Category: ठाणे

Thane news

कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा तोडण्याचे आदेश

कल्याण : डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला दिवा बाजुने कोंबड्यांच्या खुराड्यासाठी बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसात हा खुराडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम बाजुला भूमाफियांनी हरितपट्ट्यावर बेकायदा बांधकाम करून तेथे एक बेकायदा बांधकाम केले होते. या ठिकाणी निवासी वस्ती सुरू करण्यासाठी भूमाफिया प्रयत्नशील असल्याचे दृश्य होते. परंतु, या बांधकामात कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांना समजताच त्यांनी या खुराड्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करून हा खुराडा तात्काळ पालिका आणि रेल्वेने तोडून टाकावा अशी मागणी केली होती. अतिशय लपूनछपून करण्यात आलेले हे बेकायदा बांधकाम ‘लोकसत्ता’ ठाणे सहदैनिकाने उघडडकीला आणले आहे. आयुक्त डाॅ.इंंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांंनी या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बुधवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम श्रीकांत पाटील या भूमाफियाने या भागातील हरितपट्टा नष्ट करून बांधला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांंगितले. या बेकायदा बांधकामाला कोपरमधील पश्चिम मंडळातील एका पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी आहेत. कोपर मधील एका स्थानिक ज्येष्ठ राजकीय नेत्याने मात्र या बेकायदा बांधकामाला कडाडून विरोध केला आहे. उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांनीही या बेकायदा बांधकामाची पाहणी केली असल्याचे समजते. रेल्वे स्थानकाजवळ कोंंबड्याचा खुराडा सुरू झाला तर कोपर रेल्वे स्थानक भागात कोंंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी पसरेल. फलाटावर प्रवाशांना उभे राहणे मुश्किल होईल आणि परिसरातील रहिवाशांंनाही या दुर्गंधीचा त्रास सहन होणार होता. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना स्वताहून हे बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पालिकेकडून हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करून पाडकामाचा खर्च प्रशासन वसूल करील, अशी तंबी साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना दिली आहे. हे बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी भूूमाफियांची एक फळी गेल्या काही दिवसांंपासून सक्रिय आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यावरील बेकायदा बांंधकाम संबंधितांंना स्वताहून काढून घेण्याची सूचना केली आहे. स्वताहून हे बांधकाम तोडले नाहीतर पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात हे बेकायदा बांधकाम भुईसपाट केले जाईल. तसे नियोजन करण्यात आले आहे. राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)

‘सूर्या’चा पाणीपुरवठा जुलैपर्यंत?

भाईंदर : सूर्या धरण पाणी योजनेतून मिरा-भाईंदर शहराला येत्या जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. वीजपुरवठ्याअभावी हा पुरवठा नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाणार होता. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते, मात्र आता वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढून जुलैपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन ‘एमएमआरडीए’कडून मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिरा-भाईंदरसह वसई-विरार शहरासाठी एमएमआरडीए ‘सूर्या धरण पाणी योजना’ राबवत आहे. पहिल्या टप्प्यात वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे व दुसऱ्या टप्प्यात मेपर्यंत मिरा-भाईंदर शहराला २१८ दशलक्ष लिटर पाणी देण्यात येणार होते; परंतु मिरा-भाईंदर शहराला पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या स्रोताच्या जागी १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होणे आवश्यक आहे व त्यासाठी स्वतंत्र केबल टाकावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीकडून हे काम सुरू करण्यात आले आहे; परंतु प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. परिणामी, मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा मेऐवजी नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाणार होता. यासंदर्भातील सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने १२ एप्रिल रोजी ‘मिरा-भाईंदरला ‘सूर्या’चे पाणी लांबणीवर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि शहर अभियंता दीपक खांबित यांनी ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुग्दल यांची गुरुवारी (ता. २५) भेट घेतली व मिरा-भाईंदर शहराला लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्याबाबत विनंती केली. त्यावर ‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेली सर्व कामे जूनपर्यंत पूर्ण होतील व वीजपुरवठ्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्येवर मार्ग काढून जुलैपर्यंत मिरा-भाईंदरच्या हद्दीवर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन मुग्दल यांनी दिले. या दरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेने चेणा ते हटकेश या दरम्यानच्या जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली. त्यामुळे आगामी जुलैपर्यंत मिरा-भाईंदरच्या नागरिकांना पाणीटंचाईतून कायमची सुटका मिळण्याची अपेक्षा आहे. धरणात ४५ टक्के पाणीसाठा मिरा-भाईंदरला बारवी आणि आंद्रे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही धरणातील पाणी उल्हास नदीत येते व तेथून स्टेम प्राधिकरण व ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून मिरा-भाईंदरला पुरवठा केला जातो. सध्या या दोन्ही धरणांत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी दोन महिने म्हणजेच जूनपर्यंत मिरा-भाईंदरच्या नागरिकांना पाण्याच्या बाबतीत दिलासा मिळाला आहे. शटडाऊन घेतल्यासच पाणीटंचाई स्टेम अथवा एमआयडीसी या दोघांपैकी एकाने देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेतला, तरच शहरात दोन दिवस पाणीटंचाई निर्माण होते. एरवी मात्र नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.   सूर्याचे पाणी शहरात वितरित करण्यासाठी चेणा ते हटकेश जलवाहिनी अंथरण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांतच वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. – दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका

अखिल भारतीय कोळी समाजाची कार्ल्यात विशेष सभा

ठाणे : अखिल भारतीय कोळी समाज – दिल्ली, महाराष्ट्र शाखेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार २८ एप्रिल रोजी श्री क्षेत्र  एकविरा देवी संस्थान कार्ला येथे होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने संस्थेच्या वाटचालीसंदर्भात चर्चा होणार आहे. याशिवाय संघटनेच्या राज्य आणि जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या विविध समस्या, मुद्दे यावर यावेळी चर्चा होणार असल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  केदार लखेपुरिया यांनी सांगितले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केदार लखेपुरिया म्हणाले भारतीय राज्यघटनेने कोळी समाजाला दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्याबाबतीत राज्यशासनाने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. या अन्यायाच्या विरोधात संघटनेने नेहमीच लढा दिला आहे. राज्यातील अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेश सरकारप्रमाणे नोकरीत संरक्षण द्यावे. केंद्र सरकारने पारंपरिक मासेमारीला कृषी दर्जा दिला आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करावी. मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड विनाविलंब वितरित करण्यात यावे. स्थानिक स्वराज संस्थांनी कोळी महिलांनाच मासे विक्री परवाना  द्यावा , त्यांना गटई (चर्मकार) कामगाराप्रमाणे स्टॉल उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे केलेल्या प्रयत्नाचा या बैठकीत आढावा घेला जाईल.

शिंदेसेनेसह काँग्रेसची मागणी

नागरिकांवर लादलेला पाणी पुरवठा लाभकर रद्द करण्याची मीरारोड – अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नागरिकांवर केली नाही सांगायचे आणि नंतर मागून नवीन कर आकारणी करून थेट बिलात पाठवून नागरिकांना झटका द्यायचा असा प्रकार मीरा भाईंदर महापालिकेने चालवला असून पालिकेच्या पाणीपुरवठा लाभ करास आता शिंदेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक , आमदार गीता जैन , काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे आदींनी विरोध करत कर रद्द करण्याची मागणी केली आहे . लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असून कोणालाही  विश्वासात न घेता असा कर लागू करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.  अचानक कर लागू केल्याने नागरिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे . महापालिकेच्या या मनमानी निर्णयाला आमचा विरोध असून प्रशासनाने तात्काळ कर रद्द करावा अन्यथा पालिके विरुद्ध संघर्ष करू असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी लेखी पत्रा द्वारे दिला आहे . पाणीपुरवठा लाभकर  त्वरित रद्द करुन नव्याने मालमत्ता देयके नागरिकांना वितरित करण्याची मागणी काँग्रेस चे जिल्हा प्रवक्ते व प्रदेश प्रतिनिधी प्रकाश नागणे यांनी महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडे केली आहे. गेल्या वर्षात पालिकेने अश्याच प्रकारे जनतेवर १० टक्के इतका रस्ता कर लादला होता .  शहरवासीयांना मूलभूत सेवासुविधा मिळत नाहीत. उधळपट्टी , मनमानी दराने टेंडर देणे , अनावश्यक कामे करणे पासून अनेक घोटाळे करून पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या प्रशासनाने नागरिकांच्या माथी मात्र सातत्याने करवाढीचा वरवंटा चालवला आहे . महापालिका प्रशासनसह राज्यातील भाजपा – शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सरकार आणि त्यांचे स्थानिक नेते ह्याला जबाबदार असून त्याचा काँग्रेस निषेध करत असल्याचे नागणे यांनी म्हटले आहे. आमदार गीता जैन यांनी देखील प्रशासनाने आर्थिक अपव्यय टाळून काटकसर करावी . केवळ नागरिकांवर नवीन कर लादणे व करवाढ करणे हे चालणार नाही . अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नाही सांगून गोडगोड प्रसिद्धी खायची  आणि नंतर गुपचूप मागच्या दाराने नागरिकांवर करवाढ लादून त्यांचा विश्वासघात करायचा हे योग्य नाही . गेल्या वर्षी १० टक्के रस्ता कर लावण्यासह अन्य करत वाढ केली असता आता या वर्षी आणखी एक कर लावून लोकांवर आणखी कराचा बोजा टाकू नये असे आ. जैन म्हणाल्या.

निर्भिड, पारदर्शकपणे लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी दक्षतेने काम करावे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे ठाणे : ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी दि. 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. येत्या 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरूवात होणार असून भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षक हे ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून सर्व पथकांना सतर्कपणे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात आचारसंहिता पथक, दक्षता पथक, व्हिडीओ चित्रिकरण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक, भरारी पथक, स्थिर देखरेख पथक, तसेच आयकर विभाग, अबकारी कर विभाग, 24×7 कॉल सेंटर, माध्यम कक्ष यासह निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च सर्व पथकांनी यापुढील काळात अतिशय बारकाईन प्रत्येक प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. तसेच खर्च निरीक्षकांनीही उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता संबंधित पथकाने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी आचारसंहिता भंगाची तक्रार येईल, तेथे तातडीने गुन्हे दाखल करावे. . निवडणुकीच्या कालावधीत अवैध रक्कम पकडणे, तिचा पंचनामा करणे, दारू, अन्य अवैध पदार्थ ताब्यात घेऊन दंडात्मक तथा प्रसंगी फौजदारी कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात यावे, अशा सूचनाही श्री. शिनगारे यांनी दिल्या. सर्व मतदारसंघातील एक खिडकी कक्षातून राजकीय पक्ष व उमेदवारांना आवश्यक ते परवाने देताना दक्षता घ्यावी व परवानगी मागणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल व कोणत्याही प्रकारे त्याचा भंग होणार नाही, यासाठी पोलीस विभागाने बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात पार पडले, यासाठी सर्वच यंत्रणांनी जबाबदारीने कामे करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिल्या.

कपिल पाटील यांच्या प्रचाराचा शहापूर तालुक्यात झंझावात

शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी बुधवारी दिवसभर शहापूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. तर वासिंद येथील सुमारे ६०० कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले) आणि कुणबी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध प्रचार करीत नागरिकांबरोबर संवाद साधला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कार्याबरोबरच कपिल पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची माहिती दिली जात आहे. पुढील उज्जवल भविष्यासाठी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला वासिंद येथून सुरूवात करण्यात आली. गावागावांमध्ये कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. वासिंद, आसनगाव, चेरपोली, आटगाव, खर्डी, पळशीण, बिरवाडी आदी भागात स्थानिक राजकीय पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तींबरोबरच ग्रामस्थांशी संवाद साधला. तर शहापूर येथे बुद्धीजीवी वर्ग असलेल्या डॉक्टर, वकील, व्यापारी आणि सिंधी, तेली, बोहरा, नाभिक समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पळशीण येथे छोटी रॅली काढून सभा झाली. या दौऱ्यात या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरौडा, भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरनक, नंदकुमार मोगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर सासे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख विजय भेरे आदींची उपस्थिती होती. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

ठाणे शहरातील बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघ अंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली सदर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी २५ ठाणे लोकसभा मतदार संघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या. तसेच मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला माहितीपट व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केलेले आवाहन तसेच मतदानासंदर्भात इतर जनजागृती कार्यक्रम चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे – ग.दि.कुलथे

राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, सुदाम टाव्हरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष इंजि. मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुनिल चव्हाण, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री.पंडित राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. रामेश्वर पाचे, जि.प.चे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेताजी मुळीक, शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्राची चिवटे, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत, माजी सहायक संचालक श्रीकांत बाभूळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसेच अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित आहेत. महासंघाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक कुलथे यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांचे कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले. महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, सातवा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यासह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचे काम बांद्रा येथील जागेत सुरू झाले आहे. या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने यात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाप्रमाणेच वेतन आयोग, महागाई भत्ता, बालसंगोपन रजा, खंड दोन नुसार वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीविरुद्ध कायदा तयार करणे, नवीन निवृत्ती वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणे अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्या आहेत. महासंघामुळे शासकीय अधिकाऱ्यांना लाभ होत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महासंघाची शक्ती आणखी वाढविण्यासाठी हातभार लावावा. यासाठी जिल्हास्तरावरील समन्वय समिती मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनीही महासंघाच्या वतीने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अनेक सुविधा मिळाल्याचे सांगितले. यापुढील काळातही महासंघाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण केंद्राचा निधी जमा करण्यासाठी महासंघाच्या वतीने अँप विकसित करण्यात आला असून या अॅपद्वारे सदस्यांना निधी जमा करून त्याची पावती घेता येणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी या अॅपद्वारे ऑनलाईन निधी द्यावा, असे आवाहन श्री. भाटकर व श्री. सानप यांनी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना केले.ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुदाम परदेशी व कार्याध्यक्ष अविनाश सातपुते यांनी महासंघाचे काम आणखी वाढविण्यासाठी व संघटन चळवळ मजबूत करण्यासाठी तसेच महासंघाच्या कल्याण केंद्राच्या निधीसाठी जिल्हा समन्वय समिती भरीव योगदान देईल, असे आश्वासन दिले. ठाणे समन्वय समितीचे सरचिटणीस मनोज शिवाजी सानप यांनी प्रास्ताविकात जिल्हा समन्वय समितीच्या कामकाजाची व बैठक आयोजनामागील भूमिका मांडली. उपाध्यक्ष मोहन पवार यांनी सूत्रसंचालन केले.जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी ११ हजार रुपयांचा निधी श्री. कुलथे यांच्याकडे सुपूर्द केला तर श्री. सानप यांनी ऑनलाईन ११ हजार रुपये जमा करून आपले योगदान तात्काळ दिले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. कुलथे यांनी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांना महासंघाच्या वतीने प्रकाशित केलेली वार्षिक डिरेक्टरी – २०२४ भेट दिली.

निष्काम भावनेतून मदत करणारा कर्मचारी हेमंत सपकाळ

ठाणे : जगात चांगली माणसे  वावरत आहेत म्हणून  हे जग चालत आहे.त्याचे जवलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हा सामान्य रुगणालयातील कर्मचारी हेमंत सपकाळ हे आहेत.रुग्णालयात येणाऱ्या गरजूंना निष्काम भावनेतून मदत करत असतात ही त्याची ओळख आहे. हे काम इथेच न थांबवता प्रवास येता – जाता गरजूंना मदत करत असतात. दि.24 एप्रिल 2024 रोजी श्रीम. सुलोचना गायकवाड वय 72 व 12 वर्षीय नातू सोबत अंबरनाथ वरून पुण्याला निघाले होते.दोघे अंबरनाथ वरून लोकन ने कर्जत स्टेशनला पोहोचले. पुण्याला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेस गाडीची वाट बघत होते. ट्रेनमध्ये चढताना त्यांची चुकून कपड्याची बॅग प्लॅटफॉर्म न. 1 ला विसरली. ट्रेन लोणावळ्याला पोहचत असताना त्या आजीच्या लक्षात येते की, एक कपड्याची बॅग दिसत नाही. ती ट्रेन मध्ये इतरत्र शोधत होती. त्यावेळेस आजीच्या बाजूच्या सीट वर बसलेले हेमंत सपकाळ यांच्या लक्षात ही बाब आली असता, त्यांनी कर्जत रेल्वे पोलिस आर. पी. एफ. श्रीम. वर्षा गुंजाळ यांना भ्रमध्वनीद्वारे संपर्क केला. सर्व घटना त्यांनी वर्षा गुंजाळ  यांना सांगितली. त्यांनी जळद गंतीने  त्याचे सहकारी होमागार्ड  कर्मचारी यांच्या मदतीने प्लॅटफॉर्म न. 1 वरून ती बॅग शोधून काढली. बॅगचा फोटो पाठवला असता फोनवरुन ती बॅग त्याच आजींचीच आहे याची शहानिशा केली. त्यानंतर त्यांनी स्वतः ती बॅग  सायं. 5 वा कर्जत वरून  नांदेड पनवेल गाडीने घेऊन आल्या तोपर्यंत त्या आजींना श्री. सपकाळ यांच्या सांगण्यावरून लोणावळा स्टेशनला वाट पाहण्यास सांगितलेले होते. काही वेळा नंतर नांदेड पनवेल गाडी साय. 5.45 वा लोणावळा स्टेशन ला आली व आर. पी. एफ. श्रीम. वर्षा मुंजाळ मॅडम नी त्या आजींना फोन करून गाडीमध्ये ती बॅग परत केली. ती बॅग मिळताच त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले व तीने दोघांचे पण मनापासून धन्यवाद मानले. श्री. हेमंत सकपाळ  व वर्षा गुंजाळ  यांनी केलेल्या मदतीचा सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

आदिवासी क्रांती सेनेच्या लढ्याला यश ठाणे – भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली होती.  हे  स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतर करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिवीर  राघोजी भांगरे यांना दि.2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे ब्रिटिशांनी फाशी दिली होती. ह्या महान क्रांतिवीरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी स्मारक उभारण्यात आले होते. परंतु अनेक वर्षांपासून ह्या स्मारकाची दुरवस्था झाल्याने ते अडगळीत पडले होते. या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे,  यासाठी महाराष्ट्र आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भांगरे, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे,  अशी मागणी केली होती. त्यानंतर  तत्कालीन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्मारक परिसराची पाहणी करून तत्कालीन कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना  हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे स्मारक सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवून ठाणे कारागृहातील स्वांतत्र्य लढ्याचा इतिहास लिखीत स्वरूपात फलकावर लावण्यात याव्यात , अशी मागणी अनिल भांगले यांनी केली होती. अखेरीस आदिवासी क्रांती सेना, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान,व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाली. त्यानुसार या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले होते. आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या २ मे २०२४ रोजी राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना याच नूतनीकृत स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे, असे आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी सांगितले.