Category: ठाणे

Thane news

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण अशोक गायकवाड नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: सकाळी ९ वा. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते, उपमहापौर दशरथ भगत व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्यानंतर नेरूळ सेक्टर १ येथील राजीव गांधी उड्डाणपूलाजवळील चौकात स्थापित शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौर महोदयांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेवक रविंद्र इथापे, सुरेश शेट्टी, अंजली वाळुंज, भाऊ भापकर, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे, नेरूळ विभागाच्या सहा.आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, उमेश पाटील, प्रवीण गाडे,पंढरीनाथ चौडे आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवताली आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलेली होती. तसेच जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच चौकांच्या चारही बाजूंना विद्युत दीपमाळांची रोषणाई करण्यात आलेली आहे. पुतळ्यांच्या सभोवताली लक्षवेधी रोषणाई करण्यात आलेली आहे. वाशी येथे पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत प्रसारित करून मानवंदना देण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांची तसेच युवक – युवतींची लक्षणीय उपस्थिती होती. विविध शाळांनी तसेच शिवप्रेमी संघटनांनी आपल्या परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवज्योतीसह पदयात्रा काढून, शिवरायांचा जयजयकार करीत अनोखी मानवंदना अर्पण केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या नामघोषात सारा परिसर निनादला होता. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी चौकात काढलेली छत्रपती शिवरायांची रांगोळी लक्षवेधी होती. अनेकांनी रांगोळी समवेत सेल्फी छायाचित्रे काढली. विशेषत्वाने तरूणाईने चौकातील शिवचरित्रशिल्पकृतींना भेट देऊन शिवरायांचा चरित्रपट जयंतीनिमित्त अनुभवला. शिल्पाकृती वास्तूच्या वरील बाजूस असलेल्या घुमटांवर लावलेल्या शिवरायांच्या विविध भावमुद्रा असणा-या छायाचित्रांमुळे चौकातील वातावरण भारलेले होते. नेरूळ येथील चौकात नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवप्रभूंचा सिंहासनारूढ पुतळा स्थापित करण्यात आलेला असून त्याठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. शिवरायांच्या पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीला केलेली आकर्षक पुष्पसजावट लक्षवेधी होती. दोन्ही ठिकाणी दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, पोवाडे यांचे ध्वनीक्षेपकाव्दारे सादरीकरण होत असल्याने शिवरायांच्या नावाचा गजर नवचैतन्य निर्माण करणारा आहे.

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अनिल ठाणेकर ठाणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजयंती उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू” या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या ‘माय भारत, मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या उपस्थितीत ही रथयात्रा ठाणे शहरातून मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यादरम्यान तलाव पाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नियोजन भवन प्रांगणात ‘अश्वमेध प्रतिष्ठान इंटक ठाणे चॅप्टर’ यांच्या सौजन्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रदर्शनातील प्रत्येक वस्तूची बारकाईने माहिती घेतली आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केल्याबद्दल अश्वमेध प्रतिष्ठानचे कौतुक केले. या प्रदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्यक्ष शिवकालीन युद्धनीती आणि साहित्याचा अनुभव घेता आला.नियोजन भवन येथे पार पडलेल्या मुख्य सांस्कृतिक सोहळ्यात ‘शिव शंभू गाथा’ या टीमने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासात नेले. पोवाडे, गोंधळ, जागरण आणि विविध शौर्यगीतांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनपटातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत करण्यात आले. सादरीकरणातील जिवंतपणा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक भारावून गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ युद्धापुरते मर्यादित नसून ते एक उत्तम व्यवस्थापक आणि रयतेचे राजे होते. आज आपण शॉर्ट नोटीसवर आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असतानाही नियोजन हॉलमध्ये इतका सुंदर कार्यक्रम करू शकलो, हे टीम वर्कचे यश आहे. शाहीर आणि कलाकारांनी मांडलेला अफजलखान वध आणि शाहिस्तेखानाची फजिती हे प्रसंग बघताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर व उर्मिला पाटील, पोलीस उपआयुक्त (वाहतूक विभाग) पंकज शिरसाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश पाटील, अमोल कदम, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, लेखाधिकारी उमेश कुमावत, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहायक गिरीश काळे, सागर यादव तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भारत स्काऊट, गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी चे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलीस दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने करण्यात आली.

  नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

  शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात

शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात प्रशासकीय मान्यतेसाठी सुधारीत प्रस्ताव सरकारला सादर  अविनाश उबाळे ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नामपाडा धरणाचे काम सुरू झाले असून या धरणाचा सरकारी अंदाजपत्रकीय खर्च सुरुवातीला ९ कोटींवरून ३८ कोटींवर तर आता या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६६ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचला आहे.या नामपाडा धरणाच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता व वाढीव निधी मिळावा यासाठी जलसंपदा विभागाने राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. शहापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर किन्हवली जवळ नामपाडा नावाचा धरण प्रकल्प राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने २००९ सालापासून हाती घेतला आहे.संपूर्ण मातीचे काम असलेल्या या धरणाला केवळ स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती,परंतु सुरुवातीला कासव गतीने सुरू असलेले धरणाचे काम वर्षभरातच रखडून पडले.वन विभागाच्या परवानग्या अपूर्ण राहिल्याने वन विभागाने धरणाचे काम बंद पाडले होते.आजमितीस या धरणाचे फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे.या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण ३ हजार ५३३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.हे धरण पूर्ण झाल्यास धरणाच्या डाव्या कालव्यातून २५५ हेक्टर क्षेत्रात सिंचन होणार आहे.सुरुवातीला केवळ ९ कोटी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च ३८ कोटी ९८ लाख त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आता तब्बल ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च पोहोचला आहे.आजमितीला या धरण प्रकल्पासाठी १७ कोटी ७२ लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला असून गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या या बहुचर्चित नामपाडा प्रकल्पाला राज्य सरकारने पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला आहे.सध्यास्थितीला धरण प्रकल्पाचे काम जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे.नामपाडा धरण प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर या धरणातून शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील सावरोली,कानडी,नांदगाव,खरीवली,आपटे या गावांसह वेलकड़ी,गांगणवाडी,वडाची वाडी,हिरव्याची वाडी,नामपाडा,टाकीची वाडी,मधली वाडी,रिकाम वाडी,उंबरवाडी,डोंगरी,कातकर वाडी या आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांना बारमाही शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी उपलब्ध होणार आहे.असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.यंदा मे महिन्याच्या अखेरीस धरणाच्या मुख्य बांधावरी मातीचा भराव करणे व तलावाच्या बाजूकडीलदगडी पिंचिगचे काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.सु.शहाणे यांनी माहिती देताना सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. तद्नंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी  अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहायक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न

मिलाप नगरमध्ये बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद कल्याण : डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर हा विशेष करून बंगल्यांचा परिसर असून कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील, शासकीय, खाजगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी इत्यादी उच्चभ्रू लोकांची वस्ती येथे आहे. याठिकाणी एका बंगल्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला असून हे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. महाशिवरात्री दिवशी रात्री अडीच वाजता दरम्यान मिलापनगर, एमआयडीसी मधील अभिनव सहकारी बँकेच्या समोरील एका बंगल्यात एक वृद्ध स्त्री घरात एकटीच असताना बंगल्याचे खिडकीचे ग्रील तोडून तीन दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी एका दरोडेखोराने त्याच रात्री १.२५ वाजता या बंगल्यात रेकी करून गेल्याचे सीसी कॅमेरात दिसत आहे. दरोडेखोरांचा हातात कोयते व इतर हत्यारे होती. बंगल्यात कोणीतरी असल्याचे व सदर वृद्ध स्त्री जागी झाल्याचे समजताच त्या तीन दरोडेखोरांनी भागो बोलत पलायन केले. यानंतर त्या वृद्ध स्त्रीने शेजारी राहणाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता त्यानी मदतीसाठी प्रत्यक्ष येऊन पोलिसांना कळविले. काहीवेळातच मानपाडा पोलीस घटनास्थळी येऊन त्यानी चौकशी करून दरोडेखोरांना पकडण्यासाठी एक पथक रवाना केले. परंतु दरोडेखोर तोपर्यंत पसार झाल्याने मानपाडा पोलीस या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सीसी कॅमेराद्वारे त्यांचा तपास करीत आहेत. यापूर्वीही मिलापनगर परिसरात अशा घरफोड्या झाल्या असल्याने येथील रहिवाशांत घबराट पसरली असून रात्री/पहाटे पोलीस गस्ती वाढवावी आणि या दरोडेखोरांना जेरबंद करावे अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेलफेअर असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली. महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अति.आयुक्त हर्षल गायकवाड, अति.शहर अभियंता (विदयुत/यांत्रिकी)  प्रशांत भागवत, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास महापौर हर्षाली चौधरी, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवलीतही राज्यगीताचे गायन करुन महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास आणि मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास उपमहापौर राहुल दामले यांनी पुष्पहार अभिवादन केले. यावेळी उपस्थित उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, सहा.आयुक्त प्रसाद ठाकूर, भारत पवार, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिकेच्या बारावे येथील शाळा क्र.६८, धाकटे शहाड येथील शाळा क्र.३३ व उंबर्डे येथील शाळा क्र.१२  मधील चिमुकल्या विदयार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामाविरुद्ध तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त…

 जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद

जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा प्रतिसाद नगरसेविका नम्रता कोळी यांचे आयोजन ठाणे : टेंभीनाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या पारशी बांधवांच्या अगियारी कंपाऊंडमध्ये आयोजित केलेल्या जन आरोग्य शिबिराला पारशी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले होते. पारशी समुदाय वर्षानुवर्ष गुण्यागोविंदाने राहत आहे. या समाजातील नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष जन आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड व ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. त्यात ७० वर्षांवरील ९० स्त्री-पुरुष नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून देण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी १०८ नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या नागरिकांना लवकरच कार्डचे वाटप केले जाईल, असे नम्रता कोळी यांनी सांगितले. या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नगरसेविका नम्रता कोळी व जयेंद्र कोळी यांनी आभार मानले आहेत.

 मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ महाअंतिम फेरीत एसएसटीची दमदार भरारी

मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ महाअंतिम फेरीत एसएसटीची दमदार भरारी पोवाडा गायनात तृतीय क्रमांक कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या जीवन शिक्षण आणि विस्तार  विभागातर्फे आयोजित ‘उडान’ मेगा फायनल राऊंडमध्ये एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने पोवाडा गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने पार पडलेल्या ‘शिव शौर्यगाथा’ पोवाडा गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी आणि दमदार सादरीकरणाची उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेतली. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद करांदे, डीएलएलई संचालक डॉ. बळीराम गायकवाड, प्रा. डॉ. कुणाल जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम गायक नंदेश उमप यांची उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी सहाय्यक डीएलएलइचे फिल्ड कॉर्डिनेटर प्रा. दिलीप आहुजा, प्रा.सुदर्शन पाटील, सदान जावरे यांनी मार्गदर्शन केले.