रमेश औताडे

मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघडीशिवय पर्याय नाही. असे स्पष्ट मत  दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेला ” उत्सव लोकशाहीचा २०२४ ” या  वार्तालाप मालिकेत गुरुवारी सावंत बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर उपस्थित होते.

काळबादेवी आणि भुलेश्वर सारख्या हिंदू किल्ल्यांमध्ये तसेच  भेंडी बाजार, पायधूनी आणि मस्जिद बंदर या दाट लोकवस्तीच्या मुस्लीम परिसरांमध्ये या मतदारसंघात सावंत यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.

राजकीय आघाड्यांमधील जागावाटपाच्या वाटाघाटी दरम्यान ही जागा वादाचा विषय बनली होती.  यावेळी बोलताना सावंत म्हणाले, कवाडे बंद केली तरी प्रकाश येत असतोच.तसे मी दिल्लीत असलो तरी मतदार संघाच्या गल्लीत जाऊन जनतेची कामे करत असतो. संसदेत सर्वात जास्त प्रश्न विचारणारा अरविंद सावंत आहे.  त्यामुळे मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असुन मतदार संघात प्रचारादरम्यान फक्त मशाल चीच चर्चा सुरू आहे. असे सावंत यांनी सांगितले.

गिरण्यांच्या जमिनीचा विकास, मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या जमिनीवरील विकास,बी डी डी चाळीचा विकास,  या व इतर विकासाबाबत अहोरात्र मेहनत घेत असताना सत्ताधारी सरकारने अनेक वेळा माझे प्रयत्न हाणून पाडले. मुंबईतील गगनचुंबी इमारती मधे करोडो रुपयांची घरे मराठी माणूस घेऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे असणारी लक्ष्मी कमी आहे.असे सावंत यांनी यावेळी सांगितले.

महागाई वाढल्याने सामान्य माणसांनी ९ लाख कोटी रुपये स्वतःच्या बँक खात्यातून काढले असल्याचा एक सर्व्हे नुकताच समोर आला आहे.यावरून महागाई किती वाढली आहे याची प्रचिती येत आहे. कोस्टल रोड, र्स कोर्स,पूर्व किनारा विकास, एस आर ए, बंदर विकास आदी महत्वाचे प्रकल्प पुढील टर्म मधे पूर्ण करणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *