Category: ठाणे

Thane news

महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली नाकाबंदी

महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली नाकाबंदी कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन व परिसरात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनात फक्त महिला अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी करत वाहतूक विभागासह सयुक्त कारवाई केली.  या नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करून चलान देण्यात आले. तसेच स्टेशन परिसरात पायी पेट्रोलिंग केली. स्कायवाक पेट्रोलिंग, दरम्यान केडीएमसी अतिक्रमण विभागाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी विविध कलमान्वये एकूण १०३ कारवाया करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान ४ महिला अधिकारी व ३२ महिला पोलीस अमलदार हजर होते.

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव अनिल ठाणेकर ठाणे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे रविवारी भल्या पहाटे ५:३० वाजता ठाणे स्टेशन परिसरात एका आगळ्यावेगळ्या ‘महिला सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. उन्हाळा, पावसाळा असो वा कडाक्याची थंडी, पहाटेच्या अंधारात घराबाहेर पडून घराघरात ज्ञान पोहोचवणाऱ्या महिला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना त्यांनी महिला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. “शहराच्या प्रगतीत आणि माहिती पोहोचवण्याच्या कार्यात या भगिनींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.या सोहळ्याला संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश मोरे, ‘शब्दमुद्रा’ वृत्तपत्राचे संपादक प्रफुल वाघुले, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, शहर प्रमुख नंदू देशपांडे, ठाणे स्टेशन विभाग प्रमुख संदीप आवारे, चंद्रकांत पवार, राजू शेलार, नंदू करले, सखाराम चव्हाण, संजय भुजबळ, शंकर पाटील आणि ज्येष्ठ विक्रेते विठ्ठल गांगुर्डे यांसह अनेक पदाधिकारी व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित महिला वृत्तपत्र विक्रेत्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. पहाटेच्या वेळी जेव्हा शहर निद्रावस्थेत असते, तेव्हा आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या महिलांचा उत्साह पाहून उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

कष्टकरी महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाकडून विशेष सन्मान

कष्टकरी महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाकडून विशेष सन्मान अनिल ठाणेकर ठाणे : धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. समाजातील कष्टकरी आणि परिश्रमाने कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त घरकाम करून तसेच विविध प्रकारची मेहनत करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या कष्टकरी महिलांचा विशेष सत्कार धनगर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. समाजातील महिलांनी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पुष्पगुच्छ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील मासुंदा तलाव येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत महिलांसाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणेची आठवण करून दिली. या कार्यक्रमाला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे तसेच सदस्य संगीता खटावकर, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, स्मिता गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमात महिलांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा केला तसेच महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. समाजातील महिलांनी एकमेकांना प्रोत्साहन देत पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

राष्ट्रवादी शरद पवारच्या आरोग्य शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी

राष्ट्रवादी शरद पवारच्या आरोग्य शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी अनिल ठाणेकर ठाणे : महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ॠताताई आव्हाड, सिद्धीविनायक रूग्णालयाचे डॉ. अमोल गिते यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात महिलाध्यक्षा मनिषा भगत,  कार्याध्यक्षा फुलबानो पटेल आणि साबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. घर-संसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीने कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देत नसतात. त्यातच संसाराचा गाडा हाकताना दोन पैसे वाचविण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. ही बाब ध्यानात घेऊन ८ मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्ष मनिषाताई भगत, कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, तुळजाभवानी मंदिराशेजारी, गणेशवाडी पांचपाखाडी ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने हृदयरोग तपासणी, (ECG), किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह (शुगर) आदी आजारांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या महिलांवर मोफत शस्त्रक्रिया सिद्धीविनायक रूग्णालयात करण्यात येणार आहेत. याप्रसंगी ॠता आव्हाड यांनी, महिला घर चालविताना स्वतःच्या आरोग्याचे बजेट आखत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात. म्हणूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष नेहमीच जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आला आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केले असल्याचे मनिषा भगत यांनी सांगितले. डॉ. अमोल गिते यांनी, या शिबिरात तपासणी केलेल्या महिलांसाठी किडनी स्टोन प्रोस्टेटवर मोफत  शस्त्रक्रिया, मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे सांगितले. दरम्यान , महिला दिनाच्या अनुषंगाने ऋता आव्हाड, मनिषा भगत यांच्य् हस्ते महिला पत्रकार अनघा सुर्वे, रोहिणी दिवाण, सुचिता बिराजदार, सारिका साळुंके, नम्रता सूर्यवंशी,  वंशिका चाचे, जयश्री शेट्टी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, नवनिर्वाचित नगरसेविकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पल्लवी जगताप ,रिटा यादव ,वर्षा मोरे ,सुषमा पाटील ,सपना पाटील, अश्विनी पालकर , नीलिमा शेख , माधुरी सोनार , शशिकला पुजारी , ज्योती निम्बर्गी , मनीषा पाटील , मल्लिका पिल्ले, हाजी बेगम , मुनिपा सय्यद , रेणुका अलगुडे,  रेशमा भानुशाली, कल्पना नार्वेकर,  रुबीना सय्यद, उषा नरहरे,पूजा जाधव , गीतारंजन , श्रुती डिसोलकर , ज्योती चव्हाण, संगीता चंद्रवंशी , लिलाबाई फुलपगारे ,संगीता लोकरे आदी उपस्थित होते.

3७ लाख महिलांना लखपती दीदी योजनेत जोडून घेणार – देवेंद्र फडणवीस

3७ लाख महिलांना लखपती दीदी योजनेत जोडून घेणार – देवेंद्र फडणवीस मिरा – भाईंदर: महिला या अर्थव्यवस्थेचे दुसरं चाक आहेत हे विकसित देशात दिसून आला आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नारिकेंद्रित विकासाला प्राधान्य दिलं आहे त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात चौथी अर्थव्यवस्था झाली आहे. बेटी बचाव आणि बेटी पढाव पासून सुरू असलेली हे अभियान लखपती दीदी पर्यंत येऊन पोहोचले आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. श्रीमती मु्थूलक्समि रेड्डी यांच्या विधान मंडळ सदस्य शताब्दी आणि महिला दीनानिमित्त आयोजित केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमात ‘विकसित नारी शक्ती संगम’ या दोन दिवसांच्या परिषदेत ते बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, २०२९ मध्ये तेहतीस टक्के महिला खासदार असणार आहेत आणि त्या देशाचं नेतृत्व करणार आहेत. महिलांना दिलेल्या ९९ टक्के कर्जाची परतफेड होते त्यामुळे नवीन उद्योगपती महिला तयार होतं आहेत.  यावेळी मंचावर ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री पोपटराव पवार,  राज्यसभा सदस्य रेखा महाजन,  तसेच मिरा – भाईंदरच्या प्रथम नागरिक डिंपल मेहता उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणले, ग्रामपंचायत महिलांनी स्वतः काम करावं, स्वतः निर्णय घ्यावेत हे उद्दिष्ट ठेवाव.  राज्यसभा सदस्य तसेच रामभाऊ म्हाळगी चे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की तीस वर्षांपूर्वी महिला राजकारणाचा अहवाल म्हाळगीने तयार केला होता आणि आता महिलाची राजकीय प्राशिक्षणाची जबाबदारीही म्हाळगी घेईल.  आताच्या महिला या न देवी न दासी आहेत त्यां आता भारताला नेतृत्व देणाऱ्या आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी महिला लोकप्रतिनिधी ना प्रशिक्षित करणं, स्वयंभू करणं हा उपक्रम राबविल्याच तसेच महिला बचत गटाच्या वस्तुंना तेरा जिल्ह्यात बाराही महिने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. उमेद मॉल ही संकल्पना राबवून महिला उद्यागाच सक्षमीकरण करणार असल्याचं ते म्हणाले.  दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाना राज्यातील पाचशे ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक महिला प्रतिनिधिनी उपस्थिती लावली. याठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिवामधल्या नागरिकांच्या समस्येला मिळणार दिलासा

दिवामधल्या नागरिकांच्या समस्येला मिळणार दिलासा पश्चिमेतील मातोश्री नगरात नवीन गटार कामाचा शुभारंभ दिवा : दिवा पश्चिमेतील मातोश्री नगर परिसरातील अचला, मातोश्री अपार्टमेंटसह सात ते आठ इमारतींमधील नागरिकांना गटाराच्या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागात योग्य गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचत होते. त्यामुळे नागरिकांना ये- जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. त्यानुसार या ठिकाणी नवीन गटार बांधकामाच्या कामाचे भूमीपूजन आज करण्यात आले. या भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेविका स्नेहा अमर पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, शाखा प्रमुख अश्विन चौधरी यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन गटार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिव्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

दिव्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात दिवा: रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काल सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिव्यातील हनुमान मंदिर, दातिवली गाव येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण २५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष, किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख, आदित्य पाटील आणि सचिव, स्वप्नील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व सहकार्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’

ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’ दिव्यातील बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिवा: दिवा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे स्वतःच्या जागेचा दावा करत असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ३ ते ४ इमारतीं आणि व्यावसायिक गाळ्यांवरील तोडक कारवाई सध्या स्थगित झाली आहे. संबंधित जागा मालकांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेत ठाणे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिवा रेल्वे स्थानकाजवळील जागा १९६२ साली रेल्वेने ताब्यात घेतली असून त्याबदल्यात जागा मालकांना मोबदला देण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. तरीही या जागेवर इमारती उभारण्यात आल्याने त्या अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये गणल्या जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून संबंधित इमारतींना नोटीस बजावत त्या १५ दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यानंतर तोडक कारवाई करण्याचे नियोजनही करण्यात आले होते. नोटीस मिळाल्यानंतर रहिवासी आणि जागा मालकांनी रेल्वेला उत्तर सादर केले होते. त्यानंतर रेल्वेच्या मालमत्ता विभागाकडे याबाबत सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या इमारती अनधिकृत असल्याचे नमूद करत १५ दिवसांत कारवाई करण्याचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, या निर्णयाविरोधात ऍड. निखिल वाडीकर आणि ऍड. कस्तूर पाटील यांनी ठाणे न्यायालयात अपील दाखल केले. या अपीलावर झालेल्या सुनावणीत ठाणे न्यायालयाने रेल्वेच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे प्रस्तावित तोडक कारवाई तात्पुरती थांबली असून पुढील सुनावणीपर्यंत रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ठाणे: सक्षम अधिकाऱ्याने संपूर्ण चौकशीअंती दिलेले जात प्रमाणपत्र लबाडीने रद्द केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सेवकाळातील फायदे नाकारणाऱ्या आणि त्यांच्या सेवेत अडथळे आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या शासकीय धोरणाच्या विरोधात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्र (ऑफ्रोह) संघटनेतर्फे सोमवार, ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे यांनी दिली. यासंदर्भात ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे म्हणाले, जबाबदार अधिकाऱ्याने पूर्ण चौकशी करून दिलेले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र हेतूपुरस्सर लबाडीने रद्द करण्यात आली. अशा रद्द झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाने अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २८.४.२५ रोजी नियमित आणि स्थायी झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करता येणार नसल्याचा निर्णय दिला. पण अधिसंख्य पदावर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेवेतील फायदे नाकारत त्यांना अडचणीत आणले जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध म्हणून संघटनेच्या पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ९ मार्च रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जात  प्रमाणपत्र बाबत खोटे आक्षेप घेऊन पदोन्नती साठी पात्र असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नती नाकारली जात आहे. याशिवाय सेवकाळातील १०, २० आणि ३० वर्षानंतर मिळणारे आश्र्वासित प्रगती योजनेचे लाभ न देणे, मृत झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना सेवानिवृत्त वेतन नाकारणे, आंतर जिल्हा बदली न देणे, काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून वेतन लाभ नाकारणे,  सेवासमाप्ती कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात खाजगी शिक्षण संस्थाकडून  होत असलेली दिरंगाई, आणि इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी हे आंदोलन होणार असल्याचे रोहित तरे यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऑफ्रोहच्या ठाणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष रोहित तरे, ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा निर्मला पाडळकर, सचिव हिरामण सोनावणे, कार्यकारिणी सदस्या प्रिया खापरे, दयानंद कोळी, नरेश खापरे, घनश्याम हेडाऊ, नंदनवार ,अजय कोळी,प्रकाश कोळी,अर्जुन मेस्त्री,राकेश डोलकर, स्मिता भोईर, रेखा पाटील, राजेंद्र दांडूक, सुरेश नाखवा,चंद्रशेखर ठाणेकर यांनी केले आहे.

दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार

शहापूर बिबट्या शिकार प्रकरण दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार १५ नखं हस्तगत अविनाश उबाळे ठाणे- शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या  बिबट्याच्या शिकारी प्रकरणी टोळीतील दोन जणांना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे.तथापी बिबटयाच्या हत्येप्रकरणी टोळीतील आणखी तीन संशयित आरोपी हे फरार असून हत्या करण्यात आलेल्या बिबटयाची १५ नखं जंगलातून हस्तगत करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे बिबटयांची क्रूरपणे शिकार करुन नंतर मृत बिबट्यांच्या अवयवांची लाखो रुपयांना तस्करी करणारं हे एक भलं मोठं रॅकेट ठाणे जिल्हयात कार्यरत असल्याचा अंदाज या घटनेमुळे आता वर्तविण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात वनकर्मचाऱ्यांना वाशाळा वनपरिक्षेत्रातील ढाकणे,चिंध्याचीवाडी,कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत अवस्थेत बिबट्या आढळुन आला होता.शिकारी टोळीने या बिबट्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करुन बिबट्याच्या पायाचे पंजे तोडून नखे काढून घेतली होती.अवयवांची तस्करी करण्यासाठी बिबट्याची अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि बिबट्याच्या शिकार प्रकरणी लागलीच शहापूर वनविभागाने गुन्हा दाखल करत वेगाने तपासाची सुरू हलविली असता या घटनेतील दोन संशयित आरोपींना चौवीस तासांच्या आत अटक करण्यात वनविभागाला यश आले.जेरबंद केलेल्या या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी तपास पथकातील वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी केली असता बिबट्याच्या शिकारी मध्ये आणखी तीन जणांचा समावेश असल्याची कबूली पकडलेल्या दोन आरोपींनी दिली.व मृत बिबट्याची नखं जंगलात एका दगडाखाली लपवून ठेवल्याची माहिती त्यांनी चौकशी दरम्यान दिली दरम्यान ही माहिती मिळताच हत्या झालेल्या बिबट्याच्या पायांची एकूण १५ नखं जंगलातून तपास पथकातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हस्तगत केली आहेत.दरम्यान बिबट्याच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना १६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांनी  माहिती देताना सांगितले.टोळीतील आणखी तीन फरार झालेल्या आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.फरार झालेल्या आणखी तीन संशयित आरोपींना पकडल्यानंतर बिबट्याच्या हत्येचे खरे कारण आणि तस्करीचा संपूर्ण उलगडा होणार असल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.