Category: ठाणे

Thane news

‘प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई’

उदय सामंत यांचा इशारा ठाणे : इंडिया आघाडीने जातीय ध्रुवीकरण करीत चुकीचा प्रचार केला आणि त्या प्रचाराला जनता बळी पडली. मात्र आता अवघ्या २४ तासाच्या आतच ते त्यांना विसरले. परंतु आमच्या कुठे चुका झाल्या, कोण कुठे कमी पडले, याचे आत्मचिंतन केले जाईल आणि विधानसभेला त्यांना व्याजसकट हिसाब परत केला जाईल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दुसरीकडे कोणी चांगले काम केले कोणी केले नाही, याचा अहवाल येत्या आठ दिवसात घेतला जाणार असून प्रत्येकाचा प्रगती पुस्तक तपासले जाईल असा इशारा देत जे यात नापास झालेले असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. परंतु आम्ही गाफील राहिलो, त्यामुळेच काही ठिकाणी समीकरणे चुकीली असल्याचेही ते म्हणाले. परंतु निवडून आल्यानंतर त्याचा साधा उल्लेख सुध्दा त्यांनी केलेला नसल्याचे ते म्हणाले. उमेदवार उशीराने घोषीत करणे, प्रचाराला कमी दिवस मिळाल्याने आणि काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागल्यानेही आम्ही मागे पडलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आम्ही व्याजासकट परत करु असा दावा करीत राज्यात विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी २१ जागांवर निवडणुक लढविली. मात्र त्यांना ९ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र आम्ही १५ जागा लढून ७ जागा जिंकल्या. त्यामुळे उभाठा पेक्षा आमचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी ईव्हीएमवर हल्ला झाला आणि आता निवडणुका झाल्या आणि जागा आपल्या बाजूने आल्या. मात्र आता ईव्हीमीवरील हल्ला थांबला असल्याचेही ते म्हणाले.  त्यातही ज्यांच्या हातून कोकण गेले, संभाजी नगर गेले, अशांनी आपली काय स्थिती आहे, हे समजून जावे असा इशाराही त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरेकरांची वाढलेली मते किणीकरांसाठी डोकेदुखी?

अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला ५८ हजार मते ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा एकतर्फी विजय झाला असला तरी याच मतदारसंघातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे यांना मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या वेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबाजी पाटील यांना अंबरनाथमधून ३१ हजार मते होती. या मतांमुळे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर ६० हजार मते मिळवून विजयी झाले होते. राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अंबरनाथ शहरात सर्वाधिक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे त्यांच्यासाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील लढाई तशी सोपी समजली जात होती. त्यात अंबरनाथ शहरात विरोधी पक्ष नावापुरता राहिला होता. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पडलेले खिंडार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची निष्प्रभता आणि ठाकरे गटाला नसलेले सक्षम नेतृत्व यामुळे अंबरनाथमधून विजयी आघाडी मिळण्याची आशा शिवसेनेला होता. तशी ती आघाडी मिळालीही. डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून ९३ हजार ६७० मते मिळाली. गेल्या निवडणुकीत ८८ हजार ८१० मते डॉ. शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे यंदा मतांची संख्या वाढली. मात्र त्याचवेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांनी तब्बल ५८ हजार २८ इतकी मते मिळवली. त्यामुळे शिवसेना – भाजप महायुतीसह अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाबाजी पाटील यांना ३१ हजार १४३ मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा दरेकर यांना २६ हजार अधिक मते मिळाली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांवर विधानसभा मतांचे आकडे अवलंबून असतात. गेल्या लोकसभेत डॉ. शिंदे यांना ८८ हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना विधानसभेत ६० हजार ०८३ मते मिळाली होती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेस उमेदवार रोहित साळवे यांना ३० हजार ७८९ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेल्या ५८ हजार मतांमुळे विधानसभेतील विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लढाई आणखी कठीण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. प्रभावी प्रचाराचा अभाव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कमतरता आणि सहकारी पक्षांची ताकद नसतानाही ठाकरे गटाने मिळवलेल्या या मतांमुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरूवारी दहा तास बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली, बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे. जलशुध्दीकरण केंद्रांच्या या दुरुस्ती, देखभालीच्या कामांमुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम आणि परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. त्याप्रमाणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत. या जलशुध्दीकरण केंद्रातून होणाऱ्या मुख्य जलवाहिनी, पोहच जलवाहिनींवरील पाणी गळती थांबविण्याची कामे या कालावधीत केली जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. या कालावधीत यांंत्रिकी आणि तांंत्रिक दुरुस्तीचीही कामे केली जाणार आहेत. गुरुवारी दिवसभर दहा तास कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या दोन्ही शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

डोंबिवलीतील शिळफाटा  मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त

डोंबिवली : गेल्या महिन्यापासून कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महावर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावर सोनारपाडा, विको नाका ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेपर्यंत सुरू केले आहे. या कामासाठी…

अनधिकृत होर्डिंग्जमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेचे २५४ कोटींच्या महसुलावर पाणी?

शहरांच्या मुख्य रस्त्यांवर ९६ बेकायदा होर्डिंग्ज कल्याण: कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर एकूण ९६ भव्य आकाराची बेकायदा होर्डिंग्ज आहेत. या होर्डिंंग्जनी पालिका हद्दीतील सुमारे दोन लाख ८२ हजार ५५४ चौरस फुटाचे क्षेत्रफळ व्यापले आहे. या होर्डिंग्जचे पालिकेकडून आकारण्यात येणारे एक ते पाच वर्ष कालावधीतील शुल्क आणि त्यावरील दंडात्मक रकमेचा विचार करता या बेकायदा होर्डिंग्ज (जाहिरात फलक) लावणाऱ्या एजन्सींनी पालिकेचे मागील अनेक वर्षात सुमारे २५४ कोटी ३० लाखाचे नुकसान केले आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार एजन्सी चालक, नियंत्रक पालिका अधिकाऱी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे. ही रस्तोरस्ती लावण्यात आलेली बेकायदा होर्डिंंग्ज नैसर्गिक आपत्तीने कोसळुन सामान्यांचा जीव जातो. घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेने हे स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा होर्डिंग्जने दुर्घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा तत्पूर्वीच होर्डिंंग्ज काढून टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार गोखले यांनी आयुक्तांकडे केली आहे. शिळफाटा रस्त्यावर अशाप्रकारची होर्डिंग्ज असल्याने एमएसआरडीसीने अशा होर्डिंंग्जचा शोध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलाचे नुकसान ९६ बेकायदा होर्डिंंग्जनी कडोंमपा हद्दीतील दोन लाख ८२ हजार चौरस फूट जागा व्यापली आहे. या जाहिरात फलकांचे प्रति वर्षाप्रमाणे चौरस फुटामागे २५ रुपये शुल्क धरल्यास ही रक्कम आठ कोटी ४७ लाख रूपये होते. पाच वर्षाचे हे शुल्क ४२ कोटी ३८ कोटी होते. हे जाहिरात फलक बेकायदा असल्याने त्यांच्या पाच पट दंड आकारण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. या बेकायदा जाहिरात फलकांपासून पालिकेला २५४ कोटी २९ लाखाचा महसूल मिळू शकतो. ही सर्व रक्कम जाहिरात एजन्सी चालकांनी बुडून पालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. अशा एजन्सी चालक, नियंत्रक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. ठाण्याचा आशीर्वाद या बेकायदा होर्डिंग्जचा खलनायक ठाण्यात असून पालिकेने अशा होर्डिंग्जवर कारवाई केली तर राजकीय आशीर्वाद असलेला हा खलनायक थेट पालिका वरिष्ठांना संंपर्क करून ती कारवाई रोखतो. अनेक वर्षापासून हे प्रकार कल्याण, डोंबिवलीत सुरू आहेत. त्यामुळे अनेक वर्ष ही बेकायदा होर्डिंंग्ज पालिकेला महसूल न देता रस्त्यावर झळकत आहेत. या बेकायदा फलकावर जाहिरात लावण्यासाठी एक दिवसाचा खर्च चार हजार रुपये असतो. खासगी धारक ती वसूल करतो. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात अशी फलके झळकत आहेत. कोट पालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्यात आली आहेत. काही होर्डिंग्ज धारकांनी परवानगी, नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. काहींना फलक स्थिरता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जी होर्डिंंग्ज शहरात दिसतील ती सर्व काढून टाकण्यात येणार आहेत. होर्डिंग्जच्या माध्यमातून पालिकेचे महसुली नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. धैर्यशील जाधव (उपायुक्त, मालमत्ता विभाग)

कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नागरिक घामाघूम

मनोर : महावितरण कंपनीकडून मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ग्रामीण भागासह मनोर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे पंखे वेगाने फिरत नसल्याने ग्रामस्थांना घामाघूम होण्याची वेळ आली आहे.…

ठाण्यातील भास्कर कॉलनीच्या रस्त्याजवळील अवाढव्य होर्डींग काढण्यासाठी

जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे! ठाणे : येथील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीच्या भर वस्तीत सिताराम भुवन या जुन्या इमारतीत फ्लड लाइट्स लावलेले आवाढव्य जाहिरात फलक व त्यावरील मोठमोठ्या लाईटमुळे परिसरात उष्णतामान वाढवले जात आहे. हा प्रखर प्रकाश रहिवाशांच्या घरात येत असल्याने त्यांना त्रास होतो. याशिवाय या होर्डींगमुळे घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करून येथील हाऊसिंग सोसायटींमधील रहिवाश्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करून हाेल्डीग हटवण्याची मागणी रहिवाश्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह ठाणे महापालिका आयुक्तांकउे केली आहे. भास्कर कॉलनीच्या सर्विस रोडला लागून चार मजली जुनी सिताराम भवन ही इमारत आहे. या इमारती लगत अवाढव्य जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्याचा आकार अंदाजे ४० फूट ४० फूट असल्याचा आंदाजही या रहिवाश्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. या हाेल्डींगच्या इमारतीजवळ हॉटेल, पानाचे दुकान, टायरवाला व सर्विस रोड हा सतत मोठ्या वर्दळीचा परिसर आहे. या भर नागरी वस्तीमध्ये अवाढव्य होर्डिंगच्या जाहिरातींबोर्डवर तब्बल वीस हाय पावरचे हॅलोजन लॅम्प लावलेले आहेत. त्यामुळे परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. परिसरातील लगतच्या सर्व इमारतीमधील रहिवाशांना प्रखर प्रकाश घरात येत असल्याने त्यांना भयानक त्रास होत आहे. याशिवाय आगामी वादळी पावसादरम्यान घाेटकाेपरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठी घटना होण्याची भीती रहिवाश्यांनी व्यक्त करून तत्काळ हाेल्डीग हटवण्याची मागणी लावून धरली आहे. या अवाढव्य हाेल्डींगमुळे दुर्दैवी घटना घडल्यास मोठी जीवित व वित्त हानी होण्याचा संभव आहे. त्यास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हाेल्डींगवर तात्काळ कारवाई करण्यासाठी रहिवाशांनी कंबर कसली आहे. करदात्यांच्या जीवावर बेतणाऱ्या ह्या जाहिरात फलकांच्या आथिर्क उत्पनास वेळ प्रसंगी मुकावे लागले तरी तरी चालेल, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या भव्य हाेल्डींगला हलवण्याची मागणी टीएमसी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे जेष्ठ नागरिक महेंद्र माेने यांनी स्पष्ट केले.

१४ अनाधिकृत होर्डींगवर पालिकेची कारवाई

ठाणे : मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने आता शहरातील तब्बल १४ होर्डींगवर कारवाई केली आहे. तर ३२ ओव्हरसाईज होर्डींगचे आकार कमी करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या जाहीरात विभागाने दिली. तर २६० होर्डींगजचे स्ट्रक्चरल अहवाल सादर झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे. मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेला या होर्डींगजवर कारवाई करण्याची जाग आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत ठाण्याच्या वेशीपासून ते अगदी थेट घोडबंदरच्या शेवटच्या टोकापर्यंत होर्डींगजे जाळे पसरले आहे. परंतु त्यावर कारवाई मात्र होतांना दिसत नव्हती.  शहरात आजही ९० च्या आसपास ओव्हरसाईज होर्डींग आहेत. मात्र त्याकडे पुन्हा एकदा काना डोळा करण्यात आल्याचेच चित्र आहे. असे असले तरी महापालिकेने आता ओव्हरसाईज असलेल्या ३२ होर्डींगवर कारवाई केली आहे. त्यांचे आकार कमी करण्यात आले आहेत. तसेच २९४ होर्डींगजे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे आदेश संबधीत जाहीरातदारांना दिले होते. त्यानुसार २६० होर्डींगजचे स्ट्रक्चरल आॅडीटचे अहवाल सादर झालेले आहेत. त्यात कोणताही दोष आढळून आलेला नसल्याचेही पालिकेचे म्हणने आहे. परंतु त्याचे त्रयस्त तपासणी मात्र महापालिकेकडून होणार नसल्याचेच दिसत आहे. दुसरीकडे महापालिकेने शहरात प्रभाग समितीनिहाय सर्व्हे करुन १४ अनाधिकृत होर्डींगवर कारवाई केली आहे. यापुढेही अशी कारवाई होत राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.

जिल्ह्यातील नैसर्गिक तलाव जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनाशील क्षेत्र म्हणून जाहीर करावीत  – नितिन देशपांडे

अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून. ठाणे जिल्ह्यातील सर्व तलावं संवेदनाशील क्षेत्र, म्हणून जाहीर करुन, पर्यावरण दिनाचे पावित्र्य राखूया, असे आवाहन धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष  नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना केले आहे. जिल्हाधिकारी कचेरीपासून सुमारे दोनशे फुटावर अस्तित्वात असलेल्या तलाव, जो की, जेल तलाव म्हणून ठाणेकरांना प्रचलित आहे. या तलावाचे सुशोभीकरण, संरक्षण व संवर्धन याचे काम  धुमधडाक्यात चालू आहे. प्रत्यक्षात या तलावाबाहेर संबंधित काम कोण करतेय व प्रस्तावित सुशोभीकरणाचे नेमकं काय काम चालू आहे? याचा बोध होत नाही; पण, याआधीच शहराच्या रस्ता-रुंदीकरण यामुळेच, तलावाचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. आता तर, सुशोभीकरण, संवर्धन, संरक्षणाच्या नावाखाली सुमारे २०% पाण्याच्या क्षेत्रफळात, मातीचा भर टाकून नैसर्गिक तलावात हस्तक्षेप केला असून, हे घटनेला बाधा अणणारे आहे. घटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, नैसर्गिक तलाव व त्यावर अवलंबून असणारे पक्षी-प्राणी व जलचर यांचे संवर्धन, संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे व शासन त्याला बांधिल आहे. जिल्हाधिकारी कचेरीपासून सुमारे ५०० फुटावर अस्तित्वात असलेल्या घोसाळे तलावाचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत- २ या अभियानांतर्गत तलावाचे सुशोभीकरण चालू असून, (काम करण्याची मुदत संपली आहे) या तलावातील कासवांच्या अधिवासाची नेमकी काय व्यवस्था केली आहे वा काय करणार आहे? याची फलकावर माहीती नाही. दरम्यान, शहरात आणि जिल्ह्यात वातावरण बदलाचे परिणाम चांगलेच जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील उष्णता तपमान रेकॉर्ड ब्रेक करीत असताना, संबंधित बाबींवर शासनस्तरावर निरनिराळे उपाय योजना करीत असताना  नैसर्गिकरित्या लाभलेले पाण्याचे आकारमान करुन, शासन निर्णयास छेद देणारे व घटनेला बाधा पोहोचण्याऱ्यांवर, कडक कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही करीत आहोत. पाण्याचे क्षेत्रफळ कमी करणारा, मातीचा भराव तात्काळ काढावा आणि यापुढे तलावक्षेत्रात सुशोभीकरण, संवर्धन-संरक्षणाच्या नावाखाली, घटनेचे अनेक ठिकाणी उल्लघंन होते, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. आंबेघोसाळे तलावापैकी, आंबे तलाव पूर्णपणे बुजविला आहे व त्यावर झोपडपट्टी उभारली आहे. याप्रकरणी, पर्यावरणप्रेमी उच्च न्यायालयात गेल्यामुळे घोसाळे तलाव वाचला आहे, याकडे आम्ही आपले लक्ष वेधत आहोत. ठाणे महापालिकेच्या महासभेत मुंब्रा येथील तलाव बुजवून “Transit Camp” बांधण्याचा ठराव संमत केला; पण, पर्यावरणप्रेमींनी वेळीच हस्तक्षेप करुन, आयुक्तांकडून ठराव रद्द करुन घेतला याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील होणारी अनियोजित वाढ, प्रदूषित वातावरण, यामध्ये जैविक साखळी, जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे. नैसर्गिक परिसंस्था अबाधित रहाण्यासाठी व घटनेनुसार संरक्षण करण्यासाठी, देशातील पहिल्यावहिल्या पर्यावरणवादी अशा, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही आग्रहपूर्वक उपरोक्त मागणी करीत आहोत. दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, ठाणे जिल्ह्यातील सर्व तलावं “संवेदनाशील क्षेत्र” म्हणून जाहीर करुन, पर्यावरण दिनाचे पावित्र्य राखूया, असे आवाहन नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना केले आहे.

बँक ऑफ इंडियाची ६६६ दिवसांची उच्च परतावा मुदत ठेव योजना

अशोक गायकवाड अलिबाग : बँक ऑफ इंडियाच्या ६६६ दिवसांच्या उच्च परतावा मुदत ठेव योजनेसाठी संपर्क करावा, असे आवाहन विभागीय कार्यालय प्रमुख अलिबाग रायगड मुकेश कुमार यांनी केले आहे. बँक ऑफ इंडियाने ‘६६६ दिवसांची मुदत ठेव’ लाँच केली जी सुपर ज्येष्ठ नागरिकांना रु. २.०० कोटींपेक्षा कमी ठेवींवर वार्षिक ७.९५% पर्यंत उच्च परतावा देते. ग्राहक आणि सामान्य लोक ‘६६६ दिवसांची मुदत ठेव’ उघडून गुंतवणुकीच्या या अनोख्या संधीचा लाभ घेऊ शकतात. जे मुदत ठेवींवर शंभरहून अधिक परतावा देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण बँक ऑफ इंडिया मध्ये कोणत्याही शाखेत जाऊन शाखाधिकारी यांच्याशी त्वरित सम्पर्क करावा.किंवा बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयं अलिबाग रायगड येथे ०२१४१- २२३८९५, २२२२६९ सम्पर्क करावा असे आवाहन मुकेश कुमार, विभागीय कार्यालय प्रमुख अलिबाग रायगड यांनी केले आहे.