मुंबई : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रुपांतर शनिवारी चक्रीवादळात, तर रविवारी महाचक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत या चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. मात्र, मुंबईत या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
चक्रीवादळाचा तडाखा मुंबई शहराला बसणार असल्याच्या अफवा व्हॉट्स ॲप, एक्सच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहेत. दरम्यान, चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा कोणताही परिणाम मुंबई, तसेच राज्यात पहायला मिळणार नाही. याबाबत कोणताही इशारा जारी केलेला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
