफाई करण्यासाठी ड्रेन मास्टर ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली असून त्याद्वारे नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पोकलेन मशीन किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची यंत्रसामुग्री वापरणारी दिल्ली नंतरची वसई विरार ही दुसरी महानगरपालिका ठरली आहे.पालिकेने आता पर्यंत ६८ % नाले सफाई झाल्याचा दावा केला आहे. सध्या वसई विरार महापालिकेकडून शहरातील नाल्याची साफसफाई करण्यात येत आहे. त्यासाठी ९ प्रभागात नालेसफाईचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजपर्यंत एकूण ६८% नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. ड्रेन मास्टर यंत्रांला उभयचर प्रकारचे यंत्र असे म्हणतात. हे यंत्र पाण्यावर तरंगून तसेच जमिनीवरून किंवा ड्राय नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम करते. या ड्रेन मास्टर नावाच्या एका यंत्राची किंमत १ लाख ७४ हजार असून पालिकेने १५ व्या वित्त आयोगातून ३ लाख ४८ हजारांची दोन ड्रेन मास्टर यंत्रे विकत घेतली आहे. याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, नाल्यांमधील गाळ यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी आम्ही ड्रेन मास्टर या यंत्राचा वापर करत आहोत. हे यंत्र कॉम्पॅक्ट स्वरूपाचे असून त्यामुळे नाल्यातील गाळ पूर्णपणे काढून टाकला जात आहे. दलदलीच्या भागात व जास्त पाण्याचा ठिकाणी हे यंत्र चेन स्प्रॉकेटने सहज काम करत आहे. या यंत्रामध्ये गाळ गोळा करण्यासाठी विशेष प्रकारची बीन्स यंत्रावरच उपलब्ध करून दिलेली आहेत, यामुळे ज्या नाल्यांच्या धक्क्यावर इमारती आणि घरे आहेत अशा ठिकाणी नाले साफ करणे खूप शक्य झाले आहे. या यंत्रामुळे हायड्रॉलिक लेग आणि काही गाळ वाहत्या पाण्यात अडकल्यामुळे, यंत्र पाण्यात स्थिर करून ते काढले जात आहे. शहरात सघ्या नालेसफाईचे काम जोरात सुरू असून या यंत्रांच्या माध्यमातून नालेसफाई अधिक परिणामकारक होत आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (घनकचरा) नानासाहेब कामठे यांनी दिली. दिल्ली महापालिकेत या ड्रेन मास्टर यंत्राचा वापर करून नालेसफाई केली जात आहे. दिल्ली नंतर अशा यंत्राचा वापर करणारी वसई विरार ही दुसरी महापालिका ठरली आहे.

शंभर क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक

उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीकडून उल्हासनगर : शहरातील क्षयरोग रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी किंबहूना त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता निक्षय मित्राची भूमिका निभावणाऱ्या उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीने तब्बल 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेतले आहेत. या सर्व रुग्णांना पोषक आहाराचा पुरवठा व्हावा या सकारात्मक उद्देशाने कंपनीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे उल्हासनगर मेडिकल असोसिएशन यांच्या नावाने 3 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. सेंच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी हा धनादेश आयुक्त अजीज शेख यांना सोपवला असून यावेळी उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,क्षयरोग अधिकारी सत्यम गुप्ता,हानगरपालिका आरोग्य विभागाच्या पब्लिक प्रायव्हेट समनव्यक संगीता मगर,क्षयरोग विभागाच्या ममता कामरानी आदी उपस्थित होते. महानगरपालिका कडून दरवर्षी क्षयरोग रुग्णांची शोधमोहिम राबिवली जाते.वर्षाला सरासरी दिड हजार क्षयरुग्ण आढळतात.त्यापैकी 86 टक्के रुग्ण औषधोपचार केल्यावर बरे होतात.तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते. राष्ट्रपतींनी ०९ सप्टेंबर २०२२  रोजी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानाची सुरुवात केलेली आहे.त्यात निक्षयमित्राच्या माध्यमातून क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती,प्रति महिना आवश्यक धान्य,कडधान्य,डाळी,तेल इत्यादी पोषक आहार देण्याचे प्रयोजन आहे.सहा महिन्याच्या पोषक आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. सेंच्युरी रेयॉन कंपनीने निक्षय मित्र बनून आणि 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक घेऊन स्तुत्य काम केले आहे.या सर्व रुग्णांना 6 महिन्याचे पोषक आहाराचे किट देण्यात येणार आहे. अशाचप्रकारे शहरातील क्षयरुग्णांना पोषक आहाराचा फायदा होण्याकरिता जास्तीत जास्त निक्षय मित्रांनी तयार व्हावे व अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग घ्यावा असे आहावन आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांनी उल्हासनगरकरांना केले आहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षी अजीज शेख यांनी सुद्धा निक्षय मित्र बनून 10 क्षयरुग्ण दत्तक घेतले होते.

आदिवासींना मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्या, अन्यथा बहिष्कार घाला- अनिल भांगले

आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन ठाणे : पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे. या मतदानामध्ये मुरबाड,  शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आदिवासींची मतसंख्या मोठी आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडून आदिवासी समाजाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे; अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी केले आहे. अनिल भांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, मुरबाड,  शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. या भागातील आदिवासींच्या जमिनींवर धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. कल्याण, मुरबाड, मलंगगड परिसर, शहापूर, भिवंडी भागातील अनेक वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा पोहचविण्यात शासनाला यश आलेले नाही. पाणी, आरोग्य,  शिक्षण आदी सुविधा आदिवासींना मिळत नाहीत. याबाबत अनेक उमेदवारांनी आपल्या  जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही. आदिवासी वाड्या वस्त्यांवर उमेदवार जाण्यास तयार नाहीत. म्हणजेच, आदिवासींचा विकास करण्याबाबत कोणतेही धोरण आखले जात नाही. एकूणच अनेकांनी आदिवासींना गृहीत धरले आहे. त्यामुळेच आता जे उमेदवार आदिवासी समाजाला मानसन्मान देतील, अशाच उमेदवारांना मत द्यावे. अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन अनिल भांगले यांनी केले.

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्प पत्राचे अनावरण

कल्याण : सलग १० वर्ष यशस्वी खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन आज पत्रकार परिषदेत सादर केले. यात मतदार संघातील रेल्वे स्टेशनलगत ट्रॉमा सेंटर, रेतीबंदर ते कल्याणपर्यंत कोस्टल रोड, अँक्सेस कंट्रोल फ्रिवे, इंटर्नल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी संकल्प पत्रात दिले आहे.ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने पूर्ण केली. कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा ८०० कोटींचा प्रकल्प होत आहे. यामुळे मेल एक्सप्रेस, लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल. खारेगाव, दिवा, ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिम येथील रेल्वे फाटक बंद झाले आहेत. त्यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होऊन कल्याण ते कुर्लापर्यंत शटल सेवा सुरु करणे शक्य होईल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा शटल सेवा, दिवा वसई मार्गावर लोकल सेवा, कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यातील तिसरी मुंबई कल्याण परिसरात होणार असून पुढील पाच वर्षात येथे पायाभूत सुविधांचा नियोजनबद्धपध्दतीने विकास केला जाईल, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याणमध्ये मेट्रो १२ चे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर बदलापूरपर्यंत मेट्रो १४ ला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विठ्ठलवाडी ते शहाड हा ब्रीज करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये यूटाईप रोड, इतर शहरात पार्किंग प्लाझा सुरु केले जातील, असे आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. उल्हासनगरातील २०० बेड्सचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरु करणे, स्पोर्ट्स स्टेडियम, महिलांसाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच सुरु होणार आहेत. कल्याणमध्ये एम्सच्या धर्तीवर हॉस्पिटलची मागणी करण्यात आली असे ते म्हणाले. अंबरनाथमधील यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र इतर शहरादेखील सुरु करण्यात येतील. मतदार संघातील सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. अंबरनाथमध्ये आयटीआयचे आधुनिकीकरण करणे, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी अंतरलीमध्ये महा हब मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरु करण्यात येईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये टाटा इन्स्टीट्युकडून २०० कोटींचा निधी मिळाला असून तेथे सेंटर फॉर एक्सलन्स सुरु केले जाणार आहे. २०१४ मध्ये अडीच लाख आणि २०१९ मध्ये साडे तीन लाखांच्या मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले. सलग दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिल्याबद्दल डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम केल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याणमध्ये मागील १० वर्षांत झालेल्या विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांच्या कौतुकाची थाप मिळाल्याने आणखी आत्मविश्वास वाढला असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या `नमो नम: वचननामा’ चे प्रकाशन

अनिल ठाणेकर  ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या `नमो नम: वचननामा’ चे प्रकाशन गुरुवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे, शिवसेना प्रवक्ते राहूल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाइंचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. `वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे’ अशा शिर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या पाच वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांचा वाचनाम्यात संकल्प मांडला आहे. जलद, सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणे, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, कळवा- ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे, लोकल फेऱ्या वाढविणे, १२ डब्यांची लोकल १५ डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, सर्व रेल्वे स्थानके स्मार्ट करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणे, मीरा भाईंदर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे वाचन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर येथे ४० हजार प्रेक्षक संख्येचे फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरातील कोंडीमुक्त, वेगवान प्रवासासाठी विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. ठाणे – बोरिवली हे अंतर २० मिनिटात पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित बोगद्याच्या कामाला चालना देणार आहे. प्रवास वेगवान होण्यासाठी मेट्रो ४ आणि ४ अ चे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळ ते संपूर्ण नवी मुंबई शहराच्या मेट्रो कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी वचननाम्यात दिले आहे. ठाणे हा देशातील पहिला झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रगत आणि स्मार्ट शहरांची भरारी अंतर्गत ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर शहरांचा सुनियोजित विकास करून या महापालिकांना जागतिक स्तरावर पोहोचविणे, पर्यावरण संवर्धन आणि प्रदुषणमुक्ती अंतर्गत शहरांचे ४० टक्के ग्रीन कव्हर वाढवून ते ६० टक्के करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विकास करताना आणि वारसा जपताना ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे स्थलांतर करून ऐतिहासिक वारशाचे जतन केले जाणार आहे. तसेच ऐतिहासिक संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवस=ष्टी उभारणार आहे. घोडबंदर येथे फिल्मसिटी उभारण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. मीरा-भाईंदरच्या समृद्धीसाठी समाजोत्थान योजना राबवली जाणार आहे. या महत्त्वाच्या वचनांप्रमाणेच नियोजन शहराचे, नागरिकांच्या हिताचे करत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटला (टीओडी) चालना दिली जाणार आहे.  वॉकिंग स्ट्रीट, सायकल ट्रक उभारणीला प्राधान्य दिले जाणार असून मतदारसंघात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता स्वतंत्र धरण उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  उद्योग-रोजगारांना वाढते बळ, नवी मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न आणि इतर अनेक कामे करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी वचननाम्यात नमूद करून २० मे रोजी धनुष्यबाण समोरील बटण दाबून आपणाला विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

26 मे ते 31 ऑगस्ट  या कालावधीत जलयानाना समुद्रात जाण्यास प्रतिबंध

ठाणे : पावसाळी हंगामात दि. 26 मे ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदणीकृत जलयानाना समुद्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रविण खरा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळी हंगामात दरवर्षी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सर्व बंदरांमधून जलयानांना समुद्रात जाण्यापासून बंदी घालण्यात येते. यावर्षीही दि. 26 मे ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोणतीही जलयाने समुद्रात घेऊन जाऊ नयेत, असे आवाहन श्री. खरा यांनी केले आहे. यासंदर्भात मंडळाच्या अखत्यारीतील सर्व बंदर कार्यालयांना कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

ठाण्यात प्रचाराचा धडाका

ठाणे  पुढील तीन दिवस ठाणे लोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली यांचा धडाका असणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच…

तुमची स्वप्ने हाच माझा संकल्प

 पंतप्रधान मोदींचे जनतेला शब्द कल्याण : तुमची स्वप्ने हाज मोदींचा संकल्प आहे, येत्या ४ जूननंतरही याच ताकदीने आणि मेहनतीने मी काम करणार, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमधील सभेत जनतेला दिला. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा…

गर्दीचे तुफान

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्यासाठी भाजपाने आज मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शोला आज गर्दीचे तुफान आले होते. मोदींची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी घाटकोपर…