मोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात आजही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. ही सर्व शेती कामधेनूवरच अवलंबून असून त्यांच्याच माध्यमातून केली जाते. त्यामुळे शेतकरी कामधेनूला आपल्या लेकराप्रमाणे जीव लावतात. टंचाई काळात त्यांना चारा मिळावा म्हणून भाताच्या पेंढ्यांचे ऊडवे रचून ठेवलेले असतात. मात्र, मागील आठवड्यात सलग सहा दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने, पेंढ्यांचे ऊडवे भिजले आहेत. आता त्याला बुरशी येऊन तो काळा पडू लागला आहे. त्यामुळे मोखाड्यात गोधनाच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनावरांना चारा मिळावा शेतकरी धडपड करत आहेत.
मोखाड्यात खरीप हंगामाची शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. येथे यांत्रिक पध्दतीने केली जात नाही. पारंपारिक पद्धतीने कामधेनूच्या माध्यमातून च शेती केली जाते. त्यामुळे शेतकरी आपल्या कामधेनूला लेकराप्रमाणे जपतात. तालुक्यात 13 हजार हेक्टर हून अधिक खरीपाचे क्षेत्र आहे. तसेच 2019च्या शिरगणतीनुसार 21 हजार 710 जनावरांची संख्या आहे. यामध्ये दुधाळ गाई आणि म्हशींची संख्या आहे.
याच जनावरांवर फेब्रुवारी महिन्यात फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामध्ये काही जनावरांचा मृत्यू देखील झाला होता. प्रशासनाची सतर्कता आणि शेतकर्यांनी समयसुचकता दाखवुन गोधन वाचवले होते. मात्र, मागील आठवड्यात सहा दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजला आहे. चारा प्लास्टिकचे आवरण टाकुन वाचवण्याचा काही शेतकर्यांनी केला आहे. मात्र, त्याला बुरशी येऊन तो काळा पडू लागल्याने, जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊन्हाच्या काहीलीने कुठेच चारा शिल्लक नाही तर साठवलेला पेंढा ही खराब झाल्याने, शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी वणवण भटकत, तो मिळविण्यासाठी धडपड करत आहे.
शासनाने नागरीकांना 20 लिटर तर मोठ्या जनावरांना 35 लिटर, लहान जनावरांना 10 तर शेळी, मेंढ्या, कोंबडी आणि डुक्कर यांसाठी 2 लिटर पाण्याचा, टँकरद्वारे पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे माणसांसह जनावरांना ही दिलासा मिळाला आहे. पाणी मिळाले मात्र, चारा नसल्याने, आता जनावरांचे हाल आणि ऊपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे आदिवासी भागात चारा छावण्या सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
