विश्व पुस्तक दिनानिमित्त पवनसुत प्रतिष्ठानकडुन वाचन चळवळीची रुजवात
ठाणे : सण उत्सव म्हटले की, संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच हल्ली जल्लोषी धांगडधिंगा सुरु असतो. परंतु, याला छेद देत ठाणे पुर्वेकडील कोपरीतील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने ज्ञानदानाचे कर्तव्य म्हणुन हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळीची रुजवात केली आहे. विशेष म्हणजे, हनुमान जन्मोत्सवा दिवशीच आलेल्या २३ एप्रिल या विश्व पुस्तक दिनाचे औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुके ऐवजी बुक (पुस्तके) प्रदान करण्यात येणार आहेत.
कोपरीतील श्री पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी श्री सत्यनारायणाच्या महापुजेनिमित्त हजारो गोरगरिबांना अन्नदान करण्यात येणार आहे. श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्यावतीने गेली ४४ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची साग्रसंगीत पूजा-अर्चा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद (भंडारा) तर,सायंकाळी सुश्राव्य भजन-कीर्तन आणि महिलावर्गासाठी हळदी-कुंकूचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच, गतवर्षी प्रमाणे यंदादेखील हनुमान जन्मोत्सवा निमित्त वाचन चळवळीची रुजवात केली आहे. कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ (बुके) न देता वाचनीय पुस्तके (बुक) भेट देण्यात येणार आहेत. ठाण्यातील या वाचन चळवळीला बळ मिळावे यासाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे पवनसुत प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.
