नवी मुंबई : सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुका होत असून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे याकरिता ठिकठिकाणी जनजागृती मोहीमा राबवल्या जात आहेत. याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विविध माध्यमांतून अनेक लोकप्रिय व्यक्तीही प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन करीत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रानेही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदार जनजागृती मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला असून विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष आरदवाड तसेच ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्र इमारतीपासून वाशी रेल्वे स्टेशन परिसरात मतदानाचे आवाहन करणारी रॅली काढण्यात आली. यामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक आणि प्रौढ विशेष विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाले होते.

यावेळी ईटीसी केंद्रातील सहशालेय शिक्षकांनी तयार केलेले मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरिता घोषणा देण्यात आल्या आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत त्यांना 20 मे रोजीच्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. ईटीसी केंद्राचे शैक्षणिक व्यवस्थापक व अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली या रॅलीचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी आपल्या पालकांसह रॅलीव्दारे केलेल्या मतदानाविषयक जनजागृती उपक्रमाची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *