राजेंद्र साळसकर

मुंबई: दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबर पशूपक्ष्यांनाही  जाणवू लागला आहे. विशेषता: उंचावरून उडणाऱ्या घारीसाठी कडाक्याचे ऊन जणू काही त्यांच्या जीवाला मारकच ठरत आहे. उन्हाच्या जबरदस्त तडाख्याने माणसांबरोबर पशू-पक्ष्यांचीही  लाहीलाही झाली असून प्रत्येकजण आपल्या परीने त्यावर उपाय शोधत आहेत. म्हणून एप्रिल मे महिन्यातील कडक उन्हाच्या दिवसात पशू पक्ष्यांच्या बचावासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेतर्फे  करण्यात आले आहे. उष्माघातात  पशु -पक्षी संरक्षणार्थ  प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. ‘स्पॅरोज शेल्टर’ संस्थेच्या स्वयंसेवकांनी महिनाभरात जवळपास १५० ते २०० उष्माघाताने आजारी पक्ष्यांवर उपचार केल्याची माहिती संस्थेच्या प्रवक्ताने दिली आहे.

‘स्पॅरोज शेल्टर’ ही संस्था गेली १५ वर्षे पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नरत आहे. उन्हाळयाच्या दिवसांत पाण्याअभावी व उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येत असल्याचे ओळखून संस्थेच्या  स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी घरगुती व सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू केली आहे. तशाच पद्धतीने सर्वच नागरिकांनी आपल्या घरासमोर छोटया वाटीद्वारे पक्ष्यांसाठी ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे. विशेषता: घार हा पक्षी आकाशात खुप उंचावर उडते त्यामुळे त्या पक्षाला उन्हाचे जोरदार तडाखे बसल्यामुळे उष्माघातानेे असे पक्षी जमिनीवर चक्कर येऊन आढळतात. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. जास्त उष्मा असेल तर डिहायड्रेशनमुळे हे पक्षी घायाळ होतात आणि मृत्यूमुखी पडतात त्यावर उपाय म्हणून नागरिकांनी इमारतीच्या गच्चीवर मुबलक पाण्याची सोय  करावी तसेच उष्माघाताने पक्षी ,प्राणी घायाळ होऊन पडलेले आढल्यास ९८६७६३३३५५ या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे  आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ चे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *