Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय १८ फेब्रुवारी रोजी भिवंडी तालुक्यातील सरवली येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी व…

छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना

छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहा. आयुक्त अनुराधा बाबर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई :  पीएमबाथ अँड बोट क्लब ट्रस्टच्यावतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चर्नी रोड २८ फेब्रुवारी व १ मार्चला मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई जिल्ह्याला संलग्न असलेल्या क्लब मार्फत खेळाडूंनी आपली नावे शुक्रवार २० फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे नोंदवावीत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण अशोक गायकवाड नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: सकाळी ९ वा. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते, उपमहापौर दशरथ भगत व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्यानंतर नेरूळ सेक्टर १ येथील राजीव गांधी उड्डाणपूलाजवळील चौकात स्थापित शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौर महोदयांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेवक रविंद्र इथापे, सुरेश शेट्टी, अंजली वाळुंज, भाऊ भापकर, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे, नेरूळ विभागाच्या सहा.आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, उमेश पाटील, प्रवीण गाडे,पंढरीनाथ चौडे आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवताली आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलेली होती. तसेच जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच चौकांच्या चारही बाजूंना विद्युत दीपमाळांची रोषणाई करण्यात आलेली आहे. पुतळ्यांच्या सभोवताली लक्षवेधी रोषणाई करण्यात आलेली आहे. वाशी येथे पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत प्रसारित करून मानवंदना देण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांची तसेच युवक – युवतींची लक्षणीय उपस्थिती होती. विविध शाळांनी तसेच शिवप्रेमी संघटनांनी आपल्या परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवज्योतीसह पदयात्रा काढून, शिवरायांचा जयजयकार करीत अनोखी मानवंदना अर्पण केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या नामघोषात सारा परिसर निनादला होता. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी चौकात काढलेली छत्रपती शिवरायांची रांगोळी लक्षवेधी होती. अनेकांनी रांगोळी समवेत सेल्फी छायाचित्रे काढली. विशेषत्वाने तरूणाईने चौकातील शिवचरित्रशिल्पकृतींना भेट देऊन शिवरायांचा चरित्रपट जयंतीनिमित्त अनुभवला. शिल्पाकृती वास्तूच्या वरील बाजूस असलेल्या घुमटांवर लावलेल्या शिवरायांच्या विविध भावमुद्रा असणा-या छायाचित्रांमुळे चौकातील वातावरण भारलेले होते. नेरूळ येथील चौकात नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवप्रभूंचा सिंहासनारूढ पुतळा स्थापित करण्यात आलेला असून त्याठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. शिवरायांच्या पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीला केलेली आकर्षक पुष्पसजावट लक्षवेधी होती. दोन्ही ठिकाणी दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, पोवाडे यांचे ध्वनीक्षेपकाव्दारे सादरीकरण होत असल्याने शिवरायांच्या नावाचा गजर नवचैतन्य निर्माण करणारा आहे.

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अनिल ठाणेकर ठाणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजयंती उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू” या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या ‘माय भारत, मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या उपस्थितीत ही रथयात्रा ठाणे शहरातून मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यादरम्यान तलाव पाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नियोजन भवन प्रांगणात ‘अश्वमेध प्रतिष्ठान इंटक ठाणे चॅप्टर’ यांच्या सौजन्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रदर्शनातील प्रत्येक वस्तूची बारकाईने माहिती घेतली आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केल्याबद्दल अश्वमेध प्रतिष्ठानचे कौतुक केले. या प्रदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्यक्ष शिवकालीन युद्धनीती आणि साहित्याचा अनुभव घेता आला.नियोजन भवन येथे पार पडलेल्या मुख्य सांस्कृतिक सोहळ्यात ‘शिव शंभू गाथा’ या टीमने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासात नेले. पोवाडे, गोंधळ, जागरण आणि विविध शौर्यगीतांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनपटातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत करण्यात आले. सादरीकरणातील जिवंतपणा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक भारावून गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ युद्धापुरते मर्यादित नसून ते एक उत्तम व्यवस्थापक आणि रयतेचे राजे होते. आज आपण शॉर्ट नोटीसवर आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असतानाही नियोजन हॉलमध्ये इतका सुंदर कार्यक्रम करू शकलो, हे टीम वर्कचे यश आहे. शाहीर आणि कलाकारांनी मांडलेला अफजलखान वध आणि शाहिस्तेखानाची फजिती हे प्रसंग बघताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर व उर्मिला पाटील, पोलीस उपआयुक्त (वाहतूक विभाग) पंकज शिरसाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश पाटील, अमोल कदम, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, लेखाधिकारी उमेश कुमावत, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहायक गिरीश काळे, सागर यादव तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भारत स्काऊट, गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी चे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलीस दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने करण्यात आली.

जुन्नर-शिवनेरी विकासाला प्राधान्य, किल्ले संवर्धन आणि पर्यटन सर्किट उभारणीचा निर्धार -एकनाथ शिंदे

जुन्नर-शिवनेरी विकासाला प्राधान्य, किल्ले संवर्धन आणि पर्यटन सर्किट उभारणीचा निर्धार -एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असूनशिवनेरी विकासाला प्राधान्य, किल्ले संवर्धन आणि पर्यटन सर्किट उभारणीचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथे केला. किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या आदर्शांचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार-आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषातून संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी प्रजेला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी राज्य उभारले. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा आणि पराक्रम यांच्या जोरावर त्यांनी काळाच्या पुढे विचार करणारे शासन दिले. आज आपण ज्या विकास मॉडेलचा विचार करतो, त्याचा पाया महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी घातला होता. अर्थव्यवस्था, जलव्यवस्थापन, शहर नियोजन, पायाभूत सुविधा, पर्यावरण यांचा त्यांनी दूरदृष्टीने विचार केला. मोहिमेतून आर्थिक लाभ झाला की त्यांनी किल्ले उभारणीसाठी वापर करून राज्य बळकट केले. शिवराई चलन निर्माण करून स्वतंत्र आर्थिक व्यवस्था उभी केली, धरणे-कालवे बांधले, घाटरस्ते विकसित केले आणि आरमार उभारून सामर्थ्य वाढवले.महाराज शेतकऱ्यांवर जिवापाड प्रेम करणारे राजे होते. मावळे युद्धासाठी सीमोल्लंघन करून जात आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीची कामे करत, अशी शेतकरी-सैनिक संकल्पना त्यांनी निर्माण केली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी कठोर आज्ञा त्यांनी दिली होती. त्यामुळे “अन्नदाता बळीराजा हा मायबाप आहे” हीच भूमिका आजच्या सरकारची असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवनेरी व परिसरातील जुन्नर भागाच्या सर्वांगीण विकासाला सरकार प्राधान्य देणार असून स्थानिक मागण्या गांभीर्याने विचारात घेत आवश्यक सुविधा उभारल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट उभारणे, स्वच्छता-संवर्धन मोहिम राबवणे आणि ऐतिहासिक वारसा जपणे यावर सरकार भर देत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गड-किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धन मोहिमाही हाती घेतली जाणार आहे. मराठा लष्करी लँडस्केप म्हणून ११ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी किल्ल्यांच्या जतनासाठी व्यापक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितलेस्वदेशी आणि आत्मनिर्भरता हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे मुख्य तत्त्व होते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा मंत्र देशाला महासत्ता बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल. महायुती सरकारने लाडकी बहीणसह विविध लोककल्याणकारी योजना राबवून महिलांना आत्मसन्मान व आत्मनिर्भरता देण्याचे काम सुरू केले आहे.शिवरायांच्या गनिमी काव्याचा अभ्यास जगभर केला जात असून दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात त्यांच्या युद्धनीतीवर अभ्यासक्रम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. भूगोलाची जाण, दूरदृष्टी आणि युद्धकौशल्यामुळे त्यांनी बलाढ्य शक्तींना नमवले आणि आजही त्यांचे विचार प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात. विकसित भारताच्या निर्मितीसाठी आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी शिवरायांचा आदर्श महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.“आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत. प्रत्येकाने महाराजांचा किमान एक गुण अंगीकारला तर स्वाभिमानी, सुरक्षित आणि बलशाली महाराष्ट्र घडेल,” असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि जय शिवरायच्या घोषणांनी शिवनेरी दुमदुमून गेला.

  नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

  शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात

शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात प्रशासकीय मान्यतेसाठी सुधारीत प्रस्ताव सरकारला सादर  अविनाश उबाळे ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नामपाडा धरणाचे काम सुरू झाले असून या धरणाचा सरकारी अंदाजपत्रकीय खर्च सुरुवातीला ९ कोटींवरून ३८ कोटींवर तर आता या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६६ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचला आहे.या नामपाडा धरणाच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता व वाढीव निधी मिळावा यासाठी जलसंपदा विभागाने राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. शहापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर किन्हवली जवळ नामपाडा नावाचा धरण प्रकल्प राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने २००९ सालापासून हाती घेतला आहे.संपूर्ण मातीचे काम असलेल्या या धरणाला केवळ स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती,परंतु सुरुवातीला कासव गतीने सुरू असलेले धरणाचे काम वर्षभरातच रखडून पडले.वन विभागाच्या परवानग्या अपूर्ण राहिल्याने वन विभागाने धरणाचे काम बंद पाडले होते.आजमितीस या धरणाचे फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे.या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण ३ हजार ५३३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.हे धरण पूर्ण झाल्यास धरणाच्या डाव्या कालव्यातून २५५ हेक्टर क्षेत्रात सिंचन होणार आहे.सुरुवातीला केवळ ९ कोटी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च ३८ कोटी ९८ लाख त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आता तब्बल ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च पोहोचला आहे.आजमितीला या धरण प्रकल्पासाठी १७ कोटी ७२ लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला असून गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या या बहुचर्चित नामपाडा प्रकल्पाला राज्य सरकारने पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला आहे.सध्यास्थितीला धरण प्रकल्पाचे काम जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे.नामपाडा धरण प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर या धरणातून शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील सावरोली,कानडी,नांदगाव,खरीवली,आपटे या गावांसह वेलकड़ी,गांगणवाडी,वडाची वाडी,हिरव्याची वाडी,नामपाडा,टाकीची वाडी,मधली वाडी,रिकाम वाडी,उंबरवाडी,डोंगरी,कातकर वाडी या आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांना बारमाही शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी उपलब्ध होणार आहे.असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.यंदा मे महिन्याच्या अखेरीस धरणाच्या मुख्य बांधावरी मातीचा भराव करणे व तलावाच्या बाजूकडीलदगडी पिंचिगचे काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.सु.शहाणे यांनी माहिती देताना सांगितले.

  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज!

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता होणार ‘दहा पदरी’ हरिभाऊ लाखे नाशिक :  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी द्वारका ते नाशिकरोड या नाशिक-पुणे रस्त्याचे दहा पदरीकरण केले जाणार आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरद्वारे भूसंपादनाचा निर्णय महापालिकेने घेतला असून, रस्ता क्षेत्राचे डिमार्केशन करत ३५ जागामालकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. नाशिक शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून अंडरपास तयार केला जात आहे. या कामाला सुरुवात झाली असून, चौकातील वाहतूक अन्य मागनि वळविण्यात आली आहे. तीन महिने काम सुरू राहणार असल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना भविष्यातील गरज आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहनांची वाढणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या बांधकाम विभागाने एकूण २७६ कोटी रुपयांच्या खर्चातून द्वारका ते नाशिकरोड रस्ता दहा पदरी करण्याचा प्रस्ताव न्हाईला सादर केला आहे. न्हाईने त्यास हिरवा कंदील देत हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देणे गरजेचे असल्यामुळे महापालिकेने रुंदीकरणासाठी आवश्यक रस्त्याच्या डाव्या बाजूकडील क्षेत्राचे डिमार्केशन करत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मौजे नाशिक शिवारातील स.नं. ८४७/१/१-१/२/१/१ नगररचना योजना क्रमांक २ पैकी मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याने डाव्या बाजूने बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राकरिता एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील विनयम क्रमांक ११.२ नुसार हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) / संलग्न उर्वरित जागेत चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मोबदल्यात बाधित क्षेत्र मनपाच्या ताब्यात देण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा मनपाकडून संबंधित जागामालक तसेच शासकीय यंत्रणांना बजावल्या आहेत. जागामालकांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर मिळविण्यासाठी वास्तुविशारदांमार्फत मनपास प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार आपल्या प्रस्तावावर नियमोचित निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने जागामालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.