– पनवेल तालुका कृषी विभागाचा दिलासादायक उपक्रम
राज भंडारी
पनवेल : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात बियाण्यांची पेरणी बाधित झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाच्या सततच्या तडाख्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली. ही परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल तालुका कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेत यू.एन.डी.पी. अंतर्गत भात बियाण्यांची मागणी केली.
पनवेल तालुका कृषी विभागाच्या या मागणीनुसार महाबीजकडून भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
या संपूर्ण उपक्रमात पनवेल तालुका कृषी अधिकारी श्री. हेगडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक प्रसाद पाटील यांनी शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून बियाणे वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली. तसेच गुळसुंदे येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी स्थानिक स्तरावर समन्वय साधत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
याशिवाय गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी जगताप तसेच ग्रामपंचायत लेखनिक नंदकुमार नवरंगे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे, वितरणाचे नियोजन करणे आणि आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देणे यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शासन, कृषी विभाग आणि महाबीज यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात वेळेवर उपलब्ध झालेल्या भात बियाण्यांमुळे पुन्हा पेरणी करणे शक्य होणार असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पनवेल तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीविषयक कोणतीही अडचण असल्यास संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *