पिकांचे मोठे नुकसान
ठाणे : काल रात्री साडेसातच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. किन्हवली,शेणवा व डोळखांब परीसरात अनेक घरांची छप्परे उडाली असून आंबा बागायतदार,काकडी, भेंडी आदी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टीचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
आपटे येथील जिल्हा परिषद शाळा, माणेखिंड येथील अनिल सपाट, काशिनाथ गोडांबे,कानडी- झापवाडी येथील दौलत धर्मा शिद, शिरवंजे येथील उत्तम बांगर, लक्ष्मण लातार,सावरोली येथील गणेश आराज यांची राईसमिल,टिकबाईपाडा आदी गावांतील अनेक आदिवासी ,शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरांची,गोठयांची छप्परे उडाली असून काही घरे कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
घरातील कपडे, धान्य,गृहपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणत नासधूस झाली आहे.गुरे, ढोरे व अनेक जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजवाहक तारा तुटून रस्त्यांवर पडल्या होत्या, त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. काकडी,भेंडी,घोसाळे, कारले,घेवडा आदी.
रब्बी पिके व आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.कच्च्या आंब्यांचा पडलेला खच बघून शेतकरी त्याकडे हताशपणे बघत होते. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून बधितांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
