Month: June 2024

अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी !

सलमान पठाण ठाणे : नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं बघायला मिळालं. कापूरबावडी ते बाळकूम रोडवरील कोलशेतकडे जाणाऱ्या नाक्यावर मोठया  प्रमाणात पाणी साचले आहे.  अवघ्या १ तास पडलेल्या पावसातच  इथे पाणी साचलेले दिसले. या साचलेल्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात ट्राफिक  जामचा वाहनचालकाला त्रास होत आहे. गाडी चालवताना ड्रायव्हयर्सना योग्य ती खबरदारी घ्यावी लागत आहे.  महत्वाचं म्हणजे  याठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. आणि…

राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणावर हरकती पाठवा – डॉ.प्रशांत नारनवरे

अशोक गायकवाड रायगड : राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत हरकती पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश समिती गठीत करण्यात आली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी,सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा-२०२२ च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सुचना दिनांक ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय,२८ राणीचा बाग, जुन्या सर्कीट हाऊस जवळ, पुणे-०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.om या इमेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. 0000

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती

अशोक गायकवाड* नवीमुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:२००७) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक ९३२४५६५११० असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com…

उल्हासनगरच्या नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा

उल्हासनगर :  उल्हासनगर येथील नागरिकाना गेल्या चार ते पाच दिवसापासुन दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिवळ्या रंगाचे असुन नागरिक हे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रध्न उभा ठाकला आहे.…

पहिल्या पावसानंतर भातपेरणीला सुरुवात

  डहाणू, : तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावात सोमवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटात मॉन्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन झाले. त्यानंतर मंगळवार (ता. ११)पर्यंत पावसाने विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांनी पावसाच्या पहिल्या…

क्षयरोगाने पिडीत २५ वर्षीय महिलेने दिला बाळाला जन्म

मुंबई, ता. ११: गर्भधारणेनंतर क्षयरोगाची लागण झालेल्या २५ वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन २.२ किलो इतके असून प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. सलोनी मुरूडकर असे या महिलेचे नाव असून गर्भधारणेच्या ३४ आठवड्यांनंतर त्यांना श्वास लागणे, तीव्र खोकला आणि थकवा जाणवू लागला होता. वैद्यकीय चाचणीदरम्यान महिलेला क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले. अशा स्थितीत प्रसूती करणे खूप अवघड असते. क्षयरोग हा पसरणारा आजार असल्याने आईच्या गर्भातील बाळालाही क्षयाची लागण होऊ शकते, मात्र डॉक्टरांच्या यशानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला क्षयरोगाचा संसर्ग झालेला नाही. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लालगुडी म्हणाल्या की, गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. छातीचा एक्सरे केल्यानंतर महिलेला क्षयरोग असल्याचे निदान झाले. गरोदर महिलांना क्षयरोग होण्याचे प्रमाण भारतात २१ टक्‍के आहे. क्षयरोगाचे अंदाजे प्रमाण १००० गर्भवती महिलांमध्ये २.३ आहे. गर्भधारणेदरम्यान क्षयरोगामुळे महिलेला अशक्तपणा, वेळेआधीच प्रसूती, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, प्रसूतीपूर्व मृत्यू होण्याचा धोका असतो. छातीचा एक्स-रे अहवाल आल्यानंतर लगेचच क्षयरोगविरोधी औषधोपचार सुरू करण्यात आले. या महिलेची मुदतपूर्व प्रसूती झाली, असे त्‍यांनी सांगितले. सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रिया साधारणतः १८ तास चालली. रुग्णाने २.२ किलो वजनाच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर उच्च-रिझोल्यूशन कंप्युटेड टोमोग्राफी चाचणी केली गेली. या चाचणीत आईमधील क्षयरोगाची लक्षणे नियंत्रणात आली होती.

वृक्ष प्राधिकरणाकडून १० नियंत्रण कक्ष स्थापन

वसई : पावसाळ्यात वादळी वारे वाहून सोसायट्यांतील खासगी जागेतील मोठे वृक्ष उन्मळून पडणे अथवा त्यांच्या फांद्या तुटणे आदी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिककडून प्रभाग समितीनिहाय वृक्ष प्राधिकरण विभागाचे १० नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. वृक्ष उन्मळून पडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. या वेळी अनेकदा मालमत्तेची हानी होते, रस्त्यावर झाड पडल्यास वाहतूक ठप्प होते. या वेळी महापालिकेकडून वृक्ष बाजूला करण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाते. पावसाळ्यात अशा घटना घडू शकतात, यासाठी नागरिकांना सतर्क करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र १० कक्ष तयार करण्यात आले असून संपर्क क्रमांकदेखील जाहीर केले आहेत. सोसायटीतील खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्वरित दखल घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पावसाळ्यात वृक्षांसबंधांत काही समस्या उद्‍भवल्यास नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अथवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा. नागरी समस्यांची तत्काळ उकल करण्यात येईल. – प्रियंका राजपूत, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग

‘दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका’

 राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्या होत्या. त्यात निकालानंतर ठाण्यात २ लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे. या भेटीबाबत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज राज साहेबांची भेट घेतली. सोबत माझे सगळे कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सुद्धा होते. साहेबांनी दिलखुलास गप्पा मारत दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे अशी दरारायुक्त सूचना केली. त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. राज साहेब मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न समस्या आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री मी’ काव्यसंग्रहाचे मॉरिशसमध्ये प्रकाशन

नवी मुंबई : सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये राहणाऱ्या व महिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा, कुर्ला ( प.) येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ. अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मॉरिशस येथे नुकतेच पार पडले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ इंडियन स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ मराठी स्टडीजच्या सहकार्याने स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र, अक्षर विश्व मराठी साहित्य  संमेलन ३१ मे २०२४ रोजी सब्रमणिय भारती लेक्चर थिएटर, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका, मॉरिशस येथे पार पडले. या संमेलनात मराठी गझल कार्यक्रम, काव्यगायन सादरीकरण झाले. संमेलनात प्रमुख मान्यवर डॉ.श्रीम.मधुमती कुंजुल (मराठी अभ्यास विभाग प्रमुख, मॉरिशस), श्री. रामपरताब (सी.एस.के. महासंचालक, एम्.जी. आय. अँड आर.टी.आय. मॉरिशस )  श्री.नितीन बापू (राजकीय नेते मॉरिशस), श्री.एम. के. गोंधळी (माजी शिक्षण सहसंचालक,कोल्हापूर ) डॉ. दिलीप पांढरपट्टे व श्रीम.कल्पना गवरे (अध्यक्ष, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी ) तसेच अजमेर लेखिका मंच अवाम सामाजिक सेवा संस्था या सर्वांच्या उपस्थितीत भारताच्या मुंबईतील कवयित्री सौ.अनिता मेस्त्री  यांच्या  ‘आनंदयात्री ’मी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. याच काव्यसंग्रहातील  हेचि दान या कवितेचे सादरीकरणही त्यांनी केले. श्री.रामचंद्र मेस्त्री व सौ. अनिता मेस्त्री यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आपला पहिला काव्यसंग्रह ‘आनंदयात्री मी’ मॉरिशस येथे प्रकाशित झाला याचा आनंद निश्चितच अवर्णनीय आहे; असे मनोगत उभयतांनी व्यक्त केले.

माथेरानमध्ये हातरीक्षा चालकांना ई रिक्षा सुपूर्द

  माथेरान : मागील वर्षभर ठेकेदारामार्फत ई रिक्षा सुरू असल्याने ज्या हातरीक्षा चालकांनी एक तपाहून अधिक काळ ई रिक्षा सुरू होऊन स्वतःची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी कठोर संघर्ष केला होता. अनेक आव्हाने आणि काही नेहमीच्या विरोधक मंडळींच्या विरोधाचाही सामना केला होता.अखेरीस आज एकूण वीस हातरीक्षा मालकांना पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा महिने या ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सायंकाळी चार वाजता शास्त्री हॉल याठिकाणी गावातील काही राजकीय पक्षांची मंडळी त्याचप्रमाणे सर्व ई रिक्षा समर्थक उपस्थित होते. याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, अजय सावंत, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रदीप घावरे, राजेश चौधरी,स्मिता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर केला होता.त्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका पार पाडली होती. तर राजकारण बाजुला ठेऊन गावामध्ये ई रिक्षाच्या माध्यमातून पर्यटन क्रांती होणार आहे हा दुरदृष्टिकोन समोर ठेवून कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता मनोज खेडकर, शिवाजी शिंदे यांनी ई रिक्षाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. तर काहींनी मतांच्या राजकारणापायी यातून काढता पाय घेत ई रिक्षाच्या विरोधात असणाऱ्या मंडळींना सहकार्य केले आहे आणि आजही त्यांची तीच भूमिका कायम दिसत आहे. परंतु आता अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार असल्याने हातरीक्षा चालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नव्याने दाखल झालेल्या ई रिक्षांना झेंडा दाखवून पहिल्याच दिवशी संघटनेच्या वतीने मोफत प्रवास देण्यात आला याचा पर्यटकांननी मोठया प्रमाणावर लाभ घेतला.गावात एकूण ९४ हातरीक्षा असल्याने उर्वरित ७४ हातरीक्षा मालकांना लवकरच टप्प्याटप्प्याने या ई रिक्षा ताब्यात मिळणार आहेत त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ————————————————————————– हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी या संघर्षाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. 94 हात रिक्षा चालकांपैकी 20 चालकांनी  दि.१० पासून ई रिक्षा सुरू केल्या आहेत उर्वरीत 74 हातरिक्षा चालकांना परवानगी मिळे पर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. सुनिल शिंदे, याचिकाकर्ते व सचिव श्रमिक रिक्षा संघटना —————————————————————————– ई रिक्षा आमच्या ताब्यात मिळाल्यामुळे जे समाधान आम्हा सर्व हातरीक्षा चालक मालक वर्गात आहे ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. आमच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे.या जोखडातून मुक्ती मिळून आमची पुढील पिढी तरी सन्मानाने जीवन जगू शकते. रुपेश गायकवाड –ई रिक्षा चालक माथेरान —————————————————————————- गावात अनेक मुले आजही सुशिक्षित बेकार आहेत. अजूनही उर्वरीत एकूण ७४ ई रिक्षा लवकरच येणार आहेत.त्यामुळे सर्वमिळून ९४ मालकांसह अन्य मुलांना या व्यवसायामुळे आपल्या कुटुंबाला आधार प्राप्त होणार आहे.ई रिक्षामुळे पर्यटन वाढून याच माध्यमातून गावातील सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संतोष लखन —-हातरीक्षा मालक माथेरान