Category: ठाणे

Thane news

 डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन

डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप कल्याण : हिंदू धर्मसंस्कृतीत पादुका पूजन व दर्शनाची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. गुरु-शिष्य परंपरेतून आलेल्या या परंपरेला सगुण स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. याच भक्तीभावातून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य सिद्ध पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, २२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता डोंबिवली पूर्व येथील चंद्रेश नीलकंठ बिल्डिंग मागील मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोढा हेवन, निळजे, कल्याण-शिळ रोड येथे करण्यात आले आहे. रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत ३० गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी दूरवर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांनी दिलेल्या ‘ तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ या संदेशातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ज.न.म. संस्थानाद्वारे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल वितरण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भक्त, साधक, शिष्य मोठ्या भक्तिभावाने सहभागी होणार असून सिद्ध पादुका रथात विराजमान करून डोंबिवली परिसरातून कार्यक्रमस्थळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. भजन, नामगजर, टाळ-मृदुंगांचा नाद, भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा, कलशधारी महिला, लेझीम, फुगड्या आणि आकर्षक देखावे यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. वेदोक्त मंत्रोच्चारात पूजन, शेकडो अनुयायांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. संस्थानाच्या पुरोहितांकडून वेदोक्त मंत्रोच्चारात सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात येईल.  त्यानंतर प्रवचन सेवा, भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह उपस्थित राहून सिद्ध पादुका दर्शनाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा येत्या २० फेब्रुवारीला आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका सचिव मनिष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते. महापौरांनी सभागृहातील आसनव्यवस्था, ध्वनी प्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची तपासणी केली. ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय १३१ नगरसेवक निवडून आले असून, याशिवाय १० स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसनव्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतला.  महापौरांनी नमूद केले. ९सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनिव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच महासभेच्या कामकाजाचा प्रारंभ बदललेल्या सुचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम् आणि राज्यगीताने, तर  महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनीफ‍ितीवर लावण्यात यावीत असेही महापौरांनी नमूद केले. एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

विहंगच्या विजयात संदीपची चमक

विहंगच्या विजयात संदीपची चमक ठाणे : डावखुरा मध्यमगती गोलंदाज संदीप यादवच्या प्रभावी माऱ्यामुळे विहंग इंटरप्राइजेस संघाने टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत सुवर्ण महोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या क गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुनीलने सात धावांत चार बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना ६६ धावांवर रोखले. त्यानंतर विजयी संघाने ३ बाद ६८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघाच्या एकाही फलंदाजाला संदीपसह शुभम शेवाळे आणि लोहित सुराणाने खेळपट्टीवर टिकू दिले नाही. वेदांत सिंगने सर्वाधिक १५ धावा बनवल्या. तर आनंदराव भोईटेने ११ धावा केल्या. शुभम आणि लोहितने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर जितेंद्र देशमुखने नाबाद २७ आणि सुधीर यादवने नाबाद १४ धावांची भर टाकली. प्रथमेश कदम आणि फरहान खानने प्रत्येकी १३ धावांची खेळी केली. या डावातील तिन्ही बळी विश्वदीप जाधवने मिळवले. संदीप यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट: १९.४ षटकात सर्वबाद ६६ (वेदांत सिंग १५, आनंदराव भोईटे ११, संदीप यादव ५-२-७-४, शुभम शेवाळे ४-११-२, लोहित शर्मा २.४-४-२) पराभूत विरुद्ध विहंग इंटरप्राइजेस : १३.२ षटकात ३ बाद ६८ (जितेंद्र देशमुख नाबाद २७, सुधीर यादव नाबाद १४, प्रथमेश कदम १३, फरहान खान १३, विश्वदीप जाधव ७-१-२९-३).

  वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप  ठाण्यातील शेठ एनकेटी हॉल, खारकर आळी या ठिकाणी करण्यात आले. गेल्या २४ वर्षापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इ. जिल्ह्यातील व तालुक्यातील आदिवासी, मागासवर्गीय, भटके-विमुक्त जाती जमाती, बालमजूर, निराधार, अनाथ, आणि बालसुधारगृहातील गरीब व गरजू मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संस्था राबवीत आहे. यावर्षी देखील ३००० मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम (गणवेश, नोटबुक, चप्पल-बूट, बॅग, पाटी-पेन्सील, कंपास पेटी, पेन, व इत्यादी शैक्षणिक साहित्य) आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे हे उपस्थित होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन  डावखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या प्रसंगी महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर  वेल्फेअरचे   चेअरपर्सन बुधाजी पाटोळे, सुरेखा राऊत, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा झेंडे, चाईल्ड लाईन हेल्पच्या सोनाली पुफळा, प्रियेश साबळे पाटील, बालाजी इंजिनियरिंगचे सर्वेसर्वा प्रीतम रॉय आणि ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा,पालघर जिल्हा, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बालशिक्षण सुधार केंद्रातील व शाळांतील शिक्षक कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विधवा व निराधार श्रमिक महिला संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आदिवासी, मागासवर्गीय, गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कामामध्ये प्रकल्पाचे सर्वेसर्वा प्रियेश साबळे पाटील यांचा मोठा वाटा असून अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अनुषंगाने आणि अथक प्रयत्नाने २०२१ पासुन या प्रकल्पाने आतापर्यंत १ करोड ८२ लाख मुला मुलींची शिक्षणाची विनामूल्य सेवा केली असून या सर्वे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती दिवा- संत सेवालाल गोर बंजारा समिती (दिवा) यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रेरणा टॉवर, दिवा महोत्सव मैदानाजवळ, दिवा शिळ रोड (पूर्व) येथे रविवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर गोरबंजारा समाजाने संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण दिव्यात फिरवण्यात आली. तसेच भोग विधी कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. संत सेवालाल गोरबंजारा समिती (दिवा) कमिटी अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार मिथुन आडे, तर कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, स्नेहा अमर पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, समाजसेवक कैलास भगत, बालाजी कदम उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख अतिथी चंदर राठोड, वासु सेठ राठोड, बाबू राठोड, देविदास राठोड हे सर्व मान्यवरांनी उपस्थीती दाखवून जयंती कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय पवार, प्रविण राठोड, लक्ष्मण चव्हाण, रामदास चव्हाण, रमेश राठोड, रामेश्वर पवार, चंदू चव्हाण, गुंडू राठोड, शंकर राठोड, श्याम राठोड, गणेश पवार, संतोष पवार, रमेश राठोड, वशिया राठोड, रामू राठोड, रामदास चव्हाण तसेच संत सेवालाल महाराज गोरबंजारा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दिवा (आरती परब) – दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ऊॅ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिव मंदिर दिवा आणि कोपर स्थानका दरम्यान खाडी किनारी असलेले पुरातन मंदिर आहे. या मंदिरात दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणची सगळी आगरी, कोळी आणि कोकणी माणसे श्रद्धेने पूजा करायला येतात. या महाशिवरात्री महोत्सवात पहिल्या दिवशी सकाळच्या वेळी दातिवलीच्या प्रवचन गुरुभक्त प्रकाश महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. दुपारच्या वेळी ह.भ.प. गुरुवर्य शरद महाराज म्हात्रे यांच्या विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ, दातिवलीचे सुस्वर भजन होते. तसेच संध्याकाळी माऊली महिला हरिपाठ मंडळ (दातिवली) यांचे भजन तर गावदेवी भजन मंडळ, बेतवडे यांचे ही भजन झाले. तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, बेतवडे यांचे भजन झाल्यावर महादेवाची महा आरती मोठ्या उत्साहात पार पडली. त्या नंतर महाप्रसाद सर्वांसाठी ठेवण्यात आला होता. हा महाशिवरात्री महोत्सव विना विघ्न पार पडण्यासाठी ऊॅ म्हातार्डेश्वर ट्रस्टी मंडळ व समस्त ग्रामस्थ (म्हातार्डी) अध्यक्ष सदाशिव शंकर पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत शंकर पाटील, सचिव जयदास कान्हा शेलार, खजिनदार गोवर्धन पाटील, सदस्य दिपक कान्हा शेलार, अशोक शेलार, वैद्यनाथ शेलार, मंगेश शेलार, शांताराम पाटील, भोलाराम शेलार, सुदेश पाटील यांनी मेहनत घेतली होती. तसेच स्वयंपाकी ग्रुप बेतवडे, द्वारकानाथ पाटील, जयदास पाटील, बाळाराम पाटील, नारायण पाटील, गणेश दळवी, नामदेव नाईक, गणेश पाटील आणि टीम यांनी ही जेवणाचे योग्य नियोजन करून नागरिकांसाठी प्रसाद आणि जेवण बनवले होते. त्यावेळी आमदार राजेश मोरे, दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, साक्षी मढवी, विभाग प्रमुख राजेश पाटील, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, उपविभाग प्रमुख शंकर पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ अनिल ठाणेकर ठाणे,  ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे नुकताच संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष प्रदीप जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगार, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत यानिमित्ताने दिले.

विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांचा स्नेहपूर्ण समन्वय ही काळाची गरज – डॉ. आनंद नाडकर्णी 

विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांचा स्नेहपूर्ण समन्वय ही काळाची गरज – डॉ. आनंद नाडकर्णी अनिल ठाणेकर ठाणे: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे. शाळा, शाळेची इमारत व परिसर यांच्याबद्दल एक घट्ट नाते विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. सरस्वती सेकंडरी शाळेच्या “पेरणी ते कापणी” शेती प्रकल्पाचे कौतुक करताना प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. या समारंभास, शाळेचे माजी विश्वस्त आणि मुख्याध्यापक अशोक टिळक, मनिषा टिळक, विश्वस्त विकास दामले, विश्वस्त अनुराधा आपटे, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या  विमला कर्वे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी विमला कर्वे स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाचे हे अकरावे वर्ष होते.विमला कर्वे यांनी ६ जून १९५२ रोजी प्राथमिक शाळा सुरू केली. ६ जून २०२६ ते ६ जून २०२७ हे शाळेचे ‘ अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभाची मुहूर्तमेढ विमला कर्वे यांच्या स्मृतिदिन समारंभाचे औचित्य साधून रोवली गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांची ‘प्रकट मुलाखत,शाळेची माजी विद्यार्थिनी हर्षदा बोरकर यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली.  यावेळी बोलताना डॉक्टरांनी असे सांगितले की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे. शाळा, शाळेची इमारत व परिसर यांच्याबद्दल एक घट्ट नाते विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. सरस्वती सेकंडरी शाळेच्या “पेरणी ते कापणी” शेती प्रकल्पाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता शिक्षकांनीही समृद्ध आणि परिपूर्ण होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न करून शिकविल्यास शाळेतून सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी बाहेर पडेल आणि बाहेरील जगाच्या महाकाय व्यवस्थेशी तोंड देऊन यशस्वीपणे जीवन व्यतीत करु शकेल. यासाठी जसे दाणेदार पीक हाताशी येण्यासाठी पेरणी आणि कापणी  या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूपच फरक आहे. आज समाजामध्ये विविध प्रकारचे तणावयुक्त जीवन माणसे जगत आहेत. अशावेळी त्या तणावापासून मुक्त होण्यासाठी विविध मानसिक आणि भावनिक गोष्टीची जोड देऊन त्यावर काम करणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विमला कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त सुरेन्द्र दिघे यांनी केले. यावेळी बोलताना श्री. दिघे सरांनी दोन्ही माध्यमातील शाळा मधील  “विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या मध्ये स्नेहपूर्ण  संबंध  रुजवणे आणि जोपासणे हे अमृत वर्षाचे वैशिष्ट्य असणार आहे. स्नेह – संवाद आणि सन्मान हे त्रिसूत्र  हे अमृत वर्षाचे ब्रीदवाक्य असणार आहे. शाळेच्या विभागवार झालेल्या शालेय समितीत घेतलेल्या निर्णयाला अनुसरून विश्वस्त मंडळाने मराठी शाळा याच इमारतीत राहिल  आणि सीबीएससी शाळा नवीन तयार होत असलेल्या इमारतीत नवीन शैक्षणिक वर्षांपासून सुरू होईल. सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यविकास, विज्ञान तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी विविध उपक्रमांद्वारे शिकविल्या जातील. सरस्वती सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक भरत खोटरा यांनी आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली.

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास‍ शिंदे यांचा संवाद

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास‍ शिंदे यांचा संवाद अशोक गायकवाड नवी मुंबई : २८ फेब्रुवारी व १ मार्चला सेक्टर २९ खारघर ओवे मैदान येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपन्न होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त संपूर्ण जगभरातून मोठया संख्येने लक्षावधी नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुरुव्दारांच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे नमुंमपा मुख्य समन्वय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुरुव्दारांचे प्रमुख पदाधिकारी तेजिंदर सिंग (वाशी), इंद्रपाल भाटीया (कोपरखैरणे), सतनाम सिंग(कोपरखैरणे), मनजित सिंग (सानपाडा), इंद्रजित सिंग(तुर्भे-सानपाडा) हे प्रत्यक्ष सभागृहात व जसपाल सिंग सिध्दू (सीबीडी बेलापूर), मेहेरसिंग रंधवा व अम्रपालसिंग रंधवा (ऐरोली) हे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. या बैठकीची सुरुवात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकालावर आधारित सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेल्या भक्तीगीताने करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.४२ घणसोली येथे इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी विदयार्थिंनी कु.कलिना दास हिने गायलेल्या याच भक्तीगीताचे प्रसारण करण्यात आले. सध्या हे भक्तीगीत सोशल मिडीयाच्या विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन सर्वदूर लोकप्रिय झाले आहे. बैठकीस उपस्थित गुरुव्दाराच्या प्रमुखांनीही या लहान मुलीचे भरभरुन कौतुक केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले व महानगरपालिकेमार्फत आयोजित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या अंतर्गत शाळांमध्ये दररोज सकाळी भक्तीगीत प्रसारण, डॉक्युमेंटरी प्रसारण तसेच प्रभात फेरी, निबंध –वक्तृत्व-चित्रकला-गायन-वाचन-घोषवाक्य अशा विविध स्पर्धांचे भव्यतम स्वरुपात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १.७५ लाखाहून अधिक विदयार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी १२४ आरोग्य शिबीरांचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या ५० शिबीरांमधून ७७३६ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे. तसेच दररोज लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून ११ फेब्रुवारीपासून २२ ठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहीमांमध्ये ३९३८ नागरिकांनी व एनएसएस विदयार्थ्यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींसमवेत सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात १४ मोठे डिजीटल होर्डिंग, ६ मोठे स्थिर होर्डिंग्ज तसेच ८० फ्लेक्स होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बसस्टॉपवरही बॅनर्सव्दारे प्रसिध्दी करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ५ मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये २९ स्क्रिनवर शोच्या आधी सतिंदर सरताज यांचे भक्तीगीत प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमास मोठया संख्येने जनसमुदाय येणार असल्याने महानगरपालिकेने २ हजारहून अधिक नागरिकांची निवासव्यवस्था, ये-जा करण्यासाठी बसेस व्यवस्था, वैदयकीय आरोग्य व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, शौचालय व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था अशी विविध व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. याप्रसंगी गुरुव्दारा प्रतिनिधींकडून आलेल्या सूचना जाणून घेण्यात आल्या व त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असा विश्वास देत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेशी थेट संपर्क साधावा असे आवाहन उपस्थित गुरुव्दारा प्रमुखांना केले.

केडीएमसीत मालमत्ता कर व पाणीपटटीची अभय योजना विचाराधीन नाही

केडीएमसीत मालमत्ता कर व पाणीपटटीची अभय योजना विचाराधीन नाही कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांस मालमत्ता कराची देयके यापूर्वीच बजावण्यात आलेली आहेत. मालमत्ता कराच्या रक्कमा विहित मुदतीत महापालिकेत जमा…