Category: ठाणे

Thane news

मनसेचा झाला श्रीकांत शिंदेंना फायदा, पाटीलांनी दिलेला शब्द पाळला !

कल्याण : कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या या हॅट्रीक मध्ये कल्याण ग्रामीणचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते आहे. केवळ या एका विधानसभा क्षेत्रातून शिंदे यांनी 1 लाख 51 हजार मते मिळविली आहेत. 2019 च्या तुलनेत यंदा 5 टक्क्यांनी मतदान येथे जास्त झाले असून त्याचाच फायदा शिंदे यांना झाला आहे. मनसेचे पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर खासदार शिंदे यांच्या विजयासाठी आमदार पाटील प्रयत्न करत होते. मनसेचा आधीचा असलेला प्रखर विरोध पाहता मनसे साथ नक्की देईल ना ? असे बोलले जात होते. मात्र शंका घ्यायची गरज नाही मनसे काम करणार हा शब्द पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर खासदारांना दिला होता आणि तो खरा करुन दाखविला असल्याचे आता बोलले जात आहे. कल्याण लोकसभेचा निकाल जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवित त्यांनी आपला विजय संपादन केला आहे. खासदार शिंदे यांचा 2 लाखांच्या फरकाने विजय झाला असला तरी त्यांना अपेक्षित असे मताधिक्य मिळविता आलेले नाही. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पावणे चार लाख मते मिळवित या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाची ताकद शिंदे गटाला दाखवून दिली आहे. तर शिंदे गटास येथे विजय मिळवून आणताना मोठी कसरत करावी लागली आहे. ही विजयश्री खेचून आणण्यात मनसेचा मोठा हातभार असून कल्याण ग्रामीणच्या मतांनी शिंदे यांना तारले असल्याचे बोलले जात आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शिवसेनेस दिले. आमदार पाटील आणि खासदार शिंदे यांच्यामध्ये 2014 च्या निवडणूकीपासून वैर होते. मात्र ते राजकीय वैर असून वैयक्तीक कोणतेच मतभेद आमच्यात नाही. पक्षप्रमुखांचा आदेश असून त्यानुसार आम्ही शिंदे यांच्यासाठी काम करणार असे पाटील नंतर वारंवार सांगत असत. कल्याण लोकसभेत मनसेच्या पाठिंब्याशिवाय कोणाचाही खासदार होऊ शकत नाही असं मनसे आमदार राजू पाटील यांनी माध्यमांसमोर ठणकावून सांगितलं होतं. यानंतर मनसेने देखील कल्याण लोकसभेची तयारी सुरू केली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर मनसे आणि शिवसेनेची मन काही काळातच जुळलेली कल्याण लोकसभेत दिसुन आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजू पाटील यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि डॉ.शिंदेंची आमदार पाटील यांच्याशी असलेली मैत्री यशस्वी झाली आहे.

ग्रामीण परिसरात बहुरुपी कलावंतांची भटकंती

कासा : अनेक बहुरूपी कलावंत पोटापाण्यासाठी राज्याच्या अनेक गाव-खेड्यात येऊन आपली कला सादर करून रोजगार मिळवतात. सध्या डहाणू तालुक्यात अनेक बहुरंगी कलावंतांची संख्या वाढली असून अमरावती जिल्ह्यातील चंदरखेडा येथील पाच ते सहा कलावंत विविध प्रकारच्या बहुरूपी कला सादर करून आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. डहाणू, पालघर तालुक्यातील अनेक गाव-खेड्यामध्ये हे कलावंत आले आहेत. कोणी विदूषक, यम, राक्षस, पोलिस, जादूगार, पक्षी यांची रूपे घेत अजूनही गाव-खेड्यात पारंपरिक प्रथा जपणारे नागरिक आहेत. घरासमोर आलेल्यांना दान दिले जाते. यात अनेक महिला शिधा, काही पैसे, कधी साडीचोळीसुद्धा दान करतात. बहुरूपी कलावंतांची कला सध्या फार कमीजण जोपासत असून ती लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे रवींद्र खेडकर या कलाकाराने सांगितले. या बदलत्या काळात अजूनही विविध कलावंत या कला जपून आहेत. पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या कलेला राजाश्रय दिला होता. विविध गुप्त बातम्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाई. सध्या इंटरनेट, मोबाईलच्या या युगात बहुरूपी कलेकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत, पण पारंपरिक कला आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असे हे कलाकार सांगत आहेत. आम्ही असे प्रयत्न कला दाखवण्यासाठी करत आहोत, पण आमची पुढची पिढी या क्षेत्रात उतरण्यास तयार नाही. सध्या दररोज गाव-खेड्यात भटकंती करत पाचशे रुपये मिळतात, पण या महागाईच्या ते पुरेसे नाहीत. सरकारने देखील आमच्यासाठी काहीतरी मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी सांगितले.

दादरमध्ये सांगीतिक मैफल

प्रभादेवी : दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शुक्रवारी  रात्री ८ वाजता एकेएस क्रिएशन्स आणि रघुलीला एंटरप्रायझेस आयोजित ‘मेलोडिज ऑफ द मास्टर्स’ या आगळ्यावेगळ्या सांगीतिक मैफलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन यांना मानवंदना देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध गायिका केतकी भावे जोशी, सारेगमप लिटील चॅम्प स्वरा जोशी, गायक डॉ. जय आजगावकर, नचिकेत देसाई गाणी सादर करतील. कार्यक्रमाचे आरेखन कमलेश भडकमकर यांनी केले आहे; तर आदित्य बिवलकर, अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होत आहे. सागर साठे वाद्यवृंद संयोजन करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अॅकॉर्डियन वादनाची झलकसुद्धा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. झंकार कानडे, दीप वझे, विजू तांबे, किशोर नारखेडे, आर्चिस लेले, नीलेश परब, हनुमंत रावडे, सिद्धार्थ कदम यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. अधिकाधिक रसिकांनी या सांगीतिक मैफलीत सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजीत जोशी यांनी केले आहे.

रुग्णालयातील सोयीसुविधा, औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही – सौरभ राव

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, उपायुक्त (आस्थापना) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत, नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च यांचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले. वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमतावृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, पार्किंग प्लाझामधील  उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा त्यासाठी डीन आणि अधिक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तत्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव  यांनी दिले.रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतूक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रमुख श्री. एन. चंद्राबाबू नायडू यांची घेतली सदिच्छा भेट.

जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्र्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटले !

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे डाॅ. श्रीकांत शिंदे हे निवडणूक जिंकले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटलेले आढळून आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार व मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डाॅ श्रीकांत शिंदे हे ५ लाख ८७ हजार ९२१ मते मिळवून विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली राणे-दरेकर यांना ३ लाख ७९ हजार २३६ मते मिळाली. म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना दरेकर यांच्यापेक्षा २ लाख ८ हजार ६८५ मते अधिक मिळून ते निवडून आले. पण आमदार जितेंद्र आव्हाड प्रतिनिधीत्व करत असलेल्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात मात्र वैशाली दरेकर यांना १ लाख ३५ हजार ४९६ मते मिळाली तर श्रीकांत शिंदे यांना अवघी ६९ हजार ९८८ मते मिळाली. म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा ६५ हजार ५११ चे मताधिक्य मिळवून दिली. अंबरनाथमध्ये ३५ हजार ६४२, उल्हासनगरमध्ये ५४ हजार ७५७, कल्याण पूर्व ३२ हजार ५९६, डोंबिवली ६५ हजार २०३, कल्याण ग्रामीण ८६ हजार २९५ या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. कळवा मुंब्र्यात राहूल गांधी यांची झालेली दुसरी भारत यात्रा, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा रोड शो, शरद पवार यांनी घेतलेली सभा महत्वाचे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली मेहनत या सर्वांचा परिणाम  वैशाली दरेकर यांचे मताधिक्य वाढण्यात तर श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटण्यात झाले आहे.

खासदार नरेश म्हस्के अॅक्शन मोडवर 

ठाणे रेल्वे स्थानकाची केली पाहणी राडारोडावरून रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर ठाणे : दनवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडेल्या राडारोडावरुन खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच फलाट क्रमांक ५ च्या रुंदीकरणाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहर  शहरप्रमुख  हेमंत पवार, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत पाटील, ठाणे मनपा परिवहन समिती सभापती विलास जोशी, योगेश जानकर, पवन कदम, विभाग प्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती, युवा सेनेचे नितीन लांडगे, निखिल बुजबुडे, स्टेशन मास्तर केशव तावडे आदी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी फलाट क्रमांक १, २ आणि ५ ची पाहणी केली. तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला. पावसाळ्याचे दिवस असून येत्या दोन दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. रेल्वे प्रवाशांशी दौऱ्या दरम्यान नरेश म्हस्के संवाद साधला. प्रवासी प्रतिक्षालयाला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना केल्या. फलाटांवरील पाणपोई, शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केली. फलाटांवर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन मास्तरांना निर्देश म्हस्के यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. मोठमोठ्या सुविधा आम्ही देऊ पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

पनवेलमधून मताधिक्य दिल्याबद्दल श्रीरंग बारणे यांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांचे आभार

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, रुपेश नागवेकर आदी उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हजार झाडे लावून अभियानाला सुरूवात

मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानातंर्गत १५ ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावणार  –  आयुक्त सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात १५ ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ बुधवारी पोखरण रस्ता क्र्.१, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, ०५ जूनपासून १५ ऑगस्ट २०२४पर्यंत ठाणे महापालिका हद्दीत एक लाख झाडे लावण्याचे  ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे ५००० झाडे लावून करण्यात आली आहे. या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बांबू तसेच, स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच, सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. रोपांची मागणीही नोंदवावी. या सगळ्यांच्या सहकार्याने  ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, तसेच वन विभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका हे अभियान राबवेल. त्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बाबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही आयुक्त राव यांनी दिली. या अभियानात एकेका विभागाचे पालकत्व महापालिकेच्या एकेका विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. या अभियानाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे ही कामे विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. पोखरण रस्ता क्रमांक १ येथे रस्त्याच्या दुर्तफा पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडे लावण्यात आली. वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुर्तफा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडे यांची माहिती उपस्थितांना दिली. झाडांविषयी विशेष आस्था असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनीलगतच्या फुटपाथच्या कडेने वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्यासह, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान विभाग) सचिन पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदींनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. त्याचबरोबर, नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली. कमी जागेत, कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पद्धत असून जैवविविधता संवर्धनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सिताअशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकूळ आदी देशी वृक्षांचा समावेश आहे. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधिक्षक केदार पाटील यांनी येथे वृक्षारोपण झाली.

तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकासाठी आचारसंहिता भंगासंदर्भात ठाणे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेसंदर्भात तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख रोहितकुमार राजपूत  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघांतर्गत ठाणे जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींसाठी तळ मजला, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे अहोरात्र 24 X 7 ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाकडे ‘लेखी तक्रारी’ किंवा ‘टोल फ्री क्रमांक 18008911350’ वर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024, ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा पथक प्रमुख, आदर्श आचारसंहिता रोहितकुमार राजपूत यांनी कळविले आहे.